टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • उमा भारती, डोनाल्ड ट्रम्प, नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस
  • Wed , 26 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या उमा भारती Uma Bharti डोनाल्ड ट्रम्प Donald Trump मोबाईल फोन Mobile phone नितिन गडकरी Nitin Gadkari देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis

१. राज्यातील आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. तशी परिस्थिती आलीच तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यासाठी पुढे येतील, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात कोणताही राजकीय भूकंप होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा शिवसेनेला एकप्रकारे ‘अदृश्य’ इशाराच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा अदृश्य हात ‘पंजा’ नाही, अशी कोपरखळीही त्यांनी काँग्रेसला मारली.

अध्यक्षमहोदय, ही तर डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराची गोष्ट झाली. आपल्याला जे हात अदृश्य वाटतात, ते इतरांना ढळढळीत दिसतायत की हो... हे अदृश्य हात ‘पंजा’ नसले, तरी पंजातूनच ‘फुटणार’ आहेत, याचीही कल्पना अख्ख्या गावाला आहे. बिचारे भुजांत बळ आहे, तोवर अभयदान मागून घ्या, नाहीतर आधार कार्डावरचा पत्ता बदलायचा, म्हणून तुमच्या सदाशुचिर्भूत पक्षाच्या शुचितासंपन्न सरकारमध्ये सामील होतायत.

.............................................................................................................................................

२. जगभरात चालकरहित (ड्रायव्हरलेस) कार धावणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, भारतात ड्रायव्हरलेस कार धावणार नाहीत, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. लाखो चालकांच्या नोकरीची सरकारला चिंता आहे. ड्रायव्हरलेस कार बाजारात आणून लाखो चालकांच्या नोकरीवर गदा आणली जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. ट्रक आणि टॅक्सी एग्रीगेटर्सच्या माध्यमातून परिवहन बाजारात हजारो नोकरीच्या संधी उपलब्ध होत असताना ड्रायव्हरलेस कार बाजारात आल्या तर लाखो लोकांच्या रोजगारावर कुऱ्हाड पडू शकते, असंही त्यांनी सांगितलं.

अजून ड्रायव्हरलेस कार युरोप-अमेरिकेत नीट धावू नाही लागली. तिच्या अनेक चाचण्या होतील. मग ती बाजारात येईल. तिथून कधीतरी भारतात येईल. त्याला अनेक वर्षं लागतील. आता तहहयात आपणच सत्तेत असू, असं गडकरींना वाटतंय बहुतेक. त्यांचं विधान संगणकयुगाच्या विरोधात बैलगाडी मोर्चा काढणाऱ्या भाजपच्या मूळ मानसिकतेला साजेसंच आहे. पण, ड्रायव्हरलेस कार भारतात यायला नकोतच. ड्रायव्हर असलेल्या मोटारींच्या बेबंद वाहतुकीत ड्रायव्हरलेस कार इतरांच्या चुकांमुळे अपघातग्रस्त होतील. शिवाय, इथल्या हवेत त्यांच्यातही बेशिस्त आणि मस्तवाल बेबंदपणाचे विषाणू शिरायला वेळ लागणार नाही.

.............................................................................................................................................

३. गंगा नदी म्हणजे काही टेम्स नदी किंवा राईन नदी नाही जी कायम स्वच्छच राहील. गंगा नदीत रोज २० लाख आणि वर्षाकाठी ६० कोटी लोक डुबकी मारतात, मग ती कायम स्वच्छ कशी राहील? असा प्रश्न केंद्रीय जल संशोधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती यांनी केला आहे. ‘नमामि गंगे’ या योजनेचे परिणाम २०१८ पासून बघायला मिळतील, असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे. संसदेत गंगा सुरक्षेचं विधेयक आणण्याआधी मसुद्याची चर्चा राज्यासोबत केली जाईल असंही भारती यांनी म्हटलं आहे.

