टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नरेंद्र मोदी आणि दिग्विजय सिंह
  • Sat , 09 September 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नरेंद्र मोदी Narendra Modi दिग्विजय सिंह Digvijaya Singh बाबा रामदेव Baba Ramdev पतंजली Patanjali इरफान पठाण Irfan Pathan

१. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अर्वाच्च भाषेत ट्वीट करणारे काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांना भाजपकडून त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं गेलं आहे. ज्या नेत्याला मुलगी आणि पत्नी यांच्या वयातील फरक समजत नाही, ते पंतप्रधान मोदी यांच्याकडे बोट दाखवतात, अशी टीका भाजप नेते लोकेंद्र पराशर यांनी केली आहे. लोकेंद्र पराशर हे मध्य प्रदेश भाजपचे माध्यम प्रभारी आहेत.

दिग्विजय सिंह हे भाजपमधील आदित्यनाथ, साक्षी आणि प्राची या स्वत:ला योगी, महाराज, साध्वी वगैरे म्हणवून घेणाऱ्या तोंडाळ ब्रिगेडचेच काँग्रेसमधले भाऊबंद आहेत. त्यांनी मोदींवर केलेलं ट्वीट हे अश्लाघ्य आणि मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या जबाबदार नेत्याला न शोभणारं आहे. मात्र, त्यावरची प्रतिक्रिया देताना लोकेंद्र यांच्या स्वरात नकळत विषाद डोकावलेला दिसतो. दिग्विजय सिंह यांच्यापेक्षा वयानं खूप लहान असलेली स्त्री त्यांच्यावर अनुरक्त झाली, याची असूया का बाळगायची. लग्न हा दोघांमधला व्यवहार आहे, त्यात वयाची पूर्वअट लादणारे तुम्ही कोण? मुलीच्या वयाच्या स्त्रीबद्दल बोलताना लोकेंद्र यांना भाजपनं पावन करून घेतलेलं पितामह एन. डी. तिवारी आठवले नाहीत, हे आश्चर्यच. ते नातींच्या वयाच्या मुलींबरोबर चाळे करत होते हो!

.............................................................................................................................................

२. महाविद्यालयं आणि विद्यापीठांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं थेट प्रक्षेपण करण्याचे आदेश यूजीसीनं दिल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये वातावरण तापलं आहे. राज्य सरकारनं आपल्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) आदेशाकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं आहे. ११ सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्समध्ये केलेल्या भाषणाला १२५ वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी हे भाषण देणार आहेत. या भाषणाचं सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये थेट प्रक्षेपण करण्याचे आदेश यूजीसीनं दिले आहेत.

अरे अरे, विवेकानंदांनी १२५ वर्षांनंतरच्या ज्या मूळ भाषणावर आपलं भाषण बेतलं होतं, ते मोदींचं भाषण ऐकण्याची सुवर्णसंधी बंगालच्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही, त्या ज्ञानसागरातल्या डुबक्यांना ते मुकणार, हे फारच वाईट आहे. ममता बानर्जी यांनी असं पक्षीय राजकारण करायला नको होतं. भविष्यात लोक हेच भाषण लक्षात ठेवतील आणि त्याचा उलटा १२५वा वर्धापनदिन कोणा तरी विवेकानंदांनी साजरा केला होता, असं मानतील, तेव्हा त्यांना या चुकीचं गांभीर्य समजेल!

.............................................................................................................................................

३. गुजरात सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त छुप्या पद्धतीनं कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी, वडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात सहभागी होणाऱ्या दीड लाख लोकांना अन्नाची पाकिटं वाटण्यासाठी हे पैसे हवे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. वडोदराच्या ‘डबोही’ इथं १७ सप्टेंबर रोजी ही रॅली पार पडणार आहे. मोदींच्या उपस्थितीमुळे या रॅलीत लोक मोठ्या संख्येनं सहभागी होईल, असा अंदाज आहे. व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या भोजनासाठी अतिरिक्त पाच लाख रुपयांचा निधीही जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला आहे. हा सर्व खर्च तब्बल ८० लाखांच्या घरात जात आहे. १७ सप्टेंबरला नर्मदा महोत्सवाच्या नावाखाली ही रॅली आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी लोकांना राज्य परिवहन विभागाच्या १८०० बसेसमधून आणण्यात येईल. हा सगळा जिल्हा प्रशासनाला खर्च उचलावा लागणार आहे.

