अरुवार कवी आणि माणूसही...
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • डावीकडे ना. धों. महानोर पत्नीसह एका निवांत क्षणी, उजवीकडे महानोरांची काव्यवाचन करतानाची एक मुद्रा
  • Fri , 04 August 2023
  • संकीर्ण श्रद्धांजली ना. धों. महानोर Na.Dho. Mahanor पु.ल. देशपांडे P.L. Deshpande लता मंगेशकर Lata Mangeshkar लताफळ Lataphal

‘गुंतलेले प्राण ह्या रानात माझे

फाटकी ही झोपडी काळीज माझे’ - ना. धों. महानोर

‘रानकवी’ ना. धों. महानोर यांच्या निधनानंतर समाज आणि मुद्रित माध्यमांत वैपुल्यानं लेखन झालेलं आहे. या बहुतेक लेखनाचा भर त्यांच्या कवितेवर आहे. आमच्या मुग्धा कर्णिकनं महानोरांच्या शब्दकळेचा उल्लेख ‘अरुवार’ या चपखल आणि लोभस शब्दात केला आहे. (फार म्हणजे फारच वर्षांनी हा शब्द अवचित भेटला.) खरं तर, केवळ कवी म्हणूनच नाही, तर माणूस म्हणूनही महानोर पूर्णपणे अरुवारच होते, असा अनुभव आहे.

बरंच मागे जाऊन सांगायचं, तर १९६७-६८चे ते दिवस होते. औरंगाबादच्या पांडुरंग कॉलनीत एका छोट्याशा खोलीत आम्ही राहत होतो. वडिलांचं नुकतंच निधन झालेलं होतं. आमच्यासाठी तो काळ कठीणच नाही, तर विपन्नावस्थेचा होता. त्या काळात वडिलांचे एक दूरचे मावसकाका उत्तम क्षीरसागर आणि प्रभाकर क्षीरसागर यांचा आम्हाला खूपच आधार मिळाला. या दोघांमुळेच मला शिक्षणाची गोडी लागली. सर्वच क्षीरसागर बंधू उच्चशिक्षित होते.

उत्तम क्षीरसागर यांना आम्ही ‘आबा’ म्हणत असू, तर मित्रवर्तुळात त्यांना ‘महाराज’ म्हणत. ते अभिजात साहित्यप्रेमी, वाचक आणि कलासक्त होते. त्यांची उठबस त्या काळात ना.धों. महानोर, भास्कर लक्ष्मण भोळे, चंद्रकांत पाटील, भालचंद्र नेमाडे अशा मंडळींत होती. नेमाडे यांच्या गाजलेल्या ‘कोसला’ या कांदबरीच्या पहिल्या आवृत्तीचं मुखपृष्ठ महाराजांनीच रेखाटलं होतं. महाराजांकडेच मी या सर्वांना बघितलं.

महानोर वगळता ही सर्व मंडळी तेव्हा नुकतीच प्राध्यापकी पेशात स्थिरावत होती, तरुण होती आणि तिशीच्या उंबरठ्यावर म्हणजे माझ्यापेक्षा वयाने १२-१४ वर्षांनं ज्येष्ठ होती. यापैकी भोळे आणि महानोरांशी माझी बऱ्यापैकी गट्टी जमली. पुढे या दोघांचंही अपार ममत्व मला लाभलं. १९७७ साली पत्रकारिता करण्यासाठी मी औरंगाबाद सोडलं आणि १९८१ साली नागपूरला पडाव टाकल्यावर भोळे आणि महानोरांची छत्रछाया माझ्यावर पुन्हा पसरली. तेव्हापासून या दोघांच्याही मी अतिशय नियमित संपर्कात आलो आणि प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या या दोघांतही असलेला माणूस मला सतत दिसत राहिला.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

तेव्हा आम्ही बजाजनगरमधील ‘आनंद मंगल’ या फ्लॅट्समध्ये राहत असे. तिथल्या टेरेसवर मित्रांच्या मैफिलीत काव्य गायनांसाठी महानोर यांना दोन वेळा आमंत्रित केलं. कोणतेही आढेवेढे न घेता ते आले, इतके ते साधे होते, निगर्वी होते. नागपूरची थंडी पण पेटवलेल्या शेकोटीच्या उबेत महानोर रंगले. आधी भोळे गेले आणि आता महानोर…

महानोरांना नंतर अमाप प्रसिद्धी मिळाली; अनेक मोठमोठे सन्मान लाभले. त्यांची भटकंतीही खूप झाली, पण त्यांची पावलं, त्यांचं हृदय मात्र पळसखेडच्या भूमीत जखडूनच राहिलं. कवी, आमदार, कथा आणि ललितलेखक, प्रयोगशील शेतकरी या पलीकडे जाऊन महानोरांना व्यसन होतं, ते पळसखेडची माती, कविता आणि माणसांचं. त्यांचं हे माणूसवेडेपण जात, धर्म आणि प्रदेशाच्या सीमा ओलांडून अफाट विस्तारलेलं होतं. राजकारण, समाजकारण, प्रशासन, साहित्य, कला अशा सर्व क्षेत्रात त्यांचा मुक्त संचार होता. त्यांना हेरलं ते यशवंतराव चव्हाण यांनी आणि मग हा माणूस दोन्ही ओंजळीत घेऊन निगुतीनं सांभाळला तो शरद पवार यांनी.

