‘यहाँ से हमारी लाश जायेगी, या किसानविरोधी तीन कानून जायेंगे’!
पडघम - देशकारण
विवेक कोरडे
  • दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे एक प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 07 August 2021
  • पडघम देशकारण शेतकरी आंदोलन Farmers Protest शेती Farming शेतकरी Farmer शेती सुधारणा बिल Farm Reform Bill लोकशाही Democracy

चौकाचौकात उभे राहिलेले पोलीस दिसू लागले आणि सिंघू बॉर्डर जवळ आल्याची खूण पटली. गेले आठ महिने पंजाबमधील शेतकरी सिंघू बॉर्डरवर धरणे धरून बसले आहेत. त्या शेतकऱ्यांना आणि जमल्यास त्यांच्या नेत्यांना भेटण्याच्या उद्देशाने ११ जुलै २०२१ रोजी काही कार्यकर्त्यांसह दिल्लीहून निघालो. शेतकरी आंदोलन जवळून पाहण्यास मिळेल या विचारांत २८ कि.मी. अंतर कारने कधी कापले ते समजलेच नाही. आंदोलन स्थानाकडे जाणारे रस्ते पोलिसांनी लावलेल्या अडथळ्यांमुळे बंद. काही तर उखडून टाकलेले. बऱ्याच वेळा रस्ता शोधायचा प्रयत्न करूनही आंदोलन स्थान सापडत नव्हते. शेवटी एका नाक्यावर उभे असलेल्या पोलिसांनाच विचारले. त्यांनी दाखवलेल्या दिशेने लांबवर जाऊन वळसा घेतला आणि अचानक समोर दिसलेल्या राहुट्यांनी आपण योग्य जागी पोहोचल्याची जाणीव दिली.

शिस्तबद्धता आणि दिलदारपणा

या ठिकाणी मुख्य नेते बलविर सिंग रजेवाल नेतृत्व करतात. ते कोठे असतील, असे विचारल्यावर एका शेतकऱ्याने थेड्याशा अंतरावर असलेल्या एका गजबजलेल्या ठिकाणाकडे बोट दाखवले. गाडीतून खाली उतरताच उन्हाची आणि उष्ण हवेची जाणीव झाली. अकराच वाजले असून तेथील तापमान ४० अंश सेल्शिअस तरी असावे. एका छोट्याशा गल्लीतून आत शिरलो. उजव्या हाताला दोन टेबलांवर पीपीई किट घालून दोन डॉक्टर्स रुग्ण तपासताहेत. समोर सुमारे ५० लोक आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करताहेत. कुठेही गडबड नाही. एक जण साऱ्यांची नावे लिहून रुग्णांची यादी बनवत होता. त्यालाच रोज किती लोक औषध घ्यायला येतात, असे विचारले. रोज ५० ते ६० रुग्ण, असे त्याचे उत्तर. परत जाताना डॉक्टर्सना भेटू असे ठरवून पुढे गेलो. एका छोट्याशा राहुटीत बलबिर सिंग रजेवाल १०-१५ लोकांबरोबर नाष्टा करत होते. मुंबईहून काही लोक भेटायला आले आहेत, म्हटल्यावर त्यांनी कुणाला तरी आम्हाला आत बसवून नाष्टा देण्यास सांगितले. अर्थात आम्ही नाष्टा करून गेलो असल्याने नाष्टा नको म्हटले. तरीही आग्रह सुरूच राहिला. तितक्यात एक जण एका मोठ्या ट्रेमध्ये दीड-दोनशे रवा-बेसनाचे लाडू वाटत आला. आग्रहाने सर्वांना लाडू दिले. लाडू कशाबद्दल, असे विचारल्यावर ‘आनेवाले लेके आते है सबके लिये’ असे उत्तर मिळाले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

इथे दर दोन-तीन दिवसांनी नवीन जत्थे येतात. जणू आंदोलनासाठी नव्हे, तर उत्सवाला ते येत असतात, असा त्यांच्यात उत्साह आणि आत्मविश्वास असतो. आपल्या हक्कासाठी जीव झोकून देत आंदोलन छेडताना पूर्ण ताकदीनिशी छेडायचे, पण तसे करताना आपल्यातली माणुसकी गमवायची नाही, जीवनेच्छा आटू द्यायची नाही, तक्रारीचा वाकडा सूर न लावता, येणाऱ्या प्रत्येक आव्हानात्मक क्षणाचे हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करायचे, हा तर खास पंजाबी नि उत्तर भारतीय गुण. तोच इथेसुद्धा अनुभवास आला.

