‘तरीही शेषप्रश्न’ : दस्तावेज स्त्रीमुक्तीचा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
वासंती दामले
  • ‘तरीही शेषप्रश्न’चं मुखपृष्ठ
  • Sun , 14 May 2017
  • ग्रंथनामा Booksnama तरीही शेषप्रश्न Tarihi Sheshprashna छाया दातार Chhaya Datar ग्रंथाली Granthali

डॉ. छाया दातार या स्त्रीमुक्ती चळवळीतील एक आघाडीच्या कार्यकर्त्या! महाराष्ट्रात, १९७५ पासून सुरू झालेल्या, स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रथमपासूनच्या साक्षीदार. त्यामुळे स्त्रीप्रश्नाच्या, ज्या ज्या पैलूंची चर्चा या प्रवासादरम्यान झाली, त्याची त्यांना उत्तम जाण आहे आणि ते पुस्तकात दिसूनही येते. ‘तरीही शेषप्रश्न’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून कळते की, तरीही अनेक प्रश्न अजून सुटलेले नाहीत. पुस्तकाची रचना ‘डॉक्युनॉवेल’ अशी आहे- म्हणजे शुद्ध दस्तावेजही नाहीत व सर्वस्वी काल्पनिकही नाही. काही घडलेल्या घटना, किंचित वेगळे रूप दिलेल्या खऱ्या व्यक्ती, काही खऱ्या व्यक्ती, काही स्वत:चे आयुष्य, काही मैत्रिणींचे आयुष्य अशी सरमिसळ या पुस्तकात आहे. सगळे वेगवेगळे प्रश्न उपस्थित करताना या कथा, या घटना येतात. चळवळीतील सदस्यांनी, स्वत:ची भूमिका स्पष्ट करताना कुठल्या कुठल्या प्रश्नांची चर्चा केली, त्यात कुठले मुद्दे चर्चिले गेले, याच्या समर्थनार्थ कुठल्या घटनांचा उल्लेख आहे, हे सर्व यात आले आहे. अनेक प्रश्नांवर चळवळीची भूमिका काय होती व आहे, ती तशी का आहे, हे यातील चर्चेवरून समजून येईल. ज्याला स्त्रीप्रश्न जाणून घेण्याची इच्छा आहे त्याच्यासाठी हे पुस्तक आवश्यक व वाचनीय आहे.  पुस्तक परिचयाच्या लिखाणाच्या मर्यादेत मात्र यातील काही प्रश्नांविषयीच चर्चा करणे शक्य आहे.

हे पुस्तक, थोडक्यात सांगायचे तर, छायाच्या नजरेतून घेतलेला स्त्री चळवळीचा इतिहास आहे. इतिहासाचा अभ्यास करताना, ऐतिहासिक साधनांबरोबरच म्हणजे कागदपत्रे, दस्तावेज यांच्या बरोबरच, इतिहास घडताना त्यात असणाऱ्या माणसांच्या आठवणींना, दुय्यम साधने म्हणून महत्त्व असते. पुरावा म्हणून ग्राह्य धरता येत नसल्याने, इतिहासाच्या दृष्टीने या डॉक्यु-कादंबरीला तेवढे महत्त्व नसले तरी, दस्तावेज व गेल्या चाळीस वर्षांचा स्त्री लढ्यातील प्रश्न समजून घेण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल. काही गोष्टी जशाच्या तशा वा काही भर घातलेल्या, बदललेल्या असल्या तरी ८० टक्के खऱ्या आहेत. त्या चळवळीचे मानस, अंतर्गत प्रवाह समजायला उपयोगी आहेत. शहरी, सुशिक्षित स्त्रियांची चळवळ म्हणून वेळोवेळी या चळवळीला बदनाम केले गेले. पश्चिमेतून आलेला विचार म्हणून ही चळवळ सुरू झाली नाही. पश्चिमेतून आलेली लोकशाही अजून आपल्याकडे म्हणावी तशी रुजली नाही. पण स्त्रीमुक्तीला शक्ती म्हणून का होईना, परंपरावादी पक्षाने स्विकारली. ती का? याचे उत्तर कदाचित या पुस्तकात मिळू शकेल.

