“शास्त्रीय संगीत पाया, तर फिल्लम संगीत कळस काय रे?”
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 29 July 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music राग Raag केशव परांजपे Keshav Paranjpe किशोरी आमोणकर Kishori Amonkar शास्त्रीय संगीत Classical music सुगम संगीत Sugam Sangeet

मराठी शाळेत महिन्याला शेवटच्या शनिवारी वादसभेचा कार्यक्रम असायचा. ‘तलवार श्रेष्ठ की लेखणी श्रेष्ठ?’ असे विषय असायचे. आणि समारोप करताना अध्यक्ष नेहमीच सामोपचारानं म्हणायचे, ‘दोन्ही आपापल्या परीनं श्रेष्ठ आहेत.’ तशी वादसभा ‘शास्त्रीय संगीत की सुगम संगीत?’ असा विषय घेऊन करू या का?

वर्तमानपत्रातल्या एका बातमीवरच्या किशोरी आमोणकरांच्या प्रतिक्रियेचा किस्सा मी अनेक ठिकाणी, अनेक वेळा सांगितला आहे. इथंही कदाचित याआधी सांगून झाला असेल. एका विख्यात पार्श्वगायिकेनं एका कार्यक्रमात केलेल्या भाषणाचा वृतान्त होता तो. त्यात त्या म्हणाल्या होत्या- “पार्श्वसंगीतात कारकीर्द करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांनी शास्त्रीय संगीत शिकलंच पाहिजे. शास्त्रीय संगीत शिकलेल्या कलाकाराला काहीही गाता येतं… शास्त्रीय संगीत हा पाया आहे…” किशोरीताईंनी उद्विग्नपणे, तुच्छतेनं, वैतागून मला विचारलं, “काय वाचलास का हा सदुपदेश?” मी वाचलाच होता, पण त्यात खटकण्यासारखं, उद्विग्न होण्यासारखं काय असावं असं मोठ्ठं प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर उमटलं. त्यावर ताई उदगारल्या, “शास्त्रीय संगीत पाया, तर फिल्लम संगीत कळस काय रे?” ओ हो!, माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला!

शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत या संगीतकलेच्या दोन (स्वतंत्र) शाखा मानायच्या की एकाच संगीतकलेतील वर-खालच्या श्रेणी? दोन्ही मतांसाठी बरेच सबळ पुरावे देता येतील. दोन शाखा मानल्या तर शास्त्रीय आणि सुगम यात श्रेष्ठ कोण याचा निवडा देता येणार नाही. व्यक्तिपरत्वे हे उत्तर बदलेल. शास्त्रीय संगीताची अभिरूची ही उच्च अभिरूची आणि सुगम संगीताची अभिरूची ही हीन जरी नाही, तरी जरा खालच्या दर्जाची, असा जो सार्वत्रिक समज आहे, तो सोडून द्यावा लागेल. (माझ्याही स्वत:च्या मनात असा समज आहे!) संगीत ही स्वायत्त कला आहे. आणि तिची स्वायत्तता शास्त्रीय संगीतात अबाधित आहे. सुगम संगीत हे उपयोजित संगीत आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि त्या अर्थानं शास्त्रीय संगीताचा अवकाश अधिक व्यापक आहे, हे मान्य करावं लागतं.

किशोरीताईंचं म्हणणं असं होतं की, ताला-सुराची उपजत समज असणारी, गोड गळा लाभलेली मुलं जे ऐकतील ते सहज गुणगणुतात. ते सुगम संगीत. त्यांच्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात जसजशा त्यांचा सुरांचा सहवास वाढत जातो, तसतशी ती मुलं संगीतसागरात अवगाहन करायला प्रवृत्त होता. त्यांना सुरांची भाषा अवगत व्हावी, रागांचा भावानुभव यावा, त्यांचे वैयक्तिक भावानुभव, त्यांची वैयक्तिक गुणवत्ता यांचा विनियोग व्यापक अशा रागाच्या भावाला प्रतिममान करण्याकडे व्हावा, अशा तऱ्हेनं संगीताच्या स्वर्गात पोचलेला कलाकार पुन्हा पृथ्वीवर, मर्त्य लोकांत- जिथं बाह्य ताल आणि शब्द यांनी स्वराला कुंठित केलं आहे अशा गानप्रकारात - कशाला येईल?

