टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पी. चिदंबरम, नितेश राणे, काऊ मिट डिटेक्शन किट, गाय आणि प. बंगालमधील हिंसाचार
  • Mon , 10 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या पी. चिदंबरम P. Chidambaram नितेश राणे Nitesh Rane काऊ मिट डिटेक्शन किट Cow meat detection kit गाय Cow प. बंगालमधील हिंसाचार Communal riots

१. संघटना आणि कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागली, अशी कबुली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नुकतीच दिली. दिल्लीतील एका कार्यक्रमात ते म्हणाले, यूपीए १ आणि यूपीए २ सरकारच्या काळात कार्यकर्ते आणि संघटनेची उपेक्षा झाली. काँग्रेस पक्ष बघताबघता जिल्हा आणि प्रदेश पातळीवर दुबळा होता गेला आणि आम्ही काहीच करू शकलो नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. १९७७च्या पराभवानंतर इंदिरा गांधी यांचा सामना काही माजी काँग्रेसी आणि थकलेल्या समाजवाद्यांशी होता. पण आज काँग्रेसची लढत आरएसएससारख्या शक्तिशाली संघटनेशी आहे, याची त्यांनी आठवण करून दिली.

काँग्रेसचे कार्यकर्ते स्वातंत्र्योत्तर काळात नेमकं कुठे आणि काय काम करत होते, कसलं संघटन करत होते? तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या नावावर आणि स्वातंत्र्यलढ्याच्या पुण्याईवर मतं मिळवणाऱ्या या पक्षाने इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली यश संपादन करतानाच कार्यकर्त्यांचा सफाया करून चमच्यांच्या फौजा उभ्या केल्या होत्या. काहीही केलं न केलं तरी सत्ता मिळत असल्याने तथाकथित कार्यकर्ते हे नेते बनून तुस्त झाले होते आणि अजूनही ही सुस्ती पळालेली नाही. रा. स्व. संघाशी लढाई करण्याचा आपला वकूब राहिलेला आहे, असा भ्रम चिदूकाकांना कुठून झाला असेल, असा प्रश्न राहुलबाबांनाही पडला असेल हे वाचल्यावर.

.............................................................................................................................................

२. परप्रांतीय मच्छीमार बंदीच्या काळातही मासेमारी कसे करतात, याचा जाब विचारून सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या अंगावर मासे फेकल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार नितेश राणे अडचणीत आले आहेत. सहाय्यक मत्स्य आयुक्त वन्स यांनी राणे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परप्रांतीय लोकांना मच्छीमारी करू दिली जाते, असा नितेश यांचा आरोप होता.

राणे कुटुंबातील कोणाहीपुढे सिंधुदुर्गात कोणी सरकारी अधिकारी ‘उर्मट’पणा करायला धजत असेल, यावर विश्वास बसणं कठीण आहे. बरोबरी करणं शक्य तरी आहे का? बोटी पाण्यात जात नसल्याने आधीच मत्स्याहारींना सुक्या मासळीच्या पाणीदार कालवणाशी कसंबसं जेवावं लागत असताना काही बांगडे (भले कोणीही का पकडलेले असेनात) असे फेकाफेकीत वाया घालवणं कोकणच्या सुपुत्रांक शोभत नाही, हे नितेश यांना कोणीतरी सांगा. ते वन्स म्हणे, लगेच बांगडे उचलून किसमूर करायला घरी घेऊन गेले. याबद्दल त्यांचा सत्कार करायला हवा.

.............................................................................................................................................

३. हरियाणातल्या मथाना गावात असलेल्या एका सरकारी गोशाळेत मुसळधार पावसामुळे पाणी साठून चिखल आणि गाळ जमा झाला आणि त्यातच रूतून २५ गायींचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर येते आहे. या गोशाळेत या गायींसाठी पुरेसा चारा आणि पाण्याचीही व्यवस्था नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. इतर काही गायीही अत्यवस्थ झाल्या आहेत.

