‘द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी’ - हे पुस्तक दमनकारी मनोवृत्तीच्या शासनसत्तेने चालवलेल्या लोकशाही पतनाचा पुरावाजन्य दस्तऐवज वाचकांपुढ्यात ठेवते
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शेखर देशमुख
  • ‘द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी’ या पुस्तकाच्या इंग्रजी व मराठी आवृत्त्यांची मुखपृष्ठे आणि डॉ. कफील खान
  • Thu , 06 April 2023
  • ग्रंथनामा शिफारस उत्तर प्रदेश Uttar Pradesh योगी आदित्यनाथ Yogi Adityanath गोरखपूर Gorakhpur द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी The Gorakhpur Hospital Tragedy डॉ. कफील खान Kafeel Khan

फॅसिस्ट मनोवृत्तीच्या शासनसत्तेला सुखेनैव राज्य करण्यासाठी कायम एका दीर्घकालीन शत्रूची आवश्यकता असते. नव्हे, ही शासनसत्ता धर्मकेंद्रित पुराण, गौरवशाली इतिहास, तथाकथित गतवैभवाचा किंवा परकीय आक्रमकांचा काळ, यातून आपल्याला हवा तो शत्रू जन्माला घालते. या शत्रूबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात घृणा आणि तिरस्काराची भावना कायम पेटती राहील, यासाठी अपप्रचाराची यंत्रणा सतत कार्यरत ठेवली जाते. खऱ्या-खोट्या कहाण्या पसरवून शत्रूवर्गात ढकलल्या गेलेल्या समाजसमूहाला सातत्याने लक्ष्य केले जाते.

या दुष्टचक्रात त्या समाजसमूहातले ओळखी-अनोळखी लोक भरडले जातात. सत्तेच्या बाजूने असलेल्या जनतेला त्यातून आसुरी आनंद मिळतो आणि सत्ताधाऱ्यांना सर्वंकष सत्तेसाठी मार्ग मोकळा होत राहतो. तेव्हा ठरवून सत्ताधाऱ्यांच्या वतीने लोकशाही राज्यव्यवस्था अस्तित्वात असल्याचा आव आणला जातो. या कारस्थानात शासन-प्रशासन, कायद्याच्या रक्षक असलेल्या तपास यंत्रणा आणि न्यायदानाचे ‘पवित्र’ कार्य करणाऱ्या न्यायसंस्थामधले भ्रष्ट मनोवृत्तीचे लोकही राजीखुशी सामील होत जातात, तेव्हा लोकशाही कागदोपत्री शिल्लक असल्याचा अनुभव पीडित समाजसमूहांना येत राहतो.

शोकात्म घटनाक्रमाची पार्श्वभूमी

डॉ. कफील खान हे या पीडित समाजसमूहाचे प्रतिनिधित्व करणारे अलीकडच्या काळात गाजलेले एक नाव. व्यवसायाने बालरोगतज्ज्ञ. कार्यक्षेत्र पूर्वोत्तर उत्तर प्रदेशातले गोरखपूर. गोरखपूर हा उत्तर प्रदेशचे झटपट नि मनमानी पद्धतीने न्याय करणारे ‘बुलडोझरबाबा’ या नावाने त्रिखंडात कीर्ती (खरे तर अपकीर्ती) मिळवलेले विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ. या मतदारसंघातले प्रतिष्ठाप्राप्त, उच्चशिक्षित आणि सधन म्हणता येईल, असे डॉ. खान यांचे घराणे. त्यांचे वडील बड्या पदावर सरकारी अधिकारी राहिलेले. कुटुंबात व्यवसायाचीही परंपरा. त्यात भावांचा शहरात शॉपिंग मॉल वगैरे. डॉ. खान यांची पत्नी दंतचिकित्सक. तिचाही शहरात दवाखाना आणि स्वतः डॉ. कफील हे गोरखपूरच्या बाबा राघवदास (बीआरडी) जिल्हा शासकीय रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक आणि बालरोगतज्ज्ञ म्हणून नियुक्त.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

