खरंच सापडला का हो दाभोलकरांचा मारेकरी?
सदर - सडेतोड
निखिल वागळे
  • डॉ. नरेंद्र दाभोलकर
  • Mon , 20 August 2018
  • सडेतोड निखिल वागळे Nikhil Wagle डॉ. नरेंद्र दाभोलकर Narendra Dabholkar सनातन संस्था Sanatan Sanstha

आज डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला ५ वर्षं पूर्ण होत आहेत. काही तास आधीच दाभोलकरांचा मारेकरी सापडल्याचा दावा महाराष्ट्र एटीएस आणि सीबीआयनं केला आहे. सचिन अंधुरे नावाच्या हिंदुत्ववादी तरुणाला त्यांनी औरंगाबादहून अटक केली आहे.

गेल्या आठवड्यात एटीएसनं नालासोपारा इथं धाड टाकून वैभव राऊत या हिंदू जनजागृती आणि सनातनशी संबंधीत व्यक्तीला अटक केली होती. त्याच्या घरून बॉम्ब्स, दारूगोळा, पिस्तुलं सापडली. वैभवसोबत आणखी दोघांना अटक झाली हे आपण जाणतोच. या तिघांनी दिलेल्या माहितीतून सचिन अंधुरेला जेरबंद करण्यात आलं, असं पत्रक एटीएसनं काढलं आहे.

सचिन अंधुरेच्या अटकेनं दाभोलकरांचे कुटुंबीय, चाहते आणि देशभरातले संवेदनशील नागरिक यांना आनंद होणं स्वाभाविक आहे. तब्बल ५ वर्षानंतर या गुन्ह्याचा छडा लावण्यात एटीएस आणि सीबीआयला खरोखरच यश आलं असेल तर त्यांचं अभिनंदन करायला हवं. समीर गायकवाड आणि विरेंद्र तावडे यांच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अटकेनंतर या प्रकरणात विशेष काही होत नसल्यानं उच्च न्यायालयानं संबंधित तपास यंत्रणांचे कान उपटले होते. त्यामुळे या ताज्या कारवाईनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हायसं वाटलं असेल. अखेर, दाभोलकरांना २० ऑगस्ट २०१३ रोजी भल्या सकाळी गोळ्या घालणारे सापडले म्हणून सरकारलाही आनंद झाला असेल.

पण सचिन अंधुरेच्या अटकेमुळे हा प्रश्न सुटण्यापेक्षा अधिकच गुंतागंतीचा झालेला दिसतो आहे. या आधी या खटल्यात, २०१६ साली, सीबीआयनं सारंग अकोलकर आणि विनय पवार हे हल्लेखोर असल्याचं म्हटलं होतं. तसे साक्षीदारही नोंदवले होते. मग आता सचिन जर हल्लेखोर असेल तर या दोघांची भूमिका काय? हे खरं की ते खरं? काल सचिनच्या वकिलांनी न्यायालयात हाच प्रश्न केला आहे.

सीबीआयला पुरवणी आरोपपत्र दाखल करता येईल हे खरं, पण हा नवा झटका किंवा ट्विस्ट आहे. तो नीट हाताळावा लागेल. फौजदारी खटल्यात पुरावा किती महत्त्वाचा असतो, हे सीबीआय किंवा एटीएसच्या अनुभवी अधिकाऱ्यांना कुणी सांगायची गरज नाही. शिवाय, २०१६ मध्येच सीबीआयनं विरेंद्र तावडे हा या कटाचा सूत्रधार आहे असा दावा केला आहे. या नव्या अटकांचा धागा त्याच्यापर्यंत जाणार आहे. यापुढे सीबीआय-एटीएस अधिकाऱ्यांचं आणि सरकारी वकिलांचं कौशल्य या खटल्यात पणाला लागणार आहे.

दिल्लीत गाजलेल्या आरुषी खून खटल्यासारखा घोळ या प्रकरणात होऊ नये, अशी अपेक्षा आहे. २०१४ साली पुणे पोलिसांनी असा घोळ मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना अटक करून केला होता. त्यांच्याकडे सापडलेल्या रिव्हॉल्वरमधून सुटलेल्या गोळीनं दाभोलकरांचा जीव घेतला असावा, असं संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. पण त्या अटकांमधून काहीच साधलं नाही. पोलीस किंवा सीबीआयच्या अशा गफलतींचा फायदा घ्यायला आरोपींचे वकील टपलेले आहेतच.

