पुस्तकांनी नादावलेल्यांच्या जगाची सफर
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
विकास पालवे
  • ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 07 July 2017
  • ग्रंथनामा Booksnama लीळा पुस्तकांच्या Leela Pustakanchya नीतीन रिंढे Nitin Rindhe पुस्तकांविषयीची पुस्तकं Book on Books लोकवाङ्मय गृह Lokvangmaya Griha

‘मैं किताबों की शरण में वैसे ही जाता हूँ, जैसे लोग धुआंधार बमबारी से बचने के लिए अण्डरग्राउण्ड डेरे में जाते हैं।’ - निर्मल वर्मा

वाचन ही एकट्यानं आणि गंभीरपणे करावयाची कृती आहे. या कृतीत सातत्य आणि शिस्त असणं या अत्यंत मूलभूत व आवश्यक गोष्टी आहेत. यासाठी प्रसंगी वाचकाला सगळ्या बंधनांपासून स्वत:ला बाजूला करून घेत एकटं पडावं लागतं. यामुळे ‘स्वार्थी’, ‘तुसडा’, ‘क्रूर’ अशी विशेषणं आपल्या नावामागे लावली जातील, हे ठाऊक असूनही त्याला ही जोखीम पत्करावी लागते. निर्मल वर्मा यांनी या कृतीला म्हणूनच ‘अण्डरग्राउण्ड’ होण्याशी जोडलेलं आहे.

प्रत्येकाच्या वाचनाची निमित्तं वेगवेगळी असू शकतील, पण म्हणून या सगळ्या प्रकारच्या वाचकांना वाचन, पुस्तकं यांविषयी जिव्हाळा असेलच असं नाही. हिंदी सिनेमे, क्रिकेट यांविषयीचं प्रेम जसं आपल्या समाजात लहानपणापासून आपसूकच निर्माण होत जातं, त्याप्रमाणे पुस्तकांविषयीचं प्रेमही लहान वयातच निर्माण होईल, अशी काही ठोस व्यवस्था आपल्याकडे नाहीच.

यासाठी काहीएक व्यवस्था उभी करायची झालीच तर ‘पुस्तकांविषयीची पुस्तकं’ हा त्यातील एक महत्त्वाचा घटक होऊ शकेल. मराठीत या स्वरूपाच्या पुस्तकांचं प्रमाण तुरळकच आहे. नीतीन रिंढे यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक म्हणूनच या प्रकारातील अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक ठरतं. या पुस्तकाला लिहिलेल्या ‘विषयांतर...’नामक मनोगतात त्यांनी पाश्चात्य देशांतील पुस्तकसंस्कृती आणि वाचनसंस्कृती यांविषयीची त्यांची मतं, त्याचबरोबर आपल्याकडील वाचनसंस्कृती आणि ‘पुस्तकांविषयीचं पुस्तकं’ या प्रकारात केलं गेलेलं लेखन, समाजात वाचनसंस्कृती रुजावी, यासाठी ही पुस्तकं कशी साहाय्यभूत ठरू शकतात आणि या विषयासंदर्भात आपण एकूणच आजपर्यंत गाठलेली मजल यांविषयी सविस्तर लिहिलं आहे.

पाश्चात्य समाजात सगळ्या थरांतल्या लोकांत ‘पुस्तक’ या गोष्टीविषयी अपार जिव्हाळा, प्रेम असल्याचं दिसून येतं. पुस्तकं, लेखकांच्या अप्रकाशित डायऱ्या, पत्रं यांची जपणूक करण्याकडे त्या लोकांचा विशेष कल असतो. आणि म्हणूनच त्या समाजात पुस्तकांचा अनेक अंगांनी विचार, अभ्यास, संशोधन होऊ लागलं. पुस्तकांची मुखपृष्ठं, अर्पणपत्रिका, समासातल्या नोंदी, बुकमार्क्स, बुकशेल्फ, यांविषयी तिथल्या संशोधकांनी स्वतंत्र पुस्तकं लिहिली आहेत. त्यात नवनवीन विषयांची भरही सातत्याने पडत राहते. आता तर ‘पुस्तकांतल्या तळटिपांचा इतिहास’ या विषयावरही संशोधन सुरू आहे. लवकरच हे संशोधनही पुस्तकरूपाने प्रकाशित होईल. नीतीन रिंढे यांनी उपरोक्त उल्लेख केलेल्या विषयांसंबंधीच्या पुस्तकांवरील लेख आपल्या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. पुस्तकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या रहस्यकथा-कादंबऱ्या यांवरही दोन लेख आहेत. पुस्तकचोरी याविषयीची चर्चाही एका लेखात आहे. न वाचलेल्या पुस्तकांविषयी जाहीरपणे बिनदिक्कत कसं बोलावं याविषयी चर्चा करणाऱ्या एका पुस्तकावरील लेखही आपल्याला वाचायला मिळतो. पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा इतिहास कथन करणाऱ्या पुस्तकाविषयी लिहिताना त्यांनी केवळ त्या मुखपृष्ठांविषयीच लिहिलंय असं नाही, तर त्या त्या पुस्तकाच्या आशयासाठी ती मुखपृष्ठं कशी समर्पक होती हेही सोदाहरण पटवून दिलं आहे.