ताई हे असं ज्या उत्कटपणे बोलत, ते ऐकताना उन्मन अवस्थेचा अनुभव येई. पण ही एक अत्यंत आदर्श स्वप्नासारखी प्रक्रिया आहे. प्रत्यक्षात काय घडतं, कसं आणि का घडतं? वास्तव लक्षात घ्यायलाच हवं. ताई सहज गुणगुणणं, स्वर-तालांची माहिती, रागांचा परिचय, रागांचा अनुभव आणि पुढे साक्षात्कार ही अशी एकानंतर एक अशा पायऱ्यांची मांडणी (सोपान), असं या प्रवासाकडे पाहतात. प्रत्यक्षात या मार्गाला अनेक फाटे फुटलेले आहेत.

आज सुगम संगीत या गानप्रकारानं बरीच मजल मारली आहे. इतकी की सुगम संगीत ही गानसोपानाची सुरुवातीच्या भागातली एक पायरी न राहता, ती एक वैशिष्ट्यपूर्ण कलाशाखा म्हणून सुस्थापित झाली आहे. ‘सर्व सुगम संगीत हे तर रागदारीवरच आधारित असंत’ असा समज बाळबोधपणाचा ठरेल. रागसंगीत हा सुगम संगीताच्या समृद्धीचा एक स्रोत आहे. असे आणखी अनेक स्रोत सुगम संगीतात एकजीव झाले आहेत. सुगम संगीतातल्या स्वररचना गाण्यासाठी मुळीच ‘सुगम’ राहिलेल्या नाहीत. शास्त्रीय गायन शिक्षणात आणि रियाजात अनेक वर्षं व्यतीत केलेल्यांनासुद्धा सलगपणे म्हणायला अवघड वाटतात अशा चाली आज (गेली निदान २५-५० वर्षं तरी) बांधल्या जातात. श्रीनिवास खळ्यांसारख्या संगीतकाराच्या चालींतला ‘ऑफ बीट’ शास्त्रीय गायकांना सहज साधला असं झालेलं नाही.

दर्जेदार सुगम संगीत गाण्यासाठी गळा फारच तयार हवा, कारण सुगम संगीतात गानक्रिया महत्त्वाची भूमिका बजावत असतात. (गानक्रिया – ‘गळा’ चालवणे. कण, खटका, मुटकी, मींड,घसीट, कंप इ.) शिवाय गळा हुकमी हवा. वक्तृत्व कठीण असतं, पण लेखकानं लिहिलेले संवाद अभिनित करणंही कठीणच असतं. तसंच दुसऱ्या कुणी बांधलेली चाल आपली करून गाणं आव्हानात्मक असतं. सुगम संगीतातली सांगीतिक सामग्री – चाल, गायन, वाद्यमेळ – ही एकाच कलाकाराची क्वचितच असते. ती विविध कलाकारांची असते. सुगम संगीत ही सामूहिक निर्मिती आणि प्रस्तुती असते. म्हणून सुगम संगीताचा विचार करताना कलाकार म्हणून त्या त्या टीमचा, संघाचा विचार केला पाहिजे.

चांगलं जमलेलं भावगीत किंवा चित्रपटगीत आपल्या मर्यादित अवकाशात एक वातावरण उभं करतं. एक जिवंत अनुभव देतं आणि अनुभव सहज मोठा असतो का? शब्द आणि स्वरतालांच्या मिलाफातून एक विविक्षित भावछटा सुगम गीत छेडून जातं. आणि हा भावानुभव कविता वाचनाच्या अनुभवापेक्षा वेगळा असतो.

