हे पुस्तक लिहिण्यामागील एक हेतू हा होता की, आपल्या डोळ्यांवरील ‘इझम’चे, पारंपरिक समज-गैरसमजांचे काळे गॉगल उतरावेत...
ग्रंथनामा - झलक
रवि आमले
  • ‘परकीय हात : विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 22 June 2024
  • ग्रंथनामा झलक परकीय हात Parkeey Haat रवि आमले Ravi Amale रॉ RAW

ज्येष्ठ पत्रकार व लेखक रवि आमले यांचं ‘परकीय हात : विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने’ हे नवंकोरं पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला लेखकाने लिहिलेलं हे मनोगत…

.................................................................................................................................................................

‘‘… तेव्हा भारतात हा ‘परकीय हात’ काम करत होताच. आजही करत आहे. तो स्वतंत्र पुस्तकाचा विषय ठरावा.’’

‘रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाच्या मनोगतातील हे वाक्य. ते पुस्तक २०१८मधले. ‘रिसर्च अँड ॲनालिसिस विंग’ या आपल्या गुप्तचरसंस्थेची यशोगाथा हे त्याचे स्वरूप होते. आपल्याकडील एका विशिष्ट वर्गात विदेशी गुप्तचरसंस्था, त्यातही खासकरून इस्रायलच्या ‘मोसाद’चे फार कौतुक. ते असायला हरकत नाही. पण त्या कौतुकात आपल्या गुप्तचर यंत्रणांना कमी लेखणे असे. ते खटकणारे.

रॉविषयी, तिच्या कारवायांविषयी काहीही माहिती नसताना, तिची तुलना मोसादशी करायची; ते मोसादवाले कसे अरब-मुस्लीम अतिरेक्यांना त्यांच्या देशात घुसून ठोकून काढतात आणि आपण कसे बुळे अशी कुजबूज करत आपल्याच देशाला नावे ठेवायची, असा तो सारा प्रकार असे. गेल्या ७०-७५ वर्षांत देशात काहीच झाले नाही, या कृतघ्न आणि अडाणी भावनेचाच तो एक भाग. तर त्यावरील प्रतिक्रियेतून रॉ या पुस्तकाची पहिली ठिणगी पडली. स्वाभाविकच त्या पुस्तकात रॉच्या यशाच्या कहाण्यांना प्राधान्य होते. त्याकरता वाचन, संशोधन करत असताना समोर इतरही बरीच माहिती येत होती.

रॉचा सगळाच इतिहास काही देदीप्यमान म्हणता येईल असा नाही. त्या संस्थेच्या नावाला काळीमा फासणाऱ्या घटनाही येथे घडून गेलेल्या आहेत. तेही कुठेतरी येणे आवश्यक आहे असे वाटत होते. दुसरीकडे परराष्ट्रांनी, त्यांच्या हेरसंस्थांनी भारतात केलेले उद्योगही ठोसपणे समोर येत होते. त्यातील काही उद्योग आपल्या हेरसंस्थांच्या साह्याने केलेले. काही आपल्या विरोधातले. राजनैतिक मुत्सद्दी, नेते, गुप्तचर अधिकारी यांची आत्मकथने, पुस्तके, संशोधन लेख, पेपर, ‘विकिलिक्स’, तसेच एडवर्ड स्नोडेन यांनी फोडलेली गोपनीय कागदपत्रे, खुद्द अमेरिकी हेरसंस्थांनी तेथील कायद्यानुसार जाहीर केलेली कागदपत्रे या सगळ्यांतून त्या ‘फॉरिन हँड’वर, ‘परकीय हाता’वर प्रकाश पडत होता.

त्याची एकत्रित नोंद व्हावी, तत्कालिन घटना-घडामोडी यांचे बिंदू एकमेकांना जोडून त्यातून भारतातील परकीय हाताची कारस्थाने आणि कारवाया, यांचे सलग चित्र समोर यावे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची ती बाजू मांडावी, असे रॉचे लेखन सुरू होते, तेव्हापासूनच मनात होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हा ‘परकीय हात’ तसा आपल्याला नवा नाही. इंदिरा गांधी यांचा काळ ज्यांनी अनुभवला आहे, त्यांना तर त्याचा चांगलाच परिचय असेल. आणीबाणी लागली, तेव्हा मी शाळकरीच होतो. तेव्हाच्या दोन आठवणी आहेत. एक म्हणजे आमच्या जीवन शिक्षण मंदिरातील गणेशोत्सवात रांगोळीने काढलेले ‘आले अनुशासन पर्व, वागू शिस्तीने सर्व’ हे वाक्य आणि नंतर ओतूरच्या बाजारपेठेतील भिंतीवर निळ्या शाईने लिहिलेली ‘अंधेरे में एक प्रकाश… जयप्रकाश, जयप्रकाश’ ही घोषणा. पण तेव्हाच्या काळात ‘परकीय हात’ हे एक ‘चलनी नाणे’ होते.

