टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • फिडेल कॅस्ट्रो, बिस्मिला खान, पूजा शकुन पांडे, गिरीराज सिंह, जॉन की
  • Tue , 06 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या फिडेल कॅस्ट्रो Fidel Castro बिस्मिला खान Bismillah Khan जॉन की John Key

१. हिंदूंच्या लग्नसराईआधी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूविरोधी आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे २०० ते ३०० रुपये कमावणाऱ्या आणि सरकारी योजनांवर अवलंबून असलेल्या लोकांना फटका बसतो आहे. यामुळे श्रीमंतांना कोणताही त्रास झालेला नाही. तथाकथित हिंदुत्ववादी पक्ष असणाऱ्या भाजपचे नेते आता इस्लामिक बँकिंगला प्रोत्साहन देत आहेत. या निर्णयामुळे त्यांच्या सत्ताकाळाच्या शेवटाला प्रारंभ झाला आहे. : हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे

ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. सरकार 'आपलंच' आहे. आपल्याकडे ना वर्षाचे बारा महिने काही ना काही सण-समारंभ साजरेच होत असतात; कधीही नोटाबंदी जाहीर केली असती, तरी तुम्ही हीच तक्रार केली असती? शिवाय, सरकार कोणत्याही प्रकारच्या बँकिंगला प्रोत्साहन देतंय, ही तुमची गैरसमजूत कशामुळे झाली? लोकांचा बँकिंगवरचा विश्वास उडावा आणि त्यांनी जास्तीत जास्त कॅश घरी नेऊन ठेवावी, यासाठी सगळी यंत्रणा राबते आहे, हे तुम्हाला दिसतच नाही काय?

………………………..

२. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता नसबंदी करण्याची गरज आहे. देशाची लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी नसबंदी आवश्यक आहे : वादग्रस्त वाचाळवीर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

आपल्याच भक्तांची पंचाईत करण्यात ही माणसं पारंगत आहेत… तिकडे थोरले मिशीवाले काका सांगतात, देशकार्यासाठी जास्तीत जास्त पिलावळ जन्माला घाला, त्या महन्मंगल कार्यासाठी सज्ज झालेले असताना हे काका थेट नसबंदीची भाषा करून सगळा जोश लोळागोळा करून टाकतायत… भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी, भलत्या अवस्थेत तिष्ठलेल्या भक्तांनी आता नेमकं करायचं तरी काय?

………………………..

३. २००८पासून सलग चार वेळा सर्वोच्च पदावर असलेले न्यूझीलंडचे अत्यंत लोकप्रिय पंतप्रधान जॉन की यांचा राजीनामा; राजकारणाच्या धबडग्यात पत्नीला वेळ देता येत नसल्यामुळे चौथी टर्म पूर्ण करणार नसल्याची घोषणा.

देशासाठी, समाजासाठी काही करण्याची सच्ची तळमळ असती, तर घरदार, कुटुंब, पत्नी, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा त्याग करून ते कधीच कायमचे घराबाहेर पडले असते; अशा उदात्त त्यागाच्या अभावामुळेच हे देश आपल्या तुलनेत मागास राहिलेले आहेत… काय म्हणता? बराच प्रगत आहे हा देश? अहो, पण, ते भौतिक बाबतीत! आध्यात्मिक, आत्मिक वगैरे बाबतीत (कोणी हिंग लावून विचारत नसलं तरी) आपणच जगद्गुरू!

………………………..

४. नोटाबंदी आणि रिअल इस्टेटच्या बाजारातली मंदी यामुळे दोन बिल्डरांनी आपल्याच उच्चभ्रू, आलिशान, महागड्या प्रकल्पामध्ये ११९ कोटी रुपयांचे चार आलिशान फ्लॅट खरेदी केले…

ही परिस्थिती कायम राहिली, तर उरलेले फ्लॅटही त्यांना एकमेकांतच खरेदी करावे लागतील… थोडा बदल हवा असेल, तर एका बिल्डरने दुसऱ्याचे फ्लॅट खरेदी करायचे, दुसऱ्याने तिसऱ्याचे खरेदी करायचे, असा आपापसात टाइमपासचा खेळही खेळता येईल काही काळ! पैसाही रोलिंगमध्ये राहील. बघा, जमतंय का!

………………………..

५. दिवंगत भारतरत्न उस्ताद बिस्मिला खान यांच्या पाच सनया घरातून चोरीला गेल्या

या चोरांनी आता काही डिंडिम, नगारे, पिचक्या पिपाण्या, ढोलताशे, तुणतुणी, डबल ढोलक्या यांच्याकडेही वक्रदृष्टी वळवली, तर देशातला मतामतांचा गल्बला थांबून थोडी शांतता प्रस्थापित होईल.

………………………..

६. फिडेल कॅस्ट्रो यांच्याच इच्छेनुसार व्यक्तीचे माहात्म्य वा स्तोम माजू नये यासाठी त्यांचे नाव कोठेही वापरणार नाही, असं त्यांचे बंधू आणि देशाचे नेते राऊल कॅस्ट्रो यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या मृत्यूनंतर आपलं नाव किंवा प्रतिमा संस्था, रस्ते, बागा किंवा सार्वजनिक ठिकाणांसाठी कधीही वापरू नयेत, तसंच अर्धपुतळे, पुतळे किंवा इतर कोणत्याही स्वरूपातलं स्मारक उभारलं जाऊ नये, असं फिडेल यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं.

या एका गोष्टीसाठी फिडेल कम्युनिस्ट विचारधारा किंवा त्याचं क्रांतिकारकत्व मान्य नसलेल्यांकडून आणि त्याला क्रूर हुकूमशहा मानणाऱ्यांकडूनही एक कडक लाल सलाम वसूल करून गेला!

editor@aksharnama.com

Post Comment

Nilesh Sindamkar

Tue , 06 December 2016

वाह, नेहमी प्रमाणेच आज ही मस्त चिमटे काढले... !! स्तंभ लेखकाला मानाचा मुजरा... !!!


Nilesh Sindamkar

Tue , 06 December 2016

वाह, नेहमी प्रमाणेच आज ही मस्त चिमटे काढले... !! स्तंभ लेखकाला मानाचा मुजरा... !!!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......