उमादेवींनी धार्मिक डुबक्या मारणाऱ्या लोकांची ढाल उभी करून पळवाट शोधली आहे. गंगेत ३५हून अधिक शहरांमधलं सांडपाणी सोडलं जातं, ते त्या सोयीस्करपणे विसरल्या. बरं इतका कॉन्फिडन्स आहे गंगा अशुद्धच राहणार याचा, तर ते सगळे आयोग आणि यांच्याकडचं गंगेचं खातं गंगेतच विसर्जित का नाही करत? कोणाचंही सरकार असलं तरी बहुसंख्याकांच्या लांगूलचालनाचा भाग असलेलं गंगास्नान काही थांबणार नाही. अंत्यसंस्कार आणि प्रेतं नदीत भिरकावणंही थांबणार नाही. सांडपाणीही येत राहणार. मग हे खातं फक्त कोट्यवधी रुपयांचा निधी खात राहील, त्याचा उपयोग काय?

.............................................................................................................................................

४. स्मार्टफोन, फिटनेस ट्रॅकर यांसारख्या गॅजेटचे चार्जिंग करण्यासाठी आता विजेची गरज भासणार नाही. केवळ मानवी हालचालींमधून ऊर्जा घेऊन त्याचा पुरवठा इलेक्ट्रॉनिक उपकरणांना करू शकणारा एक ‘डिव्हाइस’ शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. या शास्त्रज्ञांमध्ये भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. अतिशय पातळ असलेल्या काळ्या फॉस्फरसपासून हा डिव्हाइस तयार करण्यात आला आहे. हा डिव्हाइस अतिशय हलक्या तीव्रतेने वाकवला अथवा दाबला गेला, तरीही एनर्जी हार्वेस्टिंग सिस्टीमद्वारे ऊर्जा निर्माण करण्यात येते. अशा प्रकारे भविष्यात आपण स्वतःच आपली वैयक्तिक उपकरणे चार्ज करू शकतो, असे अमेरिकेतील वॅन्डरबिल्ट युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक कॅरी पिंट यांनी सांगितले.

वा वा, फारच मौलिक संशोधन. अडचण फक्त एकच आहे. स्मार्टफोनने माणसांना जागच्या जागीच थिजवून टाकलं आहे. टीव्हीपासून गेमपर्यंत आणि मित्रपरिवाराबरोबर गप्पागोष्टींपासून प्रियपात्रांबरोबरच्या प्रेमालापापर्यंत सगळं काही स्मार्टफोनमधून व्हायला लागलं आहे. आता तो चार्ज करण्यासाठी हालचाल करायची असेल, तर त्यासाठी माणूस नेमावा लागेल वेगळा... त्याच्या हातातही स्मार्टफोन असला, तर तोही हलेल याची गॅरंटी नाही.

.............................................................................................................................................

५. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवर टीका करून हल्ला चढवला आहे. 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या एका बातमीमुळे 'आयएस' या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी बगदादी याला मारण्याचा अमेरिकेचा प्रयत्न निष्फळ झाला, असे ट्रम्प यांनी एका ट्विटद्वारे म्हटले आहे. 'राष्ट्रीय सुरक्षेबाबत त्यांचा हा अत्यंत घाणेरडा अजेंडा आहे', असेही त्यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे. वर्तमानपत्राच्या कोणत्या बातमीमुळे बगदादीला पकडण्याची योजना निष्फळ ठरली, याबाबत मात्र ट्रम्प यांनी स्पष्ट केलेले नाही.

बिकाऊ मीडियाच्या बातमीमुळे केवढा उत्पात झाला, याचे ढोल पिटायचे आणि बातमी कोणती ते सांगायचंच नाही, या तंत्राने तर कसलाही पुरावा न देता एखाद्याला फासावरही चढवता येईल. परदेशांतून बीटल्सपासून स्टीव्ह जॉब्जपर्यंत अनेकजण कशाकशाच्या शोधात भारतात येऊन गेले होते. ट्रम्पतात्याही गुप्त ट्रेनिंगसाठी येऊन गेले असणार इतक्यातच, असा फुल डौट खायला वाव आहे.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......