टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • हरिभाऊ बागडे, नरेंद्र मोदी, हंसराज अहिर आणि अनंतकुमार हेगडे
  • Wed , 27 December 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya हरिभाऊ बागडे Haribhau Bagde हंसराज अहिर Hansraj Ahir अनंतकुमार हेगडे Anant Kumar Hegde नरेंद्र मोदी Narendra Modi

१. स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना त्यांचे आई-बाप कोण हेदेखील ठाऊक नसते, असं वक्तव्य आता केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केलं आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यापेक्षा धर्म आणि जातीच्या आधारावरच लोकांनी स्वतःची ओळख निर्माण करावी असंही ते म्हणाले. कोप्पल जिल्ह्यातील यलबुर्गा या ठिकाणी झालेल्या ब्राह्मण परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. अशा प्रकारे ओळख करून दिल्यानं आत्मसन्मान प्रस्थापित होतो. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवाणाऱ्या माणसांमुळेच समस्या निर्माण होतात, असाही आरोप त्यांनी केला.

सरपंचकीचाही वकूब नसलेल्यांना कधीकधी केंद्रीय मंत्रिपदाची लॉटरी लागते आणि मग ते आपल्या तथाकथित जाती आणि धर्माच्या ओळखीलाही लाज आणेल, अशी वक्तव्यं करतात. आपण, अमुक एका जाती आणि धर्मात जन्म घेतो, यात जिचा अभिमान बाळगावा अशी आपली नेमकी काय कर्तबगारी असते, हे हेगडे यांनाच माहीत! अभिनेता प्रकाश राज यानं हेगडे यांनी खालची पातळी गाठल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तो मात्र तथ्यहीन आहे. हेगडे हे मुळात ज्या पातळीवर आहेत, त्याहून खालची पातळी संभवत नाही.

.............................................................................................................................................

२. मी रुग्णालयात येणार हे माहिती असूनदेखील डॉक्टर रजेवर जातात. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालून ठार मारू, असं वादग्रस्त विधान केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केलं आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूरच्या सरकारी रुग्णालयात अहीर यांच्या हस्ते अमृत दीनद्याल मेडिकल स्टोअरचं उद्घाटन झालं. या दुकानात रुग्णांना २४ तास स्वस्त दरात औषधं मिळू शकतील. या दिवशी रुग्णालयातील डॉक्टर रजेवर होते. मी जनतेनं निवडून दिलेला खासदार असून मी केंद्रीय राज्यमंत्रीपदावर आहे. मी इथं येणार हे माहीत असूनही डॉक्टर रजेवर कसे जाऊ शकतात, असा सवाल त्यांनी केला.

हेही सरपंच क्रमांक दोन. लोकशाहीचे अनेक फायदे असतात, त्याचप्रमाणे काही तोटे असतात, त्यातला हा एक तोटा. हे सद्गृहस्थ हॉस्पिटलमध्ये येणार म्हणून डॉक्टर हजर राहिले नाहीत, तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, हे तर्कट अदभुत आहे. शिवाय, हे काका नक्षलवाद्यांना गोळ्या घालतात, म्हणजे काय, तर नक्षलवाद्यांच्याच वयाच्या जवानांना तिकडे या जोखमीच्या कामाला पाठवतात. माणूस नक्षलवादी बनतो, तेव्हा तो गोळ्या घालायला नक्षलवादी बनतो, गोळ्या खायला बनत नाही, हेही यांना माहिती नाही का? बाकी, अटलबिहारींच्या वाढदिवशी उघडल्या जाणाऱ्या दुकानालाही दीनदयाळांचंच नाव आहे, हे विलक्षण!

.............................................................................................................................................

३. पूर्वी भाजपमध्ये प्रवेश देताना खूप काळजी घेतली जात होती. आता ज्यांच्यामुळे पक्ष बदनाम होतो, अशा लोकांना पक्षात घेतलं जात आहे, अशी खंत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी बोलून दाखवली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बागडे म्हणाले, पूर्वी पक्षातर्फे कोणत्याही निवडणुकीला उमेदवारी देताना किंवा पक्षात प्रवेश देताना विविध माध्यमातून चौकशी केली जात होती. काळानुरूप फार बदल होत गेले. अनेक जुने व निष्ठावान कार्यकर्ते दुर्लक्षित राहिले आहेत. भाजपचा आज वटवृक्ष झाला, मात्र ज्यांनी खतपाणी घालून तो वाढवला त्यांच्याकडे म्हणावं तेवढं लक्ष दिलं जात नाही. आता पक्षात फक्त खुनाचा गुन्हा असलेला आणि मनोरुग्ण सोडले, तर कोणालाही प्रवेश दिला जातो, असे ते म्हणाले.