डॉ. कफील खान यांचे व्यक्तिमत्व मुस्लीम वर्गवारीबाबतच्या सर्वसाधारण समजुतीला साफ फाटा देणारे. नजरेत भरणारी अंगकाठी, देखणा चेहरा, खालच्या ओठाखाली नवतरुण पिढीची ओळख सांगणारी ‘घोटी’ प्रकारातली चिमुकली त्रिकोणी दाढी, कुतूहलाने जगाकडे पाहणारे डोळे आणि चेहऱ्यावर मंदसे हास्य. एकूणच एखाद्या कॉर्पोरेट विश्वातल्या अधिकाऱ्यास शोभणारे व्यक्तिमत्त्व आणि इतरांप्रमाणेच आयुष्यात प्रगतीचे शिखर गाठण्याची महत्त्वाकांक्षा प्रकट करणारी देहबोली.

गोरखपूर शहर आणि आसपासची गावे म्हटली, तर मागासलेपणाच्या ठळक खुणा वागवणारा प्रांत. दरवर्षी पावसाळ्यात लहान मुलांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या ‘जापनिज इनसिफिलाइटिस’ आजारामुळे बाहेरच्या जगात गोरखपूरची ओळख खरे तर बदनामीच झालेली. २०१७ हेदेखील वर्ष त्यास अपवाद नव्हते. त्या वर्षी नेहमीप्रमाणेच प्रमाणाबाहेर पाऊस पडला. पाठोपाठ रोगराई पसरली आणि ‘जापनिज इनसिफालाइटिस’ने गोरखपूर आणि परिसरातल्या, त्यातल्या मुख्यतः गरीब घरांतल्या मुला-मुलींना विळखा घालण्यास सुरुवात केली.

अपेक्षेप्रमाणेच गोरखपूरच्या एकुलत्या एक बीआरडी जिल्हा रुग्णालयात आजारी मुलाबाळांची रीघ सुरू झाली. एकीकडे रुणांची वाढती संख्या आणि प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे ऐनप्रसंगी ऑक्सिजन वायूची निर्माण झालेली कमतरता, यांमुळे एक रात्र काळरात्र होऊन अवतरली. डीनपासून विभागप्रमुखांपर्यंतचे कोणी दाद देत नाही, यास्तव एक सहकारी बेरात्री डॉ. कफील यांना नाजूक परिस्थितीची कल्पना देतो आणि परिस्थितीचे गांभीर्य आणि कर्तव्यभावनेच्या रेट्यातून ते झपाटल्यागत रुग्णालय गाठतात. एकीकडे प्लाण्टमधल्या ऑक्सिजनची खालवत चाललेली पातळी आणि मृत्यूच्या दाढेत जाणारी मुले आणि आक्रोश करणारे त्यांचे आई-बाप, अशी तब्बल दीड-दोन दिवसांची लढाई सुरू राहते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वरिष्ठांपैकी कोणीच दाद देत नाही हे बघून डॉ. कफिल स्वतःच ऑक्सिजन सिलेंडर्सची व्यवस्था करण्यासाठी बाहेर पडतात. प्रसंगी स्वतःच्या पैशांतून जमेल तशी व्यवस्था करतात, परंतु तेही प्रयत्न तोकडे पडतात. एकापाठोपाठ एक ६३ मुले मृत्युमुखी पडत जातात. एकच हल्लकल्लोळ माजतो. राज्याची राजधानी लखनौपासून देशाच्या राजधानी असलेल्या दिल्लीपर्यंत घटनेचे पडसाद उमटतात. मीडियाचे कॅमेरे रोखले जातात. शासन-प्रशासनाच्या पातळीवर सारवासारव दोषारोप आणि रुग्णालयांतर्गत राजकारण, चौकशी समित्या, मुख्यमंत्री, प्रशासकीय सचिवांपासून ते केंद्रातल्या आरोग्य मंत्र्यांपर्यंतच्या नेत्यांचे दौरे असे सारे सुरू होते. यात डॉ. कफील खान हे नेत्यांच्या तोंडी येत असते.

