शंकर : कॅमेरा हा ज्याचा तिसरा डोळा आहे असा दिग्दर्शक
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • तमिळ चित्रपट दिग्दर्शक शंकर आणि त्यांच्या सिनेमांच्या तेलुगु आवृत्त्यांची पोस्टर्स
  • Sat , 07 October 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar

दिल्लीमध्ये भाजप आणि काँग्रेससारख्या प्रस्थापित राजकीय पक्षांचा पराभव करून अरविंद केजरीवाल सर्वप्रथम सत्तेत आले, त्याला अनेक सामाजिक आणि राजकीय घटक कारणीभूत होते. आपच्या समर्थकांनी अतिशय चतुराईनं केलेल्या सोशल मीडिया कॅम्पेनचा या विजयात वाटा होता. वाचकांना आठवत असेल तर 'नायक' या चित्रपटामधल्या शिवाजीराव गायकवाड या राज्याच्या भ्रष्ट आणि गर्विष्ठ मुख्यमंत्र्याला आवाहन देऊन एक दिवसाचा मुख्यमंत्री बनणाऱ्या पात्राचा केजरीवालांची प्रतिमानिर्मिती करण्यासाठी आपच्या मीडिया मॅनेजर्सनी खुबीनं वापर करून घेतला होता.

'नायक'मधला शिवाजीराव गायकवाड हा प्रामाणिक, ध्येयवादी आणि प्रस्थापित भ्रष्ट व्यवस्थेला आव्हान देणारा होता. 'नायक'मधले संवाद-प्रसंग वापरून केजरीवाल हे प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देणारे 'नायक'च आहेत, असा प्रचार आप समर्थकांनी केला होता. काँग्रेस-भाजप म्हणजे भारतातल्या सडलेल्या राजकीय व्यवस्थेचं प्रतीक असलेला बलराज चौहान (‘नायक’मधलं अमरीश पुरी यांनी केलेलं भ्रष्ट मुख्यमंत्र्यांचं पात्र) आहे, अशी भावना  मतदारांच्या जाणिवां-नेणिवांमध्ये जागृत करण्यात 'आप'वाले यशस्वी झाले होते. 'आप'च्या आणि पर्यायानं केजरीवालांच्या यशामध्ये अशा प्रकारे एका चित्रपटानं छोटासा का होईना वाटा उचलला. केजरीवाल खरोखर शिवाजीराव गायकवाडसारखे नायक झाले का याचा फैसला दिल्लीकर पुढच्या विधानसभा निवडणुकीत करतीलच. पण 'नायक' चित्रपट ज्याने बनवला तो दिग्दर्शक शंकर आपल्या चित्रपटाचं यश आपल्याला ज्या भागातली भाषादेखील बोलता येत नाही, त्या भागात राजकीय उत्पात घडवताना बघून मनातल्या मनात नक्कीच खुश झाला असेल. कारण चित्रपटांमधून राजकीय विधान करण्यात शंकरचा हातखंडा आहे.  

