टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • संदर्भ - सेना-भाजप युती (चित्र - सतीश सोनवणे)
  • Wed , 25 January 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अमोल पालेकर Amol Palekar विनय कटियार Vinay Katiyar सुब्रमण्य स्वामी Subramanian Swamy केशवप्रसाद मौर्य Keshav Prasad Maurya एकनाथ शिंदे Eknath Shinde

१. मराठी माणूस नाटकवेडा तर मग नाट्यसंस्कृतीवर हल्ला होतो, तेव्हा कलाकारांच्या पाठीशी तो का उभा राहत नाही? -अमोल पालेकर 

पालेकरसाहेब, मराठी माणूस रंगमंचावरच्या नाटकांचा नाही, नाटकी नेत्यांच्या नौटंकीचा चाहता आहे, त्या अर्थाने तो नाटक'वेडा' आहे. धादान्त खोट्यावर विश्वास ठेवायला लावणं, हे जर अभिनयाचं कौशल्य असेल, तर त्यात नेतेच अधिक सरस असतात, हे तुम्हीही मान्य कराल, नाही का?

………………………..

२. काँग्रेसमध्ये प्रियांका गांधी यांच्यापेक्षाही अनेक सुंदर महिला नेत्या आणि अभिनेत्री असताना पक्षाने त्यांना स्टार प्रचारक म्हणून का नेमले असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे नेते विनय कटियार यांनी उपस्थित केला आहे.

या विधानावरून कसलाही वादंग करण्याचं काहीच कौशल्य नाही. जो तो आपल्या अनुभवातून आणि आपल्या पक्षाच्या धोरणांच्या चौकटींतून बोलतो. ज्या पद्धतीने कटियार यांच्या पक्षात स्टार प्रचारक निवडले जातात, तीच पद्धत जगातली एकमेव पद्धत आहे, अशी त्यांची समजूत झाली असेल, तर त्यात त्यांचा दोष काय?

………………………..

३. 'टाइम्स नाऊ'चे माजी पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या आगामी वृत्तवाहिनीच्या नावाला भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्य स्वामी यांनी आक्षेप घेतला आहे. गोस्वामी लवकरच ‘रिपब्लिक’ नावाची वृत्तवाहिनी सुरू करणार आहेत. मात्र, हे नाव संविधानातील कायद्याचा उल्लंघन करणारे आहे, असं स्वामी यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

अर्णबदादा कोणासाठी वाहिनी काढणार आहेत, याची स्वामींना कल्पनाच नाही की, ते असताना अर्णबची गरजच काय, अशा असूयेतून ते हे करतायत? कारण काहीही असो; अर्णबच्या अहंमन्य, उद्धट, उर्मट आणि आचरट पत्रकारितेपासून भारतीय जनमानसाचा काही काळासाठी बचाव होईल, हा फायदाच झाला ना!

………………………..

४. रामलल्लाचे मंदिर दोन महिन्यात बनणार नाही. आता निवडणुकीनंतरच राम मंदिर उभारणार आहोत. राम मंदिर आमच्या आस्थेचा विषय आहे. : भाजपचे उत्तर प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य

या विधानानंतर उत्तर प्रदेशात थंडीच्या लाटेवर मात करणारी हास्याची लाट उसळली असेल. रामलल्ला हा आस्थेबिस्थेचा नाही, भाजपच्या मत-गल्ल्याचा विषय आहे, हे उत्तर प्रदेशातल्याच नव्हे तर देशभरातल्या सगळ्याच रामभक्तांना समजून गेलं आहे. आता दुसरं काही फोडता आलं तर पाहा, म्हणजे पुढची पंचवीस वर्षं नवं दुकान थाटता येईल.

…………………………………………….

५. मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षारक्षकाने टोल कर्मचाऱ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. शिंदे यांना व्हीआयपी एन्ट्री न दिल्याने या रक्षकाने ही राडेबाजी केली. मात्र, आपल्या सुरक्षारक्षकाने फक्त काचेवर हात ठेवला होता; योगायोगाने ती काच फुटली, असा दावा शिंदे यांनी केला आहे.

शिंदेसाहेब, लोकांना सांगून उपयोग नाही हो! आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि माननीय साहेबांच्या प्रेरणेने आपण कुठेही हात न ठेवता किती काचांचा भुगा होतो, याची कल्पना ज्याची फुटली त्यालाच येणार- बाकीच्यांना या दैवी शक्तीचा महिमा काय कळणार?

editor@aksharnama.com

Post Comment

Vidyadhar Pokharkar

Wed , 25 January 2017

टिक्कोजीरावांच्या एकापेक्षा एक सरस टपल्या खाऊन तरी संबंधित व्यक्ती सुधारतील अशी आशा बाळगू या!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......