‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाली, तेव्हाचे राहुल आणि दोन महिन्यांचा प्रवास पूर्ण केल्यानंतरचे राहुल यांच्यात फार मोठा फरक आहे…
पडघम - देशकारण
श्याम पाखरे
  • ‘भारत जोडो पदयात्रे’चे एक छायाचित्र
  • Tue , 08 November 2022
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra काँग्रेस Congress

‘भारत जोडो’ यात्रेला साठ दिवस पूर्ण झाले. राहुलने यात्रींसह १५०० किमीपेक्षा अधिक अंतर पार केले आहे. तेलंगणामध्येदेखील यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. यात्रा सुरू झाली, तेव्हाचे राहुल आणि दोन महिन्यांचा प्रवास पूर्ण केल्यानंतरचे राहुल यांच्यात फार मोठा फरक आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये प्रचंड सकारात्मक स्थित्यंतर होत असल्याचे जाणवते. हे स्थित्यंतर त्याच्यासोबतच्या यात्रींमध्येदेखील होत आहे.

दररोज सायंकाळी यात्रा मुक्कामी पोहोचल्यानंतर राहुल स्थानिक सभेला संबोधित करतात. यात्रा सुरू झाली, तेव्हा त्यांचे भाषण ऐकताना वाटायचे की, यांना आपला सूर गवसतो आहे. आता त्यांचे भाषण ऐकताना जाणवते की, ते आता समेवर आले आहेत. परंतु केवळ दोन महिन्यांमध्ये इतके मोठे स्थित्यंतर होऊ शकते का, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर हे स्थित्यंतर केवळ चालल्यामुळे येत नाहीये.

एक म्हणजे ही यात्रा ज्या उदात्त हेतूने सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे तिच्याभोवती एक तेजोवलय निर्माण झाले. त्या तेजामुळे जनसामान्य यात्रेकडे शरीराने आणि मनाने खेचले जात आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

दुसरा मुद्दा म्हणजे राहुलनी या यात्रेसाठी ‘स्व’चे विसर्जन केले आहे. ते जनसामान्यांशी एकरूप झाले आहेत. आणि हेच त्यांच्यात आलेल्या स्थित्यंतराचे गमक आहे. जेव्हा नेता ‘स्व’चे विसर्जन करून जनतेशी एकरूप होतो, तेव्हा त्याला जनसागराकडून शक्ती प्राप्त होते. महात्मा गांधींसारख्या महान नेत्यालादेखील जेव्हा आपला आत्मविश्वास डळमळीत होताना जाणवायचे, तेव्हा ते सरळ जनसामान्यांमध्ये मिसळून आपल्या शक्तीचा पुनर्शोध घेत असत. दांडी यात्रा किंवा सांप्रदायिक दंग्यांच्या पार्श्वभूमीवर नोआखाली आणि बिहारमधील यात्रा, ही गांधींच्या आत्मशक्तीच्या शोधाचीच उदाहरणे आहेत.

इथे हेही नमूद करायला हवे की, अनेक वर्षांनंतर भारतात पुन्हा एकदा राजकीय क्षितिजावर प्रेरित करणाऱ्या नेतृत्वाचा उदय होत आहे. जयप्रकाश नारायणांचे निधन झाल्यानंतर अशा नेतृत्वाची परंपरा खंडित झाली होती. आज ४० वर्षांनंतर राहुलच्या स्वरूपात ती परंपरा पुनरुज्जीवित होताना दिसते. या ४० वर्षांत जनतेला उद्युक्त करणारे अनेक नेते झालेत आणि आहेत. परंतु ‘प्रेरित’ (inspire) करणे आणि ‘उद्युक्त’ (motivate) करणे, यामध्ये फार मोठे अंतर असते. उद्युक्त करणारे नेते बाह्य प्रभाव किंवा शक्तीचा उपयोग करून लोकांना कृती करण्यास प्रवृत्त करतात, तर प्रेरित करणारे नेतृत्व लोकांमध्ये अंतःप्रेरणा निर्माण करून त्यांना कार्यप्रवृत्त करतात. आज राहुलच्या यात्रेसाठी जो जनसागर लोटत आहे, त्यामागे त्यांच्या नेतृत्वामधील प्रेरक शक्ती कारणीभूत आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

मानवी प्रवृत्ती मुळात कशा असतात, याबद्दल दोन मतप्रवाह आहेत. इ.स. पूर्व चौथ्या शतकातील ग्रीक तत्त्वज्ञ अ‍ॅरिस्टॉटलने लिहिले आहे की, मनुष्याला नैतिकता शिकावी लागते, कारण तो एक अनैतिक जीव म्हणून जन्माला येत असतो. थॉमस हॉब्स (१५८८-१६७९)च्या मते मनुष्य मुळात धोकादायक आणि क्रूर असतो. सिगमंड फ्रॉइड लिहितात की, नवजात बालकांची नैतिकतेची पाटी कोरीच असते. याउलट फ्रेंच तत्त्वज्ञ रूसोच्या मते, समाजाने लादलेल्या वर्गव्यवस्थेमुळे असमानता आणि स्वार्थाची विकृती निर्माण झाली नसती, तर मनुष्य नेहमी सभ्य आणि निर्मळ राहिला असता.

मानसशास्त्रज्ञांनीदेखील अलीकडेच प्रयोगांअंती निष्कर्ष काढला आहे की, नवजात बालके ही निसर्गतः निरागस आणि मैत्रीपूर्ण असतात. ती अहिंसक आणि करुणामय असतात. म्हणजेच मानवी अंतःप्रेरणा या मुळातच ‘सत्’ असतात. प्रेरक नेतृत्व या अंतःप्रेरणेलाच साद घालत असते. परंतु उद्युक्त करणारे नेतृत्व दुधारी तलवारीप्रमाणे असते. ते समाजाला योग्य मार्गावर घेऊन जाऊ शकते, परंतु स्वार्थासाठी समाजाला अमानुष कृत्ये करण्यासदेखील भाग पाडू शकते.