आश्चर्य वाटेल, पण आज बिग बजेट चित्रपटांसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक शंकर जेव्हा तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला, तेव्हा त्याला यथार्थ, छोट्या बजेटचे, चकचकटापेक्षा कथेला प्राधान्य देणारे सिनेमे बनवायचे होते. आज शंकरची फिल्मोग्राफी बघून हे खरंही वाटणार नाही. बॉलिवुडच नव्हे तर देशभरातल्या अनेक प्रादेशिक फिल्म इंडस्ट्रीमध्ये इंजिनीअरिंग केलेले लोक मोठ्या प्रमाणावर दिसतात. शंकरनेही आपलं मॅकेनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलं होतं. त्या पार्श्वभूमीचा फायदा शंकरला फिल्ममेकिंगमध्ये झाला असणार. फिल्ममेकिंगची अनेक डिपार्टमेंट्स दिग्दर्शक म्हणून सांभाळणं आणि कुठल्याही प्रॉडक्टचे शेकडो नटबोल्ट व्यवस्थित घट्ट पिरगाळणं यात बरंच साम्य आहे. कुठलाही एखादा नटबोल्ट नीट बसवला नाही तर प्रॉडक्ट फेल जाण्याची शक्यता असते. संघर्षाच्या काळात शंकरचा आदर्श यथार्थ सिनेमे बनवणाऱ्या जे. महेंद्रन या तमिळ दिग्दर्शकाचा होता. शंकरनं आपल्या पहिल्या चित्रपटासाठी जी कथा लिहिली होती, ती स्त्रीप्रधान होती. पण तेव्हा तमिळ सिनेमात ‘लार्जर दॅन लाईफ’ नायक, हाणामाऱ्या, गाणं, अंगप्रदर्शन अशा घटकांचा समावेश असणाऱ्या मसाला सिनेमाची चलती होती. शंकरला आपल्या स्त्रीप्रधान चित्रपटासाठी निर्माताच मिळेना. शेवटी शंकर आपला पहिला चित्रपट बनवण्यासाठी प्रचलित व्यवस्थेला शरण गेला. त्याचा सर्व व्यावसायिक चित्रपटांचे गुणधर्म अंगी असणारा पहिला चित्रपट 'जेंटलमॅन' सुपरहिट झाला आणि शंकरनं नंतर मागं वळून बघितलं नाही. यशाची चव चाखलेल्या शंकरनं मग यथार्थ सिनेमाकडे ढुंकूनही बघितलं नाही. आज शंकर म्हणजे मसाला चित्रपटांचं समानार्थी नाव बनलं आहे. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करणारी माणसं स्वतःच व्यवस्थेचा भाग बनतात, तेव्हा किती बदलतात याचं हे उदाहरण आहे.

शंकर हा तसा तब्येतीत भरपूर वेळ घेऊन काम करणारा माणूस. जवळपास पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यानं अवघे चौदा सिनेमे दिग्दर्शक म्हणून केले आहेत. त्याचे काही सिनेमे सुपरहिट आहेत, काही हिट आहेत तर काही सरासरी चालले आहेत. पण एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यानं अपयशाचं किंवा फ्लॉपच तोंड बघितलं नाहीये. मोठ्या कारकिर्दीत फ्लॉप सिनेमा न देण्याचं कर्तृत्व असलेले फार कमी लोक आहेत. चटकन आठवणारी दोन नावं म्हणजे राजू हिरानी आणि ‘बाहुबली’ फेम राजामौली. 

शंकरचा स्वतःचा आवडता दिग्दर्शक मणिरत्नम आहे. पण तो मणिरत्नमसारखे सिनेमे तयार करण्याच्या फंदात कधी पडला नाही. मला स्वतःला शंकर दिग्दर्शक म्हणून कधी आवडतो, तर कधी आवडत नाही. पण त्याच्या चित्रपटांनी काही आयुष्यभर आठवत राहतील अशा गोष्टी दिल्या आहेत हे नक्की. त्याच्या 'जेंटलमॅन'मध्ये प्रभुदेवा नावाच्या चमत्काराला पडद्यावर पहिल्यांदा नाचताना बघितलं. त्याच्या सिनेमात रहमाननं अदभुत गाणी (‘माया मछिंद्रा’ किंवा ‘टेलिफोन धून में हसनेवाली’ असे अतिशय विचित्र लिरिक्स असणारी) दिली आहेत. त्याचा 'इंडियन' आता कितीही बटबटीत वाटत असला, तरी तेव्हा त्यातल्या भ्रष्टाचारविरोधी संदेशामुळे खूप आवडला होता. मुख्य म्हणजे त्याचे 'नायक', 'रोबोट' आणि 'शिवाजी द बॉस' हे सिनेमे मला त्यातली सगळी अतर्क्यता लक्षात येऊनही बेहद आवडतात. पण शंकरचा मला सगळ्यात जास्त आवडलेला सिनेमा म्हणजे 'अपरिचित-द स्ट्रेंजर'. मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असणारा एक आदर्शवादी माणूस भ्रष्ट लोकांना कसं संपवतो याची कथा चित्रपटात होती. शंकरच्या नावावर एक नकोसा रेकॉर्डही आहे. त्याचे 'इंडियन' आणि जुळ्या भावंडांची प्रेमकथा सांगणारा 'जीन्स' हे दोन सिनेमे ऑस्करसाठी भारताकडून पाठवले गेले होते. अजूनही ऑस्करसाठी पाठवल्या गेलेल्या सर्वांत वाईट चित्रपटांची यादी बनते, त्यात हे दोन चित्रपट सगळ्यात वर असतात. 