पुरुषांपेक्षा बुद्धिमान व शिक्षित स्त्रियांनी दुय्यमत्व का स्वीकारावे? पन्नास वर्षांपूर्वी स्त्रियांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ‘पुरुषप्रधान संस्कृतीच्या’ विश्लेषणात त्यांना सापडले असू दे किंवा हे विश्लेषण पश्चिमेतील स्त्रियांनी आधी केलेले असू दे, पुढची वाटचाल तर येथील स्त्रियांनी, या समाजाच्या संदर्भात, इथेच करायची होती. त्याची सुरुवात स्वानुभव कथनाने झाली. आपले संस्कार सांगतात की, घरातील दु:खं बाहेर सांगायची नाहीत. मैत्रिणींच्या गटात येऊन आपली साधी सल ऐकून घेतली जाते व इतरांची ऐकल्यावर हे जाणवते की फारसे वेगळे असे, गुप्त ठेवावे असे, काही नसते. अशा एकत्र येण्यातून काही समविचारी स्त्रिया भेटत राहिल्या व त्यांनी काही प्रकल्प आखले, पुस्तक लिहिले, मासिक काढले. हा सुधा व मैत्रिणींचा गट यांनी अनेक प्रश्नांवर चर्चा केली. या गटाला लेखिकेने नाव दिले आहे- ‘शेषप्रश्न’.

चळवळीत सुरुवातीला आलेल्या स्त्रिया बहुतांशी डाव्या चळवळीतून आलेल्या होत्या. क्रांती झाल्यावर सर्व काही ठीक होईल, स्त्री-पुरुष समानता येईल यावरील विश्वास गमावलेल्या, पण डाव्या मूल्यांवर ठाम विश्वास असणाऱ्या होत्या. त्यामुळे सुरुवातीला, आधी क्रांती की आधी स्त्रीमुक्ती, हा प्रश्न आधी स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा, या प्रश्ना इतक्याच हिरीरीने चर्चिला गेला. समानतेवर विश्वास असल्याने, क्रांतिकार्यात फूट पाडत असल्याचा आरोप करणारे कॉम्रेड, एखाद्या स्त्रीला अत्याचारातून सोडवायला मदतही करायला यायचे. पण प्रथम पासूनच संघटनेच्या  रोजच्या कामापासून पुरुषांना लांबच ठेवण्यात आले होते.

……………………………………………………………………………………………

तरीही शेषप्रश्न  - ले. छाया दातार   

ग्रंथाली, मुंबई

पाने - ३१९, मूल्य - ३०० रुपये.       

हे पुस्तक ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3478

……………………………………………………………………………………………

स्त्री चळवळीच्या मते, समाजसुधारणा व राजकीय कार्य यात द्वैत नव्हतेच. उलट ‘जे वैयक्तिक ते राजकीय’ हेच सर्व स्त्री चळवळीचे बोधवाक्य होते. धर्म, परंपरा यावर विश्वास नसल्याने मंगळसूत्र का घालत नाही? कुंकू का लावत नाही? काहींनी आडनावे बदलली नाहीत तर का नाही? या प्रश्नांना चळवळीतील स्त्रियांना तेव्हा वारंवार तोंड द्यावे लागले. हळूहळू पुरुषप्रधानतेची मांडणी पटून अनेक राजकीय विचारसरणींच्या स्त्रिया अथवा राजकीय विचारसरणींविषयी विचार न केलेल्या, तसेच दलित स्त्रिया चळवळीकडे येऊ लागल्या. यातील निवेदनकर्ती ‘सुधा’ हिचा प्रवास एका गृहिणीपासून चळवळीतील कार्यकर्तीपर्यंत कसा झाला, पुढे त्यात आलेली वळणे, घडलेल्या घटना हे आत्मकथन मधून मधून येत राहते. स्त्रीमुक्ती यात्रेत तिच्या हातून अजाणतेपणी घडलेल्या चुकीची कबुलीही आहे. तसेच यातील निर्मला, ललिता, चारू, साधना या प्रातिनिधिक स्त्रियांचे आयुष्यही यात येते.

गेल्या चाळीस वर्षांच्या प्रवासात अनेक प्रश्नांची चर्चा, चळवळीत म्हणजे फक्त शेषप्रश्नात नाही, तर देशातील सर्व स्त्रीमुक्ती मानणाऱ्या गटांमधून झाली. ते प्रश्न लेखिकेनी दिले आहेत ते म्हणजे ‘समलिंगी संवेदना’, ‘विवाहसंस्था’, ‘सेक्स वर्कर्स’, ‘रतीप्रेरणा’ वगैरे. या चर्चा होत्या घटीत घटनांवर, आपली भूमिका निश्चित करण्यासाठी केलेल्या चर्चा! समलिंगी संवेदना या निवड म्हणून चळवळ स्वीकारत होतीच, पण इतक्या वर्षांच्या वाटचालीत, वैज्ञानिक संशोधनाच्या साह्याने, या संवेदना नैसर्गिक आहेत ही चळवळीची आजची भूमिका आहे हे लेखिका स्पष्ट करते.

