दादा फोन हातात घेऊनच उभे राहिले, समोरच्या खिडकीचा पडदा दूर केला, दिवस उजाडू लागला होता.
सदर - वास्तव-अवास्तव
संजय
  • उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी
  • Fri , 05 June 2020
  • सदर वास्तव-अवास्तव स्वातंत्र्यवीर सावरकर Swatantryaveer Savarkar अजित पवार Ajit Pawar भगतसिंग कोश्यारी Bhagat Singh Koshyari

म्हटलं तर वास्तव, म्हटलं तर अवास्तव. म्हटलं तर शक्य, म्हटलं तर अशक्य. म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं. म्हटलं तर कल्पना, म्हटलं तर सत्य. आजच्या कल्पना उद्याचं वास्तव असू शकतात किंवा उद्याचं वास्तव आजच्या कल्पना. अशा अनेक शक्य-अशक्य घटनांचा वेध घेणारं हे नवं-कोरं साप्ताहिक सदर...

..................................................................................................................................................................

सकाळचे साडेपाच वाजले होते. अजितदादांच्या लेखी ती मध्यरात्रच. फोन खणाणला. आगीच्या बंबाची घंटी वाजल्यासारखा दणदणीत आवाज घरात पसरला.

दादांना वाटलं कोणी तरी चुकून गजर लावून ठेवला. काय कटकट आहे असं म्हणत त्यांनी घड्याळावर थापटी मारली. तरी घंटी थांबली नाही. दादांच्या लक्षात आलं की फोन वाजतोय.

दादा जवळ जवळ झोपेतच होते.

फोन टेबलावर होता. दादा अंथरुणातून उठून टेबलाकडं गेले आणि त्यांनी फोन घेतला.

“प्रणाम” पलीकडून.

दादांना हे प्रणाम प्रकरण कळेना. त्यांच्या मस्तकात तिडीक गेली. आधी येवढ्या पहाटे फोन आणि त्यातून प्रणाम.

“काय प्रणामबिणाम लावलंय? कोण बोलतंय?” दादांनी अत्यंत त्रासिक आणि चिडलेल्या स्वरात विचारलं.

“मी भगतसिंग बोलतोय.” पलीकडून.

‘आता हा कोण भगतसिंग? स्वर्गात याला स्वस्थ बसवत नाही काय! कशाला माझी झोपमोड करतोय.’ मनात आलं पण ओठावर आलं नाही.

“अहो भगतसिंग, ही काय फोन करायची वेळ आहे काय? काय झालंय काय? मुंग्यांनी मेरूपर्वत गिळला काय?” अजितदादा फोन आदळणारच होते तेवढ्यात पलीकडचा माणूस म्हणाला, “अहो भगतसिंग म्हणजे भगतसिंग कोश्यारी, माननीय राज्यपाल महोदय.”

अजितदादांच्या मनात आलं - हा स्वतःला माननीय म्हणवून घेतो. काय विनोदी माणूस आहे! अहो माननीय आणि महोदय हे इतरांनी म्हणायचं असतं. या येड्याला हेही कळत नाही… आता या महोदयांना काय हवंय?

दादा सावरले. म्हणाले, “बोला सर. जरा झोपेत होतो. सॉरी. तुमचा आवाज ऐकायची सवय नाहीये, त्यामुळं पटकन ओळखलं नाही. त्या दिवशी तुम्ही मला शपथ दिली होती. तेव्हा दोन शब्द बोलला होतात तेवढंच. त्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं असतं, ते आम्हाला फडणवीसच सांगत असतात. त्यामुळं तशी तुमची थेट भेट होत नाही. माफ करा. काय सेवा करू?”

दादांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. उद्धवचं सरकार पाडणार आणि पुन्हा आपल्याला सरकार करायला बोलावणार काय? पण आता उपमुख्यमंत्रीपदावर भागणार नाही. थेट मुख्यमंत्रीपद किंवा संयुक्त मुख्यमंत्रीपद. क्षणाच्या हजाराव्या भागात दादांनी निर्णय घेऊन टाकला.

