‘कडिकाळ’ : ‘दलित साहित्या’च्या बहराच्या काळात हे पुस्तक आलं असतं, तर या लेखकाला डोक्यावर घेतलं गेलं असतं...
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नितीन साळुंखे
  • ‘कडिकाळ’चे मुखपृष्ठ
  • Sat , 10 August 2024
  • ग्रंथनामा शिफारस कडिकाळ KADIKAL अनिल भालेराव Anil Bhalerao

खानदेशातल्या ग्रामीण भागातला दहावी पास झालेला एक मुलगा... मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबातला. दलित समाजातला... कल्याणच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि बिस्कीट कंपनीत नोकरीला जाणाऱ्या त्याच्या गाववाल्याकडे आला आहे. एकटाच. कारण त्याला पुढे शिकायचं आहे. त्यासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे. पण त्याच्याही आधी त्याला समाजकल्याण विभागाकडून वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवायचा आहे. त्याच्यासारखेच हातावर पोट असलेले त्याचे बरेचसे नातेवाईक उल्हासनगर भागात राहतात. त्यामुळे त्याला कल्याणमध्ये अस्मिता महाविद्यालयामध्ये आणि तिथल्याच वसतिगृहात प्रवेश घ्यायचा आहे.

आत्मकथनाच्या शैलीत ही गोष्ट सुरू होते आणि वाचणारा त्यात गुंतून जातो. दीडशेपेक्षाही कमी पानांच्या ‘कडिकाळ’ या कादंबरीत लेखक अनिल भालेराव यांनी शिक्षण घेऊ पाहणाऱ्या तरुण मुलांची जी परवड होते, त्याचं हृदयस्पर्शी वर्णन केलं आहे. पण कोठेही त्रागा, आक्रस्ताळेपणा, समाजाला किंवा व्यवस्थेला दोष असं काहीही नाही. आनंद शिशुपाल या मुलाच्या माध्यमातून लेखक शांतपणे हे सगळं मांडत पुढे जात राहतो. कारण या मुलाला शिकायचं आहे. आपल्या घराला आहे या अवस्थेतून बाहेर काढायचं असेल, तर आपल्याला शिकल्याशिवाय पर्याय नाही, हे त्याला चांगलंच उमगलेलं आहे.   

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कादंबरीच्या सुरुवातीच्याच भागात येतं, ते तिथल्या वसतिगृहाचं वर्णन. तिथली राहण्याची व्यवस्था, जेवण, जेवणाची एकूण ‘सिस्टिम’. आणि मग प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये गेल्यावर गावाकडून शहरात शिकायला गेलेल्या बहुसंख्य मुलांची जी अवस्था होते, तीच अवस्था आनंद आणि त्याचा मित्र यांची झालेली आहे. कारण तिथले प्रोफेसर इंग्रजीत शिकवताहेत आणि गावाकडे तर इंग्रजीतून शिकवणारे शिक्षक आढळणे महामुश्किल. पण अशा परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या मुलांकडे जे एक उपजत शहाणपण आणि तडजोड करण्याकडे कल असतो, त्याची झलक वसतिगृहाच्या खडूस वाढप्याबद्दल त्या दोघा मित्रांत जे बोलणं होतं, त्यातून दिसते. माणुसकी नसलेल्या त्या माणसाबद्दल हे दोन मित्र एकमेकांचं आणि त्याच वेळी स्वतःचं समाधान करताना आपसात बोलतात की, ‘असू देत. आपल्याला दिवस काढायचे आहेत. पण हे दिवसही जातील. आजपर्यंत इतकं भोगलं. त्यात आता आणखी याची भर, इतकंच.’

इंग्रजी समजत नाही, या समस्येबाबत तिथल्याच एका प्राध्यापकांना विचारल्यावर त्यांनी इंग्रजी शिकण्याचा सल्ला दिला. तो अभ्यास कसा करायचा, हेसुद्धा सांगितलं. आणि त्याचा अवलंब करायला सुरुवात केल्यानंतर मग कुठं खऱ्या अर्थानं त्यांची शिकायला सुरुवात झाली आणि बघता बघता दिवाळीच्या सुट्या जवळ आल्या. वसतिगृहावरही नोटीस लागली, सुटीच्या काळात बंद राहणार असल्याची. पंधरा दिवसांसाठी गावाकडे जायला परवडणार नाही. आणि वसतिगृह बंद असल्यानं या काळात राहायला आणि अर्थातच जेवायला मिळणार नाही. वसतिगृहामध्ये राहण्याच्या आणि जेवण्याच्या कितीही गैरसोयी असल्या तरी मुळात ती सोय, कशी का असेना, तिथं असते. तीच नाही म्हटल्यावर जायचं कुठं? मग कुठं मित्राच्या खोलीवर. कुठं एखाद्या गाववाल्याच्या खोलीवर. अर्थातच झोपडपट्टीत. या झोपडपट्टीत राहावं लागणाऱ्या लोकांचं जगणंसुद्धा आपल्यापुढे उलगडलं जातं… कसर लागलेलं एखादं भिजकं वास मारणारं जुनेर उलगडावं तसं.