लग्नसंस्थेची चर्चा सविस्तर आहे. त्यात घडलेले बदल आपण आज प्रत्यक्ष समाजात बघत आहोत. अगदी महाराष्ट्रापुरते म्हणायचे झाल्यास हेही सर्वजागी सर्वसमाजात सारखे नाहीत हे ग्रामीण भागावरील प्रकरणात आपल्याला कळते. पण ग्रामीण भागही बदलतो आहे हेही आपल्याला कळते. लग्न व घटस्फोटाच्या कारणांची मांडणी उत्तम झाली आहे. चळवळीत वेश्यांसाठी ‘सेक्स वर्कर्स’ हा शब्द रूढ झाला आहे ज्याच्याशी सहमत होणे कठीण आहे. कारण गरिबी हेच या व्यवसायामागचे कारण आहे, हे इतिहासात अनेकदा दिसून आले आहे. गोंडस शब्द दिल्याने व्यवसायाचे उदात्तीकरण होण्याचा धोका वाढतो. यात अडकलेल्या स्त्रियांविषयी सहानुभूती बाळगूनही, छाया, सेक्स वर्कर या मांडणीविषयी मनापासून सहमत आहे असे वाटत नाही. अर्थात कुठल्याही भूमिकेत अंतिम वाक्य असूच शकत नाही. ‘रतीप्रेरणा’ या प्रकरणात काही अनुभव व काही कल्पनेच्या सहाय्याने, स्त्रियांमधील रतीप्रेरणेचा शोध घेतला आहे. गटाने या चर्चेला सुरुवात केली तेव्हा या विषयी उघड बोलले जायचे नाही. पुरुषांनी समाजात या विषयी अनेक भ्रम पैदा करून ठेवले होते. आज परिस्थिती बरीच बदलली आहे.  

या वाटचालीत समाजात अनेक घटना घडल्या. हुंडाबळीच्या, बलात्काराच्या या खास भारतीय घटना! यांना सामोरे जाताना अननुभावामुळे चुका घडल्या, यातून संघटना शिकत गेल्या. संसारात सुखी नसलेल्या बायका संघटनेकडे मदतीसाठी येऊ लागल्या. निर्मला वकील असल्याने तिचा या घटनांशी रोजचा संबंध यायचा. तसेच संघटनेतील प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या कामांशी जोडली गेलेली होती व मिटींगच्या दिवशी अनुभवांची देवाणघेवाण व्हायचीच. काम करताना पडलेले प्रश्नही चर्चिले जायचे. चळवळ यामुळे अनुभवाने व विचारांनी समृद्ध होत गेली. निर्भया बलात्कार केसचा अनुभव, त्यामुळे घडलेले विचारमंथन हेही यात आहे. गेल्या पन्नास वर्षातील स्त्रीचे बदलते रूप यात आपल्याला बघायला मिळते. मग स्त्री-चळवळ यशस्वी झाली असे म्हणता येईल का?

‘तरीही शेषप्रश्न’ या शीर्षकामुळे आपण म्हणू शकतो की, लेखिकेला म्हणायचे आहे की तरीही प्रश्न शिल्लक आहेतच. कुठलेही सामाजिक बदल हे टप्प्या टप्प्यानेच होत असतात. शिवाय भारतासारख्या खंडप्राय देशात ते समान नसणार. पण म्हणूनच शेवटल्या प्रकरणात तरुण मुलींनी संघटना, ‘आता आम्ही चालवतो. तुम्ही आम्हाला सल्ले द्या’ म्हणून सुधा व तिच्या मैत्रिणींना सन्मानपूर्वक निवृत्त केलेले दाखवले आहे. या प्रकरणाची भाषा सकारात्मक आहे, हे आवडले.

आधी म्हटल्याप्रमाणे पुस्तक जास्त दस्तावेजी व कादंबरी कमी असे झाले आहे. काही प्रकरणे, स्त्रीमुक्ती चळवळीविषयी फारशी माहिती नसणाऱ्यास, रुक्ष वाटू शकतील. पण ज्याला माहिती करून घ्यायची आहे, चळवळ समजून घ्यायची आहे, त्याच्या साठी हे उपयुक्त पुस्तक आहे.

लेखिका निवृत्त प्राध्यापिका आहेत.

vasdamle@gmail.com                                                

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......