 “अहो आज, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरसाहेबांचा जन्मदिवस.” कोश्यारी.

“ठीक आहे. मी ऑफिसमध्ये पोचल्यावर त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदन करेन.” दादा. फोन खाली ठेवण्याच्याच बेतात होते.

“अहो मी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतोय. ते समुद्रात उडी मारलेले, तुरुंगात कोलू चालवणारे क्रांतिकारी सावरकर.” कोश्यारी.

“कळलं हो मला. मी ते सर्व वाचलंय. लहानपणी मी त्यांनी काढलेल्या प्रभात फेरीत भाग घेतला होता, ‘वंदे मातरम’ त्यांनीच मला शिकवलं, स्वातंत्र्यलढ्यात जनतेनं भाग घेतला, तो त्यांच्याच सांगण्यावरून, गांधीजींची थोरवी त्यांनीच जनतेला सांगितली. ते बरे आहेत ना? मी बोलेन त्यांच्याशी. त्यांना कशाची जरूर असेल तर सांगा. व्यवस्था करेन.”

“अहो मी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलतोय. त्यांच्यासाठी आता काही करायची जरुरी नाही, ते त्या पलिकडं गेले आहेत.” कोश्यारी.

“कळलं हो मला. किती वेळा तेच तेच सांगत आहात. मला त्यांच्याबद्दल अतोनात आदर आहे. फार मोठे आहेत ते. असा माणूस झाला नाही. त्यांचं जे आहे ते त्या ठिकाणी स्वातंत्र्याला असलेलं योगदान जे आहे ते फार मोठं आहे. त्यांना स्वातंत्र्यसैनिक कोट्यातून फ्लॅट हवाय का? त्यांना म्हणावं की अर्ज करा. लगेच सँक्शन करून टाकतो.” दादा.

कोश्यारी गरगरले.

“अहो, स्वातंत्र्यवीरांनी कधी कोणाकडं काही मागितलं नाही. ब्रिटीश सत्तेपुढं त्यांनी कधीही तोंड वेंगाडलं नाही. पण ते जाऊ द्या. तो मुद्दा नाही. त्यांचा आज जन्मदिवस आहे.”

“अहो कोश्यारीसाहेब, मघापासून ही एकच गोष्ट तुम्ही मला सारखी सांगत आहात. मला कळलीय. मी माझ्या सेक्रेटरीला डायरीत लिहायला सांगतो. फोन ठेवू?” दादा.

“अहो मी काय बोलतोय, ते नीट ऐकून घ्या. सावरकरांबद्दल तुम्हा काँग्रेसवाल्यांची वेगळी मतं आहेत ते मला माहीत आहे. पण तो मुद्दा नाही. त्यांचं देशावर प्रेम होतं, देश स्वतंत्र व्हावा यासाठी त्यांनी कठोर तुरुंगवास सोसला हे तर तुम्हालाही मान्य असणार. पण तो मुद्दा नाही. आज त्यांचा जन्मदिवस आहे.” कोश्यारी.

काय कटकट आहे यार, असं दादा स्वतःशीच बोलले.

“त्यांना काय हवंय ते सांगायला ते तयार नाहीत. तुम्ही तरी एकदाचं सांगून टाका आणि विषय संपवा. परवा काकांच्या बोलण्यात काहीतरी विषय होता. काका म्हणत होते की, फडणविसांचंच सरकार केंद्रात असूनही सावरकरांना भारतरत्न दिलेली नाही. भारतरत्न काही आम्ही महाराष्ट्र सरकार देऊ शकत नाही. तुम्हाला शिफारसपत्रं हवंय का? लगेच देतो. पण विषय संपवा.” दादा.

दादांच्या घरातली आणखी एक-दोन माणसं येऊन दादांच्या बाजूला उभी राहिली. ती माणसं बुचकळ्यात.

दादा फोन हातात घेऊनच उभे राहिले, समोरच्या खिडकीचा पडदा दूर केला, दिवस उजाडू लागला होता.

कोश्यारी काकुळतीला आले.

“तुम्हाला मागण्याच कळतात तर मागणी करतो. आज मंत्रालयात जाऊन सावरकरांच्या फोटोला हार घाला.” कोश्यारी.