थोड्याच वेळात रजेवालजी स्वतः आले. उन्हाने रापलेला चेहरा, पण चेहऱ्यावर थकव्याचा लवलेश नाही. उत्साह तरुणाला लाजवेल असा. कोण, कुठले चौकशी झाली. ‘चलो, अंदर बैठके बात करेंगे’ असे म्हणून शेजारच्या जागेत घेऊन गेले. पाच-सहा पायऱ्या चढून वर जावे लागले. आत जाण्यास दरवाज्याऐवजी एक जाडसर पडदा होता. तो बाजूला करून आत जाताच एसीची बऱ्यापैकी गार हवा सुखावून गेली. आत गडद हिरव्या रंगाची माफक सजावट आणि त्याच रंगाचा गालिचा. बसल्याबरोबर आधी ‘इन्हे मिठा खिलावो’चा आदेश आणि त्याची तत्परतेने पूर्तता. एकदम ताजी आणि बरीचशी गोड बर्फी. ओळखीचा कार्यक्रम आटोपताच रजेवाल यांनी केंद्राने बनवलेले कायदे कसे शेतकरी विरोधी आणि भांडवलदारांचा फायदा करणारे आहेत, हे सांगितले. ते बोलत असतानाच वीज गेली. पण लगेचच जनरेटर सुरू झाला. शेतकरी किती तयारीने आलेत याची त्या क्षणी जाणीव झाली.

अविश्वसनीय निर्धार

बोलण्याच्या ओघात त्यांनी इतिहासाची आठवण करून दिली. ‘पंजाब हा लढवय्यांचा प्रांत आहे. मोगल, ब्रिटिश या साऱ्यांच्या विरोधात आमचा प्रांत प्राणपणाने लढला. स्वातंत्र्य आंदोलनात सर्वात जास्त कुर्बानी पंजाबने दिली. आम्ही जे लढे दिले त्यांत एकतर विजयी झालो वा आम्ही मरण पत्करले. त्याच निर्धाराने आम्ही येथे आलो आहोत. ‘यहाँ ऐसे हजारो लोग है, वह ये कहते है की, यहाँ से हमारी लाश जायेगी, या किसानविरोधी तीन कानून जायेंगे’! आणि हा निर्धार आम्हाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. रजेवाल हे एक अभ्यासू नेते आहेत. बोलता बोलता त्यांनी नोम चॉम्सकी यांनी नुकतेच केलेले “The Indian farmers should be proud of what they are doing and I think this movement is a Becon of Light for the world in dark times” हे वक्तव्य उच्चारले.

देशाच्या राजकारणातील साऱ्या घडामोडींकडे आंदोलनातील अन्य नेत्यांचेही बारीक लक्ष असल्याचा इथे प्रत्यय आला. आमच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते होते. महाराष्ट्राने पंजाब सरकारप्रमाणे नव्याने केलेल्या सुधारित कृषी कायद्याबाबत नाराजी व्यक्त करून ही गोष्ट एकप्रकारे केंद्राने केलेल्या कायद्याचे समर्थन असल्याचे एका नेत्याने ठासून सांगितले. तसेच श्री शरद पवार यांनी कायद्यात सुधारणा करून हे कायदे मान्य करावेत असे म्हटल्याबद्दल नाराजी व्यक्त करून हे कायद्याचे समर्थन आहे, असेही तो तरुण नेता म्हणाला. शरद पवारांचे वक्तव्य प्रसारमाध्यमांनी ‘तोडमरोडकर’ छापल्याचे राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने सांगितल्यावर ‘फिर आप शरद पवारजी से यह कहने को कहो, और उनका किसान आंदोलन को समर्थन है, ऐसा भी उन्हे कहने दो’ असे म्हणून त्या नेत्याने ‘तोडमरोडकर’ म्हणणाऱ्याला पेचात टाकले.

