‘पिढीजात’ आत्मचरित्रात्मक कादंबरी वाटण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही!
ग्रंथनामा - झलक
श्रीकांत देशमुख
  • ‘पिढीजात’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Wed , 25 May 2022
  • ग्रंथनामा झलक पिढीजात Pidheejat श्रीकांत देशमुख पिढीजात Shrikant Deshmukh साखर कारखाना Sugar Factory शेती Farm शेतकरी Farmer

प्रसिद्ध कवी व लेखक श्रीकांत देशमुख यांची ‘पिढीजात’ ही सहाशेहून अधिक पानांची कादंबरी अलीकडेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला देशमुख यांनी लिहिलेलं हे प्रास्ताविक...

..................................................................................................................................................................

एखादा कवी, लेखक लिहितो, व्यक्त होतो - म्हणजे नेमकं काय होतं? कलावंताची अभिव्यक्ती ही त्याला अंतर्बाह्य उसवून काढणारी असते. आपला भूतकाळ आणि वर्तमान कवेत घेऊन सभोवतालाबद्दल व्यक्त होणं, मला स्वत:ला आवडतं. विशिष्ट पातळीवरील मनाची तरलता नेमकी किती प्रमाणात अभिव्यक्तीच्या पातळीवर उतरते, हा तसा मलाही पडणारा प्रश्न आहे.

‘पिढीजात’ ही माझी पहिलीच कादंबरी. याआधी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी वेगळ्या कादंबरीचा एक खर्डा लिहून ठेवलेला, तो अनेक वर्षांपासून तसाच पडलेला आहे. ‘पिढीजात’ ही त्यानंतर गेल्या काही वर्षांत लिहायला हाती घेतली. कवी म्हणून माझं असणं या कादंबरीचा प्रदीर्घ पट हाताळताना बहुतांशी माझ्यासाठी उपकारकच ठरलं असावं. गद्यलेखनातही कवितेची संप्रक्तता, तरलता, टोकदारपणा टिकणं तसं कठीणच असतं. तशी अपेक्षाही नसते. भोवतालचं गद्यप्राय जगणं आपल्याही जगण्याचा नकळतपणे भाग बनून जातं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

लेखनाच्या पातळीवर स्वत:ला कितीही घुसळून काढलं, तरी त्याचं अभेद्यपण वेगळं नाही करता येत. लेखक, कलावंत म्हणून आपण बरंच काही पाहत असतो. बहुतेकदा कलावंत हा त्याचे विषय निवडत नाही, तर सभोवताल ते विषय निवडण्यास त्याला भाग पाडत असतो. मनाच्या तळाशी जपलेली काही एक मूल्यव्यवस्था असते. तिला धक्का देणारे अनेक घटक आपल्याभोवती असतात. त्याचबरोबर कलावंताचं जगण्याच्या पातळीवरचं व्यावहारिकपण हाही एक महत्त्वाचा घटक असतोच.

माणूस म्हणून जगत असताना या दोन घटकांतील संघर्षाची अटळता नाकारता येत नाही. हीच अवस्था सामाजिक पातळीवरही पाहावयास मिळते. आपला समाज हा अनेकार्थांनी दुविधेत सापडलेला समाज आहे. आजच्या भोवतालाकडे नजर टाकली, तर भय आणि अनिश्चिततेची सावली सगळीकडे दृश्य-अदृश्यपणे फिरताना आपल्याला दिसेल. कलावंताची आणि कलेची स्वायत्तता या पार्श्वभूमीवर निश्चितपणे विशेष महत्त्वाची ठरावी, असा हा कालखंड आहे.