पंतप्रधानांच्या वाढदिवशी माते नर्मदेचा उत्सव करण्याची प्रेरणा जिल्हाधिकाऱ्यांना होण्यामध्ये काही ना काही ईश्वरी संकेत असणार. पंतप्रधानांकडे पाहून वाटत नसलं तरी ते एक सर्वसंगपरित्यागी फकीर आहेत. त्यांचं सगळंच, उठणं, बसणं, चालणं, बोलणं, जेवणं, श्वास घेणं हे देशासाठी चालतं. त्यांना वाढदिवस साजरे करण्यात काहीच रस असेल असं वाटत नाही. पण, इतक्या प्रेरक व्यक्तिमत्त्वाच्या वाढदिवसाला सरकारी खर्चानं छोटासा (व्यक्तिमत्त्वाच्या हिशोबात) समारंभ साजरा करावासा वाटला, तर त्यात काही गैर नाही. फार तर माते नर्मदे सेस लावायचा देशभरात कशा ना कशावर? असेही लोक नर्मदेतले गोटेच तर आहेत!

.............................................................................................................................................

४. गृहोपयोगी वस्तूंच्या निर्मितीत वेगानं पुढे सरकणाऱ्या रामदेव बाबांच्या पतंजलीला मुंबई उच्च न्यायालयानं धक्का दिला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरचे साबण निकृष्ट दर्जाचे असतात, असा रोख असणाऱ्या पतंजलीच्या जाहिरातीला मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे. पतंजलीच्या जाहिरातीत लक्स, पीअर्स, लाईफबॉय आणि डव या युनीलिव्हरच्या उत्पादनांना लक्ष्य केलं आहे. ग्राहकांनी केमिकलपासून तयार करण्यात आलेल्या साबणांचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक वस्तूंपासून निर्माण केलेले साबण वापरावेत, असे पतंजलीनं अप्रत्यक्षपणे या जाहिरातीमधून म्हटलं होतं. ‘फिल्म स्टार्सचे केमिकलने भरलेले साबण वापरू नका,’ असंही पतंजलीनं जाहिरातीत म्हटलंय. याशिवाय ‘लाईफ जॉय ना लाओ नियर’ असे म्हणत लाईफ बॉयवर खोचक भाष्य करण्यात आलं होतं.

ज्यांचा स्वत:वर विश्वास असतो, त्यांना दुसऱ्यांची बदनामी करून माल खपवावा लागत नाही. पण, दुसऱ्यांचा माल आपल्या पाकिटांमध्ये भरून विकणाऱ्यांकडून अशा विश्वासाची अपेक्षा कशी करणार? ग्राहकांना देशभक्तीची, स्वदेशीची भूल घालून काही काळ गंडवता येऊ शकतं. सगळे सर्व काळ गंडणार नाहीत. साबणांच्या बाबतीत तर केमिकलरहित आणि स्वदेशी (बाबा रामदेवांच्या अर्थानं) असण्याचा दावाही हास्यास्पद आहे. सध्या वापरले जाणारे साबण ही संकल्पनाच विदेशी आहे. पण, ही कंपनी डिटर्जंटही ‘स्वदेशी’ बनवते, तिथं हा विनोद सौम्यच म्हणायला हवा.

.............................................................................................................................................

५. म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लीम समाजावरील अत्याचारांच्या संदर्भात केलेल्या ट्वीटवर इरफान पठाणला ट्विटवरच्या ट्रोलांचा सामना करावा लागला. म्यानमारमध्ये हिंसाचारात अनेक मुस्लीम समाजातील नागरिकांची घरं जाळण्यात आली. यामुळे काही लोकांनी निर्वासित होऊन बांगलादेश आणि इतर देशांत आश्रय घेतला आहे. या सर्व प्रकाराबद्दल भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाणनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट टाकलं. “जगातील सर्व नागरिकांनी असं ठरवून टाकलंय की, आम्हाला शांतता नकोय. माणूसच माणसाचा सर्वात मोठा शत्रू होऊन बसलेला आहे.” त्यावर बकरी ईदमधल्या कुर्बानीपासून ते काश्मिरी पंडितांपर्यंत अनेक दाखले देणाऱ्या ट्रोल्सनी त्याच्यावर हल्लाबोल केला आहे.

हे विनोदवीर आता सगळ्याच समाजमाध्यमांना व्यापून उरले आहेत. बकरी ईदमधल्या बकरीचे बळी यांना खुपतात, यांच्या श्वासोच्छ्वासातून लाखो सूक्ष्मजीव मारले जातात, ते टाळण्यासाठी हे तो बंद का करत नाहीत? जग ही बरी जागा होईल त्यांच्याशिवाय. काश्मिरी पंडित निर्वासित झाले, तेव्हा कदाचित इरफानचा जन्मही झाला नसेल, त्याला शहाणपणा शिकवणाऱ्या दीडशहाण्यांचाही झाला नसेल, पण कशाचाही कशाशीही संबंध जोडून मोकळं होणं, हा त्यांना प्रशिक्षणात शिकवलेला भाग आहे. इरफाननं यांना भीक घालू नये, ती त्यांना त्यांचे पोशिंदे घालतच असतात दरमहा!

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......