ब्रेन टीझर कादंबरी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
प्रमोद मुनघाटे
  • ‘खेळघर’चं मुखपृष्ठ आणि कादंबरीकार रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
  • Sat , 22 October 2016
  • प्रमोद मुनघाटे रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ खेळघर Pramod Munghate Ravindra Rukmini Pandharinath Khelghar

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या ‘खेळघर’ या कादंबरीची रचना काहीशी रुबिक्स क्यूबसारख्या खेळासारखी आहे. या खेळात वेगवेगळ्या रंगांचे चौकोन असतात. ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात. एकाच रंगाचे चौकोन क्यूबच्या एकाच बाजूला आणले की, खेळ पूर्ण होतो.

‘खेळघर’ या कादंबरीत वेगवेगळ्या माणसांचे चौकोन आहेत. त्या त्या माणसांचा पूर्वेतिहास, त्यांचे स्वभाव, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी वेगवेगळ्या काळांमध्ये वेगवेगळ्या चळवळींमध्ये केलेलं काम वेगवेगळ्या रंगाचं आहे. कादंबरीतील ही विविध रंगांची माणसं एका समान पातळीवर एकत्र आणणं, हे आव्हान लेखकानं स्वीकारलेलं आहे. लेखक त्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाला आहे, असं म्हणता येईल.

या कादंबरीतील माणसांना स्वत:चं वैयक्तिक जीवन आहेच. स्वत:चे रागलोभ-आवडीनिवडीही आहेत, पण तरीही ते स्वतंत्र नाहीत. त्यांनी स्वत:हून कोणत्या तरी तत्त्वज्ञानाला, विचाराला, त्या विचारांच्या चळवळीला बांधून घेतलं आहे. त्या बांधीलकीतून त्यांची झालेली ससेहोलपट हाही या कादंबरीचा एक मुख्य विषय आहे. किंबहुना तोच खरा विषय आहे. या माणसांचं खासगी जीवन, त्यांनी निवडलेल्या चळवळींशी त्यांची तात्त्विक बांधीलकी, त्यातून निर्माण झालेले अनेक प्रश्न हे अर्थातच वेगवेगळ्या रंगांचे आहेत. ही माणसंही एकमेकात गुंतलेली आहेत. या वेगवेगळ्या रंगांचा गुंता सोडवण्यासाठी या कादंबरीत ‘खेळघर’ अस्तित्वात आलं आहे.

खेळाला नियम असतात. खेळ जिंकता येतो आणि हरताही येतं. नियम असतात म्हणून खेळाला गांभीर्य आहे, पण दुसऱ्या बाजूला जिंकायची सक्ती नाही, म्हणून तो खेळ आहे, युद्ध नाही. ‘खेळघर’मधील माणसं जीवनाच्या हेतूगांभीर्यानं खेळघरात एकत्र आलेली आहेत, पण तो अखेर खेळच आहे, याची त्यांना जाणीव आहे. अर्थात ही जाणीव लेखकाचीच आहे. म्हणून तो वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं आणि वेगवेगळ्या चळवळी यांचे चौकोन एकत्र आणण्यासाठी त्यांची अदलाबदल करून ‘खेळघरा’च्या अनेक शक्यता आपल्यासमोर मांडतो.

‘खेळघर’ ही मुक्त स्त्री-पुरुषांच्या सहजीवनाची प्रत्यक्षात अवतरलेली एक प्रयोगशाळा आहे असं म्हणता येईल. सर्व प्रकारच्या कौटुंबिक, सामाजिक व सांस्कृतिक बंधनांनी काचलेल्या ‘स्व’ला एक मुक्तांगण हवं असतं. विवाहसंस्था आणि कृत्रिम अवांछित नातेसंबंधातून स्वत:ची मुक्ती आणि त्याच वेळी जगाला आपल्या विवेकी चळवळीतून बदलवण्याची घाई नसलेल्या समविचारी माणसांची ही छोटीशी वसाहत असते. परिवर्तन हीच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानणाऱ्या या स्त्री-पुरुषांजवळ निखळ प्रेम आणि विवेकनिष्ठ जीवनशैली हेच भांडवल असतं.    