“हात्तिच्या. येवढी बारीकशी गोष्ट सांगण्यासाठी किती फूटेज खाल्लं तुम्ही राव. फोटो पाठवून द्या. हार घालून टाकू.” दादांनी सुस्कारा टाकला.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

देश उभारणीच्या कार्यात पटेल प्रांतिक पातळीवरच्या नेतृत्वाला आपले सहकारी मानत आणि देशासमोरील आव्हाने कशी एकमेकांमध्ये गुंतलेली होती, याचे पक्के भान त्यांना होते (उत्तरार्ध)

एकूण चार वेळा -  पहिल्यांदा १९४८ सालच्या उत्तरार्धात, मग एप्रिल १९४९मध्ये, तिसऱ्यांदा १९४९च्या उत्तरार्धात आणि चौथ्यांदा जून १९५०मध्ये - सरदार पटेलांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिले. चारही वेळा नेहरू परदेशात असताना पटेल यांच्याकडे ही जबाबदारी आली होती. नेहरू दर पंधरवड्याला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायचे. पंतप्रधान म्हणून काम पाहात असताना पटेलांनीदेखील तेच केले. अशी दोन पत्रं या खंडात समाविष्ट केलेली आहेत.......

महात्मा गांधींची हत्या पं. नेहरू आणि सरदार पटेल या दोन नेत्यांसाठी फार मोठा धक्का होता. दोघांनी मतभेद बाजूला सारून एकदिलाने काम करायचे ठरवले, पण... (पूर्वार्ध)

आपल्या आणि पटेल यांच्यातील मतभेदांबाबतचे एक सविस्तर टिपण नेहरूंनी ६ जानेवारी १९४८ रोजी म. गांधींना सादर केले. हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि आर्थिक धोरण यांच्याबाबत आपल्यात मतभेद आहेत, ही बाब त्यांनी या टिपणात नोंदवली. अय्यंगारांच्या भेटीचा उल्लेख करत पंतप्रधान यांना सरकारच्या कारभारातील बाबींची चौकशी किंवा देखरेख करण्याचा अधिकार आहे किंवा नाही, हा मुद्दा उपस्थित केला. तसा तो नसेल तर पंतप्रधान हे केवळ नामधारी ठरतील.......

प्रांतिक प्रश्न आणि संस्थानांच्या विलिनीकरणाच्या दिशेने : या पाचव्या खंडातील पत्रव्यवहार वाचल्यावर राज्यकारभार किती गुंतागुंतीचा असतो, हे लक्षात येते

१९४७-१९४८मध्ये तर परिस्थिती अधिक बिकट होती आणि त्यामुळे गुंतागुंत अधिक वाढली होती. शिवाय गृहमंत्रीपदावर आणि सरकारात दुसऱ्या क्रमांकास्थानावर असल्यामुळे पटेलांना असंख्य बाबींबाबत निर्णय घ्यावे लागत. शिवाय सत्ताधारी पक्षाचे ते एक वजनदार नेते असल्यामुळेदेखील त्यांना पक्षांशी निगडित बाबीही हाताळाव्या लागत असत. हा पत्रव्यवहार वाचताना या बाबी त्यांनी समर्थपणे हाताळल्या, असेच म्हणावे लागते.......

देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताचा काळ आणि स्वांत्र्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांचा काळ हा किती धकाधकीचा होता, हे या खंडातील पत्रव्यवहारावरून कळते

एकूणच देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असताचा काळ आणि स्वांत्र्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांचा काळ हा किती धकाधकीचा होता, हे या खंडातील पत्रव्यवहारावरून कळते. देशासमोरील अडचणी किती तीव्र आणि गुंतागुंतीचा होत्या, हेही लक्षात येते. शीर्षस्थ नेतृत्वाला कोणकोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे लागे, हे ध्यानात येते. अष्टावधानी राहून आपल्या शीर्षस्थ नेत्यांनी आपल्या परीने या अडचणींचा सामना केला. त्याबद्दल त्यांचे ऋण .......