वाचनाची आवड असणारा आनंद विद्यार्थ्यांवर शासनाकडून केल्या जाणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ठामपणे उभा राहतो. आणि मग आपसूकच विद्यार्थी चळवळीकडे ओढला जातो. चळवळ आणि मित्रांबरोबर केल्या जाणाऱ्या तारुण्यसुलभ मस्तीमजा या सगळ्यांतही आपल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होता कामा नये, याबद्दलचं त्याचं भान कायम राहतं. पण या चळवळी करताना त्याला तरुण वयातच सामाजिक भानसुद्धा आलेलं आहे. त्यामुळे सुट्टीला घरी गेल्यावर त्याच्या लहान बहिणीचा १४व्या वर्षी घरच्यांनी लावून दिलेला विवाह त्याला खटकला आहे. या विवाहाच्या निमित्तानं, समाजातले चांगले शिकलेले लोकही समाजाला दिशा देण्याचं काम न करता उलट आणखीच अज्ञानाच्या खाईत नेण्याचं काम करताहेत. अशिक्षित समाजबांधवांना धार्मिकदृष्ट्या कर्मठ बनवताहेत आणि यातून आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा मात्र उद्धार करून घेत आहेत, हे त्याला दिसतं. त्यांच्याबद्दलची त्याची चीड उफाळून येते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आनंद बारावी उत्तीर्ण होतो. मुंबईतल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवतो. पण समाजकल्याणाच्या वसतिगृहात बारावीपर्यंतच्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. त्यामुळे राहण्या-जेवण्याचा प्रश्न पुन्हा उभा राहतो. चुलत बहिणीकडे केवळ राहण्या-जेवण्याची तात्पुरती सोय झाल्यावर आनंद पुन्हा अभ्यासाला लागतो. एक मल्याळी मित्र ‘मल्याळम संघा’त व्याख्यान द्यायला बोलावतो. ‘महाराष्ट्रातल्या दलितांवर होणारे अन्याय’ या विषयावर पाऊण तास व्याख्यान दिल्यावर तिथल्या मल्याळी मुलांशी झालेल्या चर्चेतून समोर येतं की, हीच अवस्था केरळ आणि तामिळनाडू येथेही आहे. या जातीय वर्णव्यवस्थेला कंटाळून तिथल्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, असं ती मुलं सांगतात.

दुसऱ्या समाजांकडून झालेल्या पिळवणुकीबद्दल बोलतानाच आनंद नात्यातल्या एका प्राध्यापकाने आपल्या थोरल्या भावाची कशी पिळवणूक केली, तेसुद्धा सांगतो. मानसिक रुग्ण पत्नी, दोन लहान मुलं आणि म्हातारी आई असलेल्या या प्राध्यापकाला पीएच.डी. करायची होती. तुला शिकवतो, असं म्हणून आनंदाच्या थोरल्या भावाला तो स्वतःच्या घरी औरंगाबादला घेऊन गेला आणि त्याला घरातली सगळी कामं करायला लावली. स्वतःची पीएच.डी. पूर्ण झाल्यावर लगेच भांडण काढून त्याला हाकलून दिलं. या सगळ्यात भावाचं पदवीपर्यंत शिक्षण मात्र पूर्ण झालं.

दहावी पूर्ण करून कल्याणाला आल्यापासून एम.ए., बी.एड., नेट-सेट पूर्ण होईपर्यंतचा असा सगळा प्रवास या छोट्याशा पुस्तकात लेखकाने अतिशय रसाळपणे मांडला आहे. त्याच वेळी समाजातल्या घडामोडी आणि त्यावर एक तरुण मुलगा म्हणून त्याचं मत या सगळ्याचाच धावता आढावा घेतला आहे. ग्रामीण भागातलं जातवास्तव मांडत असतानाच ही कादंबरी शहरी भागात अशा विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या अनेकविध संधी आणि त्या मिळवण्यात त्यांना येणारे हरतऱ्हेचे अडथळेही मांडते.

असं वाटतं की, ‘दलित साहित्या’च्या बहराच्या काळात हे पुस्तक आलं असतं, तर या लेखकाला डोक्यावर घेतलं गेलं असतं.  

‘कडिकाळ’ - अनिल भालेराव | चेतक बुक्स, पुणे | मूल्य – ३२४ रुपये.

.................................................................................................................................................................

नितीन साळुंखे

salunkheneetin@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now       

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......