टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अर्थसंकल्प २०१६-१७ (चित्र - सतीश सोनवणे)
  • Thu , 02 February 2017
  • विनोदनामा टपल्या अरुण जेटली Arun Jaitley डोनाल्ड ट्रम्प Donald Trump शिवसेना Shiv Sena मनसे Maharashtra Navnirman Sena

१. निश्चलनीकरणाचा त्रास थोड्या काळासाठीच भोगावा लागणार आहे. मात्र, त्याचे फायदे अधिक आहेत. चांगल्या हेतूने केलेले काम कधीच अपयशी ठरत नाही, असं महात्मा गांधी म्हणायचे. : अरुण जेटली

संदर्भ सोडून का होईना गांधीच उद्धृत करावे लागतात, हे फार बोलकं आहे. मात्र, चांगल्या हेतूने केलेल्या घोडचुकांची भलामण करण्यासाठी गांधींनी हे वचन नक्कीच उद्गारलं नसेल. चांगल्या हेतूने अर्थव्यवस्थेच्या नरड्यावरून सुरी फिरवण्याचा उद्योग असाही अपयशी ठरलेला नाहीच- विकासदरामधली अनावश्यक घट हेच त्याचं 'यश' आहे. 

…………………………………

२. भाजपबरोबरची युती संपुष्टात आल्यानंतर काँग्रेस आणि मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल होणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून आणखी काहीजण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. मात्र, या ‘आयारामां’मुळे निवडणुकीची उमेदवारी मिळवू पाहणाऱ्या शिवसैनिकांवर गंडांतर येऊ लागल्याने शिवसैनिक संतप्त होऊ लागले आहेत.

नेत्यांना कोहिनूर आणि कार्यकर्त्यांना वडापाव, हे सूत्र जर इतकी वर्षं सतरंज्या उचलून पचनी पडलं नसेल, तर मग संताप होणारच. पण, त्याला अर्थ काय? निवडणुकीत निवडून येण्याची ताकद महत्त्वाची. निष्ठेबिष्ठेचं काय लोणचं घालायचंय?

…………………………………

३. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी पुन्हा एकदा माध्यमांवर बरसले आहेत. बहुतांशी माध्यमे विपर्यस्त वृत्तांकन करणारी आणि बनावट असून अमेरिकेला खात्रीलायक वार्तांकनाची गरज आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. बहुसंख्य बातम्या बनावट असतात, बहुसंख्य माध्यमं बातम्या तयार करतात, बहुसंख्य माध्यमं विपर्यस्त वृत्तांकन करणारी आणि बनावट आहेत, असे ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं.

तात्या, ही वाहिनी बनावट नव्हती, याची खात्री करून घेतलीत ना? मग ठीक आहे. बाकी तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. माध्यमं बनावट नसती आणि त्यांनी बोगस बातम्या दिल्या नसत्या, तर तुमच्याइतका बोगस माणूस सर्वशक्तिमान अमेरिकेच्या प्रमुखपदावर विराजमान होऊ शकला असता का? तुम्हीच आहात माध्यमांच्या बोगसपणाचा धडधडीत पुरावा.

४. देशातील १०००पेक्षा अधिक गावांना मोफत वाय-फाय कनेक्शन देण्याची घोषणा सरकारने केली आहे. याआधी गुगलने मोफत वाय-फाय देण्याची घोषणा केली होती. डिजिटल इंडिया आणि रोकड विरहित व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकार ही योजना लागू करणार आहे. वाय-फाय मुळे अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना संपर्काचे साधन उपलब्ध होईल, असा विचार सरकारने केला आहे.

बरोबर आहे. आज हागणदारी योग्य मोकळी जागा कोणती आहे, गावात प्राथमिक आरोग्यसुविधा नसल्याने कोणत्या वैदूशी संपर्क साधता येईल, झाडपाल्याच्या, भोंदू भगताच्या औषधोपचारांनी माणूस दगावल्यानंतर त्याच्या मयतासाठी, विधींसाठी नातेवाईकांना कसं बोलवायचं, किती मैलावरच्या ओहोळात किंवा विहिरीत टिपूसभर पाणी आहे, अशा मौलिक माहितीच्या देवाणघेवाणीची व्यवस्था असलीच दुर्गम गावांत.

……………………………………..

५. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांसाठी केलेल्या अमेरिका प्रवेशबंदी निर्णयाचे कौतुक करताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'ट्रम्प यांच्याकडून थोडी हिंमत, थोडा देशाभिमान व चिमूटभर प्रामाणिकपणा उधार मिळत असेल तर पाहा', असा उपरोधिक टोला हाणला आहे. 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या कणखरपणाची चुणूक दाखवली आहे… पाकड्यांच्या बाबतीत जे मोदी सरकारने करायला हवे होते ते ट्रम्प यांनी एका झटक्यात करून दाखवले…' असे टीकास्त्र त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून सोडलं आहे.

ट्रम्प यांच्या या तथाकथित देशाभिमानाने अमेरिकनांच्या पोटात कसा गोळा आला आहे, हे यांच्या गावी नाही आणि अमेरिकेचं श्रेष्ठत्वच मुळात जगभरातून तिथे गेलेल्या बुद्धिमंतांच्या कष्टांतून आकाराला आलं आहे, याचीही कल्पना नाही. आता ट्रम्पकाका भारतीय आयटी व्यावसायिकांचीही अशीच हकालपट्टी करण्याच्या बेताला आहेत, तेव्हा त्या निर्णयाच्याही गौरवासाठी तयार राहा आणि मायदेशी परतणाऱ्या बांधवांच्या भवितव्यासाठी 'आयटी वडापावा'च्या हायटेक गाड्या तयार ठेवा. शेवटी राष्ट्राभिमान महत्त्वाचा.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......