करोना व्हायरसच्या काळातील सात पापीलोक आणि त्यांची सात पापकर्मे
संकीर्ण - व्यंगनामा
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 01 April 2020
  • संकीर्ण व्यंगनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

१) ज्यांना करोनाविषयी धड माहिती नव्हती किंवा ज्यांनी करोनाविषयीची माहिती धड समजून घेतली नाही, आणि तरीही विशेष म्हणजे त्यांच्यापैकी कुणीही इतरांना ‘करोना प्रवचन’ दिलं नाही किंवा ‘करोना माहात्म्य’ सांगितलं नाही, अशी माणसं ही खरी पापी जमात आहे. त्यांच्या या दुर्गुणांमुळेच ‘करोना’ने सगळ्यांची अवस्था ‘डरो ना…’ अशी करून टाकलीय. त्येंका रवळनाथ सोडणार नाय, घट्ट धरून ठेवणार हाय!

२) ज्यांनी व्हॉटसअ‍ॅपवर बदाबदा येऊन पडणारा कचरा, करोना व्हायरसच्या काळात, त्यातही लॉकडाऊनच्या काळात नेहमीप्रमाणे इतरांच्या अंगणात ढकलून (‘फॉरवर्ड’) दिला नाही; सोप्या किंवा प्रचलित भाषेत सांगायचं तर ज्यांनी करोनाविषयीच्या फेक न्यूज नेहमीच्याच सवयीनं, आंधळेपणानं, गंमत म्हणून आपल्या मित्र-मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, सोसायटीच्या, ऑफिसच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवर पाठवल्या नाहीत, असे लोक खरोखरच धन्य आहेत! लॉकडाऊन संपताच त्यांचा शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार केला जाणार आहे. असं कुठं असतं का राव? कुठं फेडाल ही पापं तुम्ही?

३) ज्या प्रतिभावान कवींनी शक्य असून, पुन्हा पुन्हा सुचून, कोऱ्या कागदांनी हाका घालून, करोनाशी संबंधित सगळ्या शब्दांनी हात जोडून विनंती करून, प्रतिभेच्या हाकांकडे दुर्लक्ष करून, रोजच्या रोज टीव्हीवरील दृश्यं पाहून, वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून, व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवरील खोट्यानाट्या ‘करोना ष्टोऱ्या’ वाचून, सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्रभर करोनासोबत राहून आणि मरणाच्या केवळ कल्पनेनंच कापरं भरूनही, आतापर्यंत करोनाविषयी एकही कविता लिहिली नाही, ते खरे कपाळकरंटे लोक म्हटले पाहिजेत. या कवीलोकांना एकत्र जमवून रायगडावर नेलं जाणार आहे. आणि तेथील टकमक टोकावरून त्यांचा कडेलोट केला जाणार आहे. अशा दळभद्री लोकांच्या कर्मदरिद्रीपणामुळेच आजवर मराठी साहित्याचं अतोनात, अपरिमित नुकसान झालेलं आहे! यांसारख्या लोकांच्या आळशीपणामुळेच आजवर मराठी साहित्य नोबेल पुरस्काराच्या तोडीचं होऊ शकलेलं नाही.

४) जे स्वत: बाहेर बोंबलत फिरले नाहीत, ज्यांनी मित्राला बाईकवर मागे बसवून पोलिसांचे रट्टे त्यालाच पडण्याची सोय केली नाही, जुगाड करून सिगारेटची पाकिटं व दारूच्या बाटल्या मिळवल्या नाहीत आणि आपलं नेहमीचं वेळापत्रक काटेकोरपणे, विनासायास पार पाडलं नाही, अशा अभागी, दुर्दैवी लोकांना लॉकडाऊन संपताच समाजातून बहिष्कृत केलं जाणार आहे, नाहीतर वाळीत टाकलं जाणार आहे. यांच्या अशा या पापकर्मांमुळेच तुमच्या-आमच्या जगण्यातली सगळी ‘एक्साईटमेंट’ निघून गेलेली आहे!

५) ज्यांनी ‘जनता कर्फ्यु’च्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता बेंबीच्या देठापासून आरोळ्या ठोकल्या नाहीत, जिवाच्या आकांताने थाळ्या बडवल्या नाहीत, जोर देऊन देऊन टाळ्या वाजवल्या नाहीत, अध्यक्ष महोदय त्यांचं लॉकडाऊन पुढचे सहा महिने चालूच ठेवलं जाणार आहे. त्यांना अशीच अद्दल घडवण्याची गरज आहे.

६) ज्यांनी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून स्वत:ला कुटुंबासह अक्षरक्ष: आणि शब्दश: घरात कोंडून घेतलं नाही, नजरकैदेत असल्यासारखं स्वत:ला आणि स्वत:च्याच कुटुंबाला वागवलं नाही, ‘मी आणि माझं कुटुंब जगलं पाहिजे, बाकीचे मरोत नाहीतर जगोत’ असं मानलं नाही, स्वत: योग्य ती काळजी घेत इतरांनाही त्यासाठी उद्युक्त केलं, अशा ‘देशद्रोही’ लोकांची रवानगी थेट पाकिस्तानात केली जाणार आहे. विमानसेवा पूर्ववत सुरू होताच त्यांच्या तिकिटांची सोय केली जाणार आहे.

७) जे लॉकडाऊनमुळे मिळालेल्या सुट्टीचा वापर नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईमवर वेगवेगळे तथाकथित दर्जेदार सिनेमे वा बेवसीरिज पाहण्यासाठी, आजवर या ना त्या कारणांनी वाचायची राहून गेलेली पण वाचलीच पाहिजेत अशी पुस्तकं वाचण्यासाठी न करता, घरातली जाळी-जळमटं काढण्यासाठी, कपाटांची-भिंतींची सापसफाई करण्यासाठी, बायकोला स्वयंपाकात मदत करण्यासाठी, मुलांसोबत खेळण्यासाठी करतात, त्यांना लॉकडाऊन संपताच भरचौकात उभं करून चाबकाचे १०० फटके लगावले जाणार आहेत.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......