टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • विराट कोहली, सिद्दरमय्या, स्मार्टफोनवरील महिला, नोटबंदी आणि स्टिव्ह फोर्ब्स
  • Tue , 27 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नोटाबंदी Demonetisation नरेंद्र मोदी Narendra Modi विराट कोहली Virat Kohli सिद्दरमय्या Siddaramaiah

१. एका सर्वेक्षणानुसार आज भारतातल्या अर्ध्याधिक लोकांकडे स्मार्टफोन आहेत. भारतीय पुरुषांच्या तुलनेत महिलाच सर्वाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवतात. महिला ८० टक्के वेळ फेसबुकवर घालवतात, असंही निदर्शनास आलं आहे.

सतत बायकांच्या हातात असतो, म्हणूनच या फोनला 'स्मार्ट' फोन म्हणतात, हे सर्वेक्षणातून स्पष्ट झालेलं नाही. शिवाय, फेसबुकच्या नावाचा आणि त्यावरच्या स्त्रियांच्या उपस्थितीचा काहीही अन्योन्य संबंध नाही, हेही स्पष्ट करायला हवं होतं.

……………………………………………

२. नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचा विकासदर अर्धा टक्क्यानं खाली येईल, असं भाकीत खुद्द रिझर्व्ह बॅंकेनं केलं असताना ‘फोर्ब्स’ मासिकाचे मुख्य संपादक स्टिव्ह फोर्ब्स यांनी या निर्णयावर कठोर शब्दांत टीका केली. सक्षम पर्यायी व्यवस्था निर्माण न करता हा निर्णय घेऊन केंद्र सरकारनं एक प्रकारे लोकांच्या संपत्तीवरच डल्ला मारला आहे, असं ते म्हणाले.

जगातल्या, देशातल्या धनाढ्य, पॉवरफुल व्यक्तींच्या याद्या छापणाऱ्या मासिकाच्या मालक-संपादकपदी एक समाजवादी, फेक्युलर, काँग्रेसी, देशद्रोही (अर्रर्र, हे दुसऱ्या देशाचे नागरिक आहेत, नाही का?) व्यक्ती असावी, हे आश्चर्यच! त्यांना भारताची शंभरेक वर्षानंतर निश्चितपणे होणारी नेत्रदीपक प्रगती आतापासूनच साहवत नाहीये असं दिसतंय.

……………………………………………

३. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा 'फोर्ब्ज इंडिया'च्या यादीनुसार देशातील सर्वांत लोकप्रिय व्यक्ती ठरला आहे. विराटने लोकप्रियतेत सलमान खान आणि शाहरुख खान या फिल्मी सिताऱ्यांबरोबर क्रिकेट जगतातील महेंद्रसिंग धोनी आणि माजी क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर या दोन मातब्बर खेळाडूंनाही मागे टाकलं आहे.

विराटचं कौतुक आहेच. पण, बातमी वाचल्यानंतर सलमान, शाहरुख, धोनी आणि तेंडुलकर यांचंच अधिक कौतुक वाटतं. सलमान आणि शाहरुख विराटच्या दुप्पट वयाचे आहेत, त्यांनी पदार्पण केलं, त्या आसपास विराटचा जन्म झाला असावा. धोनी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे आणि सचिन तर निवृत्त होऊनही बराच काळ लोटला आहे. तरीही ताज्या दमाच्या विराटच्या पिढीलाही या महानुभावांशीच तुलना करावी लागते आहे, हे त्यांचंच यश म्हणावं लागेल ना?

……………………………………………

४. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवसांनी सर्वसामान्यांचा त्रास कमी होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी ठासून सांगत असले तरी, येणारं नवं वर्षही सर्वसामान्यांसाठी नोटा‘तंगी’चं असणार आहे. ३० डिसेंबरनंतरही बँका आणि एटीएममधून पैसे काढण्यावरील मर्यादा कायम राहणार आहेत.

पंतप्रधानांच्या म्हणण्याचा नेहमीप्रमाणे विपर्यास करतो आहे बिकाऊ मीडिया. त्रास कमी होईल, असं त्यांनी म्हटलेलं नाहीचै. रांगा लावाव्या लागतील, आपलेच पैसे चोरासारखे भरावे आणि काढावे लागतील, ठिकठिकाणी रोख रकमेवाचून हात आखडेल- हे सगळं होतच राहील आता आणखी दोनेक वर्षं… नव्या वर्षात त्रास कमी होईल तो सवयीमुळे. ५० दिवसांत कशाचीही सवय लागू शकते ना निमूटपणे आज्ञापालन करणाऱ्यांना!

……………………………………………

५. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्दरमय्या यांनी मैसूरमध्ये सोबत असलेल्या एका व्यक्तीकडून बुटाच्या लेस बांधून घेतल्यानं वादाचं मोहोळ उठलं आहे. मुख्यमंत्र्यांची चरणसेवा करणारा माणूस कोणी सरकारी कर्मचारी नाही, तर सिद्दरामय्या यांचा नातेवाईक आहे, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयानं दिलं आहे.

सत्ताधीशांचे बूट चाटणाऱ्यांची देशात कुठेही कमतरता नसताना ते बांधून देणाऱ्या माणसावरून गदारोळ करायचं काहीच कारण नाही. अनेक कार्यकर्तेही आपला जन्म नेत्यांच्या चपला उचलण्यासाठीच झालेला आहे, असं समजून वागत असतात; इथं तर मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक आहे. इतक्या पॉवरफुल नातेवाईकासाठी हे काम त्याने भक्तिभावानं केलं, तर त्यात काय बिघडलं?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......