‘कहाणी स्वातंत्र्य संग्रामाची’ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अमृत महोत्सवी वर्षातल्या प्रकाशनसंस्थेचे ‘जय हिंद’!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • ‘कहाणी स्वातंत्र्य संग्रामाची’ या विशेषांकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 15 August 2022
  • ग्रंथनामा शिफारस कहाणी स्वातंत्र्य संग्रामाची Kahani Swatantrya Sangramachi जय हिंद प्रकाशन Jay Hind Prakashan

मराठीतल्या प्रकाशनसंस्थांना तसा मोठा इतिहास आहे. केशव भिकाजी ढवळे या संस्थेनं तर शतकाचाही टप्पा ओलांडला आहे. इतरही काही संस्थांनी ७०-८० वर्षं पूर्ण केली आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे ‘जय हिंद प्रकाशन’. या संस्थेची स्थापना १९४६ साली ग. का. रायकरांनी केली… म्हणजे स्वातंत्र्य मिळालं, त्याच वर्षात. त्यामुळे हे वर्ष जसं स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष आहे, तसंच ‘जय हिंद प्रकाशना’चंही. या प्रकाशनसंस्थेची खरी ओळख ‘धार्मिक’ प्रकाशन म्हणून आहे. परंतु स्वातंत्र्याच्या वर्षात सुरुवात झाल्याने साहजिकच या संस्थेनी आपली सुरुवातीची २५-३० पुस्तकं स्वातंत्र्य चळवळीशी संबंधितच प्रकाशित केली होती. त्यांत ‘काँग्रेस रेडिओ’, ‘सेनापती भोसले’, ‘अच्युत आणि अरुणा’, ‘मी झियाउद्दीन’, ‘झेंडावंदन’, ‘स्वराज्याच्या वाटेवर’, ‘सीमेवरचा गोंधळ’, ‘राष्ट्रीय पोवाडे’, ‘संग्रामगीते’, ‘कॅप्टन लक्ष्मी सहगल’ या पुस्तकांचा समावेश होता. भारताच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेल्या, आपल्या प्राणाची बाजी लावलेल्या, हौताम्य पत्करलेल्यांविषयी पुस्तकरूपाने कृतज्ञता व्यक्त करणारी ‘जय हिंद प्रकाशन’ ही पुस्तकमालिका म्हणूनच महत्त्वाची ठरते.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने जय हिंद प्रकाशनाने ‘काँग्रेस रेडिओ’, ‘सेनापती भोसले’, ‘अच्युत आणि अरुणा’, ‘मी झियाउद्दीन’, ‘झेंडावंदन’ आणि ‘स्वराज्याच्या वाटेवर’ ही सहा पुस्तके नुकतीच पुनर्प्रकाशित केली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीरांची चरित्रे, कहाण्या, पोवाडे, वीरगीते यांचा समावेश असलेल्या या पुस्तकामालिकेची झलक ‘कहाणी स्वातंत्र्य संग्रामाची’ या विशेषांकातून सादर केली आहे.

या विशेषांकात ‘मी झियाउद्दीन’, ‘सेनापती भोसले’, ‘काँग्रेस रेडिओ’, ‘अच्युत आणि अरुणा’, ‘स्वराज्याच्या वाटेवर’, ‘सीमेवरील गोंधळ’, ‘झेंडावंदन’, ‘स्वातंत्र्यानंतरची वीस भाषणे’ आणि ‘नेताजी सुभाषचंद्र बोस पोवाडा’ या लेखांचा समावेश आहे.

‘मी झियाउद्दीन’ हे पुस्तक जय हिंद प्रकाशनाचे ग. का. रायकर यांनी लिहिले आहे. त्याचा संपादित अंश इथं घेतला आहे. ब्रिटिश सरकारची नजर चुकवून झियाउद्दीन यांनी तत्कालीन हिंदुस्थानची सरहद्द ओलांडली. कुठलाही परवाना नसताना, अनेक अडीअडचणींचा सामना करत ते काबूलमार्गे बर्लिनला पोहोचले. तिथे गेल्यावर त्यांनी हिंदुस्थानच्या जनतेला उद्देशून एक भाषण प्रसारित केले. हे झियाउद्दीन म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांच्या या रोमांचक प्रवासाची हकिकत म्हणजे हा लेख.

‘सेनापती भोसले’ हे गुं. फ. आजगांवकर यांचं पुस्तक. जगन्नाथराव भोसले या मराठी माणसाची ही शौर्यगाथा आहे. बालपणी जगप्रसिद्ध क्रिकेटपटू होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगलेल्या भोसले यांनी पुढे मात्र डेहराडून येथे लष्करी शिक्षण घेतले. ब्रिटिशांनी पुढे त्यांना उच्च लष्करी शिक्षणासाठी लंडनला पाठवले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते इंग्रजांच्या लष्करात मोठे अधिकारी झाले. नंतर मात्र ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत दाखले झाले; नेताजींचे आवडते सेनापती झाले. त्यांची ही कथा स्फूर्तिदायी आहे.

स्वातंत्र्याची चळवळ चालू असताना, विशेषत: गांधीजींनी १९४२मध्ये ‘चले जाव’ची घोषणा दिल्यानंतर ब्रिटिशांनी ही चळवळ दडपून टाकायला सुरुवात केली. तेव्हा ‘काँग्रेस रेडिओ’च्या माध्यमातून उषा मेहता यांनी ब्रिटिशांच्या कृष्णकृत्यांची माहिती देण्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली. इंग्रजांच्या सततच्या चौकशीच्या ससेमिऱ्यामुळे हा रेडिओ जेमतेम तीन महिनेच चालला, पण त्या काळातही त्याने मोलाची कामगिरी केली. त्याची माहिती या लेखातून मिळते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘अच्युत आणि अरुणा’ या ग. का. रायकरलिखित पुस्तकात अच्युतराव पटवर्धन आणि अरुणा असफअली या दोन स्वातंत्र्यवीरांची गोष्ट आहे. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत दिलेलं योगदान या संक्षिप्त लेखातून जाणून घेता येतं.

