पुलंच्या दोन बहारदार कथा, संगीतापायी आयुष्य पणाला लावणाऱ्यांच्या!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
जयंत राळेरासकर
  • पु. ल. देशपांडे आणि त्यांच्या ‘भावगंध’चं मुखपृष्ठ
  • Sat , 15 December 2018
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो भावगंध Bhavgandh पु. ल. देशपांडे P. L. Deshpande

पुलंनी कथा म्हणावी असं फार काही लिहिलं नाही. तसं पाहिलं तर ‘म्हैस’ ही त्यांची अगदी ठळकपणे आठवणारी एकच कथा. मात्र परवा अचानक पुण्यातल्या एका फुटपाथवर पुलंचं एक पुस्तक दिसलं - ‘भावगंध’. (हे पुस्तक जून २०१२ मध्ये प्रकाशित झालं आहे.) माझ्या बाबतीत हे जरा व्यसनासारखं आहे. जीव हल्लक करणारं स्मरणरंजन, अत्यंत लोभस व्यक्ती, हळुवार चिंतन अशा अनेक घटकांमुळे पुल हे कायम आमच्या वस्तीला आले आहेत. हा समृद्ध खजिना आयुष्यभर पुरून उरणार आहे. साधारण चाळल्यासारखं करून मी ते पुस्तक उचललं. या पुस्तकात पुलंच्या दोन कथा सापडल्या. पहिली, ‘उरलेला घास’ आणि दुसरी, ‘राघव आणि ‘तारका स्वर्गीच्या’ ’.

‘उरलेला घास’

या कथेतील संगीताचं वातावरण, संगीताबद्दलची निष्ठा आणि सर्व झुगारून संगीतापायी आयुष्य पणाला लावणारे खांसाहेब हे सगळं साहजिकपणे या कथेत येतं. पुलंनी कथा डेकोरेट करण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाही. मात्र तो काळ माहिती असणाऱ्या वाचकाला ही कथा खूप भावूक करणारी आहे. इतके दिवस ही कथा अज्ञातवासात होती. त्याची कारणं वेगळी आहेत. एकतर कथा हा प्रकार नेमका कुठल्या संग्रहासाठी निवडावा ही अडचण होती. पुलंच्या निधनानंतर त्यांच्या अप्रकाशित साहित्याची ‘उरलं-सुरलं’, ‘पुरचुंडी’, ‘गाठोडं’, ‘भावगंध’ अशी संकलनं येत आहेत. त्यासाठी कसल्या चौकटीची तितकी गरज नसावी. त्यातून अचानक ही कथा समोर आली. पुल-प्रेमींसाठी हे ‘गुप्तधन’ आहे.

तपस्वी म्हणाव्या अशा एका गवैय्याची ही कथा आहे. गायनाच्या दुनियेत खूप बदल झाले आहेत. खांसाहेबांच्या वैयक्तिक जीवनातदेखील तशी वाताहतच झाली आहे. जुनं सगळं आठवतं आहे, पण दाद देणारे ते रसिक, आश्रयदाते, त्या सगळ्या रागरागिण्या आज अस्पष्ट झाल्यासारख्या फक्त आठवणीत आहेत. सदैव संगीताच्या आराधनेत आपल्या खेडेगावी राहणारा हा तपस्वी मुंबईला रेडिओ स्टेशन हुडकत पोहोचला आहे. सुदैवानं त्यांची साथ करणाऱ्या सारंगी वादकाचा मुलगा त्यांना ओळखतो. स्टेशन डायरेक्टरची भेट घालून देतो. आकाशवाणीचा अधिकारीदेखील त्यांना सुयोग्य असा मान देतो. त्यांचं गाणं रेकॉर्ड होतं. आता हे सगळं न झेपणारं हा गवैया का करतो?

