तंबूत शिरलेला उंट बाहेर काढण्याची सनदशीर प्रक्रिया सुरू…
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र : संजय पवार
  • Sat , 15 December 2018
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar उंट Camel तंबू Tent

‘गर्वाचं घर खाली’ असं आपण शालेय शिक्षणातच शिकतो. पण शालेय शिक्षणातल्या अनेक गोष्टी आपण प्रसंगानुरूप अथवा सोयीस्कर विसरतो. तशी ही शिकवणही अनेक जण विसरतात. मुळात मानवानं तयार केलेल्या शब्दांचा एकच एक असा अर्थ नसतो. भाषेचं व्याकरण हे एक वेगळंच प्रकरण आहे. त्यातून हल्लीचा काळ असा की, कसलंच व्याकरण गांभीर्यानं घेतलं जात नाही. त्यामुळे भाषेच्या (कुठल्याही) नावानं बोंबाबोंब आहे.

‘गर्वाचं घर खाली’ असं शिकूनही आपण ‘गर्व से कहो हम हिंदू है’, ‘गर्व से कहो हम भारतीय है’, ‘गर्व आहे मला मराठी असण्याचा’ वगैरे छाती ठोकून म्हणतच असतो. मग या ‘बोध’वचनाचं प्रयोजन काय?

तर त्याचं साधं प्रयोजन असं असावं- वेगानं वर जाणारी गोष्ट गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे खाली येते. ती गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर गेली तर ती अंतराळाच्या निर्वात पोकळीत तरंगत राहते. व्यावहारिक भाषेत सांगायचं तर ती ‘घर का ना घाट का’ होते. ‘गर्वाचं घर खाली’मध्ये हे सगळं विज्ञान आहे. माणसाला गर्व होतो, तेव्हा त्याची विचारक्षमता करण्याचं ठिकाण मेंदू म्हणजेच डोकं अतिआत्मविश्वासानं तडतडू लागतं. यालाच साध्या भाषेत ‘डोक्यात हवा जाणं’, असं म्हणतात. पण आरोग्यशास्त्राप्रमाणे मेंदूवरची अतिरिक्त (वैचारिक) सूज ‘फट म्हणता ब्रह्महत्या’प्रमाणे संपूर्ण शरीरच पांगळं करू शकते. ‘गर्वाचं घर खाली’ या तीन शब्दांत ते साधेपणानं सांगितलंय. यातून जमिनीवर येणं, वास्तवाची जाणीव, हवेचा दाब इ. गोष्टी अनुभवांती कळतात. ‘अनुभवातून शहाणपण’ सगळेच शिकतात असं नाही. तरीही ‘गर्वाचं घर खाली आलं’ या वस्तुस्थितीला निदर्शक चित्रातून पर्यावरण तरी बदलतं. गर्दी जमते आणि म्हणते- ‘शेवटी हेच होणार होतं!’

११ डिसेंबरला भारतदेशी असं एक ‘गर्वाचं घर’ खाली झालं. मुळात ते घर म्हणजे एक तंबू होता. आता तंबू म्हटला की, त्याच्या परिघात अनेक गोष्टी येतात. एका छत्राखाली आणि एका खांबावर अनेक गोष्टी सुखानं, परस्पर सहकार्यानं नांदत असतात. एवढ्या तंबूत भांड्याला भाडं लागणं, एकाला दोन पोरं, दुसऱ्याला चार असंही होत राहतं. आचार-विचारापासून व्यवहारापर्यंत आणि इतिहासापासून कलासंस्कृतीपर्यंत सर्व गोष्टीत सदवर्तन आणि व्याभिचार दोन्ही दिसून येतात. त्या त्या वर्तनाला बक्षीस आणि शिक्षाही असतेच. जोपर्यंत सहमतीनं सर्व चालू असतं, तोवर ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वानुसार तंबू उखडला जाणार नाही याची काळजी घेतली जाते.

भारत देश नामक रंगीबेरंगी तंबूत, संविधानाच्या एका खांबावर हे असंच चालू असतं. संविधान तयार व्हायच्या आधीही ते ‘गंगाजमनी तहजीब’ म्हणून चालू होतं. तेव्हा खांब सहिष्णू म्हणून ओळखला जायचा!