नवनाथ शेळके हा या कादंबरीचा नायक. तो बोलतो, चालतो, कामं करतो आणि बहुतेकदा ऐकतो, पाहतो. त्याच्या जगण्याचा, विचारांचा असा एक परिप्रेक्ष्य आहे, जो त्याच्या मनातल्या भूमीशी जोडला गेला आहे. खेड्यातून अभावात शिक्षण घेऊन तो एका व्यवस्थेचा अपरिहार्य घटक बनला आहे. खरे तर त्याच्यासाठी ती अनिवार्य आपत्तीसारखी व्यवस्था आहे. त्या अर्थाने नवनाथ हा एकटा नाही, तो अनेकार्थांनी प्रातिनिधिक असा ठरावा. त्याचं प्रातिनिधिक असणं हाच त्याच्या संवेदनेचा सर्वोच्च बिंदू मानावा लागेल.

असंख्य पात्रं नवनाथभोवती फिरत आहेत. कितीतरी प्रसंग अंगावर येणारे, सोलून काढणारे, उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारे. त्यातही त्याचं टिकून असणं हे त्याचं मूलत: शेतकरी असण्यातून घडणारं. आपण या व्यवस्थेत ना-लायक आहोत, असंही त्याला खुपदा वाटून जातं. तरीही आलेल्या परिस्थितीला, संकटांना धीटपणाने सामोरं जाणं हा त्याचा स्वभाव आहे.

‘पिढीजात’ ही या अर्थाने कोणाला आत्मचरित्रात्मक कादंबरी वाटण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. व्यापक अर्थानं कोणत्याही कलाकृतीबद्दल असं विधान करता येईल. नवनाथभोवती फिरणाऱ्या पात्रांबद्दलही कोणाला असंच वाटू शकेल. कथा-कादंबऱ्यांतील पात्रांत वास्तवातील पात्रं अकारण शोधण्याची अनेकांची सवय तशी नवी नाही. तसा ताण उगाचच कोणी घेऊ नये, अशी इच्छा. शेवटी पात्रांचं बोट धरूनच लेखक व्यक्त होत असतो. ते होताना वास्तवाचा एक पदर हातात असला, तरी कादंबरीच्या पात्रात कोणाचा चरित्रशोध घेणं गैर ठरावं. समकालाचा शोध त्यात कोणी घेतल्यास अधिकच योग्य.

महात्मा जोतीराव फुले यांचा असा कयास होता की, शूद्र सत्तेवर आले, तर शूद्रांची दु:ख दूर होतील. लोकशाहीकरणाचा एक भाग म्हणून प्रशासकीय, राजकीय सत्तेवर शूद्र येऊनही यात कितपत फरक पडला आहे, याचा शोध घेणं अपरिहार्य ठरावं. वाढत्या शेतकरी आत्महत्या, स्त्री-दलित अत्याचार या साऱ्या बाबी आपल्या भोवताली आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग म्हणून फिरताना दिसतात. शेती आणि शेतीव्यवस्था, त्याला जोडून असणारी प्रशासकीय व्यवस्था, सहकार चळवळ यातली घुसमटही नवनाथला त्रासदायक ठरणारी आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

‘पिढीजात’चे माझे लेखन सलग चार ते पाच वर्षे चालले. एकदा लिहून झाल्यानंतर पुन्हा परकं होऊन आपलीच कलाकृती वाचणं हेही तसं तापदायक काम. माझ्या काही आत्यंतिक जवळच्या मित्रांनीही कादंबरी वाचून अतिशय महत्त्वाच्या सूचना केल्या. लेखक म्हणून मी राजहंस परिवाराचा भाग होणं, ही माझ्यासाठी आनंददायी बाब. कादंबरीचे काही खर्डे गेल्या दोनेक वर्षांत काही दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेले. मुखपृष्ठ साकारणारे चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रं हा नेहमीच माझ्या आस्थेचा आणि प्रेमाचा विषय राहत आलेला आहे. सर्वांचे मन:पूर्वक आभार.

‘पिढीजात’ – श्रीकांत देशमुख

राजहंस प्रकाशन, पुणे

पाने – ६१२

मूल्य – ६०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......