असं वाटतं की, व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर बायडेन व पुतिनला टॅग करता येतं का, ते बघावं! म्हणजे उद्यापर्यंत तेच जाहीर करतील- ‘युद्ध थांबवतो, पण फॉरवर्ड मेसेजेस नको!!...’
संकीर्ण - व्यंगनामा
सलील जोशी
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन
  • Tue , 01 March 2022
  • संकीर्ण व्यंगनामा जो बायडेन Joe Biden अमेरिका America व्लादिमीर पुतिन Vladimir Putin रशिया Russia सोव्हिएत रशिया Soviet Union युक्रेन Ukraine नाटो NATO व्हॉटसअ‍ॅप विद्यापीठ Whatsapp University

परवा युक्रेन-रशिया युद्ध सुरू झाले. काल सकाळपर्यंत त्याचे लोण व्हॉटसअ‍ॅपर्यंत वेगाने पसरले. सकाळी उठल्यावर २५-३० मेसेजेस बघितले नि छातीत धस्स झालं! कोणाचा वाढदिवस तर विसरलो नाही ना, आपण? का अ‍ॅनिव्हर्सरी? पण तसे काही नव्हते. युद्ध सुरू झाले आहे आणि कोणाचे बलाबल किती, याचीच बित्तंबातमी सगळ्या मेसेजेसमध्ये होती. अमेरिकेत राहत असल्याकारणाने बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होता की, आम्हास या हल्ल्याची खडानखडा माहिती असणार! युद्ध अमेरिकी वेळेप्रमाणे रात्री सुरू झाले असल्याने अस्मादिकांस त्याचा पत्ता अगदी सूर्य वर आल्यावरच झाला! तरी बरं, आम्ही अंथरुणातूनच हात पसरून फोन घेऊन पहिल्यांदा व्हॉटसअ‍ॅप वाचायची चांगली सवय लावून घेतली आहे! त्यामुळे होते काय की, दिवसाची सुरुवातच ‘ज्ञाना’त भर पडण्याने होते!! 

युद्धाच्या पहिल्या दिवशी ‘व्हॉटसअ‍ॅप विद्यापीठा’त विनोदाचा तास होता! नाही म्हणायला अगदी दोन दिवसांआधीपर्यंत बायडन यांना ‘म्हातारचळ’ लागला आहे, असे दावे करणारे जरा नरमले होते. पहिल्या दिवसाच्या विश्लेषणास एकच फ्लेवर होता. तो म्हणजे ऐन वेळी धुलाईच्या वेळेस गायब होणाऱ्या मित्राची तुलना NATO म्हणजेच पर्यायाने अमेरिकेशी केलेली होती! 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

‘अहो, पण NATOने युक्रेनला त्यांचाच गल्लीत संरक्षण देऊ, अशी कुठली हमी दिल्याचं कुठेच वाचनात आलं नाही. मुळात युक्रेन NATOचा भागच नाही’, हे म्हणे-म्हणेपर्यंत, हाच विनोद हिंदीतूनसुद्धा आला. वर ‘काय बे तुमची अमेरिका?’ हा एक प्रतिप्रश्न - स्मायली सकट!

दुसऱ्या दिवशी मात्र मेसेजेसना ‘युद्धस्य कथा रम्या’चे रूप येऊ लागले. हल्ली एक बरं झालंय, ओळखीच्या काही लोकांकडून एकाच छापाचे संदेश यायला लागले की, लगेच कळतं - ‘बोलविते धनी’ कामास लागले आहेत! नाहीतर एकच मेसेज त्यातील व्याकरणाच्या चुकांसकट सगळ्यांनाच कसा सुचू शकेल? कथा रम्या’स आपल्या नागरिकांच्या सुटकेची व्यवस्था, ज्याचा यथोचित आनंद असायलाच हवा, त्याची क्षणचित्रे येत होती. एक तर एवढी आपली पोरं तिथे शिकत आहेत, त्यांना सुखरूप परत आणणे, हे कर्तव्य जरी असले तरी, ते काम सुरळीत पार पडतंय, ही अभिमानाचीही बाब आहेच! नाही म्हणायला गेल्या दोन वर्षांतील अनुभवामुळे ही प्रोसेस नीट लागली आहे. म्हणजे नागरिक विमानात बसले रे बसले की, त्यांच्या व्हिडिओ क्लिप्स, फोटोज सगळं कसं जगाच्या कानाकोपऱ्यात जातं!!

तिसऱ्या दिवशीच्या मेसेजेसना मात्र अचानक ‘आपणच भारी’ अशी काहीशी चव यायला लागली. सगळ्यातील राष्ट्रवादाची उबळ एकदम येण्याचे काय कारण असावे, हे मात्र कळेनासे झाले! म्हणजे तसा आपला या युद्धाशी काय डायरेक्ट संबंध? आपलाच कशाला, कोणाचाच त्याचाशी काय संबंध सध्या तरी? 

बरं, दहा वर्षांत एक पिढी तयार होते म्हटलं तरी, गेल्या दोन-चार पिढ्यांनी युद्ध असं बघितलेलं नाही! अर्थात, अमेरिकी परराष्ट्रीय धोरण इतकं ‘मजबूत’ आहे, ही दशकांत एक-दोन वेळा तशी युद्धं टीव्हीवर बघण्याची सोय ते करून देतात! पण अशा ‘बेगान्या’ युद्धात कोण स्वतःला गुंतवून घेईल - व्हॉटसअ‍ॅपवरच का होईना. नक्कीच काही तरी घडलं असणार!! म्हणजे तशी जुजबी माहिती होती की, पंतप्रधानांचे बोलणे झाले आहे, खासदार स्वप्न-सुंदरीनेसुद्धा त्यांना प्रेमळ साकडे घातले आहे वगैरे वगैरे. पण म्हणून एवढा राष्ट्राभिमान का उफाळून यावा? 

‘युरेका!!’ थोड्या बातम्या चाळल्यावर खरी गंमत कळली. संयुक्त राष्ट्रसंघात निषेधाच्या ठरावाच्या विरोधात आपण मतदान केले आहे, हे वाचनात आले. आता जर का, या घटनेच्या विरोधात उद्या कोणी ‘व्हॉटसअ‍ॅपरूपी मिसाईल’ टाकलेच, तर त्याची पूर्वतयारी म्हणून हे मेसेजेस होते तर!! कारण निर्णय घेतला आहे, त्यावर चर्चा तर होणारच. त्यास खीळ म्हणून आधीच व्हॉटसअ‍ॅपची मखलाखी सुरू झाली होती! 

मग, १९७१चे युद्ध, त्यात बांगलादेशात उभी एक महासेना, दुसऱ्या महासेनेच्या पाणबुडीने त्यास केलेला भोज्जा व अचंबित होऊन परत गेलेली पहिली महासेना - यांची रसभरीत वर्णनं कुठलाही संदर्भ न देता यायला लागली. आम्ही बावळटासारखे विचारते झालो की, ‘काय रे मग देऊ या इंदिराबाईंना क्रेडिट?’ उत्तर ‘नाही’! बहुदा रात्र झाली असावी तिकडे!!

‘भारताने ‘याही’ वेळेस दोन्ही महासत्तेस कसे झुलवत ठेवले आहे, ते बघा’… कोणे एके बुद्रुक गावातून एक झरा पाझरला. आमच्या confusionचा महापूर आटेना. ‘काय रे, मग त्या नेहरूंनी काय वेगेळे केले होते NAM काढून?’ गेल्या ७० वर्षांपासून आपण हेच करत आलोय, पण विचारायची सोय नव्हती! विचारण्याची वेळच निघून गेली आहे मुळी! ‘तुमच्या आर्थिक निर्बंधांचा काय उपयोग नाही’, त्याच गावाच्या खुर्द भागातून एक विचार समोर येऊन पडला. यांनी नुकतेच तांबड्या रस्स्याची ऑर्डर उशिरा आणल्याबद्दल ‘झोमॅटो’वर आर्थिक निर्बंध टाकले आहेत.  NATOच्या आर्थिक निर्बंधांचे परिणाम याच वेगाने व्हायला यांना हवे आहेत. 

‘बाबांनो, तुमचे अमेरिकी परराष्ट्रीय धोरणाबाबतचे सगळे मुद्दे खरे आहेत. पण आपण असे कुंपणावर उभे राहण्याचे कारण आपल्याकडे अजून तरी नसलेल्या ‘निर्भर’तेत आहे. गल्लीतल्या दोन दादांच्या भांडणात एकाची बाजू न घेणं यातच शहाणपणा आहे, आणि एकाची बाजू घेणे, हे आपल्याला परवडणारं नाही. कारण त्यातल्या एका दादाने आपल्याला गॅसचं कनेक्शन मिळवून दिलंय, तर दुसरा केबल देतोय.’

यात बिचाऱ्या युक्रेनची मात्र वाट लागली आहे. दोन दादांच्या एरियात हा मध्ये फसला आहे. किती दिवस याने असं ‘NO Man's Land’ बनून राहावं? झाली आपली त्याची इच्छा एकाच भागात जायची! अगदी गेल्या आठवड्यापर्यंत असा हल्ला होणार नाही, याची त्यांना खात्री होती. आता मात्र वय वर्षं १८ ते ६०चे सगळे बाप्पे बंदुका घेऊन लढायला तयार आहेत. NATOत नसल्या कारणानं कुठलीही महासत्ता मदतीस येऊ शकणार नाही, याची खात्री असूनसुद्धा. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हे युद्ध महायुद्धसुद्धा होऊ शकेल. कारण NATOच्या जन्मावेळी दुसऱ्या महायुद्धाअखेरीच्या करारातील कलम पाचनुसार एका देशावर हल्ला, तो NATOवर, म्हणजे पर्यायाने अमेरिकेवर हल्ला ठरू शकतो. हा हल्ला नुसता जमीन, आकाश व समुद्रातूनच न होता, सायबर म्हणजे इंटरनेट वरून जरी झाला तरी तो हल्लाच ठरू शकतो! म्हणजे युक्रेन शेजारी असलेल्या पोलंड देशातील एखादी बँक सायबर हल्ल्याने बंद पडणे, एवढे कारण या युद्धाला ‘जागतिक’ करण्यास पुरेसे ठरू शकेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

पण असो, कोणाचे काय तर कोणाचं काय? आपण काय निरपेक्ष मनाने मेसेजेस वाचावेत! प्रबोधनाची ग्यारंटी पक्की!! आता उद्या कुठल्या कुठल्या विषयावर प्रबोधन होईल, याचा घोर लागून राहिला आहे.  

हो, वैऱ्याची रात्र सगळीचकडे आहे... 

वाटतं, या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर बायडेन व पुतिनला टॅग करता येतं का, ते बघावं! म्हणजे उद्यापर्यंत तेच जाहीर करतील- ‘युद्ध थांबवतो, पण फॉरवर्ड मेसेजेस नको!!...’

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा

ही लढाई डेव्हिड आणि गोलियथची आहे. रशिया नावाच्या महाकाय गोलियथपुढे युक्रेन नावाचा डेव्हिड हार मानायला तयार नाही!

आज युक्रेनची गत ‘रामायणा’तल्या विभीषणासारखी झालीय. रशिया आणि नाटो देश त्याला ‘बिभीषण’सारखा घरभेदी मानायला लागले आहेत

रशिया-युक्रेन संघर्ष : अमेरिका, युरोपियन राष्ट्र, नाटो, चीन आणि भारत

.................................................................................................................................................................

लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.

salilsudhirjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......