पुन्हा पुन्हा मीडियामध्ये झळकत असते. त्यात ते मुलांना वाचवण्याची धडपड करणारे, परिस्थितीशी झुंजणारे डॉक्टर अशा अर्थाने म्हणून पुढे येत जातात. त्यांची होणारी प्रसिद्धी नजरेत भरत राहते. अर्थात, एका बाजूला जीवतोड प्रयत्न करूनही निष्पाप मुलांना वाचवू न शकल्याने डॉ. कफील हतबल, निराश झालेले असतात आणि दुसरीकडे शासन-प्रशासनाच्या पातळीवर उच्चजातीय, उच्चवर्णीय वरिष्ठांना क्लिनचिट देऊन डॉ. कफील यांनाच प्रकरणात गोवण्याचे कारस्थान रचले जाते. ते पूर्णत्वास नेले जाते.

त्यांच्यावर निष्काळजीपणाचा, इतरांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा ठपका ठेवून अटक वॉरंट जारी केले जाते आणि एका रात्री बेसावध क्षणी अभावग्रस्त समाजासाठी झटू पाहणाऱ्या, लहानग्यांच्या डोळ्यांत उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने पेरण्याची ईर्ष्या बाळगून असलेल्या डॉ. कफील यांना गोरखपूर तुरुंगात डांबले जाते. इथूनच न संपणाऱ्या दुःस्वप्नाची सुरुवात होते.

सत्ताधारी व्यवस्थेचा विद्रुप चेहरा

ते दुःस्वप्न नेमके काय असते, त्यात डॉ. कफील यांच्यावर कोणकोणते प्रसंग गुदरतात, तुरुंगात त्यांना कशा प्रकारचे अनुभव येतात, त्या प्रसंगांना ते कसे तोंड देतात, न्यायाच्या प्रतीक्षेत कसे रात्ररात्र विव्हळतात, कुटुंबियांशी एक शब्द बोलण्यासाठी कसे तगमगतात. शहरात, राज्यात आणि देशभरात झालेल्या बदनामीचा डाग घेऊन कसे वावरतात, कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यांमध्ये कसे हेतूतः अडकवले जातात, त्यांच्या इतर कुटुंबियांवर योगीसरकार कशी दहशत निर्माण करत राहते, सतत धमक्या आणि दबावातून संपूर्ण कुटुंब कसे कोलमडून पडण्याच्या अवस्थेला येते, डॉ. कफील सत्तेच्या पातळीवर होणारा छळवाद सहन करत कसे स्वतःला सावरतात, न्यायालयात स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी किती खस्ता खातात, याचे अंगावर काटे आणणारे कथन ‘द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी : अनेक मृत्यू, एक बळी’ या पुस्तकात आले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

एका टप्प्यानंतर हे कथन फक्त डॉ. कफील खान यांचे कथन उरतच नाही, तर ते धर्मांध सत्तेने लक्ष्य केलेल्या समाज समूहाचे (ही सत्ता ‘पंक्चरपुत्र’ अशी हेटाळणी करीत मुस्लीम समाजातल्या तळागाळातल्या लोकांवर झुंडीने जशी हल्ले करते, तसेच शिक्षित मुस्लिमांना धडा शिकवण्यासाठी लोकशाही व्यवस्थेतल्या संस्थांचा दुरुपयोगही करते.) प्रातिनिधिक कथन होत जाते. राजकारणात सतत वर्चस्व गाजवण्यासाठी हे सत्ताधारी किती क्रूर पद्धतीने, लोकशाही मूल्ये पायदळी तुडवू शकतात, याचे दर्शन या पुस्तकातून होत राहते.

या देशात मुसलमान असणे हा गुन्हा आहे आणि तुम्ही मुसलमान आहात, डॉ. कफील खान यांच्यासारखे शिकले-सवरलेले आहात, महत्त्वाकांक्षी आहात, प्रसिद्धीच्या झोतात आहात, तर तो तुमचा त्याहून मोठा गुन्हा आहे, हे सत्ताधाऱ्यांना जनतेच्या मनावर बिंबवायचे असल्याचेही आपल्याला जाणवत राहते. काही काही प्रसंग तर इतके अंगावर येतात, वाचणारा स्तब्ध होऊन जातो. संवेदना थरारून जातात.

हे श्रेय अर्थातच अनुवादक राजेंद्र साठे यांचे. त्यांनी साध्या, सोप्या नि ओघवत्या शैलीत मूळ इंग्रजी पुस्तकाचा केलेला अनुवाद पहिल्या पानापासून अखेरच्या पानापर्यंत वाचक मनाची पकड घेत जातो. मूळ पुस्तक पॅन मॅकमिलनने (इंग्रजी वर्तुळात या पुस्तकाला समीक्षक आणि वाचकांनी उत्तम प्रकारे दाद दिली. मुंबईत झालेला ‘टाटा लिटरेचर लाइव्ह फेस्टिवल’, बंगळुरुचा ‘लिटरेचर फेस्टिवल’ आदी ठिकाणी पुरस्कारासाठी निवडलेल्या सर्वोत्कृष्ट ग्रंथाच्या अंतिम यादीत या पुस्तकाचा समावेशही झाला.) प्रकाशित केलेले. त्यावरचे कव्हर लक्षवेधी तरीही आकलनास थोडे क्लिष्ट आहे. मात्र अनुवादित पुस्तकाचे, हारीने मांडलेल्या ऑक्सिजन सिलेंडरची पातळी शून्यावर पोहोचल्याचे सांगणारे चंद्रमोहन कुलकर्णी यांचे प्रतीकात्मक चित्र थेटपणे भिडते. पुस्तकाचा आशय-विषय अगदी नेमकेपणाने पोहोचवते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

गोरखपूर बालमृत्यू प्रकरणात बळी ठरलेले डॉ. कफील खान अप्रिय भूतकाळ सोबत घेऊन पुढे निघाले आहेत. त्या अप्रिय भूतकाळामुळे त्यांच्या मनातली समाजाबद्दलची कणव अंशानेही उणावलेली नाही. ट्विटर खात्यावर अभिमानाने ते आपली ओळख ‘हिंदुस्तानी पेडिआट्रिशियन’ अशी सांगत आहेत. ‘हेल्थ फॉर ऑल’ आणि ‘डॉक्टर्स ऑन रोड’ या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रुग्णसेवा पुरवण्यातली त्यांची धडाडी लक्षवेधी ठरते आहे.

इंग्लिशसोबतच हिंदी, मल्याळम आणि आता मराठी भाषेत अनुवाद झालेले त्यांचे हे पुस्तक सार्वजनिक आरोग्य सेवेत असलेल्या एका प्रामाणिक आणि निष्कंलक व्यक्तीच्या झालेल्या छळाची कहाणी मांडत नाहीये, तर दमनकारी मनोवृत्तीच्या शासनसत्तेने चालविलेल्या लोकशाही पतनाचा पुरावाजन्य दस्तऐवजच वाचकांपुढ्यात ठेवते.

(‘मुक्त-संवाद’ या मासिकाच्या एप्रिल २०२३च्या अंकातून साभार)

.................................................................................................................................................................

‘द गोरखपूर हॉस्पिटल ट्रॅजेडी : अनेक मृत्यू, एक बळी’ - डॉ. कफील खान, अनुवाद : राजेंद्र साठे

मनोविकास प्रकाशन, पुणे | मूल्य - ३३० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......