सुगम संगीत गायक सुरात गातात, अतिशय सुरात गातात. मी स्वत: आजकाल जे तरुण शास्त्रीय गायक-गायिका ऐकतो आणि जे तरुण सुगम गायक-गायिका ऐकतो, त्यात सुरेलपणाचं प्रमाण दोन्ही ठिकाणी सारखंच आहे. सुगम गायकांमध्ये सुरेलपणा कमी आहे असं तरी नक्कीच म्हणता येणार नाही. शास्त्रीय गायकांमध्ये सुरांचं, आवाजांच्या सौंदर्याचं अवधान अनेकदा पुरेपूर टिकलेलं दिसत नाही. सुगमवाले ‘बसलेलं’ गातात, शास्त्रीय गायक ‘पाठ’ करून गात नाहीत? पाठांतर शक्तीच्या मर्यादांमुळे न पाठ केलेलं गाणं म्हणजे उत्स्फूर्त गाणं नव्हे. सुगम लोकरंजनासाठी आणि शास्त्रीय आत्मरंजनासाठी गायलं जातं असं खरंच म्हणता येईल का? दोन्ही क्षेत्रांत गांभीर्यानं प्रामाणिक काम करणारे आहेत, तसे सवंगतेकडे झुकलेलेही आहेत. सुगमच गाणाऱ्यांना अर्धा-पाऊण तास विलंबित ख्याल गाता येईल का? त्यांना तो गायचाच नसतो. ख्याल गाणारा एखादं सुमग गीत अपेक्षित अचूकतेनं परिणामकारक गाईल याची हमी कोणाला देता येईल का? ताला-सुरात बहुदा (!) बिनचूक म्हणून शकेल एवढंच. सुगम संगीत हा गानप्रकार जसजसा प्रगल्भ होत गेला आहे, तसतसे त्या गानप्रकाराचे निकष रूढ होत गेले आहेत. आणि केवळ शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं म्हणून त्या निकषांची परिपूर्ती कोणी करू शकेल असं नाही.

पुन्हा एकदा ‘पाया आणि कळस’ किंवा ‘कच्चा माल आणि तयार माल’ या विषयावर येतो. अर्थशास्त्रीय सिद्धान्त काय सांगतो? सुगम संगीताला बाजारात मोठी मागणी आहे. म्हणून सुगम संगीतात प्रस्थापित कलाकाराला पैसा अधिक मिळतो. परिणामी ज्याला गाता येतं तो प्रत्येक जण सुगम संगीतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून या क्षेत्रात कमालीची चुरस, स्पर्धा असेल आणि म्हणून सर्वोत्तम गुणवत्तेचे गायक या क्षेत्रात येतील, राहतील. या क्षेत्रातल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शास्त्रीय संगीतशिक्षणाची बैठक उपयोगाची असेल तर प्रत्येक महत्त्वाकांक्षी स्पर्धक हे शिक्षण घेईल. हा अर्थशास्त्रीय सिद्धान्त १०० टक्के लागू होत नसला तरी त्यात तथ्य नक्कीच आहे. शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत यांतील नात्यावर या सिद्धान्ताचा प्रभाव नक्कीच राहील.

या सिद्धान्ताला जणू छेद देत आज कितीतरी गुणी तरुण शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत आहेत, एवढंच नव्हे तर शास्त्रीय संगीतात कारकीर्द करण्याचं ध्येय बाळगून आहेत. अर्थशास्त्रात गृहीत धरलेल्या तर्कसंगत वागण्यापलीकडे पाहायला लावण्याची क्षमता रागदारीत आहे, असाच याचा अर्थ होतो ना? जे सुगम संगीतात प्रवेश मिळवू शकत नाहीत, ते शास्त्रीय संगीतात उरतात, असं काही होत नाहीये. म्हणूनच अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांनी शास्त्रीय संगीत कंठाशी धरलं आहे त्यांच्या पाठीशी उभं राहू या.

लेखक अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.

kdparanjape@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......