टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अहमद पटेल, वंदे मातरम, कन्हैय्या कुमार, संजय काकडे आणि विजेंदर सिंग
  • Wed , 09 August 2017
  • विनोदनामा टपल्या अहमद पटेल Ahmed Patel वंदे मातरम Vande Mataram कन्हैय्या कुमार Kanhaiya Kumar संजय काकडे Sanjay Kakade विजेंदर सिंग Vijender Singh

१. गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिष्ठेच्या लढाईत काँग्रेसनं भाजपवर मात केली आहे. काँग्रेसच्या अहमद पटेल यांनी बलवंतसिंह राजपूत यांचा पराभव केला असून त्यांना ४४ मते मिळाली. गुजरातमधील तीन जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस होती. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या चाणक्यांमधील लढाईत अखेर काँग्रेसने बाजी मारली आहे. काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजय महत्त्वाचा ठरणार आहे. या निवडणुकीत धनशक्तीचा आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्यांचा पराभव झाला, अशा शब्दात अहमद पटेल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. ‘सत्यमेव जयते’ असंही पटेल यांनी म्हटलं आहे.

अमित शहा कसे पहिल्या नंबरानं निवडून गेले आणि पटेलांना किल्ला लढवायला लागला, असा स्वसांत्वनायुक्त अभिनंदनाचा केविलवाणा जल्लोष करून काय फायदा? पटेलांना हरवून काँग्रेसला हतोत्साह करण्याचा डाव उधळला, याचा सल फक्त शहाच जाणू शकतात. बाकी ‘धनशक्तीचा आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्यांना धडा,’ ‘सत्यमेव जयते’ आदी शब्दप्रयोग अहमद पटेलांच्या तोंडी शोभून दिसत नाहीत... पण निकाल वेगळा लागला असता तर ते शहांच्याही तोंडी कुठे शोभले असते‌?

.............................................................................................................................................

२. तामिळनाडूतील शाळा-महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम बंधनकारक करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबईतील शाळांमध्येही ‘वंदे मातरम्’ गाणं बंधनकारक करण्यात यावं, अशी मागणी मुंबईतील भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी प्रस्तावाद्वारे मांडली आहे. महापालिकेच्या आणि सर्व अनुदानित शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गाणं अनिवार्य करण्यात यावं, असं त्यांनी या प्रस्तावात म्हटलं आहे. भावी पिढीत देशभक्ती जागृत राहावी, यासाठी आठवड्यातून किमान दोनदा ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायला हवं. महापालिका सभागृहाच्या धर्तीवर स्थायी, सुधार आणि अन्य समित्यांच्या कामकाजालाही ‘वंदे मातरम्’ या गीतानं सुरुवात करायला हवी, असंही त्यांनी प्रस्तावात म्हटलं आहे.

हे असं टप्प्याटप्प्यानं करण्यापेक्षा जेवढ्या वेळा नमाज होते, तेवढ्या वेळा दिवसातून प्रत्येकानं ‘वंदे मातरम’ गायलंच पाहिजे; बाकी कामकाज, शिक्षण वगैरे मधल्या वेळात करायचं, असाच एक निर्णय देशभरासाठी घेऊन टाकला तर? आजकाल कोर्टंही देशभक्त बनली आहेत, त्यामुळे त्यांचाही अडसर होणार नाही. आपल्यासमोर आदर्श कोणाचा आहे आणि आपल्याला लवकरात लवकर आपल्या समाजाला काय बनवायचंय, देशाला काय बनवायचंय, हे लक्षात घ्या.

.............................................................................................................................................

३. ‘आपल्या देशाचे 'पीएम' नरेंद्र मोदी म्हणजे प्रधानमंत्री नव्हे तर प्युअरली प्रचारमंत्री आहेत. कारण, ते फक्त ‘मन की बात’ करतात, जाहिरात करतात. विशेष म्हणजे पंतप्रधान सरकारी मोबाइल कंपनीचा प्रचार करत नाहीत. तर अंबानी यांच्या खासगी कंपनीचा प्रचार करतात’, अशी टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार यानं केली आहे.

बापरे, भलतेच देशद्रोही आणि फुटीरतावादी विचार! देशाचे तुकडेच करायला निघालाय तो. पदव्युत्तर शिक्षणाशी आमचा काही संबंध नसला आणि त्यातलं काही कळत नसलं तरी तरी किती वर्षं एकेका इयत्तेत घालवावीत याला काही सुमार. अभ्यासाचा वेळ असल्या राष्ट्रद्रोही विचारांमध्ये घालवतो आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी होते यांच्या शिक्षणावर. कुठाय तो रणगाडा. धाडा लवकर, काबीज करा ते विद्यापीठ!!

.............................................................................................................................................

४. पुणे महानगरपालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना 'बावळट' असं संबोधणारे खासदार संजय काकडे यांना कार्यकर्त्यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात 'पुणेकर बंधू भगिनींनो, आमचा कोणताही पदाधिकारी बावळट नाहीये' या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. पुणे शहरातील समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाची फेरनिविदा काढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्यामुळे संजय काकडे यांनी 'पालिकेतील आमचे पदाधिकारी बावळट आहेत', असं विधान केलं होतं.

पुण्यात कोणी कोणाला बावळट म्हणणं, म्हणजे जन्मजात ओव्हरस्मार्ट असलेल्या पुणेकरांच्या दृष्टीने अपमानाचा परमावधीच. एका पक्षाच्या खासदाराने आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बावळट म्हणणे, हा मात्र खरोखरच बावळटपणा म्हणायला हवा. नेते आयात असले की, कधीकधी असे गोंधळ होतात. बाकी पुणेकरांना टोप्या घालण्यात पटाईत असलेल्या कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाला बावळट म्हणण्याचा बावळटपणा कोणी पुणेकर कधी करील का?

.............................................................................................................................................

५. भारताचा बॉक्सर विजेंदर सिंगने प्रो-बॉक्सिंगमध्ये चीनचा बॉक्सर मायमायतीचा पराभव केल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विजेंदरचं कौतुक करतानाच चीनवरही निशाणा साधला आहे. 'जीत गए !! भारत ने चीन को दे मारा !!', असं ट्विट बिग बी यांनी केलं आहे. या ट्विटसह अमिताभ यांनी विजेंदरच्या विजयाच्या सेलिब्रेशनचे फोटो देखील शेअर केले आहेत.

अमिताभ बच्चन महोदय हे हवेची दिशा पाहून तिच्यावर स्वार होण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते उगाच नव्हे! एका क्रीडास्पर्धेतल्या विजयावर युद्धोन्मादी कमेंट टाकून त्यांनी लोकभावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी बनावटीच्या फोनवरूनच त्यांनी हे ट्विट केलं असणार आणि ते त्यांच्या चाहत्यांनीही तशाच फोनवरून रिट्विट केलं असणार. उद्या चीननं त्यांच्या एखाद्या योजनेसाठी, कंपनीसाठी यांना मानधन देऊन प्रचाराला बोलावलं, तर ते ‘कुछ दिन तो गुजारो झेजियांग में’ म्हणून दात विचकणार नाहीत, याची गॅरंटी नाही.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......