अशा या तंबूच्या बाहेर २०१४ साली एका उंटावर बसून एक सांडणीस्वार आला. तो आला उंटावरून, पण त्याचा आवेश अश्वमेधावर बसून आल्यासारखा. ‘अतिथी देवो भव:’ अशी संस्कृती असलेल्या तंबूवाल्यांनी त्याचं मनापासून स्वागत केलं. त्या सांडणीस्वारानं स्वत:च सांगितल्यामुळे तो ५६ इंची छातीचा आहे हे तंबूला कळलं. मग कौतुकानं सगळ्यांनी ती पाहूनही घेतली. तंबूतल्या प्रत्येकानं त्याला आपल्या प्रथेप्रमाणे फेटे, पगड्या, उपरणी, जाकिटं दिली. मात्र एक गोल टोपी मात्र त्यानं झुरळ झटकावी तशी झटकली. देणाऱ्याला वाटलं आपण डोक्याच्या मानानं एक साईज कमी आणला की जास्त? या प्रश्नानं तो ओशाळून बाजू झाला. दरम्यान उंटानंही तंबूबाहेर फतकल मारली, तरीही पाठीवरच्या ‘बाक’कडे बघून उंट स्वत:शीच हसला. म्हणाला- ‘बसलो तरी मी किमान एवढा उंच असतोच!’

सांडणीस्वार बराच बोलका निघाला. तो आल्यापासून बोलतच होता, न थांबता, थकता. खूप वर्षं अपत्य नसलेल्या घरात अपत्य झालं आणि ते थोडं किंचाळलं तरी गोड वाटतं, तसं तंबूवाल्यांना झालं!

सुरुवातीच्या आगतस्वागतानंतर सांडणीस्वारानं सगळ्यांना टाळ्या वाजवत लक्ष द्यायला लावलं… कशात आणि कसं राहताय? तंबूची काय परिस्थिती आहे बघितलंय? बाहेरून पाहिलंय कधी या तंबूला? मी येताना इतर तंबूवाले तुमच्या तंबूबद्दल हेटाळणीनं बोलले. एवढंच काय, याच तंबूतले अनेक मला बाहेर भेटले. म्हणाले- ‘आम्ही कर्मदरिद्री त्या तंबूत जन्मलो!’  मला कळलंय- गेली सत्तर वर्षं तुम्ही एका(च) कुटुंबाचे ऐकत हा तंबू चालवताय. आजोबा, मुलगी, नातू, सून, पणतू… एकामागोमाग एक तेच. या एवढ्या मोठ्या १२५ कोटींच्या तंबूवर एका कुटुंबाचं नियंत्रण? केलंय काय त्यांनी? ना आत काही सोयीसुविधा, ना बाहेर. योजनांच्या नावांनी नुस्ता भ्रष्टाचार आणि रंगीबेरंगी तंबूचा कसला अभिमान? तंबू एक खांबी, तसा एक रंगी, एक संस्कृती, एक आधारी असावा… धबधब्याच्या प्रपातासारखा सांडणीस्वार संपूर्ण तंबूला प्रदक्षिणा घालत अखंड बोलत होता.

नाही म्हटलं तरी तंबूत थोडी हलचल झाली. काहिलीनं अंग जळत असताना लहर यावी तसं झालं. बरं पाहुणा अखंड बोलत होता. एकामागून एक विषय मांडत होता. पार या तंबूचं आजचं भव्य आकारमान मुळात कसं अतिभव्य होतं आणि एका परिवारामुळे, त्यांच्या करंट्या कारर्किदीमुळे कसा तंबू कापला, छाटला गेला, कशी एका परिवाराच्या उदात्तीकरणासाठी इतर लोहपुरुष, नेताजींची कोंडी केली गेली… कसं घरातल्या घरात काहींचे लाड, काहींची उपेक्षा करण्यात आली... कसा या कुटुंबानं व त्यांच्या पित्त्यांनी खोऱ्यांनं पैसा ओढला…

आता लोकांना कधी न जाणवलेल्या गोष्टी जाणवू लागल्या. खरंच आपण या एका परिवारावर किती विसंबून राहिलो, सगळा तंबू जणू एकाच घराला आंदण दिला हे सांडणीस्वाराचे शब्द खरे वाटू लागले. तंबूचं विभाजन विसरूनही ५० वर्षं होऊन गेली होती, पण खपली निघाली, रक्त वाहू लागलं. ते तापूही लागलं.

दरम्यान सांडणीस्वारानं आता पवित्रा बदलून मला सिंहासन नको, सेवकाची जागा द्या, मी राजा नाही, तर चौकीदार, पहारेदार म्हणून काम पाहीन आणि या तंबूची अंतर्बाह्य सुरक्षा करेन... मी कामात शिस्त आणेन… मी व्यवहारात शिस्त आणेन… मी सर्वांनाच शिस्त लावेन… सर्वांनाच सर्व नवं, ताजं आणि चांगलं जीवन देईन… मी गुन्हेगारांना शासन करेन… मी सोनेरी टोळ्या उदध्वस्त करेन… मी लुटीचा माल परत आणेन… ही लूट किती आहे माहितीय? तुम्हा प्रत्येकाच्या बटव्यात काही लाख रुपये सहज जमा होतील!