इंदिरा गांधी यांच्या प्रचारातील तो एक हुकमी एक्का होता. इतका की, त्याचा विनोदविषय झाला. पण पुढे कधी एखादा फितूर पकडला जाई, कुठे हेरगिरी कारवाया उघडकीस येत आणि विदेशी हेरसंस्थांच्या, परराष्ट्रांच्या हस्तक्षेपाची चर्चा कानावर येई. पंजाब-काश्मिरातील दहशतवाद, ईशान्येतील बंडाळी यातून तो दिसे.

महाविद्यालयात एक कम्युनिस्ट मित्र होता. पूर्वी डोंबिवलीत राहायचा तो. त्याच्या तोंडात सीआयएच्या अतिरेकी कारवाया नेहमी भिजत पडलेल्या असत. पण त्या पलीकडेही हा परकीय हात कार्यरत असतो. तो येथील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, एवढेच नव्हे, तर अगदी सांस्कृतिक बाबींनाही प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असतो, हे फारसे गावी नव्हते. पत्रकारिता करताना, येथील समाजकारण जाणून घेताना, आंतरराष्ट्रीय राजकारण, ‘इंटेलिजन्स’ या विषयांचा अभ्यास करताना या गोष्टींची समज येऊ लागली. अनेकांना मात्र आजही त्यावर विश्वास ठेवणे जड जाताना दिसते.

भारतात परराष्ट्रांच्या हेरसंस्था नाना उद्योग करतात यात खरे तर काहीही धक्कादायक नाही. फार पूर्वीपासून हे सुरू आहे आणि भारतीय हेरसंस्थाही अन्य देशांत तेच करत असतात. पाकिस्तानातील फुटीरतावादी चळवळींना, तेथील दहशतवादी संघटनांना रॉने केलेली मदत जगजाहीर आहे.

कॅनडातील खलिस्तानवाद्यांविरोधातील, श्रीलंकेतील, नेपाळमधील रॉच्या कारवाया हे उघड गुपीत आहे. तेव्हा विदेशी शक्ती भारतात हस्तक्षेप करतात म्हणून रडण्यात अर्थ नाही. आपल्या राष्ट्राचे हित, स्वार्थ साधणे आणि त्यासाठी प्रसंगी कोणत्याही थराला जाणे, हा हेरसंस्थांच्या कार्याचाच एक भाग असतो. आता त्यातील नैतिकता, अनैतिकता हा वेगळा मुद्दा. त्यावर वाद होऊ शकतो. पण तशीही हल्ली ही बाब संयुक्त राष्ट्रांचे व्यासपीठ, आंतररराष्ट्रीय परिसंवाद आणि मुत्सद्द्यांची चर्चा एवढ्यापुरतीच मर्यादीत राहिलेली दिसते. प्रत्यक्ष व्यवहारात ‘माय कंट्री… राईट ऑर राँग!’ हेच चाललेले असते.

जे भारत अन्यत्र करत होता, तेच अन्य देश भारतात करत होते. त्यातील काहींची वर्तणूक एक हात मैत्रीचा आणि दुसऱ्या हातात खंजीर अशीही होती. काही देश भारतविरोधी कारवाया करत होते, तशाच भारताच्या भूमीवरून एकमेकांविरोधातही लढत होते. एरवी या गोष्टी भारतीय इतिहासातील ‘फूट नोट्स’ म्हणूनही क्वचितच समोर येतात. परंतु नीट पाहिले, तर लक्षात येते की, या अशा कारवाया आणि कारस्थानांमध्ये भारताच्या इतिहासाला कुठे ना कुठे तरी वेगळे वळण लावण्याची क्षमता होती. तसे झालेही आहे.

एकूणच कोणत्याही राष्ट्रीय घटना, तत्कालिन राजकारण यास विविध कंगोरे असतात आणि ते त्या घटना वा राजकारण यांच्या लोकप्रिय मापनाहून खूपच भिन्न असतात. ‘परकीय हात’मधील प्रकरणे वाचताना हे नक्कीच जाणवेल. हे पुस्तक लिहिण्यामागील एक हेतू हाच होता की, डोळ्यांवरील ‘इझम’चे, पारंपरिक समज-गैरसमजांचे काळे गॉगल उतरावेत. राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक, अधिक खोल व्हावी. आपल्याकडील मास-मीडियाच्या चवचालपणामुळे झाले असे की, राजकारण म्हणजे केवळ सत्तेसाठीच्या साठमाऱ्या असेच चित्र उभे राहिले. पण त्या संघर्षामागेही काही वेगळी बले कार्यरत असतात. आणि ती देशाचे ‘राजकारण’ घडवत असतात. येथील निर्णयांवर, धोरणांवर, एवढेच नव्हे, तर लोकानुबोधावर, पर्सेप्शनवरही परिणाम करीत असतात. ‘परकीय हात’ हा त्याची जाणीव करून देण्याचा एक प्रयत्न आहे.