त्याच्या मनात एक खंत असते की, मालकंसची एक जागा आपली मुलगी नीट घेत नाही. हा एक अपुरा घास त्याला आपल्या कन्येला भरवायचा आहे. सगळा जीव त्यासाठी व्याकूळ झाला आहे, अस्वस्थ आहे. काही कौटुंबिक कलहामुळे प्रत्यक्ष तर भेट नाही होऊ शकत. रेडिओवरून आपला मालकंस ती ऐकणार आणि तो परिपूर्ण राग तिच्याकडून नंतर (रेडिओवरच) ऐकायचा हेच एक जगायचं साधन बनून जातं. खेडेगावी रेडिओ एकाच्याच... त्या इनामदाराच्या घरी. त्याच्या घराच्या पडवीत बसून रात्री रोज ते मुलीचे सूर ऐकायला मिळावेत म्हणून हा ऐकायला बसायचा. आणि एक दिवस तो मालकंस त्याला ऐकायला मिळतो. त्याच रात्री तो तिथंच कोसळतो. रसिक हळहळतात. कुणालाच समजत नाही की, हा प्रतिभावंत त्या हवेलीच्या पडवीत रोज रात्री असा का बसलेला दिसायचा. मालकंसचं ते पूर्ण-स्वरूप म्हणजे किती प्रदीर्घ तपस्या होती, किती काळाचं ते वाट पाहणं होतं, याचा अंदाज घेत त्या परिसरात आज एकदेखील आख्यायिका ऐकू येत नाही.

भारतीय संगीत कलेच्या अभिजातपणासाठी आयुष्य वेचलेल्या गवैय्यांची गाथा अनेक लोकांनी आपल्या पुढे ठेवली आहे. या कथेत असाच एक गवैय्या त्याच्या निर्दोष सादरीकरणाबद्दल आग्रही राहून आयुष्यभर त्याचा वेध घेत राहतो. पत्नी आक्रस्ताळेपणानं घर सोडून जाते आणि मुलीची शिकवणी अर्धीच राहते. त्याच्या कानावर तो अर्धवट ‘मालकंस’ कायम आघात करत राहतो. आयुष्य उतरणीला लागलेलं, जगावं कशासाठी यासाठीचं प्रयोजन कमी-कमी होत जातं. केवळ हा मुलीच्या गळ्यातून येत असलेला अर्धवट ‘मालकंस’ ही एक बेचैनी. रेडिओच्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा तपस्वी धडपडतो आणि अखेर तो परिपूर्ण मालकंस ऐकल्या क्षणी तो कोसळतो.

एका अभूतपूर्व विद्यादानाची ही सांगता आज कदाचित दंतकथा वाटेल. पुलंच्या जाणीवेला ती स्पष्ट दिसली होती. संगीतावर पहिलं प्रेम होतं त्यांचं. कदाचित हे अलौकिक बुवा त्यांनी अनुभवलेदेखील असतील.

पुलंनी ही कथा एखाद्या पोवाड्याप्रमाणे सादर केली आहे. कथेचा म्हणून कसला फॉर्म सांभाळणं असा काही आग्रही अभिनिवेश घेतला असता तर ही वेगळीच झाली असती. पण ती कदाचित पुलंची म्हणून वाचली गेली नसती. ओघात येणारे उर्दू-हिंदी शब्द सोडले तर कथेत कसलंही डेकोरेशन नाही. खरं म्हणजे याच शब्दांमुळे तो त्यांच्या कल्पनेतला गवई आपल्या रंग-रूपासह आपल्या डोळ्यसमोर उभा राहतो. अर्थात मीदेखील हे वेगळेपणानं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण यातील घटना ही त्यापेक्षा महत्त्वाची आहे. त्यातील तपशील हे त्या घटनेपुरतेदेखील आहेत, आणि त्याचबरोबर एकंदरीत अशा तपस्वी-संगीतकाराचं ‘त्या काळातील’ जगणंदेखील अधोरेखित व्हावं म्हणून असावेत. पुलंनी कथा फॉर्म निवडून हे लिहिलं असं म्हणवत नाही. कारण ते कथेच्या वाटेला कधी गेले नाहीत. ते जसं त्यांच्याकडून लिहिलं गेलं आणि तसंच ते प्रसिद्ध झालं असं वाटतं.

१९४७ साली ‘अभिरुची’च्या जून महिन्याच्या अंकात ही कथा आली, त्यावेळी तिचं स्वागत कसं झालं समजत नाही. तब्बल ७० वर्षांनंतर ही मी वाचली आणि ती निदान पुल-प्रेमींनी वाचावी असं वाटलं. अर्थात हे परीक्षण नाही. तशी पुलंच्या साहित्याची समीक्षा झाली नाही, कारण त्यातील सौंदर्य इतकं हळुवार आहे की, ते शब्दांत पकडणं अवघड. हे आणि हेच कारण त्यामागे असावं. तसं पाहिलं तर, त्यांची अनेक व्यक्तिचित्रं या कथाच आहेत. पण तरीही कथेची बीजं असलेल्या या कथा समोर येणं महत्त्वाचं आहेच.

.............................................................................................................................................

पुलंच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/author_profile/7/2

.............................................................................................................................................

‘राघव आणि ‘तारका स्वर्गीच्या’ ’

कथेतदेखील पुन्हा संगीताचंच वातावरण आहे. एका मनस्वी गायकाची आणि त्याच्या उदयास्ताची ही कथा मनाला चटका लावणारी आहे. राघव एक कलंदर गायक. लहानपणापासून गायनाच्या नादी. त्याचं गाणं अचानक मित्रांच्या गप्पात रेडिओवरून ऐकू येतं आणि राघवाच्या आठवणींचा ओघ मित्रांच्या गप्पात सुरू होतो. त्याचीच ही कथा. राघवचं व्यक्तिमत्त्व, कलंदरपणा, सुरुवातीपासूनचं त्याचं अनाथपण, सगळं अगदी भन्नाट आणि जगावेगळं. मात्र अस्सल गाणं हा त्याचा स्वभाव. हे सगळं खूप विस्तारानं कथेत येतं! ही कथा १९४७ सालच्या ‘मौज’ दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे.

पुलंच्या या कथेतदेखील संगीताची दुनिया आहे. मात्र ही ग्रहण लागलेल्या एका गायकाच्या दुरवस्थेची कथा आहे. त्या दुर्दैवी वातावरणात त्यानं सांभाळलेल्या मूल्यांची एक अनवट प्रसंगांची उतरंड या कथेत आहे. ‘अनवट’ यासाठी की, व्यसनासक्त अवस्थेतदेखील रामनाथावरील (देवस्थान) निष्ठा जपण्यासाठी राघव स्वत:ची एक चीज गहाण ठेवतो आणि रामनाथाच्या अर्चनेपुरतेच पैसे घेतो. अनेकांकडून उसने पैसे घेऊन उधारी केलेला हा कलंदर गायक हे ‘वीस रुपये चार आणे’ मात्र परत करतो. इतकंच नाही तर ते मिळाल्याचं कळल्याशिवाय खुल्या मैफिलीत ‘ती’ चीज गातदेखील नाही. अगदी बडोद्याच्या दरबारी गाणं होऊनदेखील...

संगीताच्या दुनियेतील मानमरातब, वैभव, स्वैराचार आणि दुर्दैवी घसरण यांच्या अनेक कथा-दंतकथा आपण ऐकतो. आजच्या तरुण पिढीला हे खूपच चकित करणारं वाटेल. पंचतारांकित होत चाललेल्या आजच्या मैफिलींचं स्वरूप खूप भिन्न आहे. कलावंतांचा आणि रसिकांचा संबंध हा एकरेषीय आहे. ‘झोकून देणारी भणंगता’ हा विषय कौतुकाचा नाही, तरी त्यात अस्सलतेचा भाग होता. या कथा त्या जमान्यातील आहेत. आता हे विषयदेखील अभावानेच दिसतात, शिवाय ‘पुलंच्या कथा’ म्हणूनदेखील दुर्मीळ आहेत.

पुलंच्या या दोन्ही कथा १९४७ मधल्याच आहेत. संगीताची दुनिया पुलंनी खूप जवळून अनुभवली होती. त्यातील हे अनुभव कथेचा फॉर्म घेऊन यावेत असं पुलंना वाटलं असावं. हा जरा सोयीचा मामला असावा. अजूनदेखील अशा कथा अप्रकाशित असतील का, हा एक प्रश्न आहेच.

या दोन्ही कथांमधून आलेले प्रसंग, त्यातून जाणवणारी निष्ठा, हे सगळं अलौकिक आहे. या कथा आपल्याला हळवं करून जातात. या दोन्ही कथांमधून संगीताच्या दुनियेतील सच्चेपणा आणि झपाटलेपण आहे. आज दृश्यस्वरूप तसं राहिलं नाही हे खरं, मैफिलींचे concerts झाले आहेत, हेदेखील खरं पण तरीही ‘आनंदाचे डोह’ नको असतात असं तर नाही? त्याची प्रचीती या कथांमधून स्पर्श करते, हे नक्की.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखक जयंत राळेरासकर ध्वनिमुद्रिका संग्राहक आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

jayantraleraskar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......