बघता बघता तंबूतलं वातावरण बदललं. ताणलेल्या दोऱ्या सैल करून या नव्या स्वाराला आत घेतलं. त्यासाठी संपूर्ण परिघ खुला करण्यात आला. बदल आता तुला हवं ते! कापड, खांब, दोऱ्या, खुंट्या, व्यवहार, आचार-विचार बदल आणि नवं ताजं चांगलं जीवन दे आम्हाला. प्रगती, विकास या शब्दकोशातच राहिलेल्या शब्दांना बाहेर काढून त्यांना सदेह साकार. घे ही छिन्नी, घे हा हातोडा आणि घे हा सत्तर वर्षांचा दगड नि कोर नवं शिल्प!

सांडणीस्वार म्हणाला- ‘मी नतमस्तक आहे.’ म्हणून त्यानं खरंच मातीवर मस्तक ठेवलं. तंबू गहिरवरला. मग उठून तो म्हणाला मला उंट लागेल आत! उंटाशिवाय मी अपूर्ण आहे. तंबूनं गहिवरल्या वातावरणात उंटालाही आत घेतलं. उंटावर बसलेला तो स्वार आता तंबूच्या छताला टेकलेला भासू लागला!

आता सांडणीस्वार उंटासह तंबूभर फिरू लागला. बाहेर असताना सेवकाचा भाव चेहऱ्यावर असणारा स्वार आता दगडी चेहऱ्याचा झाला आणि उंट स्वत:ला हत्ती, घोडा, वाघ, सिंह असं सर्व काही समजू लागला. उंटानं प्रथम जिथं जिथं एकोपा होता, तिथं तिथं भिंती घातल्या. त्यानंतर पांजरपोळातील सांड मोकळे सोडले. विविधरंगी तंबूत आता दोनच रंग ठरवले गेले. एक, आवडता; दुसरा, नावडता. दरम्यान स्वारानं त्या कुटुंबाच्या नावे जे जे काही होतं, ते मोडीत काढलं. नवे इतिहासकार, नकाशावाले, खजानजी वगैरे नेमले गेले. मोकळे सांड गल्लीपासून विद्यापीठ ते संसद मंडळ असा उच्छाद मांडू लागले. उंटानं या सांडांच्या पाठीवर बैलबुद्धीचे सरदार बसवून त्यांच्या टोळ्या बनवल्या. आणि जे जे नावडतं त्यांना शिंग, ढुशी मारत जखमी कर, ठार मार असं सुरू केलं.

स्वार आत आला तरी त्याची भाषणं सुरूच राहिली. त्याच्या बोलकेपणाचा इतका गवगवा झाला की, काही लोकांना तो फोटोतही बोलताना ऐकू येऊ लागला. ते अर्थातच त्याचे ‘भक्त’ झाले. सतत बोलण्यानं स्वार पुढे पुढे विसंगत बोलू लागला. काळ, वेळ, स्थळ यांची अदलाबदल बिनदिक्कत करू लागला. लोकांना वाटलं हा बोलायचा थांबून काही ऐकेल. त्याचं बोलणं आता ‘सा रे ग म प ध नि सा सा नि ध प म ग रे सा’ असं उलटसुलट सारखंच ऐकू येऊ लागलं!

दरम्यान उंटानं तंबू ताब्यात आल्यासारखा आपला संचार आतल्या आत असा वाढवला की, बसल्या जागी लोक तंबूबाहेर फेकले जाऊ लागले. उंट आणि स्वार मनाला येईल ते करू लागले. आतमध्ये त्यांनी बऱ्यापैकी जम बसवला. सर्वत्र उंट आणि स्वार. स्वार आणि उंट. कुणी काही विचारलं, त्याला फटकारलं. कुणी हटकलं, त्याला संपवलं. जो बोलू पाही त्याची शेपटी पिरगाळली जाई. आता त्या परिवाराऐवजी उंट आणि स्वार हे दोघंच राज्य करू लागले. आता ते कुणाला जुमानेनात. ते आता ‘इथं आम्हीच राहणार सदैव, आमचीच शिस्त, आमचेच नियम, आमचेच कायदे, आमच्याच शिक्षा’ असं दमात घेऊन म्हणू लागले. तंबूत घुसमट वाढू लागली. लोक हातात हात घेऊ लागले, मुठी वळू लागल्या, घोषणाही दिल्या जाऊ लागल्या.