पुस्तकांच्या विविध बाजूंविषयीचं हे लेखन वाचून आपल्याकडेही कोणाला अशा तऱ्हेचा अभ्यास-संशोधन करण्याची प्रेरणा मिळाली तर या पुस्तकाच्या लेखनाचा हेतू सफल झाला असं म्हणता येईल.

लीळा पुस्तकांच्या - नीतीन रिंढे

प्रकाशक - लोकवाङ्मय गृह, मुंबई

मुखपृष्ठ - नीतिन दादरावाला

पाने – १९२, मूल्य – २५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3383

.............................................................................................................................................

नीतीन रिंढे यांनी आपल्या या पुस्तकात केवळ इतर देशांतल्या पुस्तकांच्या इतिहासाविषयीचा किंवा विविध पैलूंचा आढावा घेतलेला नाही तर प्रसंगोपात्त भारतातील पुस्तकनिर्मितीच्या इतिहासावरील संशोधन, त्याविषयी प्रसिद्ध झालेली पुस्तकं, या विषयांची माहितीदेखील दिलेली आहे. त्या त्या देशांत ज्ञानकोश, शब्दकोश यांच्या निर्मितीसाठी व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवर कसं काम केलं जातं, तिथले समीक्षक-संशोधक कशा तऱ्हेनं आपलं लेखन अद्ययावत, परिपूर्ण व्हावं यासाठी अपरिमित कष्ट उपसत असतात आणि या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात काय परिस्थिती आहे, याबद्दलही ते भाष्य करतात.

वॉल्टर बेंजामिन, अल्बर्तो मँग्वेल, उम्बर्तो इको या समीक्षक-संशोधक-पुस्तकसंग्रहाकांविषयी स्वतंत्र लेख आहेत. या लेखकांची अनावश्यक ठरू शकेल अशी चरित्रात्मक माहिती देण्याचं त्यांनी टाळलं, हे बरंच झालं. संबंधित लेखकाचं वाचन, पुस्तकसंग्रह यांतल्या चढ-उतारांना पूरक ठरेल अशीच माहिती ते देतात. त्यामुळे लेखांची लांबी आटोक्यात आली आहे. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात मिळालेली सगळी माहिती येनकेनप्रकारेण आपल्या लेखात ‘कोंबून’ आपली ‘विद्वत्ता’ प्रदर्शित करण्याच्या घातकी लालसेपासून हे लेख कोसो दूर आहेत.

‘वाचक जेव्हा कादंबरीचं पात्र बनतो...’ या लेखात वाचकाला कादंबरीचं पात्र बनवून लिहिल्या गेलेल्या इतर भाषांतील कादंबऱ्यांबद्दल लिहिताना ते मराठीतील अशा प्रकारच्या लेखनासंबंधी काय परिस्थिती आहे, याचीही माहिती देतात. युरोपीय कादंबऱ्यांत पुस्तकाला महत्त्वाचं स्थान दिलं जातं, पण तसं भारतीय भाषांतल्या कादंबऱ्यांमध्ये मात्र होताना आढळत नाही, याचा संबंध ते ‘आपल्या समाजाच्या अविकसित पुस्तकसंस्कृतीशी’ जोडतात. किंवा कादंबरीकारांनी स्वत:च्या लेखन प्रक्रियेविषयी लिहिलेल्या पुस्तकांबाबत लिहिताना मराठीत अशा स्वरूपाचं लेखन कोणत्या स्तरावर आहे, याविषयीही ते टिप्पणी करतात. ‘फिल्शनमधली पुस्तकं’ या लेखात त्यांनी ज्या कादंबऱ्यांच्या आशयसूत्रात पुस्तकं केंद्रस्थानी आहेत, अशा मोजक्या कादंबऱ्यांचा आढावा घेतला आहे. त्या कादंबऱ्यांविषयीचं त्यांचं विवेचन आणि त्या कादंबऱ्यांची रोचक कथानकं, यांविषयी वाचल्यानंतर अशा स्वरूपाच्या अधिकच्या काही कादंबऱ्यांचा शोध घेण्याची जिज्ञासा वाचकाच्या मनात निर्माण होते.

