‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’ : अंतर्मुख करायला लावणारं हे पुस्तक आपल्या संग्रही असलं पाहिजे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
नितीन हांडे
  • ‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 03 June 2022
  • ग्रंथनामा शिफारस बाजार Bajar नंदा खरे Nanda Khare

ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार हैं

हद-ए-निगाह तक जहाँ गुबार ही गुबार हैं

(ही कोणती जागा आहे मित्रांनो, ही कोणती दुनिया आहे

जिथंपर्यंत नजर जाईल, धुळीचेच लोट दिसत आहेत )

‘उमराव जान’ या चित्रपटामधील गीतात शहरयार यांनी लिहिलेल्या वरील ओळी नंदा खरे यांचं नवं पुस्तक ‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’ वाचून झाल्यावर आठवतात. अर्थशास्त्रावरील एखाद्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी शायरीचा वापर तुम्हाला आश्चर्यजनक वाटला असेल, परंतु पुस्तक वाचून बाजूला ठेवल्यावर मनातून आलेली ही उस्फूर्त प्रतिक्रिया. अर्थशास्त्रात पीएच.डी. केलेल्या अस्मादिकांना अनेक नव्या बाबी, नवे दृष्टीकोन या पुस्तकातून समजले. आपणासी जे ‘भावे’, ते इतरांना सांगावे, या उक्तीप्रमाणे या पुस्तकाचा परिचय करून देण्यावाचून राहवलं नाही.

पिढी दरपिढी जीवनाची मूल्यं बदलत जातात आणि अर्थव्यवस्थेची मूल्यं हरवत जातात. या मूल्यहीन होत चाललेल्या अर्थव्यवहारांवर नंदा खरे सरांनी केलेलं हे मुक्तचिंतन. अतिशय महत्त्वाचा असलेला हा विषय अतिशय सुंदर पुस्तकाच्या स्वरूपात आपल्यासमोर आणला आहे. वाचकांशी गप्पा मारल्याप्रमाणे अतिशय सोप्या भाषेत आणि नेहमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन खरे सर हा अवघड विषय सोपा करून सांगतात. आणि आपण रोज आसपास अनुभवत असलेल्या बाजारव्यवस्थेचे अनपेक्षित पैलू आपल्याला दिसू लागतात.

‘शेतीचा शोध हा मानवाचा आजपर्यंतचा सर्वांत घातक शोध आहे’ अशी खरे सर मांडणी करतात आणि अंतर्मुख व्हायला होतं. मानवानं शेती सुरू करणं हा उत्क्रांतीचे गोडवे गाणाऱ्यांसाठी आजवर गौरवाचा काळ होता. परंतु हे पुस्तक वाचल्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन समजला. शेतीतून मालकी ही संकल्पना जन्माला आली आणि त्यातून पुढं जन्माला आला मोबदला. तोवर मानव हा केवळ अन्नसंकलक होता, नंतर तो अन्नउत्पादक झाला आणि भांडवलशाही जन्माला आली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘सर्व माणसं समान आहेत’ हे तत्त्व भांडवलवाद आणि साम्यवाद या दोन्ही परस्परविरोधी विचारधारा मानतात. मात्र त्या दोन्हींमधील फरक स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांच्या अंगानं पाहिला, तर लक्षात येतो. स्वातंत्र्य हे मूल्य वाढीस घालताना भांडवलवादाचं समतेकडे दुर्लक्ष झालेलं असतं.

वेगवेगळ्या ‘इझम’चं सामर्थ्य आणि मर्यादा खरे सर त्यांच्या नेहमीच्या परखड शैलीत मांडतात. अर्थव्यवस्था ही एक रंगभूमी असून त्याचा नायक असलेला ‘मानव’ हा केंद्रस्थानी असलेलं कथानक लिहिलं जावं, मूठभर तुच्छतावादी संपूर्ण मानवतेचं भविष्य कसं निर्धारित करणार, हा प्रश्न ते उपस्थित करतात.

औद्योगीकरण झालं आणि पैसा वाचवणं हेच मूल्य सर्वात महत्त्वाचं बनलं. हातावर पोट असलेले देशोधडीस लागले, पर्यावरणाचा नाश झाला, मात्र भांडवलशाही आपल्याच मस्तीत होती, अनिर्बंध स्वातंत्र्य असलेल्या तिला कशाचीच पर्वा नव्हती. तिला सोयीचं तत्त्वज्ञानदेखील मांडलं जात होतं. व्यक्ती नेहमी स्वस्त पर्याय निवडतात, असं ॲडम स्मिथ मांडतो. मात्र काही गोष्टींना पर्याय नसतो. अर्थशास्त्र हे रुपये आणि पैसे यांचं शास्त्र नाही, ते माणसांचं शास्त्र आहे. त्यामागे भावना आणि नैतिकमूल्य असलं पाहिजे आणि या मूल्यांना पर्याय नसतो. अशा वेळी ‘समता हे मूल्य स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे’ हे डॉ. आंबेडकरांचं म्हणणं पटतं.

जागतिक मंदीचं विश्लेषण वाचताना लक्षात येतं की, तेजी असो किंवा मंदी, अर्थव्यवस्था ही मूठभर प्रस्थापितांच्या कल्याणासाठी राबत आहे. यज्ञामध्ये हत्ती, घोडे नाही, दुबळ्या बकऱ्याचा बळी जात असतो, याची आठवण होते. गंमत म्हणजे बकऱ्याची आई आणि हत्ती, घोडे या दोन्ही घटकांनी ‘हे असंच होणार’ हे गृहीत धरलेलं असतं. लॉर्ड केन्स यांचं कल्याणकारी अर्थशास्त्र आणि कार्ल मार्क्स यांचा सहसंबंध जाणून घेत असतानाच त्यांचे अनुयायी असलेले रघुराम राजन यांसारखे अर्थतज्ज्ञ सत्ताधाऱ्यांना का डोईजड होतात, याचंदेखील आकलन होतं. 

एकाच उद्योगातील सर्व भांडवलदार एकत्र येऊन कार्टेल तयार करतात आणि आपल्या ग्राहक आणि पुरवठादार यांच्यासोबतच्या किमती निर्धारित करतात. अर्थातच स्वतःच्या फायद्यासाठी. उद्योजक म्हणून कार्यरत असताना आपणदेखील अशा कार्टेलचा भाग कसा झालो होतो, याची कबुली देऊन खरे सर त्यांच्याबाबत घडलेला गमतीशीर अनुभव सांगतात. या पुस्तकामध्ये चुरचुरीत प्रसंग, संवाद, काही वेबसिरीज/सिनेमांमधील संदर्भ, गाणी, दोहे, शायरी यांची रेलचेल असल्यामुळे विषय कुठंच जड होत नाही.

मूल्यहीन होत चाललेल्या अर्थव्यवहारांमुळे श्रीमंत आणि गरीब यातील दरी अधिक तीव्र होत जाऊन त्यात मध्यमवर्गीयांचं ध्रुवीकरण होणार. लुप्त होत जाणारा मध्यमवर्ग जर सशक्त झाला नाही, तर मानवता हे मूल्य धूसर होत जाणार आणि निर्माण होणार अप्रत्यक्ष गुलामगिरी जन्माला घालणारं वेगळं जग, जिथं यंत्रवत जीवन सुरू असेल. जिथं मूठभर श्रीमंत रोबोटच्या दिमतीला असणार आहेत शेकडो, हजारो गरीब रोबोटस… एका वर्गाला मोकळेपणानं जगता येणार नाही आणि एका वर्गाला जगणे म्हणजे काय हे समजलेलं नसणार… अंतर्मुख करायला लावणारं हे पुस्तक आपल्या संग्रही असलं पाहिजे.

‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’ - नंदा खरे

मनोविकास प्रकाशन, पुणे

मूल्य – २५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......