अंहंहं! गैरसमज नको. मनोरुग्ण आणि खुनाचा गुन्हा असलेले नकोत, हे फक्त कोणालाही बाहेरून प्रवेश देतानाचे हे निकष आहेत. जे आधीपासून पक्षात आहेत, त्यांच्यासाठी ही पात्रता अट नाही. ते जुने आणि योग्य ठिकाणी निष्ठा वाहिलेले कार्यकर्ते असतात, हे अधिक महत्त्वाचं मानलं जातं, हे पक्षातल्या अनेकांकडे पाहून कळतंच की! शिवाय ‘बदनाम सही, सत्ता कमाने का काम तो हुआ’, हा भाजपचा सध्याचा फंडा आहे.

.............................................................................................................................................

४. नोएडामध्ये उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आल्यास त्याची खुर्ची जाते, असा एक भ्रम आहे. पण आदित्यनाथ यांनी इथं येऊन हा भ्रमाचा भोपळा फोडला, असं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आदित्यनाथांच्या कपड्यांकडे बघून ते फार कर्मठ विचारांचे आहेत असं वाटतं. पण त्यांचे विचार आधुनिक आहेत. उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री नोएडात येत नाही, असा एक समज तयार झाला होता. पण याला आदित्यनाथ छेद दिला, त्याद्दल त्यांचं अभिनंदन करतो, असं मोदी म्हणाले. जुनाट प्रथांमध्ये अडकणाऱ्या समाजाची प्रगती कधीच होत नाही, असंही मोदी म्हणाले.

राजकारणाची हीच खरी गंमत आहे. कोण, कशावर, काय बोलेल हे सांगता येत नाही. जुनाट प्रथांमध्ये अडकण्यावर भाजपचे पंतप्रधान भाष्य करतायत, असा सुदिन पाहण्याची कल्पनाही कधी केली नसेल या देशाच्या नागरिकांनी. आता आदित्यनाथांनी अंधश्रद्धेच्या भ्रमाचा भोपळा फोडला आहे, हा भ्रमाचा भोपळा खुद्द पंतप्रधानांनीच निर्माण केला आहे... तो तेच फोडूही शकतात, हे लक्षात ठेवलेलं बरं.

​​​​​​​.............................................................................................................................................

५. पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा पाकिस्ताननं कोठडीत छळ केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जाधव यांच्या कान आणि डोक्यावर जखमांचे व्रण दिसत असल्यानं त्यांचा छळ झाल्याची शक्यता अधिक बळावली आहे. दरम्यान, जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट परराष्ट्र मंत्रालयातील कार्यालयात झालीच नाही, एका शिपिंग कंटेनरमध्ये ही भेट घडवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कुलभूषण जाधव यांना सोमवारी त्यांच्या आई आणि पत्नी भेटल्या. ही भेट म्हणजे केवळ पाकिस्ताननं केलेला फार्स ठरला आहे. जाधव आणि त्यांच्या आई-पत्नी यांच्यात एक काचेची भिंत होती. त्यांच्यात फोनवरून संभाषण झालं. जाधव यांच्या उजव्या कानावर गडद रंगाचे व्रण दिसत आहेत. त्यांच्या डोकं आणि गळ्यावरही काही व्रण आहेत. त्यामुळे जाधव यांचा पाकिस्ताननं छळ केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जाधव यांना पाकिस्तानात हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक झाली आहे, याचा आपल्याकडे जबाबदार प्रसारमाध्यमांनाही विसर पडलेला दिसतो. अशा आरोपीची त्याच्या कुटुंबियांबरोबर भेट होऊ दिली गेली, हेच खूप असताना ती कुठे झाली, यावरून काथ्याकूट करणं हे अपरिपक्वतेचं लक्षण आहे. जाधव यांची सुटका करण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, तिथं हे असले भावुक फंडे उपयोगाचे नाहीत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4299

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......