टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अरुण जेटली, मोहम्मद शमी पत्नीसह आणि नरेंद्र मोदी
  • Wed , 28 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नोटाबंदी Demonetisation नरेंद्र मोदी Narendra Modi अरुण जेटली Arun Jaitley मोहम्मद शमी Mohammed Shami

१. वीस वर्षांपूर्वी केवळ एक टक्का लोकांकडे मोबाइल फोन होते, आता ९० टक्के लोकांकडे मोबाइल फोन आहेत, त्याचा वापर आपण आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी करायला हवा. आपल्या देशात १०० कोटींपेक्षा अधिक लोकांकडे मोबाईल फोन आहेत आणि १०९ लोकांकडे आधार कार्ड आहेत. ज्या व्यक्तींकडे एटीएम कार्ड किंवा मोबाइल फोन नाहीत, त्यांची खाती आधार कार्डाला जोडली जातील. केवळ अंगठा ठेवून भविष्यातील व्यवहार होतील. : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

निव्वळ मोबाइल फोन असले की व्यवहार सोपे होतात का? ते सगळे स्मार्टफोन असावे लागतात, त्यांच्यासाठी मोफत किंवा किरकोळ दराने विश्वासार्ह इंटरनेट सेवा अखंडित उपलब्ध असायला लागते, वीज असावी लागते. या पायाभूत सुविधांची बोंब असताना अंगठा दाखवून व्यवहार करण्याची आयडिया ‘ठेंगा’ दाखवण्यात रूपांतरित झाली नाही, म्हणजे मिळवली.

………………………………………

२. भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे तो भलत्याच धर्मसंकटात सापडला आहे. आपल्या पत्नीसोबतच्या या फोटोत तो तिच्या खांद्यावर हात टाकून बसलेला दिसतो. त्याच्या पत्नीने आखूड बाह्यांचा ड्रेस केलेला आहे. शमी मुस्लिम असल्याने त्याने आपल्या पत्नीला बुरख्यात ठेवायला हवं होतं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्याच्या धर्मबांधवांनी व्यक्त केल्या आहेत.  

शमीभाऊ, या सगळ्या धर्मबांधवांच्या अगोचर सूचना शमीच्या झाडावर टांगून ठेवा आणि पुन्हा कधीही तिकडे फिरकू नका. धर्माज्ञेची एवढीच फिकीर आहे तर मुळात यांनी फेसबुक, ट्विटर किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून दुसऱ्याच्या बायकोकडे इतकं डोळे फाडफाडून पाहायलाच पाहायला नको होतं. हराम तर तेही आहे धर्मात. आपापल्या बायकांना असा वेष परिधान करायला लावून त्यांच्यासोबत असा फोटो काढला, तर जरा जळजळ कमी होईल त्यांची. यांचं ऐकलं असतं तर सानिया मिर्झाला आतापर्यंत बुरखा पांघरून वाती वळायला बसावं लागलं असतं!

………………………………………

३. गेल्या ४० वर्षांत देशातील रोगांवर वेळीच इलाज झाला असता तर १२५ कोटी जनतेला आज रांगेत उभे राहावे लागले नसते. : पंतप्रधान नरेंद्र मोदी

भले शाबास! अर्धकच्च्या अंमलबजावणीमुळे अंगाशी आलेल्या निर्णयाचं खापर आधीच्यांवर फोडून मोकळेही झालात! असं म्हणतात की जो पडतो, तो अपयशी नसतो; कोणीतरी मला ढकललं म्हणून मी पडलो, असं सांगतो, तो अपयशी असतो. तुमच्या तथाकथित निडरपणावर भाळलेल्यांनी आता भाळावर हात मारून घेतला असेल. हळूहळू तुम्ही ब्रिटिशांपर्यंत आणि त्यामागे मुघल सत्तेपर्यंत जाल फसलेल्या नोटाबंदीचं समर्थन करण्यासाठी.

४. उरी दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने त्यांच्या सागरी हद्दीत गेलेल्या २२० भारतीय मच्छिमारांची नुकतीच सुटका केली आहे. या कृतीमुळे दोन्ही देशांमधील ताणलेले संबंध निवळण्यात मदत होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

छे हो, असं काही नाही झालेलं! पेद्रू पाकडे घाबरलेत आमच्या जहाल देशभक्तांना. आम्ही इथे पाकिस्तानी नटनट्यांवर बहिष्कार घातला, फेसबुक आणि ट्विटरवरून जो बॉम्बवर्षाव केला, त्याने हवालदिल झाले पाकडे. आम्ही सगळे फेसबुकी देशभक्त अकाउंट डिअॅक्टिव्हेट करून, लष्करी गणवेष चढवून सीमेवर आलो, तर पळता भुई थोडी होईल, हे लक्षात आल्यामुळेच त्यांना हे शहाणपण सुचलंय.

………………………………………

५. देशातील भ्रष्टाचार, काळा पैसा निपटून काढण्यासाठीच्या लढाईची आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. नोटाबंदी अमलात आली. आता केंद्र सरकारचा यापुढील घाव बेनामी मालमत्तांवर घातला जाईल. त्या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी

काळा पैसा कमावणारे, साठवणारे आणि तो पांढरा करून घेणारे, यांना जराही धक्का न लावता सर्वसामान्यांना ५० दिवस गुरासारखे वेठीला धरणाऱ्या निश्चलनीकरणाचा अनुभव पाहता, आता हक्काच्या, कष्टार्जित, वडिलोपार्जित मिळकतींवरही हे सरकार डल्ला मारणार की काय, या धास्तीने सामान्यजनांच्या डोळ्यांसमोर आताच तारे चमकायला लागले असतील.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......