टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अजगर पडणारे भारतीय, वडाळा शिवसेना शाखा, डोनाल्ड ट्रम्प आणि विजय मल्ल्या
  • Fri , 03 February 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या शिवसेना Shivsena डोनाल्ड ट्रम्प Donald Trump विजय मल्ल्या Vijay Mallya

१. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे रण तापलेले असताना शिवसेनेत बंडाळी माजली असून भाजपमध्ये घराणेशाहीमुळे धुसफूस असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील तीन मातब्बर नगरसेवकांनी भाजपची वाट धरली असून वडाळा येथे शिवसैनिकांनी आपल्याच शाखेला टाळं ठोकलं. भाजपच्या यादीत मंत्री, आमदार, खासदार यांच्या घरातच उमेदवारी दिल्याने इच्छुकांमध्ये धुसफूस वाढली आहे. त्याच वेळी मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीत मध्यस्थी करण्यासाठी गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या वेळी गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हाणामारीही झाली.

अहाहा, लोकसेवेसाठी जीवन समर्पित केलेल्या या त्यागमूर्तींची जनतेची सेवा करण्यासाठीची ही अहमहमिका पाहून जनता सुखाने डोळे मिटायला तयार झाली असेल (ती तरी दुसरं काय करू शकते म्हणा!). ही सगळी मंडळी एकमेकांमध्ये लढायचं सोडून एकमेकांशी लढायला सज्ज होतील ना निवडणुकीपर्यंत? नाहीतर लढत नेमकी कोणामध्ये आहे, हेच कळायचं नाही पब्लिकला शेवटपर्यंत.

…………………………………………

२. भारतात कसंबसं पोट भरणाऱ्या आणि दुर्लक्षाचा विषय असणाऱ्या गारुड्यांना चक्क अमेरिकेतून मागणी आली आहे. खास अजगरांना पकडण्यासाठी दोन भारतीय गारुडी फ्लोरिडाला बोलावले गेले. या दोघांना फ्लोरिडाच्या वनविभागाने जवळपास ४६ लाख रुपयांइतका मेहनताना देऊ केला आहे.

अरे देवा, आमचे आयटी इंजीनियर म्हणत असतील की, उगाच पैसे खर्च करून, मेहनत घेऊन सुशिक्षित आणि प्रशिक्षित झालो. यापेक्षा अजगर पकडायला शिकलो असतो, तर झटपट अमेरिकावारी घडली असती. शिवाय, फ्लोरिडामध्ये जोवर अजगर आहेत, तोवर ट्रम्पतात्याही यांना निर्वासितांचे कठोर कायदे लावून हुसकावू शकत नाहीत.

…………………………………………

३. हुंडा का घेतात याचे धक्कादायक स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या एका पाठ्यपुस्तकात देण्यात आले आहे. मुलगी कुरूप असेल किंवा अपंग असेल, तर तिचं लग्न जुळवणं कठीण होतं. त्यामुळे हुंडा द्यावा लागतो, असं महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाने प्रमाणित केलेल्या १२वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात म्हटलं आहे. हुंड्याच्या प्रथेच्या अनेक कारणांमध्ये हेही कारण आहे, असं पुस्तकात म्हटलं आहे.

आता यावर असा गदारोळ सुरू झालाय, जणू महाराष्ट्रात अजूनही सतीप्रथा जिवंत आहे, असंच या पुस्तकात म्हटलं असावं! हुंडा हे या समाजातलं भीषण वास्तव आहे. हुशार, सुस्वरूप, अव्यंग मुलींनाही लग्नात हुंडा द्यावाच लागतो अजून. त्यात मुलगी नाकीडोळी डावी असेल आणि तिच्यात काही व्यंग असेल, तर हुंड्याला पर्यायच उरत नाही. हे वास्तव बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात मांडलं, तर त्यात चूक काय? धडा बदलून समाजातली कुप्रथा संपणार आहे का?

…………………………………………

४. भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपये थकवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या म्हणतो की, प्रसारमाध्यमांच्या खेळपट्टीवर यूपीए आणि एनडीए यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात माझा फुटबॉल झाला आहे.

परदेशात ऐषोआरामात राहात असल्यामुळे मल्याभाऊंची साहित्यिक प्रतिभा अजूनही शाबूत आहे तर. विजयराव, आयुष्याच्या सामन्यात फक्त चीअरगर्ल्सबरोबर गुड टाइम्स व्यतीत करायला मिळत नाही, ज्यांना आपण खेळवतो असा आपल्याला भास होत असतो, ते आपल्याला खेळवत असतात, हे नंतर कळतं. लवकरच तुम्हाला हवा गेलेला फुटबॉल कसा असतो, तेही कळणार आहे.

…………………………………………

५. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑस्ट्रेलियाशी केलेल्या निर्वासितांबाबतच्या करारावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यात फोनवरून संभाषण सुरू असताना खटका उडाला आणि ट्रम्प यांनी चक्क फोन अर्ध्यातच ठेवून दिला.

जगाचं नेतृत्व करण्याची कुवत असलेले नेते अमेरिकेने असेही अपवादानेच निवडले आहेत, पण अमेरिकेला काहीही परवडतं म्हणून त्यांनी केस पिकलेलं एक शिशुवर्गातलं बाळ जगातल्या सर्वशक्तिमान पदाच्या खुर्चीत बसवावं, हे जरा जास्तच झालं. आता डायपर बदलत राहावे लागणार सतत.

…………………………………

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......