टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • डोनाल्ड ट्रम्प, शरद पवार, हुकूमसिंग आणि राज ठाकरे
  • Thu , 10 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प

रिपब्लिकन बुशने केलेल्या युद्धखोरीमुळे झालेल्या कर्जाचा डोंगर उपसायला ओबामांना करआकारणी करायला लागली. त्याला वैतागून धाकले बुश परवडले, असं म्हणायला लावणारा आढ्यताखोर, बाईलवेडा, वर्णद्वेष्टा, तोंडाळ आणि शुद्ध आचरट ट्रम्प अमेरिकन जनतेने निवडून दिला आहे… श्रीमंतांचे चोचले थांबवा म्हणून त्यांनी एका अब्जाधीशाला निवडून दिलं आहे… एकंदर काय, तर तिकडेही बागों में बहार है!!!

......

२. भोपाळमधल्या सिमी अतिरेक्यांच्या बराकीत काजू, बदाम, किसमिस, पेंडखजूर आणि अन्न शिजवण्यासाठी भांडी व शेगडीही सापडली…

भिजत घातलेले बासमती तांदूळ, नुकत्याच कापलेल्या बकऱ्याचं मटण आणि दुधात भिजवलेलं केशर सापडलं नाही का? अरेरे, मग बिर्याणी कसे करून खात होते ते? की पार्सल मागवत होते?

......

३. पाचशे, हजारच्या नोटा रद्द केल्यावर आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आपट्याची पानं वाटणार आहे का? : मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा खोचक सवाल

बरोबरच आहे ही काळजी? दोन्ही चुलत पक्षांना ती अडचण नाही… तिथं कोणी कोणाला काही देत नाहीत… फक्त घेण्याचीच सवय… देऊन देऊन देतात काय, तर निवडणुकीच्याआधी टार्गेट ठरवून जाहीरपणे खोपच्यात घेऊन देतात, तेवढंच… तेही कार्यकर्तेच देतात!

......

४. उत्तर प्रदेशातल्या कैरानामधून हिंदूंचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असताना त्यांची बाजू घेतल्याबद्दल सेक्युलरांनी मला जातीयवादी ठरवलं तरी बेहत्तर : भाजप नेते हुकूमसिंग

अहो, पण म्हणजे तुम्ही कपाळावर पट्टीच चिकटवून घेतलेली असताना कोणी तुम्हाला वेगळं काही कसं म्हणेल? तुम्हाला जातीयवादी म्हणण्यासाठी कारण कशाला हवं कसलं?

......

५. पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून स्वागत

काल रात्रीपासून त्यांच्यावर आणि बारामतीवर जे विनोद होतायत, त्यांनी ते खळखळून हसल्याचं बातमीत का लिहिलेलं नाही? काळा पैसा कमावणारे तो नोटांच्या स्वरूपात साठवून ठेवतात, अशी बाळबोध आर्थिक समज असलेल्या देशात आपण राहतो आहोत, याचं त्यांना किती बरं वाटलं असेल.

६. एसटीच्या निवडक मार्गांवर एसटीने करार केलेल्या हॉटेलांत प्रवाशांना शिरा, पोहे, उपमा, इडली, वडापाव, मेदूवडा यातला एक नाश्‍ता आणि एक चहा फक्त तीस रुपयांत मिळणार

बातमी चांगलीच आहे. फक्त ही हॉटेलं टाळून चालक-वाहकांची सगळीच 'सोय' फुकटात करणाऱ्या हॉटेलांपुढे एसटी नेण्याच्या प्रकारांना आळा कसा घालणार? शिवाय तीस रुपयांत द्यायचंय म्हणून नैवेद्याच्या वाटीत शिरा, पोहे आणि मरतुकडे वडे खपवले जाणार नाहीत, हे कोण पाहणार?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......