चंद्राबाबूंचा चाबूक
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
  • Wed , 07 February 2018
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar चंद्राबाबू नायडू Chandrababu Naidu नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे मोठे धोरणी राजकीय नेते मानले जातात. ते मोजकं, पण सूचक बोलतात. त्यांनी भाजपप्रणीत एनडीएमधून बाहेर पडण्याचा नुकताच दिलेला इशारा खूप सूचक मानला पाहिजे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चंद्राबाबू हे सर्वांत ज्येष्ठ नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांचा देशपातळीवर उदय होण्याआधीपासून चंद्राबाबू देशपातळीवर सतत चमकत राहिले आहेत. आघाडीच्या राजकारणात त्यांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिली आहे.

चंद्राबाबूंनी पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासारखं आदळआपटीचं राजकारण केलं नाही आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासारखी धक्कातंत्राची भूमिकाही निभावली नाही. तरी ते आघाडीच्या राजकारणात प्रभावशाली राहिले. वाजपेयी पंतप्रधान असताना चंद्राबाबूंच्या हातात हुकमाचा एक्का असे. वाजपेयी-आडवाणी त्यांना खूप मान देत असत.

वाजपेयी-आडवाणी यांचं आघाडीचं राजकारण पाहिलेलं, अनुभवलेलं असल्यानं सध्याचं मोदी-शहा जोडीचं वर्तन चंद्राबाबूंना खटकलं असल्यास त्यात नवल ते काय? चंद्राबाबू आणि त्यांच्या पक्षाची ताजी नाराजी उफाळली ती अर्थसंकल्पीय अधिवेशनात. तीही लोकसभेचं कामकाज चालू असताना. त्यात कळीचा मुद्दा होता आंध्र प्रदेशला आर्थिक मदत नाकारल्याचा.

आंध्रचं विभाजन झाल्यानंतर तेलंगणा आणि आंध्र ही दोन वेगळी राज्यं स्वत:ची वाटचाल करत आहेत. दोन्ही राज्यांना केंद्राच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाकडून त्यांच्या खूप अपेक्षा होत्या. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात आंध्रच्या विकासासाठी कोणतीही तरतूद केली नाही. तेलगू देसम पार्टीचे खासदार जादा विकासनिधी मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. पण मोदी-जेटली यांनी त्याला दाद दिलेली दिसत नाही. त्यामुळे चंद्राबाबू आणि टीडीपीचे खासदार नाराज झाले.

त्यानंतर तडकाफडकी चंद्राबाबूंनी मंत्रीमंडळातील सदस्य, लोकसभेतले खासदार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर चर्चा केली. ‘भाजपला टीडीपीची गरज नसेल तर आम्हीसुद्धा नमस्ते करून चालते होऊ’ असा चंद्राबाबूंनी पक्षाच्या नेत्यांना इशारा दिला. त्यांनी एकाएकी एनडीएतून बाहेर पडण्याचं सूतोवाच करून भाजपवर एक प्रकारे चाबूक उगारला आहे.

केंद्र सरकारनं आंध्रमध्ये रेल्वे, पोलावरम प्रोजेक्ट आणि आंध्र राज्याची राजधानी अमरावतीला निधी देण्यासह विविध प्रकल्पाला निधी दिला नाही. यामुळे आंध्रची उपेक्षा झाली अशी सार्वत्रिक भावना आहे. हे घडणं अनपेक्षित होतं. त्यामुळे चंद्राबाबूंसह इतर टीडीपी पक्ष नेते संतापले आहेत.

सध्या चंद्राबाबू यांनी कुठलीही निर्णायक भूमिका घेतलेली नाही. भाजपची काय भूमिका पुढे येते, यावर आमची पुढची दिशा ठरेल असं ते बोलले आहेत.

शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखं दररोज इशारे, धमक्या, राजीनामे देण्याचा चंद्राबाबूंचा स्वभाव नाही. ते एक घाव दोन तुकडे करण्यात प्रसिद्ध आहेत. ते कमी बोलतात, कृती जास्त करतात. त्यामुळे मोदी-शहा यांनी चंद्राबाबूंनी उगारलेला चाबूक गांभीर्यानं घेतला असणार. म्हणूनच शहा यांच्या सूचनेवरून गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी फोनवरून चंद्राबाबूंशी संवाद साधला. सबुरीनं घेण्याची विनंती केली. त्याविषयीच्या बातम्या आता बाहेर आल्या आहेत. त्यामुळे चंद्राबाबूंचा उगारलेला चाबूक तूर्तास फटका देणारा ठरला नसला, तरी तो उगारलेलाच राहणार आहे.

