‘रेषांतर’ : रेखाटनांतून किलबिलणारी विद्याधर म्हैसकरांची सुबक आणि बेतशीर अशी रेषाक्षरी कलात्मक लेणी!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
वसंत केशव पाटील
  • ‘रेषांतर’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि त्यातील दोन रेखाटने
  • Fri , 13 October 2023
  • ग्रंथनामा शिफारस रेषांतर Reshantar विद्याधर म्हैसकर Vidyadhar Mhaiskar

विद्याधर म्हैसकर हे अत्यंत प्रतिभाशाली निसर्गप्रेमी ललितलेखक, पक्षी-निरीक्षक, उत्तम रंगरेषाकार, अवघ्या प्राणिमात्रांवर मन:पूत प्रेम करणारे संवेदनशील साहित्यकार. त्यांचे एकूण लेखनही हेवा वाटावा, असेच आहे. ‘एक बुलबुल म्हणाला’ ही त्यांची कादंबरी या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. ‘हंस’, ‘मौज’ यांसारख्या दर्जेदार नियतकालिकांमधून त्यांचे लेखन सातत्याने प्रकाशित होत आले आहे. त्यांनी आपला असा खास वाचकवर्ग निर्माण केला आहे. श्रीनिवास विनायक कुलकर्णी, आनंद अंतरकर यांच्यासारख्या संपादक-लेखकांशी असलेले सख्य आणि सहवास आपणाला प्रेरक आणि लाभदायी ठरल्याचे म्हैसकर आवर्जून सांगतात.

मुळात म्हैसकर हे तसे रंगरेषांचे आणि शब्दांचे अभिजात किमयागार. अतिशय साधी सोपी शब्दकळा, मायमातीचा गंध ल्यालेली रंगांची भाषा आणि शब्दांचे रंग कवेत घेणारा हा अवलिया. मराठी साहित्यात रंगरेषा आणि शब्द ज्यांना सहज वश आहेत, असे लेखक-कवी एकूणच विरळा. त्यांपैकी व्यंकटेश माडगूळकर, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, प्रकाश नारायण संत, वसंत आबाजी डहाके, वासंती मुझुमदार, अनिल डांगे आणि अलीकडचे मधुकर धर्मापुरीकर, शैला सायनाकर, अभिराम अंतरकर इत्यादी काही ठळक नावे. त्यांमध्ये म्हैसकरांचे स्थान विशेष उल्लेखनीय आहे.

‘रेषांतर’ या त्यांच्या नव्या पुस्तकात एकंदर ४५ रेखाटने आणि तितकीच एकपानी शब्दांकने आहेत. अवघे चराचर हे सारे तसे क्षणभंगूर. क्षणाक्षणाला क्षरणारे आणि दृष्टिपार होत जाणारे. परंतु असे काही क्षण समोर ठाकतात की, कलावंताला त्यांची मोहिनी पडते. ती क्षणचित्रे तो असोशीने रेखाटतो. आणि ते क्षण सर्वांगांनी बारीकसारीक तपशिलांसह साजिवंत होऊन जातात.

मग लक्षात येते की, अरे, जीवन हे नित्यनूतन आणि चिरंतन आहे. एका परीने कलावंतांची कलात्मक धनंतरताच! काळानेही थक्क व्हावे अशी. नेहमीच्या जीवनातले साधेसुधे अलक्षित प्रसंग, घटना, वस्तू, वास्तू, पाने-फुलो, प्राणी-पक्षी इत्यादी सगळे रेषांतून साकारते. पण रेषा तशा नि:शब्दच. गूढ मौनात विरघळलेल्या. तरीही त्या रेषा आपल्या डोळ्यांशी बोलतात. अर्थात रेषाचित्रांशी संवाद साधणारे डोळे प्रत्येकाकडे असतीलच असे नाही. असो.

अशा रेखाटनांतून किलबिलणारी म्हैसकरांची ही सुबक आणि बेतशीर अशी रेषाक्षरी कलात्मक लेणी. जाणत्या वाचकांना त्यांची भाषा ऐकू येते आणि तेही क्षणभर थबकतात रेषांच्या शब्दछायेत. आणि मग आपसूकच दर्शक आणि वाचक अशा दोघांपुढेही हलकेच उलगडत जाते एक रेषांगण आणि शब्दांगणही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

