टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, मुलायम-अखिलेश यादव, अरुण जेटली आणि जयललिता
  • Fri , 30 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi अरुण जेटली Arun Jaitley मुलायमसिंह यादव Mulayam Yadav अखिलेश यादव Akhilesh Yadav जयललिता Jayalalitha

१. नोटाबंदीच्या कठोर निर्णयानंतर निर्माण झालेली आर्थिक दु:स्थिती जवळपास संपुष्टात आल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा. हा दावा करताना त्यांच्या भाषणाचा सूर ‘हत्ती गेले अन शेपूट राहिले’ असा होता.

भले रे शाब्बास, खोटे बोलावे तर ते असे रेटून बोलावे. ‘चहापेक्षा किटली गरम’ यातलाच हा प्रकार आहे. तुमच्या पक्षाच्या पंतप्रधानांनी ५० दिवसांचा वायदा केला होता. ते पूर्ण झाले. आजची स्थिती ही ‘शेपूट गेले आणि हत्ती राहिला’ अशी आहे हो!

................................................

२. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी तालकटोरा स्टेडियममधील टाउन हॉल कार्यक्रमात दुपारी तीन वाजता बोलतील, उद्या सायंकाळी साडेसात किंवा आठ वाजता देशाला उद्देशून भाषण करतील आणि येत्या सोमवारी लखनौत होणाऱ्या भाजपच्या महत्त्वाकांक्षी मेळाव्यात भाषण करतील. नंतरच्या दोनपैकी एका भाषणात ते अजून एक धमाका करणार असल्याची चर्चा चालू आहे.

मोदी पंतप्रधान आहेत की, भाषणबाज? रोजच्या रोज भाषण ठोकत बसत असतील तर देशाचा कारभार कधी आणि कसा करणार? नाहीतर म्हणा, ‘द मॅन हू किल्ड इंडियन इकॉनॉमी’, हा लौकिक त्यांनी गेल्या पन्नास दिवसांत मिळवलाच आहे. आता नवीन किताब मिळवण्यासाठी नवा धमाका करावा म्हणावा!

................................................

३. नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्ष कितीही टीका करत असले, तरी हा निर्णय देशाचे व्यापक हित लक्षात ठेवूनच घेण्यात आला आहे – नरेंद्र मोदी

अगदी बरोबर आहे!  रांगेत उभे राहून लोक मरावेत, यातही देशहित आहे. शेतकऱ्यांनी मातीमोल भावाने त्यांचा भाजीपाल विकावा यातही देशहितच आहे. उद्योगधंद्यांनी कामगारकपात करावी यातही देशहितच आहे. बाजारपेठेतील खरेदी-विक्री मंदावण्यातही देशहितच आहे. उद्या तुम्ही म्हणाल की, तीन वेळा जेवण्याऐवजी लोकांनी एकवेळच जेवावे. कारण त्यातच देशहित आहे.

................................................

४. तामिळनाडू सरकार जयललिता यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मद्रास उच्च न्यायालयाने खरे कारण शोधून काढण्यासाठी त्यांचा दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात का येऊ नये असा सवाल उपस्थित केला आहे.

जयललिता याच एक गूढ होत्या, त्यामुळे त्यांच्या मृत्यूमध्ये काही गूढ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उगाच नाही त्यांच्या मृत्यूच्या बातमीने पाचशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आता त्यांचे पार्थिव तपासासाठी बाहेर काढले जाईल आणि ते परत दफन करताना अजून काही लोकांचा मृत्यू होईल.

................................................

५. विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षात उभी फूट पडली आहे. पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी बुधवारी ३२५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री असलेला त्यांचा मुलगा, अखिलेश यांनीही २३५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

यादवांची ही यादवी तशी अपेक्षेनुसारच आहे, त्यात अनपेक्षित असे काही नाही. अखिलेशला पुन्हा सत्तेत यायचे आहे आणि त्याच्या वडलांना त्याला सत्तेतून घालवायचे आहे. त्यामुळे हे असे होणे अटळ आहे.

................................................

६. सरकार भाजपचे किंवा नरेंद्र मोदींचे नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे. धार्मिक तेढ वाढविण्याचा दृढ निश्चय करून सत्तेत आलेले हे लोक ‘सब का साथ, सब का विकास’ ही निव्वळ धूळफेक करीत आहेत. या धर्मभेदी लोकांपासून समाजाचे रक्षण करण्यासाठी बंधुतेचा विचार नेटाने पुढे न्यायला हवा. – समाजवादी नेते भाई वैद्य

भाई, तुमचे सगळे बरोबर आहे. पण तुम्ही इतकी वर्षं बंधुतेचा विचार पुढे नेण्याचे काम करत होतात, त्यापासून समाजाचे किती रक्षण झाले हो? उलट तुम्ही अल्पसंख्य होत गेलात आणि समाज आहे तिथेच राहिला. मोदींच्या राज्यात पहा, समाज कसा पुढे जातोय. मग सरकार कुणाचे का असेना, त्याने काय फरक पडतोय!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......