‘ए स्मॉल फॅमिली बिझनेस’ : आर्थिक भ्रष्टाचाराच्या संदर्भात पूर्णपणे संवेदनाहीन झालेल्या माणसांचं, कुटुंबाचं आणि समाजाचं नाटक
कला-संस्कृती - नाटकबिटक
प्रा. अविनाश कोल्हे
  • ‘ए स्मॉल फॅमिली बिझनेस’ या नाटकातील एक प्रसंग
  • Tue , 26 September 2023
  • कला-संस्कृती नाटकबिटक ए स्मॉल फॅमिली बिझनेस A Small Family Business अ‍ॅलन अ‍ॅकबोर्न Alan Ayckbourna आधार खुराना Adhaar Khurana

काही नाटकं सुरुवातीपासून विनोदी असतात; तर काही कथानक जसं जसं पुढे सरकत जातं, तसं तशी विनोदी होत जातात; तरी काहींचं कथानकच असं असतं की, त्यातून विनोद निर्माण होत जातो आणि बघताबघता प्रेक्षक अंतर्मुख होत जातात. ब्रिटिश नाटककार अ‍ॅलन अ‍ॅकबोर्न (जन्म : १९३९) यांनी लिहिलेलं ‘ए स्मॉल फॅमिली बिझनेस’ हे नाटक शेवटच्या प्रकारात मोडणारं आहे. नुकतेच त्याचे इंग्रजी प्रयोग मुंबर्इत सादर झाले.

आजच्या घडीला अ‍ॅकबोर्न इंग्लंडमधले महत्त्वाचे नाटककार मानले जातात. ‘बेडरूम फार्स’, ‘मॅन ऑफ द मोमेंट’ ही त्यांची गाजलेली नाटकं. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षी पहिलं नाटक लिहिलं. त्यांच्या नावावर तब्बल आठ डझन नाटकं आहेत. त्यांची अनेक भाषांत भाषांतरं झालेली आहेत. १९९७ साली ब्रिटिश सरकारने त्यांना ‘सर’ या किताबानं गौरवलं.

‘ए स्मॉल फॅमिली बिझनेस’ हे १९८७ सालचं नाटक. या काळात इंग्लंडमध्ये पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा प्रचंड दबदबा होता. त्यांनी त्या काळात घेतलेल्या\राबवलेल्या आर्थिक धोरणांना ‘थॅचरीझम’ असं म्हटलं जातं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अ‍ॅकबोर्न यांच्या या नाटकाला आकर्ष खुराना यांनी भारतीय रंग चढवले आहेत. त्याचं दिग्दर्शन आधार खुराना यांनी केलं आहे. आधुनिक शहरी जीवनात ‘आर्थिक भ्रष्टाचार’ (नैतिक भ्रष्टाचार नव्हे) अनेक प्रकारचा असतो आणि अनेक पातळ्यांवर घडत असतो. या मुद्दा या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. कथानक दिल्लीत घडतं. काळ आजचा, कारण नाटकातील पात्रं मोबार्इल फोन वापरतात. मुख्य पात्र सॅमसन सिक्वेरा हा मध्यमवयीन गोवन ख्रिश्चन पुरुष. अतिशय प्रामाणिक. सॅमसनचं लग्न दिल्लीतील एका पंजाबी मुलीशी झालेलं असतं. त्यांना दोन मुली असतात. त्यातील एक विवाहित आणि गरोदर असते, तर दुसरी अविवाहित.

नाटक सुरू होते, सॅमसनचा सासरा ठरवतो की, यापुढे आपल्या कंपनीची जबाबदारी जावई सांभाळेल. मध्यमवयीन सॅमसनला ही जबाबदारी आवडते. पण लवकरच त्याच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू होते आणि बघताबघता त्याची तत्त्वं, भ्रष्टाचार न करण्याची प्रतिज्ञा… सर्वांचीच जीवघेणी परीक्षा सुरू होते.

एके दिवशी सिक्वेरा कुटुंबावर बॉम्ब पडतो. बिंदू पांचाल नावाची एक खाजगी गुप्तहेर सॅमसनला भेटायला येते आणि तुमची धाकटी मुलगी नताशा एका सुपर मार्केटमध्ये चोरी करताना पकडली गेली होती.. त्याचे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे… तुमच्या मुलीने चोरलेल्या वस्तूंची किंमत तीनशे रुपये आहे… ते चुकते केले, तर ही भानगड मिटवता येईल, असे सॅमसनला सांगते.

सरळमार्गी सॅमसन तिला तीनशे रुपये देतो, पण त्यापेक्षा जास्त देण्यास साफ नकार देतो. अशा प्रकारे पैसे देऊन, ब्लॅकमेलला घाबरून सीसीटीव्ही फुटेज विकत घेणं, हे त्याला अनैतिक वाटतं. बिंदूसुद्धा फारसा वाद न घालता तीनशे रुपये घेते. तेव्हाच प्रेक्षकांच्या लक्षात येतं की, यातून आणखीही काही तरी घडणार आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

सरकारी अधिकाऱ्यांची फायलींमधील टिपणं व पत्रं यांतूनच एखाद्या प्रकरणातला भ्रष्टाचार उघडकीस येतो, असं अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलेलं आहे

‘द थ्री पेनी ऑपेरा’ - भांडवलशाही व्यवस्थेतील भ्रष्टाचार उजेडात आणणारं नाटक

‘भ्रष्टाचार’केंद्री मांडणीने घातलेला वैचारिक गोंधळ

लांच्छनास्पद भ्रष्टाचाराची लक्तरं...

..................................................................................................................................................................

सॅमसनला याचा त्रास होतो की, नताशाने तीनशे रुपयांचा शॅम्पू का चोरला असेल. घरात अनेक प्रकारचे शॅम्पू असताना आपल्या मुलीनं चोरी का करावी, हे कोडं त्याला उलगडत नाही. नताशाही ‘चोरला मी शॅम्पू… त्याचा एवढा बाऊ करण्याची काय गरज आहे?… आपल्या घरातले सर्वच तर छोट्या-मोठ्या चोऱ्या करतात,’ असं ती स्वत:च्या चोरीचं समर्थन करते.

त्यामुळे सॅमसन च्रकावतो. नताशा त्याला सांगते, ‘आई तिच्या ऑफिसमधून कित्येक वेळा पेन्सिल, पेन, स्टेपलरच्या पिना चोरून आणते.’ सॅमसनसारख्या सर्वत्र नैतिकतेचा आग्रह धरणाऱ्याला हे मान्य नसते. त्याची पत्नीसुद्धा नताशाप्रमाणेच ‘ऑफिसमधून पेन, पेन्सिल चोरून आणल्या, म्हणजे काही आकाश कोसळलं नाही’ असं समर्थन करते. तसंच स्पष्टीकरण त्याची गरोदर मुलगीसुद्धा देते. तेव्हा सॅमसनला जाणवतं की, त्याच्या कुटुंबातले लोक बिनदिक्क्तपणे आर्थिक भ्रष्टाचार करतात आणि वर त्याचं समर्थनही करतात.

दोन-तीन दिवसांनी बिंदू पांचाल पुन्हा हजर होते. तिला सॅमसनला सांगते की, त्याच्या कंपनीत प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार सुरू आहे आणि तो कोणी तरी ‘आतली’ व्यक्ती करत आहे. याची चौकशी करायला सॅमसन सुरुवातीला तयार नसतो, नंतर मात्र तयार होतो. त्यातून स्पष्ट की, सॅमसनच्या पत्नीचा सख्खा भाऊच हा भ्रष्टाचार करत आहे. तो कंपनीत तयार होत असलेल्या वस्तू लेबल लावण्याच्या आधीच बाहेर काढतो आणि नंतर बाहेर वेगळं लेबल लावून विकतो.

हे समजल्यानंतर सॅमसनला धक्का बसतो. त्याला कुटुंबाच्या नावलौकिकाची काळजी वाटते. म्हणून तो बिंदूला चौकशी थांबवण्याचे आदेश देतो. तोपर्यंत बिंदूकडे भरपूर स्फोटक माहिती गोळा झालेली असते. ती सॅमसनकडे ही माहिती दडवण्यासाठी पंचवीस लाख रुपये मागते. सॅमसन मात्र कसाबसा पाच लाख रुपये द्यायला तयार होतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बिंदू पांचाल पैशांची बॅग घ्यायला त्याच्या घरी येते, तेव्हा तिथं सॅमसनची पत्नी आणि दोन्ही मुली असतात. त्यांना त्या बॅगतल्या पाच लाखांची हाव सुटते. त्यावरून त्यांच्यात आणि बिंदू यांच्यात आधी वादावादी आणि नंतर मारामारी सुरू होते. एका क्षणी नताशाच्या हातून बिंदूच्या डोक्याला जबरदस्त मार बसतो. बिंदू मरते. तेवढ्यात सॅमसन येतो. त्याला परिस्थितीची जाणीव होते.

एका बाजूला सत्य आणि दुसरीकडे स्वत:ची मुलगी आणि कुटुंबाची प्रतिष्ठा… नाटकाच्या सुरुवातीला, चोरी मग ती पाच रुपयांची असो की, पाच लाखांची चोरी चोरीच असते, असं म्हणणारा सॅमसन हरप्रयत्नेकरून मुलीला वाचवण्याचं ठरवतो.

सॅमसनचा हा अध:पात अधोरेखित करत नाटक संपतं. 

हा प्रयोग फार्सिकल असून हसवता हसवता गंभीर आशयाकडे नेतो. काळ ऐंशीच्या दशकातला आहे. तेव्हा भांडवलशाही, त्यातील सर्व पातळ्यांवरचा भ्रष्टाचार वगैरेंची चर्चा सुरू झाली होती. आज २०२३मध्ये समाज आर्थिक भ्रष्टाचाराच्या संदर्भात पूर्णपणे संवेदनाहीन झालेला आहे. त्याला आता नताशासारखंच भ्रष्टाचाराबद्दल काहीही वाटत नाही.

प्रयोग देखणा होतो, याचं श्रेय दिग्दर्शक आधार खुराना या तरुण पण अनुभवी रंगकर्मीला द्यायलायचं हवं. या नाटकात एकंदर १२ पात्रं आहेत. अनेक प्रसंगात रंगमंचावर आठ-दहा पात्रं असतात. त्यांच्या हालचाली बसवणं, हे आव्हानात्मक काम दिग्दर्शकानं लीलया पेललं आहे. सिद्धीमा दुबे यांचं नेपथ्य वाखाणण्याजोगं आहे. त्यांनी एनसीपीएच्या प्रायोगिक रंगभूमीच्या उपलब्ध अवकाशाचा छान वापर करून सिक्वेरा कुटुंबाचं दुमजली घर उभं केलं आहे. डाव्या बाजूला घराचं मागचं दार, तर उजव्या कोपऱ्यात पात्रं बाहेरून रंगमंचावर येतात. पहिल्यांदा जेव्हा बिंदू मागच्या दारातून येते, तेव्हाच आपल्याला वाईटाची चाहूल लागते.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

सरकारी अधिकाऱ्यांची फायलींमधील टिपणं व पत्रं यांतूनच एखाद्या प्रकरणातला भ्रष्टाचार उघडकीस येतो, असं अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलेलं आहे

‘द थ्री पेनी ऑपेरा’ - भांडवलशाही व्यवस्थेतील भ्रष्टाचार उजेडात आणणारं नाटक

‘भ्रष्टाचार’केंद्री मांडणीने घातलेला वैचारिक गोंधळ

लांच्छनास्पद भ्रष्टाचाराची लक्तरं...

..................................................................................................................................................................

या नाटकाची निर्मिती ‘एनसीपीए’नेच केली आहे. नाट्यरसिकांना उत्तमोत्तम नाटकं बघायला मिळावी, या हेतूनं एनसीपीए अलीकडच्या नाट्यनिर्मिती करू लागली आहे. ‘अक्वारीस प्रॉडक्शन्स’ ही नाट्यसंस्था या नाटकामागे आहे.

सर्वच कलावंतांनी यथोचित अभिनय केला आहे. खास उल्लेखनीय म्हणजे विवेक मदन (सॅमसन सिक्वेरा), शिखा तलसानिया (सॅमसनची पत्नी) आणि ताहिरा नाथ (बिंदू पांचाल). त्यांना इतरांनी मस्त साथ दिली आहे. मात्र गुर्लीन जज (प्रकाश योजना)चा उल्लेख करावा लागतो.

वेगळं कथानक तरीही करमणूक करणारं नाटक सादर केल्याबद्दल दिग्दर्शक आधार खुरानाचं खास अभिनंदन.

.................................................................................................................................................................

लेखक प्रा. अविनाश कोल्हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.

nashkohl@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now                               

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......