टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी
  • Wed , 13 December 2017
  • विनोदनामा टपल्या Taplya राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi

१. नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा निघाला असतानाच दुसरीकडे सिंचन घोटाळ्याप्रकरणी नागपूरमध्ये चार गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. वैनगंगा नदीवर असलेल्या गोसीखुर्द धरणातून नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील सुमारे २ लाख ५० हजार ८०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून या भागातील जनता ३० वर्षांपासून जास्त काळ शेतीला पाणी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं होतं.

तिकडे पवारांनी सत्तेतून खेचू अशी गर्जना करायची की, इकडे लगेच सिंचन घोटाळ्यातले गुन्हे दाखल होणार, हे ‘सिंघम’छाप मद्रासी फॉर्म्युलेबाज सिनेमांपेक्षाही कंटाळवाणं आणि भोंगळही आहे. प्रत्येक वेळेला सरकार बदलल्यानंतर यांनी त्यांचे घोटाळे उघड करण्याची धमकी देऊन त्यांना गप्प ठेवायचं आणि त्यांनी यांचे घोटाळे वापरून यांना गप्प ठेवायचं, असाच खेळ खेळला जाणार असेल, तर राज्यात सत्तापालट घडवल्याचा जनतेचा समज हा निव्वळ भासच म्हणायला हवा.

.............................................................................................................................................

२. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी गुजरातच्या विकासाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भाजपनं विकासकामांची जंत्रीच वाचून दाखवली. संपूर्ण प्रचार मोहिमेत राहुल गांधी खोटं बोलले असून ते सातत्यानं चुकीचे वक्तव्यं करत आहेत, अशी टीका करून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले की, आता तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष झाला आहात. तुमची जबाबदारी वाढली असून आता तरी खोटं बोलणं सोडा. यावेळी त्यांनी गुजरातमधील कापूस, भुईमूग आणि विजेच्या उत्पादनाशिवाय रोजगाराशी संबंधित आकडेवारी सांगितली. काँग्रेसच्या काळात लघु आणि मध्यम स्वरूपाचे १,७८,००० उद्योग होते. त्यांची संख्या आता ३,७६,०५७ इतकी झाली आहे, असं ते म्हणाले.

रविशंकर प्रसादांचं म्हणणं बरोबर आहे. जबाबदारीच्या पदावरून खोटं बोलण्याची जबाबदारी पंतप्रधानांनीच घेतलेली असताना राहुल यांनी त्यांची बरोबरी करायला जाण्याचं कारण नाही. त्यांनी दिलेल्या आकडेवारीत एक आकडेवारी राहिली. काँग्रेसच्या राजवटीत दोन वर्षं वयाची असलेली मुलं भाजपच्या राजवटीअखेर २४ वर्षांची झाली आहेत, हे त्यांनी राज्य सरकारच्या देदीप्यमान कामगिरीत कसं घेतलेलं नाही, देव जाणे!

.............................................................................................................................................

३. अनधिकृत जागेवर बांधलेल्या मंदिरात केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचू शकेल का, असा सवाल विचारत दिल्ली उच्च न्यायालयानं सरकारी यंत्रणांच्या कारभारावर ताशेरे ओढले. दिल्लीच्या करोलबाग परिसरात असलेल्या १०८ फूट उंच हनुमानाच्या मूर्तीभोवतीचं अतिक्रमण हटवण्याच्या वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं म्हटलं की, फुटपाथ परिसरात अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या मंदिरातून केलेली प्रार्थना देवापर्यंत पोहोचेल का? यामुळे प्रार्थनेचं पावित्र्य कायम राहील का?

मान्यवर न्यायालयाचा हिंदू परंपरांचा अभ्यास तोकडा आहे, असं इथे विनम्रपणे म्हणावंसं वाटतं. खऱ्या आध्यात्मिक परंपरेत तर परमेश्वराला कोणत्याही रूपात पाहण्याचीही गरज नसते आणि त्याला नमन करण्यासाठी कुठे जाण्याचीही गरज नसते. जिथं असू तिथून मनोमन स्मरण केलेला नमस्कार पोहोचतो. मंदिरं ही शक्तिप्रदर्शनासाठी उभारायची असतात!

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/206

.............................................................................................................................................

४. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन अवकाश धोरणावर स्वाक्षरी केली असून त्यात नासाला चंद्र आणि मंगळावर अवकाशवीर पाठवण्यासाठी तयारी करण्यास सांगण्यात आलं आहे. १९७२ मधील अखेरच्या चांद्रमोहिमेनंतर अमेरिकी अध्यक्षांना पुन्हा चंद्र गाठण्याचं धोरण प्रथमच निश्चित केलं आहे. नासानं चांद्रमोहिमा करण्याचं सोडून दिलं होतं.

ट्रम्प यांची ही योजना खरोखरच स्तुत्य आहे. ती मनावर घेऊन ‘नासा’नं आता वेळ न दवडता दोन यानं तयार करावीत. एकात ट्रम्प यांना बसवावं, दुसऱ्यात किम जोंग उन यांना बसवावं आणि चंद्रावर व मंगळावर पाठवून द्यावं. अखिल मानवजातीचं हित लक्षात घेऊन यानात परतीचं इंधन मात्र भरू नये.

.............................................................................................................................................

५. उत्तर प्रदेशात अलिगढ महापालिकेत बहुजन समाज पार्टीच्या महापौरांनी उर्दू भाषेतून शपथ ग्रहण केल्यानं तिथं उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. बसपाचे नगरसेवक मोहम्मद फुरकान यांनी शपथविधी सोहळ्यात मातृभाषा उर्दूमधून शपथ घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला विरोध करत तिथं उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि कार्यक्रमात गोंधळ घातला.

उर्दू ही अन्य कोणत्याही भाषांप्रमाणे जिवंत भारतीय भाषा आहे, मूठभरांची मृत भाषा नाही; तिच्यावर कोणत्याही धर्माचा शिक्का मारणं शुद्ध अडाणीपणाचं आहे, कारण सर्वधर्मीय साहित्यिकांनी या भाषेत मौलिक साहित्यनिर्मिती केली आहे. त्यामुळे त्या भाषेत शपथ घेण्याचा या देशातल्या कोणत्याही नागरिकाला पूर्ण अधिकार आहे, हे कळण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना एखाद्या मदरशात प्रवेश द्यायला हवा फुकट.

.............................................................................................................................................

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 13 December 2017

टिक्कोजीराव, उर्दू या भाषेवर धर्माचा शिक्का मारणं बरोबर नाही म्हणता. पण पाकिस्तान वेगळा काढला गेला तो उर्दू भाषेच्या युक्तिवादावर. भारताला तोडणारी ही भाषा आहे. तिच्याकडे संशयाने बघितलंच पाहिजे. भारताचं जाऊ द्या, पाकिस्तान सुद्धा उर्दू भाषेच्या सक्तीमुळे तुटला होता. आठवतंय पूर्व पाकिस्तानात स्थानिक बंगालीच्या जागी उर्दूची सक्ती झाली होती ते? हिंदूना उर्दू संशयास्पद वाटलीच पाहिजे. असो. आणि ती मूठभरांची मृत भाषा कोणती हो? लपूनछपून संस्कृतवर शिंतोडे उडवलेले कळतात बरं आम्हांस. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......