टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अमित शहा, शरद पवार, डोनाल्ड ट्रम्प, रामदास आठवले, श्री श्री रविशंकर आणि बाबा रामदेव
  • Wed , 23 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अमित शहा Amit Shah शरद पवार Sharad Pawar डोनाल्ड ट्रम्प Donald Trump रामदास आठवले Ramdas Athawale श्री श्री रविशंकर Sri Sri Ravi Shankar बाबा रामदेव Baba Ramdev

१. पुढील ५० वर्षं देशात भारतीय जनता पक्षाचंच सरकार राहील, असं विधान भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतंच केलं होतं. त्यावर, शहा यांनी पंचांग घेऊन भविष्य सांगायचा व्यवसाय कधीपासून सुरू केला, हे मला माहीत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या विधानाची खिल्ली उडवली. सत्तेवर कोणता पक्ष किती दिवस राहणार याचा निर्णय जनताच करेल, अशी टिपणीही त्यांनी केली.

पवारसाहेब, आपलं बोट धरून राजकारणात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही नेमकं कसलं गुह्य ज्ञान दिलंत ते ठाऊक नाही; पण, त्यांचे एकनिष्ठ हनुमान असलेले अमित शहा प्रबळ विरोधकांच्या कुंडल्या मांडायला मात्र तुमच्याकडूनच शिकले असावेत, असं वाटतंय. या शिकवणीची परतफेड म्हणूनच काही कुंडल्या मांडल्या गेलेल्या नसाव्यात.

.............................................................................................................................................

२. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले. फोर्ट मायर इथं अमेरिकन सैनिकांशी संवाद साधताना त्यांनी भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांविषयीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानवर ताशेरे ओढले. दहशतवादी संघटनांसाठी पाकिस्तान अशाच प्रकारे सुरक्षित आसरा ठरत राहिल्यास अमेरिकेला शांत बसता येणार नाही, असं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानने आता दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी केली पाहिजे, असंही ते म्हणाले.

कित्ती कडक बोलतात नाही ट्रम्पतात्या! एखाद्या प्रेमळ आईने आपल्या नाठाळ कारट्याचा गालगुच्चा घेऊन आता परत त्या काकांची खोडी काढलीस, त्यांच्या घराला पुन्हा आग लावलीस तर अर्धा लाडूच देईन तुला, असं म्हटल्यासारखं वाटतं. शिवाय पाकिस्ताननं दहशतवाद्यांना आश्रय देणं खरोखरच बंद करायचं असेल, तर सगळ्यात आधी अमेरिका या जगातल्या सर्वांत मोठ्या युद्धसाहित्य पुरवठादार दहशतवाद-प्रसारक राष्ट्राला आपल्या भूमीवरून हुसकावायला हवं... काय म्हण्टा तात्या?

.............................................................................................................................................

३. अमेरिकेत सोमवारी खग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळालं. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये, ही तज्ज्ञांनी केलेली आणि शाळकरी मुलांनाही माहिती असलेली सूचना धुडकावून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या बेदरकार वृत्तीला जागून उघड्या डोळ्यांनी ग्रहण पाहिलं आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अशा प्रकारे ग्रहण पाहिल्यानंतर अंधत्व येण्याचा धोका असतो.

ट्रम्पतात्या हे आत्मप्रेमामध्ये, स्थलांतरितांच्या द्वेषानं आणि गौरवर्णीयांच्या फुकाच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनांनी आधीच इतके ठार आंधळे झाले आहेत की, त्यांना सूर्यग्रहणानं आणखी काय अंधत्व येणार? त्यांचा सूर्यग्रहण पाहतानाचा फोटो मात्र पाठवून द्या. सूर्यग्रहणाच्या वेळी ट्रम्प यांना सूर्याने त्रिखंडाच्या महानेत्याचा चेहरा दाखवला आणि ट्रम्प गॉगल घालायला विसरले, असं पोस्टर आम्ही करून घेऊ फोटोशॉपमध्ये.

.............................................................................................................................................

४. सामाजिक-आर्थिक कारणांमुळे मुंबईतील ५० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहत असून त्यांना घटनेनं दिलेला निवाऱ्याचा हक्क कोणालाही डावलता येणार नाही. त्यामुळे २००० नंतरच्या झोपड्यांनाही राज्य सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यायलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

खरं सांगायचं तर आठवलेसाहेबांनी फारच फुटकळ मागणी केली आहे. देशाच्या, राज्याच्या, मुंबईच्या कोणत्याही भागातल्या माणसाने मुंबईत झोपडी बांधायचा विचार जरी मनात आणला, तरी सरकारने त्याला तेवढा प्लॉट, पाणी-वीज वगैरे सोयींसह दिला पाहिजे, शिवाय या खर्चिक शहरातलं जीवनमान लक्षात घेता माणशी दहाएक हजारांचा उदरनिर्वाह भत्ताही दिला पाहिजे. जागेची चिंता करू नका. आठवले साहेबांच्या बंगल्याच्या हिरवळीवरही तीनचार झोपड्या आरामात उभ्या राहू शकतील. शेवटी गरीबांच्या निवाराहक्काचा प्रश्न आहे.

.............................................................................................................................................

५. अल्पावधीतच ग्राहकाच्या पंसतीस उतरलेल्या योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीला बाजारात टक्कर देण्याची तयारी सुरू आहे. रामदेव बाबांच्या पतंजलीला आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांची 'श्री श्री आयुर्वेद' (एसएसए) कंपनी टक्कर देणार आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी 'श्री श्री आयुर्वेद' कंपनीने एक हजारहून अधिक दुकानं उघडण्याची तयारी केली आहे. सुरुवातीला टूथपेस्ट, डिटर्जंट, तूप आणि बिस्कीट्स ही उत्पादनं विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

हे दोन बुवा सहकार्य करार करणार आहेत की, एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत? बाबा रामदेवांनी तथाकथित ‘स्वदेशी’ची बाजारपेठ तयार केली, तेव्हा त्यांना आपल्याच मूळ व्यवसायातून स्पर्धा निर्माण होईल, याची कल्पना नसावी. आता या दोन स्वदेशी बोक्यांच्या भांडणात लोण्याचा गोळा नेहमीप्रमाणे तथाकथित ‘विदेशी’ बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मटकावू नये म्हणजे झालं. आपण किती ‘स्वदेशी’ आहोत, हे दाखवण्याची त्यांचीही स्पर्धा सुरूच आहे की!

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......