काहीही असलं तरी गोभक्तांच्या निगराणीत असतानाच या गोमातांना मृत्यू लाभलेला असल्याने त्यांना सद्गती लाभणार यात शंका नाही. मुसलमान कसायाने कापल्या तरच ती गोहत्या होते, हे लक्षात ठेवा. हे तथाकथित गोभक्त गायीला ‘माता’ मानतात. त्यातल्या काहींना पाहिल्यावर त्यावर विश्वासही बसतो. हे लोक आईला ‘देवी’ बनवून मखरात ठेवतात आणि प्रत्यक्षात तिच्यावर टाचा घासून मरण्याची पाळी आणतात. तीच परंपरा गायींच्या बाबतीत चालवली आहे, म्हणजे तिला खरोखरच मातेचा ‘सन्मान’ दिला आहे, हे लक्षात घ्यायला हवं.

.............................................................................................................................................

३. पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोशल मीडियावरून बनावट छायाचित्र व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला कोलकाता पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर आता भाजपप्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी नवा प्रताप केला आहे. या दंगलप्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर शनिवारी निषेध आंदोलनाचे आवाहन करताना त्यांनी ट्विटरवर चक्क २००२ मध्ये गुजरात दंगलींच्या छायाचित्राचा वापर केला आहे.

भाजपच्या कोणाही पदाधिकाऱ्याला इतर कोणी दंगलींबद्दल ग्यान देणं योग्य नाही. किमान या बाबतीतला त्यांचा अधिकार मान्य करायला हरकत काय? सतत विरोधासाठी विरोध बरोबर नाही. कोणत्याही दंगलीत जमाव काय करतो? गाड्या पेटवतो, माणसं मारतो. गुजरातेत काय आणि बंगालमध्ये काय, सगळं एकसारखंच घडतं. त्याचं प्रातिनिधिक दर्शन घडवण्यासाठी त्यांनी आपल्या परिचयाच्या, हृदयाच्या जवळच्या दंगलीतल्या छायाचित्राचा वापर केला, तर त्यात एवढं चिडण्यासारखं काय आहे?

.............................................................................................................................................

५. महाराष्ट्र राज्यातील न्यायवैदक विज्ञान प्रयोगशाळा संचलनालयाने मांसामध्ये गोमांस आहे का, याचा तपास करणाऱ्या पोर्टेबल किटची निर्मिती केली आहे. बेकायदा वाहतुकीच्या काळात पकडले जाणारे मांस गोमांस आहे का, याचा तपास करण्यासाठी या पोर्टेबल किटची निर्मिती करण्यात आली आहे. या किटच्या निर्मितीमुळे पोलिसांना मोठी मदत होणार आहे. या नव्या किटमुळे केवळ गोमांसाच्या संशयामुळे होणारी कारवाईदेखील टळणार आहे. ‘गोमांस शोधणाऱ्या इलिसा किटमुळे अवघ्या अर्ध्या तासात मांस हे गोमांस आहे का, ते समजू शकेल’, अशी माहिती न्यायवैदक विज्ञान प्रयोगशाळा संचलनालयाचे संचालक के. वाय. कुलकर्णी यांनी दिली.

महाराष्ट्राच्या पोलिसांकडे एकवेळ व्हीआयपी ताफ्यांच्या पलीकडे सर्वसामान्य माणसांना संरक्षण द्यायला पोलिस नसतील; जे आहेत त्यांच्यासाठी साध्या स्वच्छतागृहं आणि स्नानगृहांसारख्या सोयीसुविधा नसतील; दंगलीच्या, अतिरेकी हल्ल्यांच्या काळात संरक्षणासाठी चांगली बुलेटप्रूफ जाकिटं नसतील; त्यांना राहायला घरं नसतील; ३६ तास सलग ड्युटीमध्ये विश्रांतीची सोयही नसेल; पण गोमांस ओळखणारं किट आहे, ही काहीच्या काहीच अभिमानाची गोष्ट आहे.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......