आरपारच्या लढ्याचा निश्चय

कुलदीप सिंग आणि हरविंदर सिंग लाखोवाल हे दोन तरुण नेते आम्हाला आग्रहाने त्यांच्या राहुटीत घेऊन गेले. जाताना त्याने मला ‘कभी पंजाब आये हो’ असा प्रश्न केला. कटखरखला येथील भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांच्या समाधीला तीनदा वंदन करायला आलो होतो, हे सांगितल्यावर गडी खूश. त्याचे गाव कटखरखलापासून आठ कि.मी. अंतरावर. ३०० एकर जमीन. आल्यापासून फारसा घरी गेलेला नाही. कितीही कष्ट पडले तरी चालतील, पण कायदे रद्द केल्याशिवाय घरी जाणार नाही, हे पुन्हा पुन्हा सांगत होता. त्यांचीही राहुटी वातानुकुलित. पुन्हा मिठाईचा आग्रह झाला. उत्तम कॉफी दिली. बोलणे आटोपताना ‘वाहे गुरु दा खालसा, वाहे गुरु दी फतेह’ असे प्रत्येक वेळी बोलत होता. आंदोलनात केवळ पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिसतात, असे म्हटल्यावर त्याने तसे नाही, साऱ्या देशातून या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातूनही अनेक शेतकरी येत-जात असल्याचे म्हटले. महाराष्ट्रातील शेतकरी संघटना संयुक्त कृती समितीत आहेत, असे तो म्हणाला.

आंदोलनातील सहकार

या साऱ्यांचा निराप घेऊन आम्ही गाझीपूर बॉर्डरकडे निघालो. या सीमेवर राकेश टिकैत नेतृत्व करत आहेत. आम्ही पोहोचलो, तेव्हा छोट्याशा मंचावर टिकैत आणि अन्य काही मंडळी बसली होती. कुणी एक तरुण हरियाणातील एका गावातून ५०-६० शेतकऱ्यांचा जत्था घेऊन आला होता. तोच भाषण करत होता. आजूबाजूला पाच-सहा ट्रॅक्टर अगदी सजवून ठेवले होते. जागोजागी घोषणा फलक आणि राकेश टिकेत यांचे फोटो. हिरव्या रंगाचा भरपूर वापर. तो नेता भाषण करत असतानाच जवळ असलेल्या एका शेतकऱ्याला विचारले की, ‘आपण इथे आलाय, मग गावी शेती कोण बघतो?’ ‘गांववाले हप्ते-पंधरा दिन के लिये जब आते है, तो गांव के लोग उसकी खेती देखते है.’ या उत्तरातून या आंदोलन स्थळी सतत हजार-पंधराशे लोक कसे राहू शकतात, याचे उत्तर मिळाले. एका वेगळ्या सहकार्याचा प्रत्यय आला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

हे आंदोलन केवळ दलालांचे आहे, असे सरकार म्हणते, यावर काय म्हणता? असे विचारल्यावर दुसरा शेतकरी त्वेशाने म्हणाला की, ‘जर आम्ही दलाल आहोत तर सरकार आमच्याशी बोलणी का करते? निवडणूक येऊ दे, यांना जनता काय असते, ते दाखवून देऊ.’ सध्या पंजाब आणि हरियाणात भाजपच्या नेत्यांना गावांमध्ये येऊ दिले जात नाही, अशी पूरक माहितीही त्याने आपला मुद्दा स्पष्ट करताना दिली.

टिकैत यांच्यातला सहृद

ती छोटी सभा आटोपल्यावर टिकैत आम्हाला त्यांच्या राहुटीत घेऊन गेले. आत बैठक घेण्याची व्यवस्था होती. आमच्यातील एका मुलीला बसायला खुर्ची नव्हती. आणखी खुर्ची येईपर्यंत टिकैत काहीच बोलत नव्हते. कुणी महिला उभी असलेली त्यांना आवडत नसल्याचे म्हणाले. ‘बेटी थकी हो तो अंदर जाके आराम करो’ असा प्रेमळ सल्ला. पुन्हा मिठाई. सर्वांना थंड पाण्याच्या बाटल्या आणि पाणी पिण्याचा आग्रह.

