टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • संदर्भ - सेना-भाजप काडीमोड (चित्र - सतीश सोनवणे)
  • Fri , 27 January 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या

१. सरकारी कार्यालयात देवदेवतांच्या तसबिरी लावण्यास आणि धार्मिक उत्सव साजरे करण्यास मनाई करणारा आदेश राज्य सरकारने मागे घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली. हा आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईही होणार आहे.

फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र राज्यघटनेच्या तत्त्वांनुसार पुरोगामी आणि सेक्युलर बनण्याचा जो एक चिमुकला धोका या आदेशाने निर्माण झाला होता, तो अत्यंत धाडसाने मोडून काढल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. राज्यघटनेच्या जागी भगव्या बासनात गुंडाळलेल्या एखाद्या पोथीची प्राणप्रतिष्ठा लवकरात लवकर केलीत की, प्रबोधनकारांच्या आत्म्याला शांतता लाभेल.

…………………………………

२. केंद्रातील मोदी सरकारचा निम्म्याहून जास्त कालावधी पूर्ण झालेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारची लोकप्रियता अद्याप कायम आहे, असे इंडिया टुडे समूह आणि कार्वे इनसाईट्स यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार दिसून आले आहे. आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) ३६० जागा मिळतील. तर संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) अवघ्या ६० जागांवर समाधान मानावे लागेल. तर अन्य पक्षांना १२३ जागा मिळतील. बहुतेक लोक नोटाबंदीच्या निर्णयावरही खूष असल्याचं सर्वेक्षणात दिसून आलं आहे.

आता निवडणुका होण्याची शक्यताच नाही. त्यामुळे सर्वेक्षण खरं की खोटं ठरतं हे कळायला काही मार्ग नाही. सर्वेक्षणात इतकी सगळी आकडेवारी छातीठोकपणे देणारे हे सर्वेक्षणकार ते कुठे केलं, किती माणसांचा त्यात समावेश होता, ही माहिती का देत नाहीत देव जाणे. शिवाय एक प्रयोग म्हणून आपल्या ओळखीच्या कोणाही दहाबारा माणसांना विचारून पाहा. ज्याला कोणत्याही सर्वेक्षणातल्या कोणा माणसाने प्रश्न विचारलाय, असा माणूस सापडायचा नाही. मग हे सर्वेक्षण करतात कुठे? चंद्रावर?

…………………………………

३. सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण चुकून तिकडे गेला असं भारतीय सेना म्हणत असताना तो वरिष्ठांशी भांडण झाल्यामुळे पाकिस्तानात आला, असा दावा पाकिस्तानी लष्कराने केला आहे. ड्युटीवरून चव्हाण यांचा वरिष्ठांशी वाद झाला होता. त्यानंतर ते चौकीतून गायब झाले होते, अशी प्राथमिक माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनीही दिली होती.

अरे देवा, आपल्याला जो जुमानत नाही, वाद घालतो, होयबा म्हणायला नकार देतो, विरोधी मत व्यक्त करतो, त्याला देशद्रोही ठरवून 'पाकिस्तानात जा'  असे फतवे काढण्याची पद्धत लष्करातही पोहोचली की काय! तिथे माणूस खरोखरच पाकिस्तानात जाऊ शकतो, हे लक्षात घेतलं नसावं बहुतेक वरिष्ठांनी.

…………………………………

४. काळवीट शिकार प्रकरणात आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या प्रकरणात आपल्याला वनविभागाने गोवलं आहे, असा दावा अभिनेता सलमान खान याने केला असून आपण निर्दोष आहोत, असा जबाब त्याने नोंदवला आहे.

उगी उगी सल्लू! तू नमोअंकलबरोबर पतंग उडवता उडवता सगळं सांगितलंयस ना? त्यांच्या सांगण्याप्रमाणेच तू पतंग उडवशील, हे सांगितलंयस ना? मग झालं तर. आता या देशात साक्षात परमेश्वरही तुझं कूस वाकडं करू शकत नाही. तू निर्दोष म्हणतोस ना, तर तू निर्दोष. उगी उगी. एखादी लँडक्रूझर हवीये का खेळायला?

…………………………………

५. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सोव्हिएत संघाने काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाला पैसे पुरवले होते, अशी माहिती सीआयएच्या अहवालातून बाहेर आली आहे. इंदिरा गांधींच्या काळात त्यांच्या ४० टक्के खासदारांना सोव्हिएत संघाने पैसे दिले होते. सोव्हिएत संघाच्या दूतावासातील अधिकारी काँग्रेस-नेत्यांना गुपचूप भेटून पैसे देत होते, असं अहवालात म्हटलेलं आहे.

सीआयएच्या अहवालात केजीबीवर आरोप नसतील, तर काय त्यांनी वाटलेल्या पैशांचे हिशोब मांडून दाखवले असतील? हा अहवाल आताच फुटावा, त्यात हेच तपशील असावेत, हे विनोदीही नाही, हास्यास्पद आहे. सीआयएच्या अधिकाऱ्यांनी जेम्स बाँडचे सिनेमे पाहिले तरी त्यांना जरा बऱ्या फिल्मी युक्त्या शिकता येतील.

……………………………….

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......