चंद्राबाबूंची नाराजी म्हणजे शिवसेना पाठोपाठ एक मोठा घटक पक्ष एनडीएतून बाहेर पडण्याची तयारी करतो आहे. याचा देशपातळीवर एनडीएच्या आघाडीवर परिणाम होईल. एनडीएमध्ये भाजपचे सर्वांत जास्त खासदार असले तरी एनडीए ही जवळपास २८ छोट्या-मोठ्या पक्षांची आघाडी आहे. या आघाडीतले टीडीपी आणि शिवसेना हे दोन प्रमुख पक्ष आहेत. त्यांची नाराजी म्हणजे इतर पक्षांसाठी सावध होण्याची वेळ आहे.

महाराष्ट्रात एनडीएमध्ये प्रभावी भूमिका असलेले खासदार राजू शेट्टी आणि त्यांची शेतकरी संघटना आधीच एनडीएतून बाहेर पडले आहेत. शेट्टी हे तर खूप टोकाला जाऊन मोदी-भाजपवर टीका करत आहेत. ‘मोदींनी जनतेला फसवलं. विशेषत: शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. मोदी सरकारला सत्तेवर आणण्याचं पाप मी केलं, त्यात वाटेकरी झालो, याबद्दल मला पश्चाताप होतोय,’ असं शेट्टी वारंवार सांगत फिरत आहेत. या सरकारला खूर्चीवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत जाण्याची शेट्टी यांची तयारी आहे.

भाजपविरोधात मोठी आघाडी उभी राहावी म्हणून कालच्या २६ जानेवारीला मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ राजू शेट्टींनी सर्व विरोधी पक्षांना एकत्र केलं होतं. तिथून मोदींना हरवण्याची, संविधान बचावची हाक दिली होती. जनता परिवारातले नेते शरद यादव, शरद पवार, सीताराम येचुरी, काँग्रेसचे अशोक चव्हाण अशी दिग्गज मंडळी संविधान बचाव मार्चमध्ये सहभागी झाली होती. भाजपविरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटत आहेत, याची ही खूण होती.

शिवसेनेनं तर कागदोपत्री भाजपपासून घटस्फोट पूर्वीच घेतला आहे. यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केलीय. मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे संबंध खूप ताणले गेले होते. त्यानंतर ते सतत तणावातच राहिले आहेत. स्वतंत्र निवडणुका लढण्याची भूमिका घेऊन शिवसेनेनं त्यांच्यातला घरोबा संपल्याचं अधिकृतरीत्या जाहीर केलं आहे. शिवसेना स्वतंत्रपणे लढल्यास त्याचा भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसेल, हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाही.

चंद्राबाबू, शिवसेना, राजू शेट्टी हे भाजपचे मित्र दूर जाण्यानं इतर भाजप मित्रही सावध होतील, हे उघड आहे. कारण या छोट्या पक्षांना स्वत:चा जनाधार टिकवून ठेवायचा असतो. बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार आज जरी भाजपबरोबर दिसत असले तरी ते सतत भाजपची मनमानी मानणार नाहीत. उद्या लोकसभेच्या निवडणुकात खासदारकीच्या जागा वाटपात बिनसलं तर नीतिशकुमार भाजपला लाथ मारायला कमी करणार नाहीत. त्याबाबतीत नीतिशकुमारांचा हात कुणीही धरू शकणार नाही. बिहारमध्येच केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांचा लोकक्रांती पक्ष भाजपवर नाराज आहे. हा पक्ष उघडपणे लालू प्रसादांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर वावरतो आहे. कुशवाह हे बिहारातल्या माळी समाजाचे ताकदवान नेते आहेत. त्यांचं बरोबर नसणं २०१९च्या निवडणुकीत भाजपला परवडणारं नाही.

चंद्राबाबूंच्या चाबकाला हे असे इतर छोट्या-मोठ्या पक्षांचे हात लागले तर या चाबकात जोर येऊ शकतो. मग त्याचे जे फटके बसतील, त्यातून खूप मोठ्या उलथापालथी होऊ शकतील. कारण मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प निराशाजनक आहे, हे या पक्षांचं म्हणणं आहे. केंद्र सरकार शेतकरी, गरीब, तरुण, दलित, आदिवासींना काही देऊ शकत नसेल तर ते हाकललं पाहिजे, ही या नाराज पक्षांची भूमिका आहे. चंद्राबाबूंनी चाबूक उगारून या नाराजीला देशपातळीवर तोंड फोडलं आहे. तो उगारलेला चाबूक यापुढे काय काय करतो हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......