‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ : आपण कोणत्या काळात जगत आहोत, याचा अंदाज न बांधता यावा, इतका माणूस भ्रमिष्ट झाला आहे. त्या शोकगीताचं निरूपण म्हणजे हा कवितासंग्रह!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अजय कांडर
  • ‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Wed , 26 January 2022
  • ग्रंथनामा शिफारस मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो Mee Deshacha Saatbara Lihin Mhanto रमेश सावंत Ramesh Sawant

कवी रमेश सावंत यांच्या ‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ या काव्यसंग्रहातील एकूण कवितेचा आविष्कार हा वर्तमानाचा कोलाहल आहे. आजच्या असत्य युगावर परखड भाष्य करताना ही कविता एक सुंदर स्वप्नवत जग निर्माण करण्याची अभिलाषा बाळगते. मूल्यांचा ऱ्हास, विवेकशून्य वर्तमानस्थिती, मन विषण्ण करत जाणारे नातेसंबंध, जाती-धर्मांचं दुभंगलेपण, मनाचा निर्घृण कोरडेपणा, बंधुत्वाची भावना संपवून समतेला प्राप्त झालेलं विटाळपण, या सगळ्या विदीर्ण अवस्थेतेचं तुकड्या-तुकड्यांचं आजचं एक काळोखं जग हे या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. या कवितांची ही आशयसूत्रं समजून घेताना आपण आतून हबकून जातो, हे या कवितेचं मोठं बलस्थान आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

आज आपण कोणत्या काळात जगत आहोत, याचा अंदाज न बांधता यावा, इतका माणूस भ्रमिष्ट झाला आहे. या भ्रमिष्टाच्या शोकगीताचं निरूपण म्हणून ही कविता वाचकासमोर येते. म्हणूनच या कवितेतून ‘बंधुत्वाच्या पुलाखालून खूप रक्त वाहून तर जाणार नाही ना?’ असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. या कवितांला आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, भावनिक, कौटुंबिक लसलसत्या  वेदनेचा स्पष्ट चेहरा आहे. तो चेहरा एवढा विद्रूप आहे की, या सर्व चेहऱ्यांमध्ये आपलाही चेहरा मिळून, तो आपणच कधी विद्रूप करून टाकला आहे, याचीही जाणीव होत नाही. हे असं होत जाणं म्हणजे समाजातील लोकशाही मूल्यं नष्ट होऊन समाजाची अराजकतेकडे वाटचाल होण्याचा प्रारंभ असतो. कवी सावंत हे याचीच भयसूचकता या कवितांतून करत असल्यामुळे, आजच्या अरिष्ट काळाची नोंद आपल्या कवितांच्या समर्थ शब्दांतून ते घेत आहेत, असं आपण खात्रीनं म्हणू शकतो.

राष्ट्रवाद आणि खोटी अस्मिता, जातीयवाद आणि धर्मवादीपणा, खोटी भूमिनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीचा बागुलबुवा या सगळ्याला अलीकडल्या काही वर्षांत इथला विचारशील माणूस, तसेच जो निवळ माणूस म्हणून जगू पाहतोय तो तो विटला आहे. या सगळ्याच्या अतिरेकी मानसिकतेतून कधी नव्हे, एवढी इथल्या माणुसकीची पडझड होताना रोज अनुभवास येत आहे. या पडझडीचा आतला आवाज या कवितेच्या ठायीठायी घुमतानाचे स्वर ऐकू येत राहतात. या कवितांतील आजच्या स्थितीच्या या अनुभवातून ‘छिन्न-भिन्न होणं’ फार अस्वस्थ करणारं आहे. म्हणूनच कवी सावंत एके ठिकाणी म्हणतात,

त्या नतद्रष्टांचं काय करू?