शंकरच्या चित्रपटांमध्ये नेहमीच एक राजकीय अंडरकरंट असतो. रजनीकांत तर शंकरच्या सिनेमातून आपल्या राजकीय भूमिका स्पष्ट करतो अशी त्याच्या चाहत्यांची श्रद्धा आहे. 'शिवाजी द बॉस'मधला खलनायक आठवतोय? तो डिट्टो करुणानिधीसारखा होता. तोच काळा गॉगल, तीच ढब  तेच व्यक्तिमत्त्व. 'शिवाजी द बॉस'  आला तेव्हा करुणानिधी सत्तेत होते. वैयक्तिक आयुष्यात रजनीकांतचे करुणानिधींशी सौहार्दाचे संबंध असले तरी सार्वजनिक आयुष्यातले त्यांचे संबंध लव्ह-हेट रिलेशनमधले आहेत. या चित्रपटामधला शिवाजी या करुणानिधीसारख्या दिसणाऱ्या खलनायकाला कसं पराभूत करतो, हे बघून प्रेक्षकांनी टाळ्या पिटल्या होत्या.

राजकारण आणि राजकारणी हे शंकरच्या चित्रपटात सतत येत असतात. प्रभुदेवा नायक असणारा 'हमसे है मुकाबला' हा चित्रपट एक प्रेमकथा होती. त्यातही गिरीश कर्नाडांनी रंगवलेला खलनायक राजकारणी होता. 'हिंदुस्थानी' आणि 'नायक' या चित्रपटांनी राजकारण्यांचं एक काळंकुट्ट चित्र रंगवलं आहे. देशात एकूणच राजकारण्यांबद्दल जो सार्वकालिक असंतोष असतो, त्याचा पुरेपूर उपयोग शंकर आपल्या चित्रपटांमधून करून घेतो. त्याच्या 'रोबोट २.०'मधून रजनीकांत त्याच्या राजकारणामधील प्रवेशावर भाष्य करेल अशा अटकळी बांधल्या जात आहेत. 'जीन्स' आणि 'थ्री इडियट्स'चा रिमेक असणारा 'नंबन' हे फक्त अपवाद.

‘भव्यता’ हे शंकरच्या चित्रपटांचं व्यवच्छेदक लक्षण. 'जीन्स'मधल्या एकाच गाण्यात त्यानं जगातल्या सात आश्चर्यांची सफर प्रेक्षकांना घडवून आणली होती. त्याच्या सिनेमातल्या एका गाण्यात त्यानं तब्बल पंधराशे ज्युनियर आर्टिस्ट्सचा वापर केला होता. त्याच्या या भव्यतेच्या सोसामुळे त्याला ‘तमिळ सिनेमामधला जेम्स कॅमेरॉन’ अशी पदवी त्याच्या चाहत्यांनी दिली आहे. शंकर आणि कॅमेरॉनचा वाढदिवस एकाच महिन्यात येतो हा योगायोग. शंकरच्या सिनेमाला वर्णगंडाचा एक पैलू आहे. एकूणच भारतीय लोकांमध्ये आणि विशेषतः दाक्षिणात्य लोकांमध्ये गोऱ्या कातडीबद्दल आणि पर्यायानं विदेशाबद्दल प्रचंड आकर्षण असतं हे एक उघड गुपित आहे. शंकरच्या सिनेमातली पात्रं ही अनेक वेळा विदेशात शिकलेली असतात किंवा परदेशी स्थायिक झालेली असतात. 'शिवाजी द बॉस'मधला नायक आपल्या विदेशातल्या उज्ज्वल करिअरवर लाथ मारून देशाची सेवा करण्यासाठी वापस येतो. त्यातून त्याची त्यागमूर्ती अशी इमेज निर्माण होते. शंकरच्या सिनेमाधल्या गाण्यांमध्ये गोऱ्या ज्युनिअर आर्टिस्टचा भरणा असतो. या गोऱ्या कातडीच्या आकर्षणातूनच 'आय' या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचला अरनॉल्ड श्वॉर्जनेगरला बोलावण्याची कल्पना शंकरच्या सुपीक डोक्यातून आली असावी. 