हे सारे मांडत असताना काही मर्यादा नक्कीच होत्या. एखादी फाईल गोपनीय आहे, याचा अर्थ त्यातील माहिती म्हणजे ब्रह्मसत्यच, असा एक समज उगाचच निर्माण झालेला असतो. गुप्तचरसंस्थांतील अधिकारी, त्यांचे विश्लेषक हे लिहितात ती काळ्या दगडावरची रेघ मानण्याचेही कारण नसते. कारण अखेरीस तीही माणसे असतात. त्यांची नोंदवलेली माहिती, त्यांची सूत्रे चुकीची वा अर्धवट असू शकतात. हीच बाब गुप्तचर अधिकारी वा मुत्सद्दी आदी मंडळींच्या लेखनाबाबतची.

अशा आत्मकथनांना अनेकदा स्वसमर्थनाचा आजार झालेला असतो. त्या आजारात तथ्ये अशक्त होतात. तेव्हा या सगळ्या माहितीकडे तारतम्याने पाहणे, ती इतर माहितीशी वा स्रोतांशी ताडून पाहणे, हे आवश्यक ठरते. जेथे ते अजिबातच अशक्य, तेथे त्या घटना वजा करणे हेच योग्य असते. या पुस्तकाच्या लेखनात आवर्जून तसा प्रयत्न केला आहे. त्याबाबत कुठे शंका निर्माण झालीच, तर हे लक्षात घ्यावे, की कोणत्याही लेखनास लेखकाच्या वैचारिकतेची, अनुभवाची, विश्लेषक शक्तीचीही मर्यादा असतेच.

हे लिहीत असताना अशी काही गूढ ठिकाणे आली, की जेथे खऱ्या-खोट्याचा साधा अंदाजही लावणे कठीण होते. इस्रोतील हेरगिरी प्रकरण हे त्यातीलच एक. त्यामुळेच त्याचा समावेश या पुस्तकात करावा की काय याबाबत द्विधा मनस्थिती होती. मात्र काहीही असले, तरी त्या हेरगिरी प्रकरणाने भारतीय अंतराळ कार्यक्रमावर मोठा परिणाम झाला. विदेशी शक्तींना आणखी काय हवे असते? त्यामुळेच त्याचा समावेश येथे केला.

या आणि खरे तर एकूणातच इतिहास लेखनाची ही एक मर्यादा असते की, आज हाती असलेल्या माहिती आणि पुराव्यांवरूनच त्याचे लेखन करावे लागते. उद्या त्या माहितीत आणखी भर पडली, काही नवे पुरावे समोर आले, तर आजचे कथन बदलावे लागते, सुधारून घ्यावे लागते. तेव्हा हेच काय ते अंतिम सत्य असे मानण्यात अर्थ नसतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.............................................................................................................................................................

पुस्तकाच्या या मर्यादेची कबुली देतानाच, हेही सांगायला हवे की, परकीय हाताच्या या बखरीतून आजवर आपण मनाशी जपलेल्या अनेक कथा-कहाण्यांना, प्रतिमांना तडे जाण्याची शक्यता आहे. मनोमन त्याचीही तयारी ठेवायला हवी. हे पुस्तक लिहिण्यामागे कोणाचे प्रतिमासंवर्धन करणे वा चारित्र्यहनन करणे हा हेतू नाही. पण तरीही तसे काही होत आहे असे वाटल्यास, त्याचे कारण तत्कालीन घटना-घडामोडींत, त्या व्यक्तींच्या तेव्हाच्या वर्तनात शोधावे लागेल.

जगभरात शांततेची, नैतिकतेची भाषणे देणारे पं. जवाहरलाल नेहरू हे चीनशी मैत्रीचा हात पुढे करीत असताना तिबेटी बंडखोरांना शस्त्रपुरवठा करीत असतात, दलाई लामांना आसरा देत असतात आणि चीन हा आपला संभाव्य शत्रू क्रमांक एक आहे, अशी नोट इंटेलिजन्स ब्युरोला पाठवत असतात.

हे नेहरूंच्या प्रतिमेला जसा तडा देते, त्याच प्रकारे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे ब्रिटिश गुप्तचर यंत्रणांचे सहकार्य घेत असतात आणि काँग्रेस पक्षातील काही ‘अतिरेकी प्रवृत्तीं’वरील पाळत सुरुच ठेवण्यास आयबीला संमती देत असतात, ही गोष्टही पटेलांच्या प्रतिमेशी विसंगत ठरते. पण ही ऐतिहासिक तथ्ये सुटी सुटी पाहण्यात अर्थ नसतो. ती तेव्हाच्या काळाच्या, परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, तेव्हाचे संदर्भ लक्षात घेऊनच पाहायची असतात. अन्यथा त्यातून अर्धसत्ये आणि अपमाहितीची पिलावळ जन्मास येते.

‘परकीय हात : विदेशी हेरसंस्थांच्या भारतातील कारवाया आणि कारस्थाने’ – रवि आमले

मनोविकास प्रकाशन, पुणे | पाने – ४७२ | मूल्य – ५९९ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......