जे इतिहासाची

मढी उकरून काढताना

विनाकारणच दडपून टाकत आहेत

माझ्या प्रेयस मायभूमीत उमठणारा

समता, बंधुता आणि एकतेचा आवाज

माणसाला अंधश्रद्धेला कवटाळू दिलं की, अराजकतेचा काळ जवळ येऊ लागतो. हा अराजकतेचाच काळ चालू आहे, असं कवीला वाटतं. त्याची प्रचिती आपल्यालाही वारंवार येत आहे. या अर्थानं कवी  सद्यस्थितीतील घटनांचा मागोवा आपल्या कवितांमधून घेताना दिसतो. याच तीव्र प्रत्यंतर या कवितांमधून येते. एकमेकांविरोधातील विषाची पेरणी समाजात इथं-तिथं करण्याचे प्रयत्न जोरदार चालू आहेत. या सगळ्यामागे विशिष्ट मानसिकता कार्यरत आहे. मात्र सर्व समाज यात भरडला जावा, असं एक षडयंत्र राबवले जात आहे. या षडयंत्रातून माणसाची सकारात्मक क्रियाशीलता नष्ट होऊन आपण सांगू तसाच समाज घडावा, अशी प्रक्रिया अलीकडल्या काळात जोर धरू लागली आहे. या प्रक्रियेचं प्रतिबिंब म्हणून या कवितेकडेही आपण पाहू शकतो. या संदर्भात कवी म्हणतो,

माझ्या रापलेल्या हातात

ठोकून पहिल्या त्यांनी

अंधश्रद्धेच्या कणखर बेड्या

आणि पेरत राहिले द्वेषाची बीजे

माझ्या नसानसात वाहणाऱ्या

मानवधर्मी रक्तात

आता मानवी जिभेला रक्ताची चटक लागलेली आहे. अशा घटना वारंवार घडताना दिसतात. पशुपक्षी सहज मरून जावा आणि त्याचं सोयरसुतक कोणाला नसावं, असा माणूस मारला जात आहे किंवा तो अनपेक्षित घटनेनं मरतो आहे. एखाद्याचा मृत्यू ही माणसाच्या मनाला चटका लावणारी घटना कोणी काळी होती. पण हा काळ, या काळातील मृत्यूबद्दलची संवेदनशीलता हरवून ती एक घटना म्हणूनच आता लोकांसमोर येते. आणि क्षणार्धात या घटनेचं महत्त्व कमी होऊन माणूस कोरडेपणानं निर्ढावलेल्या मनानं रोजचं जगणं जगू लागतो. या सगळ्यामुळे कवी प्रचंड अस्वस्थ होताना दिसतो आहे. यात माणसं व्यवस्थेची बळी गेलेली जास्त दिसतात. मृत्यू आणि जनावरांसारखं जगणं त्यांच्या वाट्याला येतं. जीवन मरणाच्या या संघर्षात ज्यांच्या हातात सत्ता आहे, जे समाज वाचू शकतात, असे लोक मात्र हे शांतपणे सगळे पाहत आहेत. त्यांची गिधाड वृत्ती लोकांच्या मरणाला कवटाळते आहे. म्हणूनच कवी म्हणतो,

मरण स्वस्त झालं

तेव्हापासून दिसू लागलीय

मस्तवाल गिधाडांची फौज

जिवंत माणसांच्या रूपात

अधाशीपणे वर्दळताना

गाव पाणवठ्याचा विकास करता करता गावातील माणसाच्या हातात भिकेची झोळी कधी आली, हेच माहीत नाही. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण म्हणजे ‘खाऊजा’ धोरणात सर्वाधिक भरडला कुठला माणूस गेला असेल तर तो गावातला. या धोरणात गाव ना गाव राहिला, ना गाव शहर होऊ शकलं. गाव आणि शहराच्या मधोमध आता उभा आहे गावचा माणूस. याला कारणीभूत आहेत चुकीची विकासाची धोरणे. गावच्या माणसाची वृत्ती बदलू लागली आहे. त्याला वेगवेगळ्या आमिषानं पछाडलं आहे. तो स्वतंत्र विचारानं जगण्याऐवजी स्वातंत्र्याच्या भ्रामक कल्पनेत तो भ्रमिष्ट झाला आहे. गावच्या माणसाला आपल्याला नेमकं आता काय करायचं आहे, आपण कुणाच्या पाठीमागे उभ रहायचं आहे, याचाच निर्णय घेता येत नाही. त्यामुळे त्याची सुख-शांती रसातळाला गेली आहे. यामुळे तो अधिकच मानसिक कोंडीत सापडला आहे. या सगळ्याच विदारक चित्रही या कवितांतून आपल्याला वाचायला मिळतं.