उम्बर्तो इको

‘‘एका ‘तरण्या’ कादंबरीकाराचा कबुलीजबाब’ हा लेख तर कोणत्याही कादंबरीकाराला मार्गदर्शक ठरू शकेल असा आहे. उम्बर्तो इको या लेखकाच्या लेखनप्रक्रियेविषयी, लेखनासाठी तो घेत असलेल्या मेहनतीविषयीची माहिती या लेखातून मिळते. लेखकावरच्या प्रेमानं त्याच्याविषयी उपलब्ध होऊ शकणाऱ्या सर्व वस्तू जमवण्याचं झपाटलेपण काय असू शकतं याची प्रचीती ‘अत्तरविक्याचं प्रूस्तप्रेम’ हा लेख वाचल्यानंतर येते. त्या देशांत लेखकाचं साहित्य तर जपलं जातंच, पण त्याचबरोबरीने लेखकाच्या इतर बारीकसारीक वस्तू, छोटे छोटे कागदाचे चिटोरे यांचाही सांभाळ करण्याची वृत्ती दिसून येते. या विषयासंबंधी आपल्या समाजात किती ‘आनंदीआनंद’ आहे, याविषयी खरं तर रिंढे यांना स्वतंत्र लेखही लिहिता येईल.

पुस्तकं आणि वाचन यांबद्दलच अनास्था असणाऱ्या आपल्या समाजात म्हणूनच तर महात्मा गांधीजींची सही असलेलं पुस्तक रस्त्यावरच्या रद्दीवाल्याकडे मिळून जातं! (हे पुस्तकही रिंढे यांनाच मिळालं होतं). जर पुस्तकांचीच अशी दशा असेल तर त्यांच्या वस्तू संग्रहालयातून चोरीला जातात, याचं आश्चर्य वाटू नये. असो. हा लेख वाचून निदान सुजाण, जाणकार मंडळींनी तरी आपल्याकडे लेखकाची पत्रं, डायऱ्या, हस्तलिखितं, इतर सामग्री यांची जपणूक करण्यासंबंधी काहीएक सोय करता येईल का, या अंगानं विचार करायला हरकत नाही. या कामात त्या त्या लेखकांच्या प्रकाशकांनाही हातभार लावता येईल.

लेखक-समीक्षक यांनी वाचलेल्या पुस्तकांवरून त्यांची चरित्रं लिहिली गेलीत, अशा पुस्तकांविषयीचे लेखही आहेत. हिटलरच्या पुस्तकसंग्रहाविषयी, वाचनाविषयी मागोवा घेणाऱ्या पुस्तकावरील दीर्घ लेखही आहे. वाचक कसा असू नये याचं आदर्श उदाहरण म्हणजे हिटलर. जो कलाविचार, तत्त्वज्ञान यांविषयांवरील पुस्तकंही वाचत होता आणि त्याची प्रत्यक्ष कृती मात्र या प्रकारच्या पुस्तकांतून होणाऱ्या संस्कारांच्या विरुद्ध जाणारी होती. तसेच एकाच प्रकारच्या विचारांचं समर्थन करणारी पुस्तकं तो वाचत होता आणि त्यामुळे त्याच्यात संकुचितपणा, आपल्या विचारांविषयीची कट्टरता दिसून येते. म्हणूनच वाचनाविषयीची आपली भूमिका कशी असू नये, हे ठरवण्यासाठीदेखील हा लेख साहाय्यभूत ठरू शकतो.

प्रत्येक लेखात वर्णन केलेले किस्से, लेखक आणि पुस्तक विक्रेत्यांच्या आयुष्यात घडलेल्या गमतीजमती, काही लेखकांचं तऱ्हेवाईक वागणं, दुर्मीळ पुस्तकांचे व्यवहार, ती पुस्तकं मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणारे संग्राहक, यांमुळे आपण कधी विस्मयचकित तर कधी स्तब्ध होऊन जातो. एखादा पट्टीचा वक्ता एखाद्या विषयाची पार्श्वभूमी, विषयप्रवेश आणि त्याचे विविध आयाम अत्यंत खेळकर, गमतीशीर शैलीत अशा प्रकारे उलगडत जातो, की आपण त्या विषयाच्या शेवटापर्यंत पोहोचलो आहोत, हेही आपल्या ध्यानी राहत नाही.