मला असं अजिबात सुचित करायचं नाही की, एटीएस आणि सीबीआयनं केलेल्या ताज्या अटका संशयास्पद आहेत. पण सीबीआय आणि पोलिसांचा इतिहास पाहता लोकांच्या मनात शंका आहेत. अजूनही खरा मारेकरी सापडला यावर त्यांचा पूर्ण विश्वास नाही. ‘खरंच सापडला का हो दाभोलकरांचा हल्लेखोर?,’ असं विचारणाऱ्या अनेक जणांचा सामना मी काल केला. या सर्वांचा हेतू चांगला आहे. पण हल्ली वातावरण असं आहे की, एकमेकांवरचा विश्वास तुटत चालला आहे. माणसं असुरक्षिततेच्या भावनेनं ग्रासलेली आहेत. अशा वेळी सरकार किंवा पोलीस यांच्यावर कोण विश्वास ठेवणार? दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल, तेव्हाच जनतेची खात्री पटेल. म्हणून म्हणतो, सीबीआय किंवा एटीएसला मोठा पल्ला गाठायचा आहे.

या प्रकरणात गेल्या सहा महिन्यांत कर्नाटक पोलिसांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. गौरी लंकेशच्या खुनाचा छडा लावताना त्यांनी १२ जणांना अटक केली आहे. यापैकी अनेक जण सनातन, राम सेने किंवा हिंदू जनजागृतीच्या परिवारातले आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळेच या कटावर मोठा प्रकाश पडला आहे. नालासोपाऱ्यात एटीएसनं टाकलेल्या धाडीची माहितीही कर्नाटक एसआयटीनं दिली होती. दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी-गौरी लंकेश या सर्वांचे खून हा एकाच कटाचा भाग असल्याची माहिती यातून पुढे येत आहे. योग्य तपास झाल्यास आणि राजकीय हस्तक्षेप न झाल्यास, हा फास कटाच्या मास्टर माईंडपर्यत पोहोचू शकतो. हे धागेदोरे २०१५ पूर्वी हाती आले असते, तर पुढच्या सर्वांचे जीव वाचले असते. पण आता निदान या मारेकऱ्यांच्या यादीवर असलेल्या इतर २६ जणांचे जीव तरी वाचू शकतील. यात कर्नाटकचे विचारवंत भगवान यांचं नाव पहिलं होतं, असं कर्नाटक पोलीस सांगतात.

दुसरीकडे, सनातन आणि हिंदुत्ववादी अतिरेक्यांच्या समर्थकांनी नेहमीप्रमाणे कांगावा सुरू केला आहे. प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्या अटकेच्या वेळेला असाच प्रकार झाला होता. परवा वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात निघालेल्या मोर्चात, ‘देश का नेता कैसा हो, वैभव राऊत जैसा हो!’ अशा घोषणा देण्यात आल्या.

हिंदू धर्माच्या नावाखाली दिशाभूल करण्यात आलेला हा जमाव आहे. स्वत:च्या घरात बॉम्ब आणि हत्यारं ठेवणारा नेता कसा होऊ शकतो, हा विचार करण्याचं भानही या मंडळीना नाही. असे अतिरेकी केवळ धर्मालाच नाही, तर माणुसकीला कलंक आहेत, हे देशाचे खरे दुश्मन आहेत, हे यांना कुणी तरी समजावायला हवं. वास्तविक हा दहशतवाद पोसणाऱ्या म्होरक्यांनाच जेरबंद करायला हवं. अन्यथा हे सगळ्या देशाची राखरांगोळी करतील.

............................................................................................................................................

लेखक निखिल वागळे ‘महानगर’ या दैनिकाचे आणि ‘IBN लोकमत’ या वृत्तवाहिनीचे माजी संपादक आहेत.

nikhil.wagle23@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......