गावात विकास आणू पाहणारे कोण असतात? गावच्या विकासाची घाई कोणाला झालेली असते? या प्रश्‍नांच्या मुळाशी गेल्यावर गावच्या आजच्या दुःखाचं नेमकं कारण आपल्याला सापडू शकतं. गाव विकासाचं तारण करतं, हे व्यवस्थेतून लाभाचा मलिदा खाणारे व्यवस्थापक असतात. बौद्धिक वाढीने ते सुमार असतात, मात्र गावच्या विकासाचं मॉडेल बनवण्याचे अधिकार सत्ताधारी व्यवस्थेशी लागेबांधे राखत आपल्या हाती ठेवतात. आणि गाव भकास करून विकास करण्याची स्वप्नं लोकांच्या नजरेत उतरवण्यात यशस्वी होतात. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे सहज करता येतं. परंतु असं विकासाचं मॉडेल दीर्घकाळ माणसाला सुखी करू शकत नाही, याची जाणीव गावच्या माणसाला नसते. ज्या अपवादात्मक माणसाला ती असते, तो इतरांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र त्यालाच वेड्यात काढलं जातं. खरं तर कुठल्याही गावचा विकास करण्यासाठी तिथली भूमीच एक ‘रोल मॉडेल’ असतं. मात्र यासाठी गावचा शाश्वत विकास करण्याची उर्मी असणारी माणसं त्या भूमीत असावी लागतात. ती माणसं नसतील तर किंवा त्या भूमीतील माणसं आपली भूमीनिष्ठा, आपला स्वाभिमान कवडीमोलाने विकून गावावर आक्रमण करणाऱ्या बाहेरच्या बाजार व्यवस्थेला शरण जात असतील तर गावाचं गावपण हरवायला आणि त्यातून माणूस सततचा अस्वस्थ राहायला वेळ लागत नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कारण असं झालं की, गावातील घर-शेती-शिवार देशोधडीला लागायला वेळ लागत नाही. पर्यायानं गावातील माणूसच देशोधडीला लागतो. आजच्या सत्ताधारी व्यवस्थेला गावातील माणसाला स्वयंपूर्ण करायचं नाही. त्याला आपल्या अधिपत्याखाली कायमच ठेवायचं आहे. यासाठी धनदांडग्यांच्या घशात तिथल्या जमिनी घातल्या जात आहेत. खरं तर सत्ताधारी व्यवस्था भूमिहीनांना भूमी देण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र ज्यांची भूमी आहे, त्यांनाच भूमिहीन करण्याचा डाव रचला जात आहे. यातून रमेश सावंत सारखा कवी प्रचंड अस्वस्थ होतो आणि त्या अनुभूतीतूनच हा कवी निराशेच्या आवेगातून म्हणतो,

वणवा होऊन जाळा म्हणतो

त्यांच्या मुजोर ठोकशाहीला

ज्यांनी बेचिराख केलीत

तुमची घर, शेतशिवार अन माणसांनाही!

माणसांना, त्यांच्या तोंडातील घासाला बेचिराख करता करता माणसाचं एकोप्यानं राहण्याचं सांस्कृतिक संचितही नष्ट करण्याची जी प्रक्रिया जोरात चालू आहे, या सगळ्याचा सशक्त उद्गगार म्हणजे कवी सावंत यांची ‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’मधील कविता होय!

‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ - रमेश सावंत

अष्टगंध प्रकाशन, मुंबई

मूल्य – १५० रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक अजय कांडर हे कवी व पत्रकार आहेत.

editor@aksharnama.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......