टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अहमद पटेल, वंदे मातरम, कन्हैय्या कुमार, संजय काकडे आणि विजेंदर सिंग
  • Wed , 09 August 2017
  • विनोदनामा टपल्या अहमद पटेल Ahmed Patel वंदे मातरम Vande Mataram कन्हैय्या कुमार Kanhaiya Kumar संजय काकडे Sanjay Kakade विजेंदर सिंग Vijender Singh

१. गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिष्ठेच्या लढाईत काँग्रेसनं भाजपवर मात केली आहे. काँग्रेसच्या अहमद पटेल यांनी बलवंतसिंह राजपूत यांचा पराभव केला असून त्यांना ४४ मते मिळाली. गुजरातमधील तीन जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस होती. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या चाणक्यांमधील लढाईत अखेर काँग्रेसने बाजी मारली आहे. काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजय महत्त्वाचा ठरणार आहे. या निवडणुकीत धनशक्तीचा आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्यांचा पराभव झाला, अशा शब्दात अहमद पटेल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. ‘सत्यमेव जयते’ असंही पटेल यांनी म्हटलं आहे.

अमित शहा कसे पहिल्या नंबरानं निवडून गेले आणि पटेलांना किल्ला लढवायला लागला, असा स्वसांत्वनायुक्त अभिनंदनाचा केविलवाणा जल्लोष करून काय फायदा? पटेलांना हरवून काँग्रेसला हतोत्साह करण्याचा डाव उधळला, याचा सल फक्त शहाच जाणू शकतात. बाकी ‘धनशक्तीचा आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्यांना धडा,’ ‘सत्यमेव जयते’ आदी शब्दप्रयोग अहमद पटेलांच्या तोंडी शोभून दिसत नाहीत... पण निकाल वेगळा लागला असता तर ते शहांच्याही तोंडी कुठे शोभले असते‌?

.............................................................................................................................................

२. तामिळनाडूतील शाळा-महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम बंधनकारक करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबईतील शाळांमध्येही ‘वंदे मातरम्’ गाणं बंधनकारक करण्यात यावं, अशी मागणी मुंबईतील भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी प्रस्तावाद्वारे मांडली आहे. महापालिकेच्या आणि सर्व अनुदानित शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गाणं अनिवार्य करण्यात यावं, असं त्यांनी या प्रस्तावात म्हटलं आहे. भावी पिढीत देशभक्ती जागृत राहावी, यासाठी आठवड्यातून किमान दोनदा ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायला हवं. महापालिका सभागृहाच्या धर्तीवर स्थायी, सुधार आणि अन्य समित्यांच्या कामकाजालाही ‘वंदे मातरम्’ या गीतानं सुरुवात करायला हवी, असंही त्यांनी प्रस्तावात म्हटलं आहे.

हे असं टप्प्याटप्प्यानं करण्यापेक्षा जेवढ्या वेळा नमाज होते, तेवढ्या वेळा दिवसातून प्रत्येकानं ‘वंदे मातरम’ गायलंच पाहिजे; बाकी कामकाज, शिक्षण वगैरे मधल्या वेळात करायचं, असाच एक निर्णय देशभरासाठी घेऊन टाकला तर? आजकाल कोर्टंही देशभक्त बनली आहेत, त्यामुळे त्यांचाही अडसर होणार नाही. आपल्यासमोर आदर्श कोणाचा आहे आणि आपल्याला लवकरात लवकर आपल्या समाजाला काय बनवायचंय, देशाला काय बनवायचंय, हे लक्षात घ्या.

.............................................................................................................................................

३. ‘आपल्या देशाचे 'पीएम' नरेंद्र मोदी म्हणजे प्रधानमंत्री नव्हे तर प्युअरली प्रचारमंत्री आहेत. कारण, ते फक्त ‘मन की बात’ करतात, जाहिरात करतात. विशेष म्हणजे पंतप्रधान सरकारी मोबाइल कंपनीचा प्रचार करत नाहीत. तर अंबानी यांच्या खासगी कंपनीचा प्रचार करतात’, अशी टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार यानं केली आहे.

