‘काफ़िराना’ : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर देऊ पाहणारी कादंबरी
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कलीम अजीम
  • ‘काफ़िराना’ या हिंदी कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Mon , 30 May 2022
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो काफ़िराना Kafirana गफ़्फ़ार आतार Gaffar Attar

‘काफ़िराना’ ही हिंदी कादंबरी आजच्या धर्मांध राजकारणाचे प्रतिनिधित्व करते. सांप्रदायिकता, हिंदुत्ववादी राजकीय विचार आणि जातीय संघर्ष हे या कादंबरीचं मध्यवर्ती सूत्र आहे. १९९३ साली झालेल्या मुंबई दंगलीपासून ही कादंबरी सुरू होते आणि २०१४च्या हिंदुत्वप्रणित राजकीय वादळानंतर संपते. तीन दशकांचा सामाजिक, राजकीय आणि सांप्रदायिक पट लेखकाने एकुण १५५ पानांत रेखाटला आहे.

लेखक गफ़्फ़ार अत्तार वयाने तरुण आहेत, त्यामुळे साहजिक त्यांनी समकाल रेखाटताना आपलं अनुभवविश्व व निरीक्षणाची मांडणी एक विचारसूत्र म्हणून कादंबरीमध्ये समायोजित केलेली आढळते. कादंबरीचा नायक हमीद तांबे तरुण असून कोकणी मुस्लीम आहे. त्याचा जन्म मुंबईत झाला.  त्या वेळी बाबरी विध्वंसानंतरची दंगल मुंबईत पेटली होती. नातवाला पाहण्यासाठी जात असताना हिंदुत्ववादी धर्मांध गुंडांच्या जमावाने आजोबाला लक्ष्य केलं, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

‘जन्मताच आजोबाला खाल्लंस’, हा जीवघेणा टोमणा तो सतत ऐकत असतो. खाता-झोपता प्रत्येक वेळी दादी सुलताना बेगम त्याला, ‘माझ्या खाविंदला तूच मारलं’ म्हणत दूषणे देत असते. त्यातून नायक आत्मग्लानीने भरलेला, नैराश्यवादी, हिंसक, उद्दाम युवक होण्याऐवजी नेमस्त व मवाळ होत जातो. अर्थात आसपासची परिस्थितीत तो आपला संयम न ढळू देता शांत राहतो. हेच शांत व संयमी असणं नायकाचं वैशिष्ट्य आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

हमीद तसा सामजिकदृष्या बंडखोर वृत्तीचा नायक आहे. कादंबरीत अनेक प्रसंगी त्याचा विद्रोह पुढे येतो. त्याचे अब्बू डॉ. रशीद व अम्मी डॉ. सलमा रत्नागिरीतील प्रतिष्ठित डॉक्टर आहेत. त्यांना वाटतं की, एकुलत्या एक मुलाने आपला व्यवसाय पुढे नेऊन त्यात नेत्रदीपक प्रगती करावी. परंतु हमीद मात्र आई-वडिलांच्या इच्छेला नुसता लाथाडतच नाही, तर लोककल्याणाची भूमिका घेऊन वेगळा मार्ग स्वीकारतो.

कादंबरी उत्तरोत्तर मराठी मुस्लिमांच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनव्यवहाराची मांडणी करत पुढे सरकते. शिवाय भांडवली, सांप्रदायिक, धर्मांध व हिंदुवादी राजकीय रेट्यात मुसलमानांचे राजकीय व सामाजिक मानस घडवण्याच्या प्रक्रियेचीदेखील दखल घेत राहते. मुस्लीम समुदाय, त्यांची प्रथा, परंपरा, मुस्लीम संस्कृती, अध्यात्म, इस्लाम धर्म, धार्मिक तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, प्रत्यक्ष व्यवहार, पंथीय भेदाभेद इत्यादीची समर्पक चर्चा कादंबरीत ठिकठिकाणी आहे.

नायक यूपीएससीचा स्पर्धक असून विचाराने बराचसा उदारमतवादी आहे. फारसा धार्मिक नसला तरी इस्लामच्या मूल्यनिष्ठांची तो व्यवस्थित जपवणूक करतो. शिवाय आपली धार्मिकता व धर्मविचारांचं प्रदर्शन करणं त्याला आवडत नाही.

राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत त्याचं वैचारिक संगोपन झालं आहे. स्वतंत्र अशी एक विचारसरणी त्याने स्वीकारलेली आहे. भूमिकेत स्पष्टता आहे. मुस्लिमांना समजून घेण्याच्या बाबतीत तो इतरांचा टीकात्मक दृष्टीकोन स्वीकारत नाही. मुस्लीम जगणे त्याला माहीत असल्याने तो प्रत्येक वेळी राजकीय मतांना सामाजिकतेच्या तुलनेत तपासतो. त्यामुळेच त्याची राजकीय व सामाजिक दृष्टी तत्कालीन समाजवाद्यांपेक्षा असंख्य पटीने प्रगल्भ आहे.