म्हैसकरांच्या रेषांची मोठी मौज अशी की, त्या ठळक, ठसठशीत अथवा बोल्ड वगैरे अजिबात नाहीत. त्या आहेत एकदम नाजूक, तुटक, अलवार आणि तशाच सकवार. अगदी हलक्या आबदार हाताने रेखलेल्या. दृश्यादृश्यतेच्या सीमेवर रेंगाळणाऱ्या. त्यामुळे त्यांचे आवाहनसुद्धा तसेच… अगदी अनाग्रही आणि अनाहत. डोळ्यांना इजा होण्याची कसलीच भीती नाही. त्यामध्ये दर्शक-वाचकांच्या अनुनयाचा लवलेशही नाही. पाहा आणि वाचा… जमले तर मनात मुरवा आणि अनुभवा… असा हा आतिथ्यशील मामला. रेषा कशा एकदम साध्या, मन:पूत आणि मनमोदकसुद्धा.

हे झाले रेषांचे रामायण. आता या रेषांना बोलते करणे, हे एक दुसरे आव्हान. तिथेही लेखकाने मिताक्षरी शैलीचा अवलंब केला आहे. नामे-सर्वनामे तेवढी ठळक आणि बाकीची विशेषणे-अव्यये वगैरेंचा बेताचा असा सरंजाम. एकदम नीटनेटका, नेमका आणि आटोपशीर. शब्दांचा अजिबात गलबला नाही. एक-एक शब्द मखरात बसवलेल्या देवावाणी पदसिद्धपणे स्थानबद्ध झालेला.

या पुस्तकातली काही उदाहरणे मोठी लक्षणीय आहेत :

“ती सहज बसली. माझ्या पुढ्यात, पाठमोरी. रुसली नव्हती. रागावली नव्हती. रागवायची कधीच नाही. झेलायची सगळं. स्वभावच तिचा क्षमाशील.” (पान सात)

आता, ही अशी सारी किमया रेषा आणि शब्दांमध्ये अद्वैताचा सेतू सहजच बांधताना दिसते. कोण कोणापेक्षा मोठे असरदार, वजनदार अथवा वफादार वगैरे असला काही कल्लोळ नाही. रेषा आणि शब्द यांच्यामध्ये सहोदरांसारखे सख्य आणि सामरस्य. जे सांगायचे-सुचवायचे ते पानाआडच्या कळीप्रमाणे. अगदी हळुवारपणे.

म्हैसकरांना साधलेली ही विलक्षण कलासिद्धी म्हणावी अशीच आहे. एका ठिकाणी (चित्रातील) ‘ती’ स्वत:शीच पुटपुटल्यागत बोलते, पण ते ऐकू येते आपल्याला :

“खरंच, माझ्यात आणि चित्रात काहीच अंतर नाहीय” (पान सात)

आता, हे दुसरं उदाहरण एका सोप्या रेखाटनाविषयीचे… पाहण्यासारखे आहे -

“पाठमोरी. म्हणून केवळ अंबाडा.

बाकी काही दिसत नसताना

आणि उठावरेषांचा अभाव असताना

ती कशी असेल?

ते मात्र दिसत होतं…

मला उमजलेलं सोपं चित्र हेच” (पान २६-२७)

असा हा एकूण नयनसुखद सोहळा – शब्द आणि रेषांचा.

सहज मनात येते की, हे डोळे असणाऱ्यांसाठी ठीक आहे. त्यांच्या डोळ्यांना ही कारागिरी भावणार, सुखावणार, आता-आत पाझरत जाणार. परंतु ज्यांना डोळे आहेत म्हणजे म्हणायलाच आहेत, त्यांना दिसत नाही. त्यांचे काय?

उगीचच वाटते की, अशी सुंदर पुस्तके ब्रेल लिपीतही जायला हवीत. मराठीतील निवडक ग़ज़लांचे असे एक पुस्तक ब्रेल लिपीत गेले आहे, ते आठवते – ‘स्पर्शांकुर’. (संपादक - डॉ. राम पंडित-भीमराव पांचाळे, प्रकाशन वर्ष २००६)

शेवटी, एक महत्त्वाची गोष्ट अशी की, इतक्या सर्वांगसुंदर पुस्तकाचा ‘स्पाईन’ चक्क कोरा आहे, याचे आश्चर्य वाटते. असो.

विद्याधर म्हैसकरांच्या ‘रेषांतर’ची ही गमभनची निर्मिती खूपच देखणी आहे, यात काही आणि कसलाच वाद नाही.

‘रेषांतर’ – विद्याधर म्हैसकर

गमभन प्रकाशन, पुणे | पाने – ९६ | मूल्य – १७० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......