पा. ना. मिसाळ यांची ‘स्वराज्याच्या वाटेवर’ ही नाटिका. मुलांसाठी लिहिलेली ही नाटिका स्वातंत्र्य चळवळ भरात असताना खूपच लोकप्रिय झाली होती. तिचे महाराष्ट्रात शेकडो प्रयोग झाले. या नाटिकेच्या छापील सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या. खासकरून मुलांसाठी ही नाटिका लिहिली असली, तरी ती आबालवृद्धांना आवडेल अशी आहे. तिची ही झलकही पुरेशी ठरते.

दा. वि. फफे यांच्या ‘सीमेवरचा गोंधळ’ या पुस्तकाचे कथारूपांतर सुरेश कोकीळ यांनी केले होते. हे पुस्तक मात्र १९६२ सालच्या भारत-चीन युद्धाबाबतची माहिती देणारे आहे.

‘झेंडावंदन’ हे पुस्तक ग. का. रायकर यांन संकलित-संपादित केलं आहे. यात तिरंगी झेंड्याबाबतची आचारसंहिता दिली आहे. लेखाच्या शेवटी साने गुरुजी, हरिभाऊ भंडारे, मायदेव, श्रीमन्नारायण अग्रवाल, सियारामशरण गुप्ता, बाबू बंकिमचंद्र आणि सेनापती बापट यांची झेंडागीते दिली आहेत.

‘स्वातंत्र्यानंतर वीस भाषणे’ या लेखात १९४७ ते ६७ या काळातील पं. जवाहरलाल नेहरू यांची १६, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांची प्रत्येकी दोन भाषणे संक्षिप्त स्वरूपात दिली आहेत.

आणि शेवटी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन, त्यांचा अतुल्य स्वार्थत्याग, ज्वलंत राष्ट्राभिमान आणि अद्वितीय संघटनाकौशल्य यांविषयीचा वीररसयुक्त पोवाडा वाचायला मिळतो.

या अंकाला ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांची छोटीशी, पण आशयनघन प्रस्तावना आहे. त्यात ते म्हणतात – “शाळकरी विद्यार्थ्यांना त्या स्फूर्तिदायक लढ्याचे आणि त्यात सहभागी झालेल्यांचे स्मरण थोडक्यात करून देणे हे मालिकेचे, अंकाचे उद्दिष्ट आहे.

‘‘ही संपूर्ण चरित्रे नव्हेत वा सविस्तर इतिहास नव्हे. हे सर्व ऐतिहासिक संदर्भ नव्हेत वा त्या संदर्भांची चिकित्सा नव्हे. विद्यार्थी, तरुण, इतकेच नव्हे, तर राजकारणात वा समाजकारणात येऊ इच्छिणाऱ्यांना आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील दीपस्तंभांची ओळख व्हावी, इतकाच मर्यादित हेतू आहे. हा मजकूर वाचून त्या लढ्याचा इतिहास वाचण्याची वा अभ्यासण्याची इच्छा झाली, त्या व्यक्तींची पूर्ण, मोठी चरित्रे वाचावीशी वाटली आणि आपल्या देशाच्या व जगाच्या इतिहासाचे अध्ययन करावेसे वाटले, तरी हेतू सफल संपूर्ण झाला असे म्हणता येईल.

‘‘करुणा आणि कर्मवाद, मानवतावाद आणि आदर्शवाद, अहिंसा आणि सत्याग्रह, त्याग आणि सेवा, समाजभान आणि विविध विचारसरणी, विषमता व जातिनिर्मूलनाचे उद्दिष्ट, गरिबी आणि बकाली दूर करण्याचे ध्येय, निसर्ग आणि पर्यावरणाचे भान, ज्ञान आणि विज्ञानाचा दृष्टीकोन हे सर्व व बरेच काही स्वातंत्र्यलढ्याच्या क्रमात रुजवण्याचा प्रयत्न झाला. त्याच वेळेस श्रमप्रतिष्ठा, वर्गजातविरहित समाजव्यवस्था आणि सेक्युलर व संसदीय लोकशाही ही मूल्येही रुजवली गेली. त्यासाठी ज्यांनी योगदान केले त्यांची ही अल्पचरित्रे.”

मूळ पुस्तकांची मुखपृष्ठे तत्कालीन प्रसिद्ध चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी केली होती. त्या जुन्या चित्रांना नितीन निगडे यांनी नव्याने रंगसंगती देऊन ती या अंकात घेतली आहेत. प्रसिद्ध चित्रकार व्ही. एन. ओके यांनी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांची केलेली अतिसुंदर रेखाचित्रे हेही या अंकाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक लेखात भरपूर चित्रे असल्यामुळे हा अंक देखणा आणि संग्राह्य झाला आहे.

त्याचबरोबर हा संपूर्ण अंक ऑडिओ बुक्सच्या रूपातही ‘स्टोरी स्टेल’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. या ऑडिओ बुक्ससाठी विक्रम गोखले, सुबोध भावे, नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, दिलीप प्रभावळकर या मान्यवर कलावंतांनी लेखांचे वाचन केले आहे.

‘कहाणी स्वातंत्र्य संग्रामाची’ – कार्यकारी संपा. हेमंत रायकर

जयहिंद प्रकाशन, मुंबई

पाने – १४४

मूल्य – २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......