२२ जुलै रोजी संसदेवर शेतकरी मोर्चाने जातील असे टिकैत यांनी सांगितले. पोलिसांनी परवानगी दिली नाही, तरीही संसदेवर जाणारच हे त्यांनी निसंदिग्धपणे स्पष्ट केले. टिकैत म्हणाले होते, तसे २२ जुलै रोजी आंदोलक शेतकरी मोर्चाने गेले, पण संसदेऐवजी त्यांना जंतर-मंतर परिसरात आंदोलनाची परवानगी दिली गेली. ‘आमचे आंदोलन हे अराजकीय आंदोलन आहे. या आंदोलनाला जे राजकीय पक्ष समर्थन देतील, त्यांचे आम्ही आभारी असू पण कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीला आम्ही आमचा मंच वापरू देणार नाही’, ही गोष्ट त्यांनी पुन्हा आवर्जून सांगितली.

आंदोलनात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना स्थान नाही, मंच मिळणार नाही, असे जे टिकैत म्हणाले, त्याचा प्रत्यय आम्हाला लगेचच आला. आम्हाला जेवण देण्यासाठी दोन कार्यकर्ते लंगरकडे नेत असताना आम्हाला सभेत चाललेल्या भाषणाचा आवाज आला. आणि आम्ही जेवण नंतर घेऊ असे म्हणून तेथे पोहोचलो. पाच-सातशे शेतकरी मोठ्या मंडपात बसले होते. कुणी तरी शेतकरी नेता आवेशाने बोलत होता. आमच्यातील राष्ट्रवादीचा उत्साही कार्यकर्ता त्यांच्या पक्षाच्या माजी आमदार आल्याचे सांगायला रुबाबात मंचावर चढला. त्याला काय सांगितले गेले माहीत नाही, पण तो तसाच खाली आला. काही वेळातच या सभेची व्यवस्था पाहणारा कार्यकर्ता आमच्याजवळ आला. तो सर्वांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते समजत असावा. त्याने पाठिंबा देण्यास आल्याबद्दल आभार मानले. पण राजकीय पक्षांच्या नेत्यांना मंचावर बसवणे वा भाषण करू देत नसल्याचे अत्यंत विनम्रपणे सांगितले. त्यामुळे तिथे थांबणे योग्य नाही, असे लक्षात आल्याने नेते मंडळी उठली.

ठाम निर्धार आंदोलकांचा

वाटेतील एका लंगरमध्ये आम्ही भोजन उरकले. वाढणारे आग्रहाने वाढत होते. शेतकऱ्यांचे अगत्य काय असते, त्याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत होता. मुद्दाम एका साध्या दिसणाऱ्या शेतकऱ्याला हे आंदोलन कशासाठी आहे, असे विचारले. त्याने अगदी थोडक्यात त्यांच्या मागण्या काय आहेत व त्या का आहेत, हे अगदी मुद्देसूदपणे मांडले. इतकेच नाही तर येथील बहुतेक जण तुम्हाला माझ्या इतक्याच सुस्पष्टपणे सांगू शकतील असे तो म्हणाला. त्यातून येथे आलेला शेतकरी सजग आहे, त्याची कोणाही दिशाभूल केलेली नाही, त्याला कोणाही बहकावलेले नाही. किंबहुना, हा शेतकरी अगदी विचारपूर्वक आंदोलनात सामील झाला आहे, याचा प्रत्यय आला. जो थोडा काळ आम्ही सिंघू आणि गाझीपूर बॉर्डरवर थांबलो त्याने काही गोष्टी मनावर बिंबल्या गेल्या.

१) आंदोलनाला सात महिने उलटून आणि सरकार मागे हटेल असे दिसत नसतानाही शेतकऱ्यांचा निर्धार कायम आहे आणि तो कायम ठेवण्यासाठी त्यांचे नेते त्यांच्याबरोबरीने ठाण मांडून बसले आहेत.

२) अन्य आंदोलनांमध्ये जसे हाल होतात, तसे हाल करून न घेता, तेथील थंडी, वारा, ऊन, पाऊस सहन करत जितके आनंदाने राहता येईल, तितक्या आनंदाने राहत आहेत आणि कितीही काळ राहण्याच्या तयारीत आहेत.

३) या आंदोलनाला परदेशातून पैसा येतो असे जे म्हटले जाते, ते शेतकऱ्यांना मान्यच आहे. त्यामागची वस्तुस्थिती ही आहे की, शेतकऱ्यांची जी मुले परदेशांत स्थायिक झाली आहेत, ती आंदोलक शेतकऱ्यांना काहीच कमी पडू देत नाहीत.