भारतीय आणि मुसलमानांचे मराठी आकलन राजकीय व धार्मिकदृष्ट्या न करता सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या करतो. आपल्या मित्रमंडळींनादेखील हेच आकलन पटवून देत असतो. त्याचे अनेक गैरमुस्लीम मित्रांशी सलोख्याचे संबंध आहेत. ते त्याच्या घरी ये-जा करत असतात. त्याची ही दोस्तमंडळी जवळपासच्या हिंदूंना मुसलमानांना समाज म्हणून समजून घेण्याची दृष्टी देतात.

प्रशासकीय सेवेतून मिळालेले अधिकार व बळातून सामान्य जनतेची सेवा होऊ शकते, असा आदर्शवाद तो आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. त्यासाठी वाट्टेल तेवढा संघर्ष करण्याची त्याची तयारी आहे. त्यामुळे तो वडिलांनी केलेल्या एमबीबीएसच्या अ‍ॅडमिशनला लाथाडून आपली कामना पूर्ण करण्याच्या प्रवासाच्या दिशेने मुंबईत दाखल होतो. प्रतिष्ठित संस्थेमधून उच्चशिक्षण घेतो. पुढे दिल्लीला जाऊन स्वतःला स्पर्धा परीक्षांच्या धंदेवाईक बाजारात दाखल करतो.

दिल्लीतील स्पर्धा परीक्षांचं मार्केट असलेल्या मुखर्जी नगर परिसराचं उत्तम रेखाटन लेखक करतात. विविध परीक्षांचे विद्यार्थी, त्यांच्यातील स्पर्धा, खोड, सवय, दैनंदिन चर्चाविश्व, लोकशाहीकडे बघण्याची दृष्टी, खासगीपण, मित्र-मंडळी, टीकात्मक दृष्टिकोन, अवांतर वाचन, राजकीय चर्चा, सामाजिक व वैचारिक जडणघडण इत्यादींचा विस्तृत व वैचारिक परामर्श या कादंबरीतून मांडला आहे.

ज्या वेळी तो दिल्लीत दाखल होतो, त्या वेळी योगायोगाने रामलीला मैदानावर रामदेव बाबाचं आंदोलन सुरू असतं. लेखक तटस्थ राहून या आंदोलनाचं रेखाटन करतात. आंदोलनाचं सूक्ष्म निरीक्षण आपल्या अमोघ भाषेत मांडत जातात. अण्णा हजारे, बाबा रामदेव, अरविंद केजरीवाल, किरण बेदी, इत्यादी आंदोलकांची बलस्थाने आणि व्यक्तिगत दोषांचे मूल्यमापनदेखील लेखक करतो. त्यातील लक्ष्यकेंद्र, प्रचार, मीडियाचा प्रपोगंडा, छुप्या शक्ती, जनसमर्थन, सामील होत असलेल्या तरुणांची मानसिकता, ‘प्रोटेस्ट टुरिझम’ यांचं सूक्ष्म निरीक्षण लेखक मांडतात. वेळप्रसंगी उपहासात्मक शैलीत सामाजिक व राजकीय परिप्रेक्ष्यात टरदेखील उडवतात.

सामाजिक आंदोलनं जिगरी दोस्त मंडळी व हक्काचं प्रेम मिळण्याची महत्त्वाची केंद्रे असतात, असं लेखक अप्रत्यक्षपणे सांगून जातात. इथंच नायकाला आपली प्रेयसी सकिना मिळते. पुढे ही कादंबरी प्रेम व त्यातील आत्मीय नाते खुलवत पुढे सरकते. लग्नासाठी नायक वैचारिकतेशी तडजोड स्वीकारून परिस्थितीला शरण जाण्याची तयारी दर्शवतो. परंतु पुढे काही घटक येतात, ज्यामुळे त्याचं लग्न होऊ शकत नाही.

कादंबरीच्या मधल्या टप्प्यात अनेक नाटकीय प्रसंग नायकाच्या आयुष्यात घडतात. ज्यात मैत्री, वैरभाव, स्वहित, वैचारिक घुसळण, आत्ममंथन, अस्तित्वाचा संघर्ष, अस्मितेचे विषय, सामाजिक हीनता इत्यादी घटक प्रसंगानुसार घडत जातात. शेवटच्या टप्प्यात प्रेम मिळवण्यासाठी नायकाची धडपड लेखक टिपतात. स्वाभाविक या मार्गातील असंख्य अडथळे येतात. सर्वांना पार करून तो उभा राहतो. परंतु समाज व कथित नैतिकतेचं भय, त्यात सांप्रदायिक शक्तींचा शिरकाव... त्यातून नायकाचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होतं.

