टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राहुल गांधी, ल्यूओ झाओहुई, नीतीशकुमार, लालुप्रसाद यादव, उमाशंकर गुप्ता, रघुबर दास आणि फारूख दार
  • Tue , 11 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राहुल गांधी Rahul Gandhi ल्यूओ झाओहुई Luo Zhaohui नीतीशकुमार Nitish Kumar लालुप्रसाद यादव Lalu Prasad Yadav उमाशंकर गुप्ता Uma Shankar Gupta रघुबर दास Raghubar Das फारूख दार Farooq Dar

१. मी चीनच्या राजदूतांची भेट घेतल्याने केंद्र सरकारला चिंता वाटत असेल तर सीमेवर तणाव असताना त्यांचे तीन मंत्री चीनमध्ये पाहुणचार का झोडत होते, यावर सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. चीनचे राजदूत ल्यूओ झाओहुई यांनी राहुल यांची भेट घेतली.

कमाल झाली राहुल तुमची? तुमच्यासारख्या अर्ध-इटालियन, ख्रिस्तीधर्मीयाने चिनी राजदूताची भेट घेण्याची भारतीय जनता पक्षाच्या देशभक्त मंत्र्यांच्या दौऱ्याशी तुलना तरी होऊ शकते का? त्या मंत्र्यांनी चीनमध्ये पाहुणचार झोडला म्हणजे हे मंत्री चिन्यांना दरडावत होते, धमकावत होते, हा २०१४नंतरचा सर्वशक्तिमान भारत आहे, याची त्यांना आठवण करून देत होते आणि चिनी लोक घाबरून त्यांची सरबराई करत होते, हे तुमच्या देशद्रोही डोस्क्यात कसं शिरायचं?

.............................................................................................................................................

२. सीबीआयने गेल्या काही दिवसांत विविध घोटाळ्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांभोवतीचे चौकशीचे फास आवळले आहेत. त्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार राजदपासून फारकत घेऊ इच्छितात. मात्र, राजदची साथ सोडल्यास सरकार कोसळण्याच्या शक्यतेमुळे ते हे धाडस करायला कचरत आहेत. अशा वेळी सोमवारी भारतीय जनता पक्षाने नितीश यांना बाहेरून पाठिंबा देण्याचे संकेत दिले. नीतीश महाआघाडीतून बाहेर पडल्यास राज्याच्या कल्याणासाठी भाजप त्यांना बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे, असे बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांनी म्हटले आहे.

नीतीश यांनी सदाशुचिर्भूत भाजपचा पाठिंबा घेऊन भ्रष्ट लालूंना उघडं पाडलं पाहिजे. त्यामुळे, त्यांना पडद्यामागे भाजपबरोबर चुंबाचुंबी करून उघडपणे तोंड लपवण्याची जी कसरत करावी लागते आहे, ती बंद होईल. शिवाय पुढच्या निवडणुकीपर्यंत हा तंबूत शिरलेला उंट नीतीश यांना राज्याच्या ‘कल्याणा’साठी तंबूतून बाहेर ढकलूनही मोकळा होईल. मग त्यांना लालूंबरोबर कुठेतरी एकत्र गुजगोष्टी करता येतील.

.............................................................................................................................................

३. जम्मू- काश्मीरमध्ये दगडफेकीतून बचाव करण्यासाठी ‘मानवी ढाल’ म्हणून जीपला बांधलेल्या तरुणाला १० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जम्मू- काश्मीरच्या राज्य मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. फारुख दार असे या जीपला बांधलेल्या तरुणाचे नाव असून तो शालविक्रेता आहे. श्रीनगर मतदारसंघात पोटनिवडणुकीदरम्यान सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी जवानांनी लष्करी जीपच्या पुढील भागावर एका युवकाला बांधून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

या फारुख दारची बाजू घेणाऱ्या विचारवंतांना जीपला बांधायला निघालेले देशभक्त आता ही नुकसानभरपाईची रक्कम ऐकल्यावर आळीपाळीने स्वत:ला जीपला बांधून घ्यायला तयार होतील. देशाच्या इतर भागांमधले काही तरबेज पोलिस अधिकारी तर दंगलकाळात जीपला बांधून फिरवण्याचं एक वेगळं रेटकार्ड जाहीर करतील आणि भरपाईची रक्कम ‘बळी’बरोबर वाटून खातील.

.............................................................................................................................................

४. देशातील व्हीआयपी कल्चर हद्दपार करण्यासाठी सरकारने काही दिवसांपूर्वीच केंद्र आणि राज्याच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांवरून लाल दिवे काढून टाकले असले तरी सत्ताधारी भाजपचे नेतेच व्हीआयपीगिरी करण्यात आघाडीवर आहेत. मध्य प्रदेशातील सांरगपूरमध्ये गृहमंत्री उमाशंकर गुप्ता एका ट्रॅफ्रिक जॅममध्ये अडकले होते. तब्बल पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असताना वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडी संपवण्याऐवजी मंत्री महाशयांना कार्यक्रमाला जाण्यास उशीर होऊ नये म्हणून त्यांच्यापुरता रस्ता मोकळा करून घेतला.

निव्वळ गाड्यांवरचे लाल दिवे हटवल्याने व्हीआयपी संस्कृती संपते, ही संकल्पना या सरकारच्या उथळपणाला साजेशीच आहे. पंतप्रधानांसारख्या शीर्षस्थ नेत्यांनी आपल्या उदाहरणातून हे धडे घालून द्यायचे असतात. इथं पंतप्रधान संसदेच्या डोक्यावरून जनतेशी संवाद साधतात, कोणत्याही प्रकारचं उत्तरदायित्व पाळत नाहीत, मंत्रिमंडळालाही ते मांडलिकांप्रमाणे वागवण्यात धन्यता मानतात. ते सुपरव्हीव्हीआयपी आहेत, यावर त्यांचा आणि त्यांच्या भक्तगणांचा प्रगाढ विश्वास असताना देशातलं व्हीआयपी कल्चर आपोआप कसं संपुष्टात येईल.

.............................................................................................................................................

५. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित गुरू महोत्सव कार्यक्रमात झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी महिलांकडून पाय धुऊन घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री दास एका मोठ्या ताटात उभे राहिलेले दिसत असून दोन महिला जमिनीवर बसून त्यांचे पाय धुवत आहेत. त्या मुख्यमंत्र्यांच्या पायावर गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणी टाकून त्यांचे पाय धुवत असल्याचे व्हीडिओत दिसत आहे. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री रघुबर दास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

भारतीय संस्कृतीची जराही माहिती नसलेल्या मूर्ख मीडियाने उभं केलेलं हे भूत आहे. बायकांनी पुरुषांचे पाय धुतले, तर त्यात एवढा गदारोळ माजवण्यासारखं काय आहे? शिवाय ते मुख्यमंत्री आहेत म्हणजे पुरुष नाहीत, महापुरुष आहेत, राज्यातल्या जनतेचे परात्पर गुरू आहेत. गुरूचे पाय शिष्यांनी धुतले, तर त्यात बिघडलं काय? या देशातल्या बहुतेक गुरूंच्या शिष्या त्यांची अशीच आणि यापेक्षाही वेगवेगळ्या प्रकारची सेवा करत असतात. ही आपली महान परंपरा आहे. त्या महिलांनी गुरूंच्या पायाचं तीर्थ भक्तिभावानं प्राशन केलं असलं, तरी त्यात काही आश्चर्य वाटून घ्यायला नको.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......