टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • टॉयलेट लोकेटर, गाड्या, अर्णब गोस्वामी, हरविंदर सिंग आणि अनुराग ठाकूर
  • Sat , 24 December 2016
  • विनोदनामा टपल्या टॉयलेट लोकेटर Toilet Locator अर्णब गोस्वामी Arnab Goswami हरविंदर सिंग Harvinder Singh अनुराग ठाकूर Anurag Thakur

१. मोदी सरकारकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमांतर्गत आता सार्वजनिक ठिकाणी शौचालय शोधण्यासाठी टॉयलेट लोकेटर आणण्यात येणार आहे. देशात सार्वजनिक ठिकाणी लोकांना विशेषत: महिलांना शौचालय शोधताना येणाऱ्या अडचणी येतात. हीच गरज लक्षात घेऊन ‘गुगल टॉयलट लोकेटर’ सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

'असतील तर दिसतील' ही म्हण मोदी सरकारला ठाऊक असेल काय? पेटीएमवर व्यवहार सुरू झाले की भ्रष्टाचार जसा आपोआप गायब होत नाही, त्याचप्रमाणे गुगलच्या टॉयलेट लोकेटरमध्ये टॉयलेट तयार होत नाहीत; ती बांधावी लागतात. तशी ती बांधली जात असतील, तर टॉयलेट लोकेटरचा उपयोग. अन्यथा, घाईच्या वेळी टॉयलेट लोकेटरबरोबर पाच मिनिटं झटापट केल्यावर जवळपास एकही टॉयलेट नाही, हीच माहिती मिळणार असेल, तर लोक संतापून फोन फेकून देतील टॉयलेटमध्ये!

………………………………………………….

२. रोज नवनवे नियम घोषित करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने आता वाहनांच्या वाढत्या संख्येला ‘लगाम’ घालण्याचे संकेत दिले आहेत. नवीन गाड्यांच्या नोंदणीसाठी पार्किंगच्या जागेचा पुरावा सादर करणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. पार्किंग असेल, तरच नवी गाडी मिळेल.

भाड्याने राहणाऱ्या लोकांनी कसला पुरावा द्यायचा? पार्किंगसकट जागा भाड्याने घेतली आहे, असं दाखवून गाडी घेतली आणि ११ महिन्यांनी बिनापार्किंगच्या जागेत स्थलांतर केलं तर काय? आज सगळ्या प्रमुख शहरांमधले रस्ते आधीच बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांनी व्यापले आहेत, बिल्डर लॉबी वाट्टेल त्या किंमतीला पार्किंग स्पेस विकण्याचे अधिकार राखण्यात यशस्वी ठरलेली आहे. आता हे वरातीमागून घोडे काय उपयोगाचे?

………………………………………………….

३. नोटाबंदीमुळे बॅंकिंग क्षेत्राचे रोजचे ३,००० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. : अखिल भारतीय बॅंक अधिकारी संघटनेचे सरचिटणीस हरविंदर सिंग

अहो, आजचं वास्तव नुकसान पाहू नका, उदयाचा काल्पनिक कॅशलेस, भ्रष्टाचारलेस भारत पाहा. तेवढी किंमत मोजायलाच हवी. मुळात नोटाबंदीच्या विरोधात कोणी कसलंही मत नोंदवता कामा नये, असा अंतर्गत आदेश निघाला असताना हे गृहस्थ असं देशद्रोही विधान करतातच कसे?

………………………………………………….

४. मी राष्ट्रवादी असल्याचा मला अभिमान आहे. भारतीय माध्यमे राष्ट्रवाद आणि देशद्रोहामध्ये अडकली आहेत. देशद्रोह्यांना माध्यमांमध्ये कोणतीही जागा नाही. मी भारत-पाकिस्तानच्या मुद्यावर तटस्थ राहू शकत नाही. मला कोणी विकत घेऊ शकत नाही. : अर्णब गोस्वामी

कोणी 'फुकटच गेला' असेल, तर त्याला विकत घेण्याची गरज काय? या सद्गृहस्थांची (आपण सभ्यता पाळावी म्हणून हा शब्दप्रयोग अन्यथा यांच्यासाठी तो भारतरत्नइतकाच मोठा सन्मान आहे) एकंदर भाषा, आपला राष्ट्रवाद तेवढा जाज्वल्य आणि आपला विरोधक तो थेट देशद्रोही, ही मांडणी पाहता यांची 'रिपब्लिक' वाहिनी 'कमलदला'वरच विराजमान होणार आहे, असं दिसतंय.

………………………………………………….

५. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सध्या ज्या संकाटांचा सामना करावा लागत असल्याचे पाहता सध्याचे वातावरण हे क्रिकेटपटूंसाठी हिताचे नाही. : ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष अनुराग ठाकूर

ठाकूर यांच्यासारख्या राजकारण्यांच्या छत्रछायेला क्रिकेटपटू वंचित झाले की त्यांच्यावर आभाळ कोसळेल, यात शंका नाही. क्रिकेटपटूंच्या माध्यमातून या राजकारण्यांनी पैसानिर्मितीची एक अजस्त्र यंत्रणा उभी केली आहे आणि विविध पातळ्यांवर क्रिकेटपटूंनाही लाभधारक बनवून आपल्या अंकित करून घेतलं आहे. सर्वोच्च न्यायालयामुळे राजकारण्यांची पकड सैल झाली तर क्रिकेटपटूंना भविष्यात खरोखरच निव्वळ क्रिकेट खेळून गुजराण करावी लागू शकते… दिवस वाईट आहे खरं.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......