बापरे, भलतेच देशद्रोही आणि फुटीरतावादी विचार! देशाचे तुकडेच करायला निघालाय तो. पदव्युत्तर शिक्षणाशी आमचा काही संबंध नसला आणि त्यातलं काही कळत नसलं तरी तरी किती वर्षं एकेका इयत्तेत घालवावीत याला काही सुमार. अभ्यासाचा वेळ असल्या राष्ट्रद्रोही विचारांमध्ये घालवतो आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी होते यांच्या शिक्षणावर. कुठाय तो रणगाडा. धाडा लवकर, काबीज करा ते विद्यापीठ!!

.............................................................................................................................................

४. पुणे महानगरपालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना 'बावळट' असं संबोधणारे खासदार संजय काकडे यांना कार्यकर्त्यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात 'पुणेकर बंधू भगिनींनो, आमचा कोणताही पदाधिकारी बावळट नाहीये' या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. पुणे शहरातील समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाची फेरनिविदा काढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्यामुळे संजय काकडे यांनी 'पालिकेतील आमचे पदाधिकारी बावळट आहेत', असं विधान केलं होतं.

पुण्यात कोणी कोणाला बावळट म्हणणं, म्हणजे जन्मजात ओव्हरस्मार्ट असलेल्या पुणेकरांच्या दृष्टीने अपमानाचा परमावधीच. एका पक्षाच्या खासदाराने आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बावळट म्हणणे, हा मात्र खरोखरच बावळटपणा म्हणायला हवा. नेते आयात असले की, कधीकधी असे गोंधळ होतात. बाकी पुणेकरांना टोप्या घालण्यात पटाईत असलेल्या कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाला बावळट म्हणण्याचा बावळटपणा कोणी पुणेकर कधी करील का?

.............................................................................................................................................

५. भारताचा बॉक्सर विजेंदर सिंगने प्रो-बॉक्सिंगमध्ये चीनचा बॉक्सर मायमायतीचा पराभव केल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विजेंदरचं कौतुक करतानाच चीनवरही निशाणा साधला आहे. 'जीत गए !! भारत ने चीन को दे मारा !!', असं ट्विट बिग बी यांनी केलं आहे. या ट्विटसह अमिताभ यांनी विजेंदरच्या विजयाच्या सेलिब्रेशनचे फोटो देखील शेअर केले आहेत.

अमिताभ बच्चन महोदय हे हवेची दिशा पाहून तिच्यावर स्वार होण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते उगाच नव्हे! एका क्रीडास्पर्धेतल्या विजयावर युद्धोन्मादी कमेंट टाकून त्यांनी लोकभावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी बनावटीच्या फोनवरूनच त्यांनी हे ट्विट केलं असणार आणि ते त्यांच्या चाहत्यांनीही तशाच फोनवरून रिट्विट केलं असणार. उद्या चीननं त्यांच्या एखाद्या योजनेसाठी, कंपनीसाठी यांना मानधन देऊन प्रचाराला बोलावलं, तर ते ‘कुछ दिन तो गुजारो झेजियांग में’ म्हणून दात विचकणार नाहीत, याची गॅरंटी नाही.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......

प्रभा अत्रे : वंदे गानप्रभा स्वरयोगिनी, नादरूप अनूप बखानी । स्वर लय ताल सरस कहाई, रागरूप बहुरूप दिखायी, कलाविद्या सकल गुण ग्यानी, सृजन कहन सब ही जग मानी।

ललितरचनांमधला प्रभाताईंचा मुलायम तरल आवाज अंत:करणात रुतून बसे. मंद्र अथवा तार सप्तकात कुठेही सहजपणे वावरणारा, त्यांचा भावार्त सूर त्या काव्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या थेट काळजाला भिडवे. विचारांच्या बैठकीमुळे येणारा गहिरेपणा, संवेदनशील दर्दभरा आवाज आणि त्यातलं ओथंबलेलं रसिलेपण... प्रभाताईंची सरगम हा तर रसिकांना खास तृप्त करणारा आविष्कार. सरगमला खऱ्या अर्थानं त्यांनी संगीतजगतात प्रतिष्ठा मिळवून दिली .......