रिंढे यांच्या लेखांची शैली ही बहुतांशी अशीच आहे. हे पुस्तक हाती घेतल्यानंतर कधी वाचून संपतं, तेही कळत नाही. याचं श्रेय त्यांच्या सुबोध मांडणीला जातं. उम्बर्तो इको या लेखकाच्या भाषेबाबत ते एके ठिकाणी म्हणतात की, ‘इकोचं लेखन कोणत्याही विषयावरचं असो, ते अकादमिक क्षेत्राबाहेरच्या सर्वसामान्य वाचकाला कधीच कंटाळवाणं, अनाकलनीय होत नाही. खेळकर आणि सुबोध भाषाशैली ही त्याच्या लेखनाची वैशिष्ट्यं.’ हेच वर्णन रिंढे यांच्या लेखनशैलीबाबतही तितकंच चपखलपणे लागू होऊ शकेल. जेव्हा एखादा विषय लिहिणाऱ्याला पूर्णपणे कळलेला असतो, तेव्हाच अशी मांडणी शक्य होते. पुस्तकाविषयी किंवा लेखांविषयी लिहिताना अत्यंत साध्या भाषेत त्यांचं मर्म सांगण्याची हातोटी त्यांना लाभलेली आहे.

काही लेखांत एखाद्या पुस्तकाविषयी लिहिताना दुसऱ्याच एखाद्या पुस्तकातील कथेचा उल्लेख येतो; एखाद्या पुस्तकातील लेखाविषयी लिहिताना एखाद्या कादंबरीचा उल्लेख येतो, पण त्यात काहीएक सूत्र असतं. एखादं पुस्तक कोणत्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलं, त्यातील आशय-विषय काय इथवरच विवेचन करून ते थांबत नाहीत, तर ते पुस्तक वाचकाने का वाचायला हवं याचंही मार्गदर्शन करतात.

नीतीन रिंढे यांच्या या सर्व लेखनातील वेगळेपण असं की, त्यांनी केवळ या लेखकांचं कौतुकच केलेलं नाही तर आवश्यक तिथं त्या लेखकाने मांडलेल्या विचारांतील उणिवा, अपुरेपणा यांविषयीही अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणी केली आहे.

साधारणपणे आपण म्हणू शकतो की, पुस्तकं आणि वाचन या दोन बाबी केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं हे पुस्तक आहे. पुस्तकांनी नादावलेल्या जगातील एका रहिवाशानं इतर समानधर्मी रहिवाशांचा, त्यांच्या वाचन आणि पुस्तकवेडाचा करून दिलेला हा परिचय आहे. अभ्यासाबाहेरची पुस्तकं म्हणजे निव्वळ रद्दी अशी समजूत असणाऱ्या घरात राहूनही निग्रहानं ग्रंथसंग्रह करू इच्छिणाऱ्या आपल्या समाजातील कोणाही ग्रंथसंग्राहकाला नीतीन रिंढे यांच्या या पुस्तकामुळे मोठाच आधार वाटू शकेल.

हे पुस्तक वाचल्यानंतर या संग्राहकाच्या हेही लक्षात येईल की, त्याच्याकडे केवळ भरपूर पैसे आणि चांगल्या लेखकांची-पुस्तकांची यादी असून भागत नाही, तर त्याला सातत्यानं ही पुस्तकं मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागतात. यासाठी त्याला पुस्तकांच्या दुकानांना, रस्त्यावरच्या पुस्तकविक्रेत्यांच्या स्टॉल्सना, रद्दीच्या दुकानांना भेटी देत राहाव्या लागतात. एखादा मध्यमवर्गीय चाकरमनी ज्याप्रमाणे अधूनमधून एलआयसीची पॉलिसी कधी ड्यू होणार हे पाहत असतो, तसंच पुस्तकसंग्राहकाला अधूनमधून पुस्तक प्रदर्शनांच्या तारखांकडे लक्ष ठेवावं लागतं.

वाचनाला जगण्यातील महत्त्वाची, प्राधान्याची बाब समजणारा कोणताही वाचनवेडा हा कोणत्याही टप्प्यावर समाधानी नसतोच. नीतीन रिंढे यांच्या या पुस्तकामुळे आपण समृद्ध होऊ, पण समाधानी नक्कीच होणार नाही. वाचावयाच्या पुस्तकांच्या यादीत आणखी काही नावांची भर पडेल. विनोद कुमार शुक्ल या हिंदीतील थोर लेखकाने एका मुलाखतीत असं म्हटलं आहे की, नुसत्या वाचनासाठी किमान ५०० वर्षांचं आयुष्य असायला हवं किंवा संपूर्ण आयुष्य रविवारच्या दिवसासारखं तरी असायला हवं. या वक्तव्यातून स्पष्ट होते ती वाचनाविषयीची प्रचंड असोशी. तळमळ. नीतीन रिंढे यांच्या या पुस्तकामुळे ही असोशी, तळमळ यांत आणखीच वाढ होते आणि हेच या पुस्तकाचं खरं यश आहे.

लेखक प्रकाशन व्यवसायात कार्यरत आहेत.

vikas_palve@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......