४) या ठिकाणी साऱ्या गोष्टी शिस्तीने चालतात. स्वच्छतागृहे, स्नानगृहे, स्वयंपाकाची जागा, भांडीकुंडी अशा साऱ्याच गोष्टी अत्यंत स्वच्छ होत्या आणि रस्त्यावर कोठेही घाण नव्हती.

५) हे शेतकरी आणि त्यांचे नेते लढवय्ये आहेतच. पण त्याचबरोबर आंदोलनाबाबत त्यांनी एक निश्चित रणनीती आखली आहे. हे लक्षात आल्याशिवाय राहात नाही.

६) आंदोलकांमध्ये परस्पर सहकार्य असल्याने व आंदोलनात आलेल्या शेतकऱ्यांची काळजी गावांतील अन्य लोक घेत असल्याने शेतकरी निर्धास्तपणे येथे येऊन राहत आहेत.

७) महिला आंदोलकांची संख्याही मोठी आढळली. महिलाही येथे येऊन राहत असतात.

८) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नेते आणि आंदोलक केवळ एकत्र राहत नाहीत, तर एकत्रच अन्न शिजवतात आणि एकत्रच खातात. त्या अर्थाने हे शेतकरी आंदोलन एकोप्याचे प्रतीकही आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

.................................................................................................................................................................

या साऱ्या गोष्टींमुळे गेल्या सहा-सात वर्षांत झालेल्या आंदोलनातील हे एक मोठे आणि अधिक काळ चाललेले आंदोलन आहे. या आंदोलनाला यश मिळेल की नाही, या प्रश्नाचे उत्तर अजून मिळायला काही काळ जावा लागेल. पण दबावतंत्राचा वापर करून आम्ही म्हणतो ते मान्य केलेच पाहिजे, असे वर्तन करणाऱ्या सरकारला या आंदोलनाने लोकशक्ती म्हणजे काय असते, याचा प्रत्यय आणून दिला आहे. पंजाब आणि हरियाणात आज तरी केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप या पक्षाची अवस्था केविलवाणी झाली आहे. या आंदोलनात उत्तर प्रदेशातूनही शेतकरी कमी प्रमाणात का असेना, सामील झाले आहेत. या राज्यांतल्या निवडणुका जवळ आल्या आहेत. राजकीय पक्षांना अन्य भाषा समजत नसल्या तरी मतांची भाषा कळते. त्या भाषेत जेव्हा शेतकरी बोलतील, तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर येईल.

लोकशाही राज्यव्यवस्थेत कायदे लोकांसाठी बनतात. लोकविरोधी कायदे आणि लोकविरोधी सरकारे टिकत नसतात. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षप्रारंभाचा क्षण जवळ येत असताना, लोकशाहीच्या बचावासाठी दिल्लीच्या सीमेवर संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या विजयाच्या निर्धारासाठी सलाम आणि खूप साऱ्या शुभेच्छा...

‘मुक्त-संवाद’ या पाक्षिकाच्या १ ऑगस्ट २०२१च्या अंकातून साभार

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाने धर्माची, पितृसत्तेची, जातीची, प्रादेशिकतेची अनेक बॅरिकेड्स तोडले आहेत!

...आणि ‘आता शेतकरी आंदोलन संपलं’ असे मनातल्या मनात मांडे खाणाऱ्यांचा विचार त्यांच्या मनातच जिरला

दिल्लीच्या सीमांवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या ‘लहरी’ राज्यकर्त्यांच्या अंगावर ‘शहारे’ निर्माण करत आहेत

‘आमच्या अंतर्गत गोष्टी सोडवण्यास आम्ही सक्षम आहोत’ असा जबरदस्त आत्मविश्वास लाभलेल्या महान देशप्रेमी लोकांचं आता हसू व्हायला लागलंय!

लोकशाहीची सुरक्षा ही आपल्या विवेकबुद्धीवर आणि लोकशाही मूल्यांवरील निष्ठेवर अवलंबून आहे!

..................................................................................................................................................................

लेखक विवेक कोरडे समाजअभ्यासक, शिक्षण व्यापारीकरण विरोधी चळवळीचे कार्यकर्ते आहेत.   

drvivekkorde@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा