‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’ : अंतर्मुख करायला लावणारं हे पुस्तक आपल्या संग्रही असलं पाहिजे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नितीन हांडे
  • ‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 03 June 2022
  • ग्रंथनामा शिफारस बाजार Bajar नंदा खरे Nanda Khare

ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार हैं

हद-ए-निगाह तक जहाँ गुबार ही गुबार हैं

(ही कोणती जागा आहे मित्रांनो, ही कोणती दुनिया आहे

जिथंपर्यंत नजर जाईल, धुळीचेच लोट दिसत आहेत )

‘उमराव जान’ या चित्रपटामधील गीतात शहरयार यांनी लिहिलेल्या वरील ओळी नंदा खरे यांचं नवं पुस्तक ‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’ वाचून झाल्यावर आठवतात. अर्थशास्त्रावरील एखाद्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी शायरीचा वापर तुम्हाला आश्चर्यजनक वाटला असेल, परंतु पुस्तक वाचून बाजूला ठेवल्यावर मनातून आलेली ही उस्फूर्त प्रतिक्रिया. अर्थशास्त्रात पीएच.डी. केलेल्या अस्मादिकांना अनेक नव्या बाबी, नवे दृष्टीकोन या पुस्तकातून समजले. आपणासी जे ‘भावे’, ते इतरांना सांगावे, या उक्तीप्रमाणे या पुस्तकाचा परिचय करून देण्यावाचून राहवलं नाही.

पिढी दरपिढी जीवनाची मूल्यं बदलत जातात आणि अर्थव्यवस्थेची मूल्यं हरवत जातात. या मूल्यहीन होत चाललेल्या अर्थव्यवहारांवर नंदा खरे सरांनी केलेलं हे मुक्तचिंतन. अतिशय महत्त्वाचा असलेला हा विषय अतिशय सुंदर पुस्तकाच्या स्वरूपात आपल्यासमोर आणला आहे. वाचकांशी गप्पा मारल्याप्रमाणे अतिशय सोप्या भाषेत आणि नेहमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन खरे सर हा अवघड विषय सोपा करून सांगतात. आणि आपण रोज आसपास अनुभवत असलेल्या बाजारव्यवस्थेचे अनपेक्षित पैलू आपल्याला दिसू लागतात.

‘शेतीचा शोध हा मानवाचा आजपर्यंतचा सर्वांत घातक शोध आहे’ अशी खरे सर मांडणी करतात आणि अंतर्मुख व्हायला होतं. मानवानं शेती सुरू करणं हा उत्क्रांतीचे गोडवे गाणाऱ्यांसाठी आजवर गौरवाचा काळ होता. परंतु हे पुस्तक वाचल्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन समजला. शेतीतून मालकी ही संकल्पना जन्माला आली आणि त्यातून पुढं जन्माला आला मोबदला. तोवर मानव हा केवळ अन्नसंकलक होता, नंतर तो अन्नउत्पादक झाला आणि भांडवलशाही जन्माला आली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘सर्व माणसं समान आहेत’ हे तत्त्व भांडवलवाद आणि साम्यवाद या दोन्ही परस्परविरोधी विचारधारा मानतात. मात्र त्या दोन्हींमधील फरक स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांच्या अंगानं पाहिला, तर लक्षात येतो. स्वातंत्र्य हे मूल्य वाढीस घालताना भांडवलवादाचं समतेकडे दुर्लक्ष झालेलं असतं.

वेगवेगळ्या ‘इझम’चं सामर्थ्य आणि मर्यादा खरे सर त्यांच्या नेहमीच्या परखड शैलीत मांडतात. अर्थव्यवस्था ही एक रंगभूमी असून त्याचा नायक असलेला ‘मानव’ हा केंद्रस्थानी असलेलं कथानक लिहिलं जावं, मूठभर तुच्छतावादी संपूर्ण मानवतेचं भविष्य कसं निर्धारित करणार, हा प्रश्न ते उपस्थित करतात.

औद्योगीकरण झालं आणि पैसा वाचवणं हेच मूल्य सर्वात महत्त्वाचं बनलं. हातावर पोट असलेले देशोधडीस लागले, पर्यावरणाचा नाश झाला, मात्र भांडवलशाही आपल्याच मस्तीत होती, अनिर्बंध स्वातंत्र्य असलेल्या तिला कशाचीच पर्वा नव्हती. तिला सोयीचं तत्त्वज्ञानदेखील मांडलं जात होतं. व्यक्ती नेहमी स्वस्त पर्याय निवडतात, असं ॲडम स्मिथ मांडतो. मात्र काही गोष्टींना पर्याय नसतो. अर्थशास्त्र हे रुपये आणि पैसे यांचं शास्त्र नाही, ते माणसांचं शास्त्र आहे. त्यामागे भावना आणि नैतिकमूल्य असलं पाहिजे आणि या मूल्यांना पर्याय नसतो. अशा वेळी ‘समता हे मूल्य स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे’ हे डॉ. आंबेडकरांचं म्हणणं पटतं.

जागतिक मंदीचं विश्लेषण वाचताना लक्षात येतं की, तेजी असो किंवा मंदी, अर्थव्यवस्था ही मूठभर प्रस्थापितांच्या कल्याणासाठी राबत आहे. यज्ञामध्ये हत्ती, घोडे नाही, दुबळ्या बकऱ्याचा बळी जात असतो, याची आठवण होते. गंमत म्हणजे बकऱ्याची आई आणि हत्ती, घोडे या दोन्ही घटकांनी ‘हे असंच होणार’ हे गृहीत धरलेलं असतं. लॉर्ड केन्स यांचं कल्याणकारी अर्थशास्त्र आणि कार्ल मार्क्स यांचा सहसंबंध जाणून घेत असतानाच त्यांचे अनुयायी असलेले रघुराम राजन यांसारखे अर्थतज्ज्ञ सत्ताधाऱ्यांना का डोईजड होतात, याचंदेखील आकलन होतं. 

एकाच उद्योगातील सर्व भांडवलदार एकत्र येऊन कार्टेल तयार करतात आणि आपल्या ग्राहक आणि पुरवठादार यांच्यासोबतच्या किमती निर्धारित करतात. अर्थातच स्वतःच्या फायद्यासाठी. उद्योजक म्हणून कार्यरत असताना आपणदेखील अशा कार्टेलचा भाग कसा झालो होतो, याची कबुली देऊन खरे सर त्यांच्याबाबत घडलेला गमतीशीर अनुभव सांगतात. या पुस्तकामध्ये चुरचुरीत प्रसंग, संवाद, काही वेबसिरीज/सिनेमांमधील संदर्भ, गाणी, दोहे, शायरी यांची रेलचेल असल्यामुळे विषय कुठंच जड होत नाही.

मूल्यहीन होत चाललेल्या अर्थव्यवहारांमुळे श्रीमंत आणि गरीब यातील दरी अधिक तीव्र होत जाऊन त्यात मध्यमवर्गीयांचं ध्रुवीकरण होणार. लुप्त होत जाणारा मध्यमवर्ग जर सशक्त झाला नाही, तर मानवता हे मूल्य धूसर होत जाणार आणि निर्माण होणार अप्रत्यक्ष गुलामगिरी जन्माला घालणारं वेगळं जग, जिथं यंत्रवत जीवन सुरू असेल. जिथं मूठभर श्रीमंत रोबोटच्या दिमतीला असणार आहेत शेकडो, हजारो गरीब रोबोटस… एका वर्गाला मोकळेपणानं जगता येणार नाही आणि एका वर्गाला जगणे म्हणजे काय हे समजलेलं नसणार… अंतर्मुख करायला लावणारं हे पुस्तक आपल्या संग्रही असलं पाहिजे.

‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’ - नंदा खरे

मनोविकास प्रकाशन, पुणे

मूल्य – २५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......