तंबूला आता आपल्या वैभवशाली गंगाजमनी तहजीबची, त्यावर आधारित संविधानाच्या खांबाची जाणीव झाली. रंगीबेरंगी महावस्त्राची, इंद्रधनुष्यी सहकाराची आणि त्यातून निपजणाऱ्या शांततेच्या वातावरणाची याद ताजी झाली. हा उंट व हा स्वार या तंबूच्या खांबालाच बदलायचं कारस्थान आस्ते कदम करतोय हे लक्षात येऊ लागलं. अवघ्या आर वर्षांत बोलक्या पोपटाचे पंख, त्याच्या लालभडक चोचीहून आखूड वाटायला लागले. उंटाचं विरूप रूप नजरेत ठसू लागलं. त्या दोघांचं गोड बोलून तंबूत येणं आणि आता तंबूच उखडून टाकायचा डाव लोकांनी ओळखला आणि त्यांनी सुरू केली उंटासह स्वाराला तंबू बाहेर काढण्याची योजना.

योजना सनदशीर मार्गाची. शेतकरी अवजारे घेऊन आले, बेरोजगार पोटातली आग, स्त्रिया परंपरेचं जू भिरकावत पुढे सरसावल्या. आदिवासी ‘वानर’ लेबल भिरकावून दगड हातात घेऊन ‘श्रीराम’ म्हणण्याऐवजी ‘उलगुलाल’ म्हणू लागले. हा उंट, हा स्वार गोतास काळ ठरणार हे ओळखून भिंती पडल्या, हेवेदावे मिटले, सामंजस्य वाढलं. प्रतिकार तीव्र झाला.

आणि ११ डिसेंबर २०१८ रोजी स्वारासह उंट तंबूबाहेर काढण्याच्या मोहिमेला प्रारंभिक यश मिळालं. तंबूवाल्यांचा आत्मविश्वास वाढलाय. उंटासह आत घुसून तंबूचा मूलाकारच बिघडवलेल्या स्वाराला ‘गर्वाचं घर खाली’ कसं येतं हे दाखवायचा चंग सगळ्यांनी बांधलाय. १२५ कोटीतले काही कोटी एका रात्रीत असे अंगावर येतील याची कल्पना नसलेला उंट आणि सांडणीस्वार आता खऱ्या अर्थानं नतमस्तक होऊ पाहताहेत. उंटाच्या कानात कुणीतरी पुटपुटलं- ‘वेळ जशी येते, तशीच ती जातेही!’ उंट कुबडासह आणि सांडणीस्वारासह शहारला!

...............................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 17 December 2018

संजय पवार, तुम्ही नाटककार आहात. मग तुम्हाला अलंकार माहितीये असेलंच. अलम् कारयति इति अलंकार:. अलम् या संस्कृत शब्दाचा अर्थ मराठीत 'आता पुरे' वा 'आता बास' असा होतो. जे केल्यावर 'आता पुरे' असं म्हणावंसं वाटतं त्याला अलंकार म्हणतात. सांगायचा मुद्दा काय की अलंकार प्रमाणाबाहेर वापरायचा नसतो. या निकषावर तुमचा लेख वाचू जाता त्यात रूपक नामे अलंकाराचा अतिरेक दिसतो आहे. अलंकार मोजकेच पण ठाशीव असावेत. अशाने अलंकारधारकाचं सौंदर्य खुलतं. मात्र तुमच्या लेखात रूपक अलंकाराचा प्रमाणाबाहेर वापर दिसतोय. त्यामुळे सोनं लादल्यावर भप्पी लाहिरी जसा भडक व बटबटीत दिसतो तसा लेख बोजड झाला आहे. अलंकारामुळे लेखाचं आकलन सुगम व्हायला हवं. प्रत्यक्षात मात्र रूपकाच्या अति आहारी गेल्याने लेखाचं आकलन क्लिष्ट होऊन बसलं आहे. आपला नम्र, -गामा पैलवान


Alka Gadgil

Sat , 15 December 2018

गोडसे को 'मोहनलाल' पे इतना 'जुस्सा' आया कि वो 'मुठ्ठी को मौत' में लेकर '600 करोड़ भारतीयों' के ख़ातिर 'बिहार के तक्षशिला में सिकंदर' को ये समझाने गये कि 'गुजरात के बेटे श्यामा प्रसाद मुखर्जी', 'गुप्त राजवंस के चंद्रगुप्त' से '2000 साल पुराने कोणार्क सूर्यमंदिर में मिले.' ~गोभी जी


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......