दिग्दर्शक म्हणून शंकर कधीच देशातल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत येऊ शकत नाही. मग त्याची नोंद का घेतली जावी? पंचवीस वर्षांमध्ये एकही फ्लॉप सिनेमा बनवला नाही म्हणून? त्याचे चित्रपट भव्यदिव्य असतात म्हणून? तो रजनीकांत आणि कमल हसनचा लाडका दिग्दर्शक आहे म्हणून? त्याचे चाहते त्याची तुलना जेम्स कॅमेरॉनशी करतात म्हणून? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ‘नाही’ असंच आहे.

शंकरची नोंद घेणं आवश्यक आहे ते त्यानं 'मासेस'ला आवडतील असे चित्रपट सातत्यानं बनवले म्हणून. मासेसनं सुपरहिट केलेल्या चित्रपटांचं चित्रपटसृष्टीच्या अर्थकारणात खूप महत्त्वाचं स्थान असतं. मासेससाठी सिनेमा बनवणारे सलमान खान, रजनीकांत, शंकरसारखे लोक म्हणजे इंडस्ट्रीची फुप्फुसं आहेत. हे लोक इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक चलनवलन घडवून आणतात म्हणून अनेक चांगल्या प्रायोगिक चित्रपटांची निर्मिती होण्याचा रस्ता मोकळा होतो. या लोकांचं नाव काढल्यावर तुच्छतेनं बघण्याचं आणि नाक मुरडण्याचं स्वातंत्र्य अर्थातच सगळ्यांना आहे, पण या वरील लोकांची गंभीर लिखाण करणाऱ्या लोकांनी नोंद न घेणं हा त्यांच्यावरचाच अन्याय नसेल तर ते ज्या लाखो-करोडो लोकांसाठी सिनेमा बनवतात, त्या मासेसवर पण अन्याय असेल.

ज्या देवाच्या नावावरून शंकरचं नाव ठेवलं आहे, त्या शंकराला तिसरा डोळा होता. शंकराला राग आला की, तो तृतीय नेत्र उघडून समोरच्याला क्षणार्धात भस्मसात करे. शंकर या दिग्दर्शकाकडे कॅमेरारूपी तिसरा नेत्र आहे. त्या कॅमेऱ्यातून राजकीय नेते, भ्रष्ट व्यवस्था यांच्यावर शंकरच्या तिसऱ्या नेत्राचा रोख आहे. जोपर्यंत जनमानसात राजकारण्यांबद्दल, व्यवस्थेबद्दल असंतोष आहे, तोपर्यंत शंकरच्या एकही फ्लॉप नसणाऱ्या कारकिर्दीला गालबोट लागणार नाही हे नक्की. 

.............................................................................................................................................

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Bharat D

Sat , 07 October 2017

गौतम वासुदेव मेनन यांच्यावरही आता एक जोरदार लेख येऊ द्या! आणि तरूण दिग्दर्शक शशीकुमारवरही. मराठी प्रेक्षकांना यांची ओळख तुम्हीच समर्थपणे करून देऊ शकाल!


Bharat D

Sat , 07 October 2017

चांगला लेख. एक बरीकसा तपशील म्हणजे जी पोस्टर्स दाखवली आहेत ती डब केलेल्या तेलुगू आवृत्त्यांची आहेत, मुळ तमिळ चित्रपटांची नाहीत. मुळ तमिळ शिर्षक, कंसात तेलुगू शिर्षक आणि मुख्य भुमिका याप्रमाणे: जेंटलमॅन (जेंटलमॅन): अर्जून, मधू. महेश भटने यावरून चिरंजीवी आणि जुहीला घेऊन हिंदी जंटलमॅन काढला. आपटला जोरात. कादलन(प्रेमिकूडू): प्रभुदेवा, नगमा. (हिंदी डबींग: हम से है मुकाबला) इंडीयन (भारतीयुडू): कमल, मनिषा, उर्मीला (हिंदी डबींग: हिंदुस्तानी) मुदलवन् (ओक ओक्कूडू): अर्जून, मनिषा. हिंदिमध्ये अनिल कपूर आणि राणी मुखर्जीचा नायक बॉयीज् (बॉयीज): सिद्धार्थ, जेनीलीया, भरत आणि इतर. हा हिंदीत आला नाही. जीन्स (जीन्स): प्रशांत, ऐश्वर्या. हिंदीतही नाव तेच आहे. फक्त अन्नीयन् (अपरीचितडू, हिंदीत अपरीचित) वगळता इतर सर्व चित्रपटांना रेहमानचं संगीत आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......