टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अमित शहा, शरद पवार, डोनाल्ड ट्रम्प, रामदास आठवले, श्री श्री रविशंकर आणि बाबा रामदेव
  • Wed , 23 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अमित शहा Amit Shah शरद पवार Sharad Pawar डोनाल्ड ट्रम्प Donald Trump रामदास आठवले Ramdas Athawale श्री श्री रविशंकर Sri Sri Ravi Shankar बाबा रामदेव Baba Ramdev

१. पुढील ५० वर्षं देशात भारतीय जनता पक्षाचंच सरकार राहील, असं विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतंच केलं होतं. त्यावर, शहा यांनी पंचांग घेऊन भविष्य सांगायचा व्यवसाय कधीपासून सुरू केला, हे मला माहीत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या विधानाची खिल्ली उडवली. सत्तेवर कोणता पक्ष किती दिवस राहणार याचा निर्णय जनताच करेल, अशी टिपणीही त्यांनी केली.

पवारसाहेब, आपलं बोट धरून राजकारणात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही नेमकं कसलं गुह्य ज्ञान दिलंत ते ठाऊक नाही; पण, त्यांचे एकनिष्ठ हनुमान असलेले अमित शहा प्रबळ विरोधकांच्या कुंडल्या मांडायला मात्र तुमच्याकडूनच शिकले असावेत, असं वाटतंय. या शिकवणीची परतफेड म्हणूनच काही कुंडल्या मांडल्या गेलेल्या नसाव्यात.

.............................................................................................................................................

२. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले. फोर्ट मायर इथं अमेरिकन सैनिकांशी संवाद साधताना त्यांनी भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांविषयीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर ताशेरे ओढले. दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान अशाच प्रकारे सुरक्षित आसरा ठरत राहिल्यास अमेरिकेला शांत बसता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानने आता दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी केली पाहिजे, असंही ते म्हणाले.

कित्ती कडक बोलतात नाही ट्रम्पतात्या! एखाद्या प्रेमळ आईने आपल्या नाठाळ कारट्याचा गालगुच्चा घेऊन आता परत त्या काकांची खोडी काढलीस, त्यांच्या घराला पुन्हा आग लावलीस तर अर्धा लाडूच देईन तुला, असं म्हटल्यासारखं वाटतं. शिवाय पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय देणं खरोखरच बंद करायचं असेल, तर सगळ्यात आधी अमेरिका या जगातल्या सर्वांत मोठ्या युद्धसाहित्य पुरवठादार दहशतवाद-प्रसारक राष्ट्राला आपल्या भूमीवरून हुसकावायला हवं... काय म्हण्टा तात्या?

.............................................................................................................................................

३. अमेरिकेत सोमवारी खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळालं. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये, ही तज्ज्ञांनी केलेली आणि शाळकरी मुलांनाही माहिती असलेली सूचना धुडकावून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या बेदरकार वृत्तीला जागून उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहिलं आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अशा प्रकारे ग्रहण पाहिल्यानंतर अंधत्व येण्याचा धोका असतो.

ट्रम्पतात्या हे आत्मप्रेमामध्ये, स्थलांतरितांच्या द्वेषानं आणि गौरवर्णीयांच्या फुकाच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनांनी आधीच इतके ठार आंधळे झाले आहेत की, त्यांना सूर्यग्रहणानं आणखी काय अंधत्व येणार? त्यांचा सूर्यग्रहण पाहतानाचा फोटो मात्र पाठवून द्या. सूर्यग्रहणाच्या वेळी ट्रम्प यांना सूर्याने त्रिखंडाच्या महानेत्याचा चेहरा दाखवला आणि ट्रम्प गॉगल घालायला विसरले, असं पोस्टर आम्ही करून घेऊ फोटोशॉपमध्ये.

.............................................................................................................................................

४. सामाजिक-आर्थिक कारणांमुळे मुंबईतील ५० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहत असून त्यांना घटनेनं दिलेला निवाऱ्याचा हक्क कोणालाही डावलता येणार नाही. त्यामुळे २००० नंतरच्या झोपड्यांनाही राज्य सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यायलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

खरं सांगायचं तर आठवलेसाहेबांनी फारच फुटकळ मागणी केली आहे. देशाच्या, राज्याच्या, मुंबईच्या कोणत्याही भागातल्या माणसाने मुंबईत झोपडी बांधायचा विचार जरी मनात आणला, तरी सरकारने त्याला तेवढा प्लॉट, पाणी-वीज वगैरे सोयींसह दिला पाहिजे, शिवाय या खर्चिक शहरातलं जीवनमान लक्षात घेता माणशी दहाएक हजारांचा उदरनिर्वाह भत्ताही दिला पाहिजे. जागेची चिंता करू नका. आठवले साहेबांच्या बंगल्याच्या हिरवळीवरही तीनचार झोपड्या आरामात उभ्या राहू शकतील. शेवटी गरीबांच्या निवाराहक्काचा प्रश्न आहे.

.............................................................................................................................................

५. अल्पावधीतच ग्राहकाच्या पंसतीस उतरलेल्या योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीला बाजारात टक्कर देण्याची तयारी सुरू आहे. रामदेव बाबांच्या पतंजलीला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) कंपनी टक्कर देणार आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी 'श्री श्री आयुर्वेद' कंपनीने एक हजारहून अधिक दुकानं उघडण्याची तयारी केली आहे. सुरुवातीला टूथपेस्ट, डिटर्जंट, तूप आणि बिस्कीट्स ही उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

हे दोन बुवा सहकार्य करार करणार आहेत की, एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत? बाबा रामदेवांनी तथाकथित ‘स्वदेशी’ची बाजारपेठ तयार केली, तेव्हा त्यांना आपल्याच मूळ व्यवसायातून स्पर्धा निर्माण होईल, याची कल्पना नसावी. आता या दोन स्वदेशी बोक्यांच्या भांडणात लोण्याचा गोळा नेहमीप्रमाणे तथाकथित ‘विदेशी’ बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मटकावू नये म्हणजे झालं. आपण किती ‘स्वदेशी’ आहोत, हे दाखवण्याची त्यांचीही स्पर्धा सुरूच आहे की!

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......