टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राम मंदिर स्टेशन, लाडूंची तयारी, तुकारामा मुंढे आणि राहुल गांधी
  • Wed , 14 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राहुल गांधी Rahul Gandhi राम मंदिर रेल्वे स्टेशन Ram Mandir railway station भाजप BJP लाडू Laddoo नोटबंदी Demonetisation

१. उद्योगपतींनी कर्जे बुडवल्यामुळे देशातील बँका डबघाईला आल्या आहेत. या बँकांना पुन्हा कार्यरत करण्यासाठी मोदींना सामान्य जनतेचे पैसे सहा ते सात महिन्यांसाठी बँकांमध्येच अडकवून ठेवायचे आहेत. त्यामुळेच नोटाबंदीचा निर्णय घेऊन सामान्य जनतेचा पैसा बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आला : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप

अरे देवा, हाच तो बहुचर्चित, बहुप्रतीक्षित भूकंप होता की काय? मग कठीण आहे. अहो, ही माहिती आता देशातल्या पहिलीत जाणाऱ्या मुलांनाही तोंडपाठ झालेली आहे. बँकांची थकबाकी, उदयोगपतींनी बुडवलेली कर्जं वगैरे सगळे आकडे तोंडपाठ बोलून दाखवतील ती मुलं. तुम्ही किमान दुसऱ्या इयत्तेतलं तरी काही तरी बोला!

………………………….

२. डॉक्टरांच्या अनाकलनीय अक्षरामुळे केमिस्टला औषधयोजना न समजल्याने जगभरात दरवर्षी एकूण सात हजार लोक मरण पावतात. डॉक्टरांचं खराब हस्ताक्षर न समजल्याने केमिस्ट चुकीचं औषध देतात आणि पेशंट दगावतो.

सगळ्या गोष्टींकडे इतक्या नकारात्मक पद्धतीने पाहणं बरोबर नाही. डॉक्टरांच्या खराब अक्षरामुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचत असतील, त्याचं काय? डॉक्टरांनी काय प्रिस्क्रिप्शन दिलंय, हे केमिस्टला न कळल्याने त्याच्याकडून चुकून योग्य औषध दिलं गेल्याचं प्रमाण अधिक असेल ना!!!

………………………….

३. नवी मुंबईचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कौतुक करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांना पक्षाच्या ज्येष्ठ स्थानिक नेत्यांची तंबी. मुंढे यांचे कौतुक कराल तर वाईट परिणाम होतील, असा इशारा.

बरोबर आहे. सर्वपक्षीय नेते आणि नगरसेवकांचे गैरधंदे, बेकायदा बांधकामं, विविध प्रकारची 'दुकानं' वाचवण्यासाठी तिकडे नेते मुंढेंना हटवण्यासाठी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत असताना या नगरसेवकांनी मुंढे यांचं कौतुक करणं हा एकप्रकारचा पक्षद्रोहच आहे. आपल्या पक्षाची धोरणं काय आहेत, याचंही भान ठेवायचं नाही म्हणजे टू मचच!

………………………….

४. पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी व गोरेगाव स्थानकांदरम्यान ओशिवरा येथे होऊ घातलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव ‘राम मंदिर’ ठेवण्यावरून वादाचे मोहोळ उठलेले असताना राम मंदिराच्या आवारातले शिवमंदिर राम मंदिराच्या किमान आठ शतकांपूर्वीचे असल्याचे पुरावे समोर आल्याने आता स्थानकाला ते नाव द्यावे, अशी अशी भावना व्यक्त होऊ लागली आहे.

या परिसरात या दोन्ही मंदिरांपेक्षा प्राचीन दगड नक्कीच सापडतील. स्टेशनला त्यांच्यावरून काही नाव देता आलं तर, त्याने असली नामकरणं करणाऱ्यांचाही 'गौरव' होऊन जाईल.

………………………….

५. बँका आणि एटीएमच्या रांगेत उभे राहणाऱ्यांना दिल्ली भाजपतर्फे लाडू वाटले जाणार. नोटाबंदीच्या निर्णयानंतर नागरिकांनी दाखवलेल्या संयमाबद्दल कृतज्ञता म्हणून प्रत्येक कुटुंबाला लाडवांचे वाटप केले जाणार.

हे तहानलाडू किंवा भूकलाडू असतील का? त्यांची अधिक गरज असेल ना नागरिकांना? पक्षाच्या देशभरातल्या नेत्या-कार्यकर्त्यांकडे रोज सापडत असलेल्या नव्या नोटांमधल्या बेहिशोबी रोख रकमेचं एटीएमबाहेर वाटप करण्याचीही आयडिया बेस्ट राहील. त्यात संतापलेल्या नागरिकांकडून रिटर्न गिफ्ट म्हणून धम्मकलाडू मिळण्याचा धोका नाही!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......