परंतु नायक निराश, हताश व हतबल न होता आत्ममंथन करतो. स्वत:ला उद्ध्वस्त करून घेण्याचा किंवा आत्महत्यासारखा पर्याय तो स्वीकारत नाही, तर स्वप्नांना पाठबळ देण्याचा निर्धार करतो. यूपीएससी यशस्वीरित्या पास होऊन प्रतिष्ठित अधिकारी होण्यापेक्षा समाजसेवा करण्याचं व्रत स्वीकारतो.

लेखक कादंबरीत टप्याटप्याने आपल्या जवळपासचा समकाल रेखाटत जातात. अर्थातच नायकाचा संघर्ष त्यात अभिप्रेत आहेच. परंपरावाद, ब्राह्मण्यवाद, हिंदुत्व, बजरंग दल, भगव्या गुंडांची बदमाशी, तथाकथित संस्कृतीरक्षकांची दादागिरी इत्यादी घटक वेळोवेळी कादंबरीत नैसर्गिकरीत्या येत राहतात.

नायकाचं स्वप्न आहे की धर्मविरहित समाज निर्माण व्हावा. त्यात जात, पंथ, वर्ण, वंश, धर्माचा दखल व्यक्तिगत व खासगी पातळीवर असावा. किंबहुना त्यापलीकडे सर्वांची ओळख देश, राष्ट्र व केवळ नागरिक म्हणून असावी.

नायकाचं स्वप्न आहे की, जातीय-धर्मीय संघर्षविरहित समाजाची निर्मिती करावी. ज्यात जात-पात, वर्ण नसतील. शिवाय धर्मीय आधारावर भेदाभेदाचे अस्तित्वही असणार नही. हिंदू-मुस्लीम दंगली किंवा अन्य धार्मिक संघर्ष असता कामा नये. शिवाय प्रत्येकांना आपले मानवी हक्कांचं संरक्षण, जतन व संवर्धन करता येईल, अशी सार्वभौमिक भौगोलिक क्षेत्र असावं, या धोरणासाठी हमीद तांबे कार्यतत्पर होतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

यूपीएससीत यश प्राप्त केल्यानंतर नायक प्रशासकीय नोकरी स्वीकारण्याऐवजी जात-धर्मविरहित समाजाची संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याची कार्यप्रणाली अंमलात आणतो. त्या परिसरात धर्म बाजूला ठेवलेला प्रत्येक व्यक्ती केवळ ‘मनुष्य’ म्हणून प्रवेश करू शकतो. ‘सुजलाम-सुफलाम’ असा समाज तो निर्माण करण्यात यशस्वीदेखील होतो. परंतु पुन्हा एकदा धर्मांध-जातीय शक्ती त्यात खोडा घालतात; असा हा ‘काफ़िराना’ या कादंबरीचा एकंदर पट आहे.

गफ़्फ़ार आतार पुण्यातील जीएसटी भवनमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत. व्यवसायाने डॉक्टर असलेले गफ़्फ़ार यूपीएससीचे काही काळ स्पर्धकदेखील होते. त्यामुळे त्या क्षेत्रातील अनेक बारकावे व निरीक्षणे त्यांनी उत्तमरित्या नोंदवली आहेत.

या कादंबरीकडे सद्यस्थितीतील हिंदुत्ववादी राजकीय धर्मांधतेचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून पाहता येऊ शकेल. ही कादंबरी समकालाच्या भीषण वास्तवाशी दोन हात करणारी एक प्रगल्भ कलाकृती आहे. ती केवळ प्रश्न मांडत नाही, तर त्यातून उत्तरे शोधण्याचा स्वतंत्र विचारदेखील वाचकांसमोर ठेवते. शिवाय सकारात्मक ऊर्जा व संघर्ष करण्याची आणि सांप्रदायिक वातावरणाशी तोंड देण्याची जिद्द या कादंबरीत अंतर्भूत आहे.

हिंदीतील मान्यवर प्रकाशन संस्था ‘हिंदी युग्म’ने या कादंबरीचे प्रकाशन केलं आहे. अल्पावधीत ‘ॲमेझॉन’च्या ‘बेस्ट सेलर’ यात तिचा समावेश झाला आहे. सांप्रदायिक वातावरणातून सकारात्मक दिशेनं पाऊल टाकण्याच्या दृष्टीनं ही कादंबरी उत्तम मार्गदर्शक ठरू शकते.

‘काफ़िराना’ : गफ़्फ़ार अत्तार

प्रकाशक : हिंदी युग्म

पाने : १५५

मूल्य : १९९ रुपये

.................................................................................................................................................................

लेखक कलीम अजीम ‘डेक्कन क्वेस्ट’ या द्विभाषिक वेबपोर्टलचे संपादक आहेत.

kalimazim2@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......