टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी, उर्जित पटेल, अजित पवार, सुरेश अडवाणी, साधू, पासपोर्ट आणि नजीब जंग,
  • Mon , 26 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi उर्जित पटेल Urjit Patel अजित पवार Ajit Pawar सुरेश अडवाणी Suresh Advani नजीब जंग Najeeb Jung

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला नोटाबंदीची घोषणा करण्यापूर्वी काही तास आधीच भारतीय रिझर्व्ह बॅंकेने नोटाबंदी लागू करण्याची शिफारस केली होती. रिझर्व्ह बॅंक आणि पंतप्रधानांनी निवडलेल्या अधिकाऱ्यांची टीम नोटाबंदीच्या तयारीसाठी काही महिने अगोदरच कामाला लागली होती, परंतु नोटाबंदी लागू करण्यासाठी आरबीआयची औपचारिक परवानगी आवश्यक असते. ती आठ नोव्हेंबरला मिळाली. आरबीआयने या घोषणेपूर्वीच साडे चार लाख रुपये किमतीच्या दोन हजाराच्या नोटा छापून ठेवलेल्या होत्या.

रिझर्व्ह बँकेची 'परवानगी' हा निव्वळ एक उपचार असतो. आता परवानगी द्या, असं सरकारने सांगितलं की रिझर्व्ह बँक हाताला हात लावून 'मम' म्हणते. त्यामुळे, हा निर्णय आधीपासूनच हितसंबंधियांना कसा ठाऊक होता, याचा उलगडा या बातमीतून होतो. त्याचप्रमाणे नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसांत, अनेक ठिकाणी दोन हजाराच्या नोटांचे गठ्ठे हातात घेतलेल्या माणसांचे फोटो आणि गठ्ठ्यांचे फोटो प्रसृत झाले होते, त्याचंही गुपित उलगडून जातं.

………………………..

२. समाजात काय चालू आहे हे कळण्यासाठी नेत्याला घरप्रपंच असणे गरजेचे असते. समाजात लोक त्या नेत्याविषयी काय बोलतात हे घरचे लोक सांगू शकतात. पण देशाच्या पंतप्रधानांना घर प्रपंचच नसल्याने त्यांना समाजात काय चालू आहे हे कळत नाही. : अजित पवार

अजितदादा, तुम्ही घरप्रपंचवाले. तुम्हालाही घरचे काही ना काही सांगत असतील. तुम्ही ते फारसं मनावर घेतलेलं दिसलंच नाही कधी. शिवाय ज्याला घरप्रपंच नसतो, त्याला गोतावळा नसतो, असं समजू नका. जिव्हाळ्याची नाती सगळीकडे असतात.

………………………..

३. पासपोर्टच्या नव्या नियमानुसार तथाकथित साधू आणि संन्याशांना त्यांच्या जैविक पालकांऐवजी आध्यात्मिक गुरूंच्या नावाचा उल्लेख करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुळात एखादा माणूस साधुसंतसंन्यासी आहे, हे कसं ठरवणार? याचा फायदा दहशतवाद्यांनी ओळख लपवण्यासाठी घेतला तर किती नाचक्की होईल? कोणत्याही धर्माचे हे नसते चोचले कायद्याच्या राज्यात पुरवताच कामा नयेत. उदया एखादा जटाजूटधारी गांजेकस माझा बाप, पालक, प्रतिपालक फक्त परमेश्वरच आहे, असं सांगायला लागला, तर काय तसं लिहिणार का पासपोर्टवर?

…………………………………

४. काळ्यापैशाच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत त्यामध्ये पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित डॉक्टर सुरेश अडवाणी यांचा समावेश आहे. डॉक्टर अडवाणी औरंगाबादमधील सीआईआईजीएमए रुग्णालयात कार्यरत आहेत. कर्करोगावरील उपचारासाठी अडवाणी यांची ख्याती आहे.

पद्मश्री, पद्मभूषण किंवा भारतरत्न हे पुरस्कार त्या त्या माणसाच्या एकेका क्षेत्रातल्या उत्तुंग कामगिरीसाठी किंवा त्या त्या काळातल्या सत्ताधीशांसोबतच्या जवळिकीची बक्षिसी, त्यांच्या राजकारणाचा भाग म्हणून दिले जातात. ती त्यांच्या व्यक्तिगत सचोटीची किंवा चारित्र्याची प्रमाणपत्रं आहेत, असं मानण्याचं कारण नाही.

…………………………………

५. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी गुरुवारी अचानक त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. आपल्याला याआधीच राजीनामा द्यायचा होता. मात्र पंतप्रधान मोदींनी राजीनामा न देण्याची विनंती केल्याने आपण थांबलो, असे जंग यांनी सांगितले.

जंग यांच्यावर दिल्लीत भारतीय जनता पक्षाचं नाक कापणाऱ्या आम आदमी पक्षाविरुद्ध अधर्मयुद्ध लढण्याची जबाबदारी आहे. ती जंग अजून संपलेली नाही, त्यामुळे खुर्चीला जंग म्हणजे गंज लागेपर्यंत त्यांनी ती सोडू नये, असं सत्ताधाऱ्यांनी ठरवलं आहे. त्यामुळेच आताही त्यांचा राजीनामा फेटाळला गेला आहे. काँग्रेसने ठेवलेल्या काठीच्या आधारे परस्पर आप ठेचण्याची ही व्यवस्था आहे.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......