महानोर तसे काँग्रेस विचाराचे, पण त्यांच्या निष्ठा मात्र पवारांवर होत्या. पवार हाच त्यांचा राजकीय विचार होता. काँग्रेसमधून फुटून पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर दीड-दोन महिन्यांनं मी एकदा पळसखेडला गेलो. गप्पांच्या ओघात महानोरांना विचारलं ‘तुम्ही काँग्रेसवादी की राष्ट्रवादी?’ तेव्हा महानोर म्हणाले, ‘तुला हा प्रश्न पडलाच कसा? मी तर कायम शरद पवारवादीच!’

पवारांप्रमाणेच कविवर्य कुसुमाग्रज, लता मंगेशकर, आशा भोसले आणि पु. ल. देशपांडे हीदेखील महानोरांची आस्थेची माणसं. गप्पा सुरू झाल्या की, या दैवतांविषयी असंख्य हकिकती आणि आठवणी महानोर त्यांच्या खुमासदार शैलीत सांगत असत. ते ऐकताना महानोरांचं हे कथन कधीच संपू नये असं वाटायचं.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

उंच आणि भक्कम बांधा, रापलेला गोरा वर्ण, विस्तृत भालप्रदेश आणि अत्यंत साधी राहणी म्हणजे महानोर. पेहराव कायम पायजामा आणि सदरा, तो बहुसंख्य वेळा धुवट. त्यांना  मी फारच क्वचित पॅन्ट आणि शर्टमध्ये पाहिलं तेही मॉरिशसमध्ये.  

शिवाय आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे महानोर कायम हसतमुख असत. सर्व क्षेत्रांतल्या अति सर्वोच्च पदस्थ लोकांशी घरोब्याचे संबंध असूनही आणि कुणालाही झिडकारून टाकावं किंवा कुणालाही हिडिसफिडिस करावं, हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. महानोर सालस माणूसवेडे होते. अनवाणी पायानं आलेल्यांशी, फाटक्यांशी, कुणाशीही ते अगत्यानं  बोलत.

‘पळसखेडचं तुमचं घर म्हणजे लंगर आहे,’ असं मी त्यांना नेहमी म्हणत असे, कारण त्यांच्या घरी कधीच पाच-दहा माणसांचा स्वयंपाक झाला नाही. त्यांच्या घरचा ताटांचा आकडा ५०-६० क्वचित शंभरच्याही पार जात असे. नवीन कवी आला असेल तर त्यांच्या कविता ऐकाव्या, आल्या गेल्यांना भेटावं, त्यांना शेत दाखवावं, शेतातल्या एकएका झाडाची जन्मकथा सांगावी, गप्पाची मस्त मैफल रंगवावी आणि त्या सर्वांना भरपेट भोजनानंद द्यावा, असं महानोरांना सात्त्विक व्यसन  होतं.

एकदा असेच बसलो असताना भेटायला आलेल्या कुणीतरी विचारलं, ‘ते लताफळ काय आहे?’ महानोर लगेच उत्साहानं जमलेल्या सर्वांना घेऊन एका झाडाकडे घेऊन गेले आणि ते झाड साक्षात लतादीदींनी कसं लावलं आहे, याची आठवण त्यांनी भारावलेल्या स्वरात सांगितली. प्रत्यक्षात ते झाड होतं सीताफळाचं, पण महानोर त्या फळांना सीताफळ कधीच म्हणत नसत, तर ‘लताफळ’ म्हणत. त्यांच्या नजरेतून कायमच स्नेहार्द्रता आणि ते बोलणाऱ्या शब्दातून आपुलकी ओसंडत असे. हे मी इतक्या ठामपणे सांगतो आहे, याचं कारण राज्यातच नाही, तर परदेशातही महानोरांसोबत भरपूर प्रवास केल्यामुळे त्यांचा निकटचा सहवास लाभला आहे.

महानोरांचं बालपण अति गरिबीत गेलं; इतक्या गरिबीत की, खूप इच्छा असूनही ते शिकू शकले नाहीत, मात्र कवितेनं त्यांचं बोट फारच लवकर धरलं आणि त्यांना लिहितं केलं. अक्षरश: ओसाड माळरानावर त्यांनी शेती फुलवली, ती त्यांचे प्रयत्न कल्पकता आणि अफाट श्रम यांचा संगम आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन पळसखेडकरांनी जलसंवर्धनाची मोहीम आणि प्रयोगशीलता राबवून परिसर संपन्न केला. तुटक तुटकपणे हे आणि आणखी बऱ्याच गोष्टी समजत गेल्या. नाही तरी कोणताही माणूस एकाच बैठकीत समजत नाही, तो असाच तुटक तुटक  समजत जातो. 

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

केवळ शेतीच नाही, तर पळसखेड्यात महानोरांनी ज्ञानगंगाही आणली. गावातल्या वर्गखोल्यांना त्यांनी वेगवेगळ्या कवींची नावं दिली; त्या त्यांनी खोल्या उभारण्यासाठी लोकवर्गणी जमा केली. त्याची एक आठवण आहे– बहुधा १९८२ साल असावं. हिवाळी अधिवेशनासाठी महानोर नागपूरला येणार होते. तेव्हा ते विधान परिषदेचे सदस्य होते. महानोरांच्या वर्गखोल्या उभारण्यात नागपूरकरांचंही योगदान असावं, असं डॉ. भोळे आणि मला सुचलं. तेव्हा भोळे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक होते आणि स्वतंत्र प्रज्ञेचा विचारवंत असा त्यांचा लौकिक होता, तर मी ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. मग महानोरांशी बोलून त्यांच्या काव्यगायनाचा एक कार्यक्रम करावा आणि उपस्थितांना मदतीचं आव्हान करून निधी जमा करावा, असं आम्ही ठरवलं.

माहिती खात्याच्या सीताबर्डीवरील सभागृहात हा कार्यक्रम झाला. ‘टीजी’ या नावाने परिचित असणारे काँग्रेसचे लोकप्रिय पुढारी, पत्रकार, लेखक त्र्यं. गो. देशमुख हे  राज्याचे मंत्री होते. त्यांच्याकडे माहिती खात्याचाही कार्यभार होता. त्यामुळे सभागृह नि:शुल्क मिळालं. कार्यक्रमाच्या दिवशी दुपारी सभागृहात टी. जी. देशमुखांची भेट झाली, तेव्हा त्यांनी विचारलं- ‘कार्यक्रम कसा झाला’. मी त्यांना सांगितलं, ‘झाला नाही अजून व्हायचा आहे. आज संध्याकाळी सहा वाजता आहे.’

महानोरांचं काव्यगायन ऐकायला रसिकांनी वेळेआधीच चांगली गर्दी केली. कार्यक्रम सुरू होण्याच्या पाच-सात मिनिटं आधी काव्य गायन ऐकायला टी.जी.ही पोहोचले. भोळेसरांनी प्रास्ताविकात पळसखेडला एक वर्गखोली बांधण्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं. काव्यगायनाचा कार्यक्रम झकास रंगला, यात काही आश्चर्य नव्हतं. मंत्री असूनही टी. जी. देशमुख श्रोत्यांमध्ये खाली संतरंजीवर बसले. एवढंच नाहीतर कार्यक्रम संपल्यावर आमच्यासोबत झोळी धरून उभे राहिले आणि नागपूरकरांच्या योगदानाची सुरुवात शंभराच्या पाच नोटा टाकून केली. (तेव्हा ही रक्कम घसघशीतच होती.) लोकांनीही लक्षणीय प्रतिसाद दिला. ती भरलेली झोळी टी. जीं.च्या हस्तेच आम्ही महानोरांच्या स्वाधीन केली. ‘रान हेच संपूर्ण जगण्याचं भावजीवन असलेला कवी’ अशा शब्दांत टी. जी. यांनी महानोर यांचा गौरव केला होता, हे अजूनही आठवतं.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...

मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?

मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!

.................................................................................................................................................................

मराठी मनाच्या जागतिक नकाशावर पळसखेड हे गाव आणणाऱ्या महानोरांना काही पळसखेडकरांनी बऱ्यापैकी छळलंही. तो छळ असह्य झाला, तेव्हा ती बाब महानोर यांनी तेव्हाचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांना कळवली. तेव्हा मी एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाच्या औरंगाबाद ब्युरो ऑफिसमध्ये कार्यरत होतो. गोपीनाथ मुंडे यांनी फोन करून ते मला सांगितलं आणि पळसखेडला जाऊन चौकशी करून वस्तुस्थिती कळवण्यास सांगितलं. मी पळसखेडला गेलो, अनेकांना भेटलो, जी काय माहिती मिळाली ती मुंडे यांना कळवली. मग मुंडे स्वत: पळसखेडला आले. त्यांनी त्या प्रकरणात सर्वांची समजूत घातली आणि समेट घडवून आणला.

हा एकच प्रसंग जेव्हा, खिन्न महानोर बघायला मिळाले. त्या वेळी झालेल्या सभेत व्यासपीठावर महानोरांनी आग्रहानं मलाही शेजारी बसवून घेतलं होतं, पण तो समेट काही फार टिकला नाही. कोर्टकचेऱ्या झाल्या. महानोरांना त्याचा भरपूर मानसिक त्रास झाला, तरी त्या काळात ते शांत होते. ना त्यांचा तोल सुटला, ना त्यांनी त्रागा व्यक्त केला, ना ते कुणाला अद्वातद्वा बोलले. तणावाच्या त्या काळातही ते अरुवारपणेच वागले.

अखंड गप्पाष्टक हे महानोरांचं आणखी एक व्यसन. त्यांच्या पोतडीत असंख्य हा शब्द थिटा पडावा इतक्या असंख्यांच्या आठवणी, हकिकती आणि किस्से होते. त्यामुळे अनेकदा तर किती सांगू आणि किती नको, अशी महानोरांची अवस्था होत असे. एका कोजागिरी निमित्त नागपूरच्या ‘आधार’ या संस्थेनं महानोरांच्या जाहीर मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी छोटासा सत्कार, स्वागत आणि मग त्यांची जाहीर मुलाखत मी घ्यावी, असं नियोजन होतं.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

‘पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे’ असा तो कार्यक्रम होता. नागपूरला पोहोचायला महानोरांना जरा उशीर झाला आणि ते  थेट कार्यक्रम स्थळीच पोहोचले. त्यामुळे कार्यक्रमाच्या स्वरूपाबद्दल बोलणं झालं नाही. शुभदा फडणवीसचं प्रास्ताविक आटोपल्यावर भोळेसरांच्या हस्ते महानोरांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान हळूच त्यांना जे सात-आठ प्रश्न काढले होते, तो कागद मी दाखवला. जाहीर मुलाखत सुरू झाली आणि माझ्या पहिल्याच प्रश्नाच्या उत्तरात महानोर सलग सव्वातास बोलले. हकिकती, आठवणी आणि काही कवितांचं गायन अशी एक सुरेल लय त्यांच्या कथनाला लाभली होती. श्रोते मंत्रमुग्ध झाले, त्या संध्याकाळचा आसमंत महानोरांच्या त्या सुरेल कथनानं उजळून निघाला. ते बोलायचे थांबले आणि मला म्हणाले, ‘विचार तुझा पुढचा प्रश्न’. 

मी त्यांना म्हणालो- ‘तुम्ही एकाच प्रश्नाच्या उत्तरात माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देऊन टाकली. पु.ल. देशपांडे तुम्हाला ‘धो धो महानोर’ का म्हणत असत, याची प्रचीती आली. आता आणखी काही कविताच सादर करा.’ ‘धो धो महानोर’ला श्रोते आणि महानोरांनीही जोरदार हास्याची दाद दिली. ती दादही त्यांच्या अरुवार स्वभावाला साजेशी होती. अन्य कुणी लेखक, कलावंत असता, तर त्याला नक्कीच राग आला असता.

अशात आमच्या गाठीभेटी कमी झाल्या होत्या. आम्ही दिल्ली सोडून औरंगाबादला स्थायिक झालो, ते कळल्यावर एकदा ते घरी आले. माझ्या बेगमच्या आजारपणाचं कळल्यावरही येऊन गेले. निरोप घेताना दुसऱ्या खोलीत मला नेऊन काही मदत पाहिजे का, असं आस्थेनं विचारलं. या शेवटच्या दोन प्रत्यक्ष भेटी, बाकी अधूनमधून फोनवर बोलणं.

हळूहळू त्यांचीच तब्येत बिघडत गेली. मध्यतंरी त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले, ‘मला जरा प्रवीण बर्दापूरकरांचा नंबर द्या बरं’. काळजात चsssर्र झालं. मग त्यांना मीच बोलत असल्याची आठवण करून दिली. विधिमंडळात त्यांनी केलेल्या भाषणांचं पुस्तक प्रकाशित पाठवण्यासाठी माझा पत्ता त्यांना हवा होता.

सुलोचना वहिनी गेल्यापासून ते खचले होते. नभातल्या चैतन्याचं दान मराठी कवितेला देणारे अरुवार मनाचेही महानोर आता त्याच नभात विलीन झालेले आहेत... 

(‘अरुवार’ म्हणजे कोमल, नाजूक, मृदु, सुंदर, मऊ, हळुवार, सुकुमार – दाते शब्दकोश)

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......