या कादंबरीच्या केंद्रस्थानी मैत्रेयी आहे. ती आपल्या आई-वडिलांपासून दूर गेलेली एक गुणवान व अतिशय मनस्वी स्वभावाची नटी आहे. तिच्या ‘खेळघरा’तील प्रवेशानं कादंबरीला प्रारंभ होतो. कॉम्रेड माधव कऱ्हाडकर हा तिचा बाबा तिला कायमचा सोडून गेलेला असतो. मागच्या पंधरा वर्षांत ती आपल्या बापाला भेटलेली नसते. त्यानं तिला कितीतरी पत्रं पाठवलेली असतात. आता मैत्रेयीसाठी त्याच्या काही डायऱ्या उपलब्ध असतात, ज्यातून तिला माधवच्या खेळघरापर्यंतचा प्रवास उलगडणार असतो.

माधव हा साम्यवादी चळवळीतील सक्रिय विचारवंत कार्यकर्ता असतो. लोकविज्ञान, आरोग्य, स्त्रीमुक्ती, पर्यावरण या चळवळीत माधवनं आपलं उमेदीतलं आयुष्य घालवलेलं असतं. मैत्रेयीच्या आईशी, शशीशी वेगळं होऊन स्त्रग्धरा या आपल्या चळवळीतील मैत्रिणीसह माधवनं ‘खेळघर’ची निर्मिती केली असते. माधवनं आपल्या डायरीत लिहिलेलं असतं, ‘‘नवरा-बायको किंवा अन्य नात्यांमधील पडझड ही एका व्यापक वसाहतीचा भाग आहे. माणूस-समाज, माणूस-निसर्ग ही सर्व नाती आता कोसळू लागली आहेत. स्वार्थ, वखवख, व्यक्तिगत अहंकार यांनी सर्व नात्यांना पोखरलं आहे. ही प्रक्रिया इतकी वैश्विक, सार्वत्रिक आहे की ‘माझ्या घरट्यात मी सुखी राहीन’ अशी अपेक्षा कुणालाच धरता येणार नाही.’’

या पार्श्वभूमीवर माधवनं सातपुड्याच्या डोंगरावर आपल्या पंधरा सहकाऱ्यांसह ‘खेळघर’ या वसाहतीची निर्मिती केलेली असते. मानवी नातेसंबंध (कुजू घातलेल्या कुटुबसंस्थेला पर्याय शोधणं) व पर्यावरण संवर्धन (परस्परपूरक जीवनशैलीचा विकास) या ध्येयानं ‘खेळघर’ ही प्रतिसृष्टी अस्तित्वात आलेली असते. माधवसोबत खेळघरात आलेली माणसं नातेसंबंधाच्या किंवा जोडीदाराच्या व्यावहारिक महत्त्वाकांक्षेच्या हव्यासापोटी खासगी आयुष्यात पोळलेली आहेत. मुक्त जीवन आणि विधायक परिवर्तनाच्या ध्यासानं झपाटलेली आहेत. सेवाग्रामच्या आश्रमात बालपण घालवलेल्या पटवर्धन काकापासून विविध महानगरांतील उच्चशिक्षित व्यावसायिक आहेत. नातेसंबंधांमध्ये निरागसपणे काही प्रयोग करण्याची त्यांची इच्छा आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना व्यक्तिगत जीवनापासून सार्वजनिक जीवनात कसं नेता येईल, याचेही प्रयोग त्यांना करायचे आहेत. सामूहिक जीवनपद्धती व पर्यावरणपूरक जीवनशैली ही त्यांची साधनं आहेत. या प्रयोगात हवसे-नवसे येऊ नयेत यासाठी खेळघरमध्ये राहणाऱ्यांना काही नियम लागू केलेले आहेत. उदा. खेळघरमधील जमीन आणि अन्य सर्व संसाधनांवर सामूहिक मालकी राहील. मुलांचं संगोपन ही सामूहिक जबाबदारी असेल इत्यादी. अशा अटींमुळे केवळ हौस म्हणून आलेले लोक लगेच सोडून जातात.

ही कादंबरी एकाच वेळी रोमँटिक आहे, वास्तववादी आहे, स्वप्नरंजक आहे, सामाजिक आहे आणि तात्त्विक किंवा विचारप्रधान आहे. नेमकं वर्गीकरण करता येत नाही, हेच या कादंबरीचं खरं सामर्थ्य आणि यश आहे.

वस्तुत: कादंबरी म्हणजे जीवनाच्या वास्तव अनुभवावर रचलेलं दुसरं एक स्वतंत्र वास्तव असतं. त्यात लेखकानं कादंबरीच्या कथानकातून आणखी एक प्रतिसृष्टी साकार केली आहे. कादंबरीत वास्तवाचं चित्रण नसतं, तर कादंबरीकार वास्तवाची सर्जक रचना करत असतो, असं म्हणतात. त्याचा प्रत्यय इथं येतो. समकालीन जीवनाचा आवाका पेलण्याची आणि समग्र वास्तव कवेत घेण्याची क्षमता फक्त कादंबरीत कशी असते, तेही या कादंबरीत वेगवेगळ्या रूपात मांडलेल्या नोंदी सिद्ध करतात.

डायऱ्या, पत्रं, वर्तमानपत्रातील बातम्या, अग्रलेख आणि ‘खेळघर’च्या व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून केलेल्या प्रत्येक घटना, प्रसंगांच्या नोंदी हा या कादंबरीच्या एकूणच निवेदनाचा मुख्य भाग आहे. कथानकाचा तो कणाच आहे. खेळघरातील घटना किवा उद्भवलेल्या पेचप्रसंगांबाबतची चर्चा, निर्णय आणि त्यावरील सर्व सदस्यांची मतं यांची नोंद अत्याधुनिक पद्धतीनं ठेवलेली असते. ज्यातून मैत्रेयीला (आणि वाचकांनाही) खेळघराच्या जडणघडणीचा आणि माणसांचा पूर्वेतिहास कळतो.

हा इतिहास जसा खेळघरमधील माणसांचा व त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आहे, तसाच तो साधारणत: १९६० नंतरच्या देशातील आणि महाराष्ट्रातील चळवळींचाही आहे. स्वातंत्र्यानंतर अनेकांचा अपेक्षाभंग या देशात झाला. जात, धर्म, वर्ण व वर्ग या प्रमाणेच भाषा, समूह, समाज, प्रदेश या पातळीवर अनेक प्रकारच्या विषमतांना तोंड द्यावं लागत आहे. लोकशाही-समाजवाद आणि विकास यांचा ताळमेळ जुळत नाहीये. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं तर दूरच राहिली, पण अनेक जातीजमाती, भटके आदिवासी पाणी, निवास, शिक्षण आणि आरोग्यापासून आजही वंचित आहेत. धरणं, कारखाने, औद्योगिक वसाहती यातून देशाचा महासत्तेकडे चाललेला प्रवास एका बाजूला तर दुसरीकडे भांडवलशाहीमुळे विस्थापित आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, बेरोजगार तरुण, प्रदूषित बकाल झोपडपटट्या आणि भग्नावस्थेत असलेली खेडी हे चित्र आहे. अशा विसंगत पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी फुटिरतावादी गट, दहशतवादी, नक्षलवादी व माओवादी उदयास न आले तरच नवल.

या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर विचारांच्या व कृतीच्याच पातळीवर नव्हे, तर अस्तित्वाच्या पातळीवर उजवे आणि डावे अशी दुफळी निर्माण झालेली दिसते. साम्राज्यवादी, भांडवलवादी, मूलतत्त्ववादी एकीकडे आणि समाजवादी, साम्यवादी व उदारमतवादी लोकशाही दुसरीकडे. काहींना परिवर्तन हवं आहे, तर काहींना ते नको आहे. परिवर्तनासाठी प्रयोगशाळा आणि गृहितकं हवी आहेत. भारतात आणि महाराष्ट्राच्या प्रयोगशाळांमध्ये ही गृहितकं जशी मार्क्स-लेनिन यांनी पुरवली, तशी कधी महात्मा गांधी, विनोबा, जयप्रकाश नारायण यांनीही पुरवली. त्यातून स्त्रिया, भटके, दलित व अदिवासी यांच्या शोषणाविरोधात वेगवेगळ्या पातळींवर काम करणाऱ्या चळवळी निर्माण झाल्या. लेखक, पत्रकार व डॉक्टर, इंजिनिअर्स प्राध्यापकांपासून तर विद्यार्थ्यांनी केलेल्या चळवळी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा एक भाग झाल्या होत्या. चळवळींच्या उद्दिष्टांबरोबरच चळवळींच्या कार्यप्रणालीचा प्रभाव कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक जीवनावरही झाला. त्यातून उदभवलेले ताणतणाव हेही स्त्री-पुरुषसंबंधाच्या व नातेसंबंधाच्या परंपरांना आव्हान देणारे ठरले.

१९९० नंतरचं खाउजा आणि बाबरी मशीदचं प्रकरण, त्यानंतरच्या धार्मिक दंगली व बॉम्बस्फोट यामुळे मूळ प्रश्न आहे तिथंच राहिले. राजकारणाला नवी पार्श्वभूमी मिळाली. त्यातून पुढे आलेल्या नव्या समस्या जुन्या चळवळींपुढे आव्हान म्हणून उभ्या राहिल्या.  हे सगळं ‘खेळघर’मध्ये वेगवेगळ्या रूपात येतं. कधी डायरीमध्ये, कधी बातम्यांमध्ये, पण ते पात्रांच्या आयुष्याशी एकजीव होऊनच येतं. चळवळीतील मतभेद, भ्रमनिरास किंवा राजकारणाला बळी पडलेली माणसं आहेत ती. काळाच्या आव्हानांमुळे चळवळीतील कार्यकर्त्यांचाही अपेक्षाभंग होतो. त्यात दोष कुणाचाच नसतो. विशेषत: मार्क्सवाद आणि साम्यवादाचं तत्त्वज्ञान व स्थानिक प्रश्न यात विसंवाद निर्माण होणं, हे एक महत्त्वाचं कारण. देशातील धार्मिक दंगली, बेरोजगारी, स्थानिक उद्योग व स्थानिक सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण, जातिसंस्था व स्त्री-पुरुष संबंध यांचा मेळ क्रांतीच्या पारंपरिक तत्त्वज्ञानाशी होत नाही. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेले कार्यकर्ते व्यक्तिगत आयुष्यातही निराधार झाल्याचा अनुभव घेत असतात.

 ‘खेळघर’च्या आश्रयाला आलेली माणसं किंवा नवा जोडीदार घेऊन आलेली जोडपी बहुधा अशीच आहेत. ‘खेळघर’मध्ये कोणत्याच पारंपरिक तत्त्वज्ञानाची चौकट नाही. नातेसंबंधाचा पारंपरिक ताण नाही. पुरुषप्रधानता किंवा योनिशुचिता यांचा काच नाही. पण पर्यावरणस्नेही नैतिक मूल्यांचं अधिष्ठान आहे. अशा खेळघराच्या आश्रयाला सगळे येतात असं नव्हे, तर ते त्या रूपात आपल्या नव्या जगाची उभारणी करतात. ती फँटसी मुळीच नाही. उदात्त जीवनमूल्यांच्या प्रेरणेनं शक्यतेच्याच कोटीतील वास्तवाची केलेली सर्जनशील निर्मिती आहे.

खेळघर -  रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, मनोविकास प्रकाशन, पुणे, पाने – २८६, मूल्य – २९० रुपये.

 

लेखक नागपूर विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

pramodmunghate304@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......