यासंदर्भात हिटलर हे आधुनिक काळातील उद्युक्त करणाऱ्या नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे. सुसंस्कृत अशा जर्मन समाजाला त्याने अत्यंत नृशंस कृत्ये करण्यास उद्युक्त केले. त्या वेळी जर्मन समाजमनाचे जे अधःपतन झाले होते, त्याची आठवण काढताच आजदेखील जर्मन नागरिकांना शरमेने मान खाली घालावी लागते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

धार्मिक कट्टरता कमी अधिक प्रमाणात सर्वच धर्मांमध्ये असते. ‘हिंदू विरुद्ध हिंदू’ या पुस्तकात लोहिया हिंदू धर्मातील कट्टरतेबद्दल विधान करतात की, या धर्मात गेली पाच हजार वर्षे उदारवाद आणि कट्टरतेमध्ये संघर्ष चालू आहे आणि त्या संघर्षाचा अंत अजून दृष्टिपथात नाही. गेली काही वर्षे हिंदू समाजातील धर्मांध शक्तींनी हिंदू समाजाच्या मूळ चरित्रामध्ये उलथापालथ करण्याचा अविरत प्रयत्न चालवला आहे. परंतु त्यामुळे हिंदू धर्मातील उदारवादी परंपरा पराभूत झाली नाही.

जर तसे असते तर ‘भारत जोडो’ यात्रेला लोकांचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळालाच नसता. हिंदू धर्मातील या उदारवादी परंपरेचा मान ‘भारत जोडो’ यात्रेने राखला आहे. आज केवळ हिंदू धर्मच नव्हे, तर सकल भारतीय समाजातील उदारवादी विचारधारेचा नायक म्हणून राहुलचा उदय झाला आहे. डावे वगळता इतर राजकीय पक्षांनी वेळोवेळी धर्मांध शक्तींशी केलेली तडजोड कोणाही सजग नागरिकाला सहज लक्षात येण्यासारखी आहे.

या पार्श्वभूमीवर राहुलने गेली आठ वर्षे सातत्याने धर्मांध शक्तींवर हल्ला चढवला आहे, हे विसरता येत नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

विनोबा गीतेवरील एका प्रवचनात म्हणाले होते, “कुरुक्षेत्र बाहेरही आहे व आपल्या मनातही आहे. सूक्ष्म रीतीने पाहिलें तर जो झगडा मनात असतो, तोच बाहेर आपणांस मूर्तीमंत दिसत असतो. बाहेर जो शत्रू उभा आहे, तो माझ्याच मनातील विकार साकार होऊन उभा आहे. आरशात ज्याप्रमाणे माझेच बरें-वाईट प्रतिबिंब दिसेल, त्याप्रमाणे माझ्या मनातील बरे-वाईट विचार बाहेर शत्रुमित्ररूपाने मला दिसतात.”

‘भारत जोडो’ यात्रा भारतीयांना या अंतर्बाह्य कुरुक्षेत्रामध्ये सत्प्रवृतीच्या बाजूने लढण्याची प्रेरणा देत आहे.

आज ‘भारत जोडो’ यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश होणार आहे. अन्यायापुढे कधीही नतमस्तक न होण्याची या मातीची परंपरा आहे. आध्यात्मिक आणि भौतिक शक्तीचा उत्तुंग आविष्कार येथे घडला आहे. या मातीतून चालताना ज्ञानोबांच्या पसायदानातील वैश्विक दृष्टी यात्रेकरूंना लाभो, छत्रपती शिवरायांचा असीम आत्मविश्वास त्यांना मिळो, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी दाखवलेल्या सत्याच्या मार्गावर यात्रेकरूंची पावले पडो आणि न्यायासाठी अविरत लढण्याची प्रेरणा त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून मिळो, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

..................................................................................................................................................................

हेही पाहावाचाअनुभवा -

राहुल गांधींच्या पदयात्रेच्या तरंगांच्या लाटा होतील का? - प्रवीण बर्दापूरकर

‘भारत जोडो’ ही काँग्रेसची आणि एका अर्थाने राहुल गांधींची पदयात्रा आहे आणि या यात्रेचा उद्देश देशाला जोडणं आणि सर्वांनी एकत्र येऊन देश बळकट करणं हा आहे, पण... - विवेक कोरडे

काँग्रेसची सर्वस्तरीय वेगवान घसरण सुरू आहे, ती थांबता थांबत नाही. ‘बुडत्याचा पाय खोलात’ याप्रमाणेच ती स्थिती आहे - विनोद शिरसाठ

काँग्रेस आणि राहुल गांधींचे भवितव्य ठरवणारी पदयात्रा... - प्रवीण बर्दापूरकर

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्राद्वारे जनतेची मनं आपल्या बाजूनं जरी वळवली, तरी त्याचा उपयोग तो काय? - कॉ. भीमराव बनसोड

राहुल गांधी काही महात्मा गांधी नव्हे, परंतु तो महात्म्याच्या पदचिन्हांचा शोध घेत निघाला आहे, हे नक्की! - श्याम पाखरे

राहुल गांधी लबाड नेते नाहीत, ते सरळमार्गी आहेत. त्यांना जे वाटते ते बोलतात. ओठावर एक, पोटात दुसरेच, असे ते बेरकी राजकारणी नाहीत... - शंकर सोलापूरकर

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा