‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ हे पुस्तक मराठीतील साहित्य आणि इतर कलांच्या समीक्षेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पुस्तक आहे
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अक्षय शेलार
  • ‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे मुखपृष्ठ
  • Fri , 26 March 2021
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade देशीवाद Deshivad द वर्ल्ड इज फ्लॅट World is Flat नितिन भरत वाघ Nitin Bharat Wagh

लेखक, समीक्षक नितिन भरत वाघ यांच्या ‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ या पुस्तकाची चौथी सुधारित आवृत्ती (सात नवीन लेखांचा समावेश असलेली) जानेवारी २०२१मध्ये प्रकाशित झाली आहे. त्या निमित्ताने हा लेख…

..................................................................................................................................................................

नितिन भरत वाघ यांच्या ‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ या पुस्तकातील ‘जॉर्ज ऑरवेल : समाजाचं सांस्कृतिक वाचन आणि ऑरवेलियन काळ’ या लेखात एक वाक्य आहे. ते असे - ‘आपल्याकडे कवी, लेखक वा समीक्षकांना अभ्यासाची, संशोधनाची अजिबात आवड नाही असं दिसतं’. या वाक्यातून वाघ यांना मराठीतील साहित्यव्यवहार आणि वाचन, लेखनसंस्कृतीबाबत असलेली तक्रार अगदी स्पष्टपणे मांडली जाते. खुद्द वाघ यांचं पुस्तक मात्र वरील वाक्याला अपवाद ठरणारं आहे. कारण त्यांच्या या पुस्तकामध्ये अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक वृत्ती असलेलं लिखाण वाचायला मिळतं. 

साहित्य, चित्र, संगीत इत्यादी कला या वास्तवापासून निर्वातात अस्तित्वात नसतात. कारण, त्या कलाकृतीच्या निर्मात्याचा आणि त्याच्या सभोवतालाचा संबंध हा येनकेनप्रकारे त्याच्या जगण्याशी, आणि पर्यायानं कलात्मक अभिव्यक्तीशी येत असतो. त्यामुळेच नितिन भरत वाघ हे साहित्यादी कला आणि कलाकृतींकडे वास्तव आणि त्यासोबत राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पैलूंच्या चष्म्यातून पाहतात.

या पुस्तकात नव्या, जुन्या सर्वच प्रकारचं साहित्य आणि लेखकांविषयीचे लेख आहेत. त्यामुळे अरुण कोलटकर, विलास सारंग, अरुण काळे या लेखकांच्या साहित्यकृतींपासून ते नीतीन रिंढे यांच्या ‘लीळा पुस्तकांच्या’ या गेल्या काही वर्षांत चर्चेत असलेल्या पुस्तकापर्यंत विविध प्रकारच्या लेखनाकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. लेखकाची एकूणच लेखनव्यवहाराविषयीची आत्मीयता ही त्याच्या या पुस्तकातील सर्वच लेखांमध्ये दिसून येणारी समान बाब. ज्यात कोलटकर-सारंग यांच्या कवितांवरील छोटेखानी लेखापासून ते भालचंद्र नेमाडे, जॉर्ज ऑरवेल यांच्यावरील दीर्घ लेखांपर्यंत सर्वच लेखांचा समावेश होतो. 

नितिन वाघ यांनी ‘सूत्रपाठ’ या लेखातून प्रस्तुत संग्रहाचं समान सूत्र मांडलं आहे. हा लेख वाचताच लेखक समाज आणि साहित्य यांच्यातील परस्परसंबंधाकडे किती गांभीर्यानं पाहतो, याची कल्पना येते. यात साहित्यासोबतच लेखक आणि वाचक यांचा सभोवताल; साहित्याला व्यापून असलेले आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक पैलू या बाबींचा एकत्रित विचार केला जातो.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

देशीवाद आणि जागतिकीकरण हे या लेखसंग्रहातील सर्व लेखांच्या केंद्रस्थानी असलेले मुद्दे असले तरी या दोन मुख्य विचारविश्वांसमवेत जातीव्यवस्था, भारतात सध्या वाढीस लागलेला मूलतत्त्ववाद अशा इतर संकल्पनादेखील येतात. या भिन्नविभिन्न संकल्पनांकडे एकत्रितपणे पाहत असताना मराठी, इंग्रजी दीर्घ अवतरणं दिली आहेत. त्यात गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाक्यांपासून ते विन्स्टन चर्चिल, पॉल क्ली यांच्यापर्यंत विविध मान्यवरांचा समावेश होतो. त्यामुळे देशीवाद, जागतिकीकरण आणि भारतीय समाजव्यवस्था यांचा परस्परसंबंध लावत असताना आवश्यक असलेली पुरेशी पार्श्वभूमी लेखक देतो. भालचंद्र नेमाडे यांच्या देशीवादाच्या मांडणीआधी आणि नंतर झालेलं सामाजिक स्थित्यंतरदेखील सगळ्या चर्चेमध्ये महत्त्वाचं ठरतं. 

‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ या दीर्घ शीर्षकलेखात ‘देशीवाद’ आणि ‘जागतिकीकरण’ हे दोन मुद्दे केंद्रस्थानी येतात. मात्र, या दोन मुद्द्यांच्या अनुषंगानं लेखाचा विस्तार करत असताना विश्वाच्या निर्मितीचा सिद्धान्त मांडणाऱ्या ‘बिग बँग थिअरी’पासून ते बुद्धाच्या तत्त्वज्ञानापर्यंत अनेकविध संकल्पनांचा आधार घेतला जातो. लेखक देशीवाद या संकल्पनेकडे एकतर तिचा थेट, आहे त्या स्वरूपात स्वीकार किंवा मग विरोध अशा सरळसोट प्रकारे पाहत नाहीत. तो देशीवाद या संकल्पनेतील त्रुटी स्पष्ट करतो, पण सोबतच तिची पुनर्मांडणी केल्यास ती कशा प्रकारे उपयुक्त ठरू शकते, याबाबतही लिहितो. काही बाबतीत नेमाडेंच्या या संकल्पनेचं कौतुक करत असताना त्यांचं जातीव्यवस्थेचं समर्थन करणं आणि ‘जातीव्यवस्थेवर हिंदू संस्कृतीचं आणि परिणामी भारताचं अस्तित्व टिकून आहे’, या अर्थाच्या वाक्यामधील फोलपणा दाखवून देतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा केली जाते. प्रत्येक गोष्ट आहे तशी स्वीकारणं किंवा नाकारणं इथं घडत नाही. 

अरुण कोलटकर, विलास सारंग, अरुण काळे आणि दिनकर मनवर यांच्या कवितांवर आधारित लेख फारच इंटरेस्टिंग आहेत. कोलटकर-सारंग आणि काळे यांच्या कवितांचा विचार करत असताना जागतिकीकरण, बदलता सभोवताल, इतिहास आणि समाजव्यवस्था इत्यादी संकल्पनांचा विचार करत लेखांची मांडणी केली जाते. त्यामुळे उपरोक्त कवींच्या कवितांच्या केवळ साहित्यिक आणि भाषिक समीक्षेच्या पलीकडे जाणारं लेखन दिसतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

हेच दिनकर मनवर यांच्या कवितासंग्रहावरील लेखाबद्दल लागू पडतं. ‘दृश्य नसलेल्या दृश्यातील दृश्य’ नावाचा हा लेख आणि त्याआधी येणारा ‘कला, कवी आणि कविता कारण’ या दोन लेखांचा घनिष्ठ संबंध आहे. कारण, दोन्ही लेखांमध्ये कविता रचली जाणं म्हणजे काय असतं, याचा विस्तृत विचार केलेला आहे. समकालात कवी ही शिवी म्हणून वापरली जावी अशी परिस्थिती का आणि कशी उद्भवली, अशी परिस्थिती असताना प्रत्यक्षात मात्र भाषिक व्यवहाराच्या स्तरावर उत्तम म्हणाव्याशा कवितांची रचना होताना का दिसत नाही, यांचा आढावा घेतला आहे.

कवितेची उत्पत्ती स्पष्ट करत असताना या लेखात भाषेची उत्पत्ती, भाषेचं राजकारण, मानवाच्या उत्क्रांतीमध्ये असलेलं भाषेचं महत्त्व असे अनेक मुद्दे सविस्तरपणे समोर मांडले जातात. त्यापुढे येणाऱ्या एका लेखात ते मनवर यांच्या कवितेतील स्त्रीविषयक दृष्टिकोनाची चिकित्सा करतात. या लेखाचं तात्कालिक कारण हे की, दिनकर मनवर यांच्या कवितेतील एका ओळीवर आक्षेप नोंदवत महिला आयोगानं त्यांना स्पष्टीकरण मागणारी नोटीस पाठवली होती. या लेखातून (आणि त्यामागील कारणातून) एकाच कवीच्या कलाकृतींकडे वेगवेगळ्या हेतूनं कशा पद्धतीनं पाहता येऊ शकतं, याचा अनुभव येतो.

लेखाचं निमित्त काहीही असलं तरी एका कवीच्या कवितांची अर्थपूर्ण आणि सर्वांगीण चिकित्सा या लेखात होते. शिवाय कवितेमध्ये तुकाराम-ज्ञानेश्वरांच्या काळापासून दिसणाऱ्या स्त्रीच्या प्रतिमेविषयी सविस्तर भाग अस्तित्वात असल्यानं ही चर्चा एकांगी किंवा वकिली थाटाची होत नाही. 

‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र… वाटून घेताना’ हा लेख एखाद्या पुस्तकाबद्दल नसून लेखक जयंत पवार यांच्या ‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ या कथेबद्दल आहे. कथेच्या समीक्षेपेक्षा तिचा आस्वाद घेणं आणि नंतर त्या कथेवर व्यक्त होणं अशा स्वरूपाचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे. लेखकाच्या वाचनप्रेमाचं द्योतक ठरावा असा हा लेख.

असेच लेख चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, जापानी लेखक हारुकी मुराकामी यांच्यावरही आहेत. कुलकर्णी यांच्यावरील लेखात त्यांची दखल न घेतल्याची तक्रार लेखक मांडतो, तर मुराकामीच्या निमित्ताने जागतिक स्तरावरील लोकप्रियतेची मीमांसा करतो. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘महार (बौद्ध) समूहाने आरक्षण सोडण्यास काय हरकत आहे?’ हा छोटेखानी (वाढीव) लेख पुस्तकातील इतर लेखांच्या यादीत न शोभणारा आहे. त्यातील मुद्दे पटणं अथवा न पटणं हा वेगळा भाग, पण इतर लेख साहित्य, चित्रकलादी कलांच्या अनुषंगानं लिहिलेले असताना हा लेख वेगळा (नकारात्मक अर्थानं) वाटतो.

या लेखाखेरीज इतर काही लेखांमध्ये जागतिकीकरण, मार्क्सवाद आणि इतर काही संकल्पना/मुद्द्यांच्या अनुषंगानं केलेलं लेखन हे पुस्तकात इतरत्र आढळणाऱ्या चिकित्सक वृत्तीला छेद देणारं ठरतं. उदाहरणार्थ, शीर्षक लेखात एके ठिकाणी नारायण मूर्तींच्या संदर्भानं येणारं भांडवलशाहीची कास धरण्याबाबतचं वाक्य. ज्यातून काहीएक वेळा परस्परविरोधी वाक्यं पुस्तकात आढळतात. 

असं असलं तरी ‘रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat’ हे पुस्तक मराठीतील साहित्य आणि इतर कलांच्या समीक्षेच्या दृष्टीनं एक महत्त्वाचं पुस्तक आहे. विशेषतः इथं फक्त कलाकार अथवा कलाकृतीकडे न पाहता कलाकृतींचा समकालाशी अर्थपूर्ण संबंध जोडत पाहिलं जातं. अपवाद वगळता नुसती आस्वादक समीक्षा वाटेल असं लेखन किंवा टिप्पण्या न करता मांडलेल्या मुद्द्यांचं सविस्तर विवेचन केलं जातं. अशा प्रकारचं अभ्यासपूर्ण लेखन विचारात घेतलेल्या कलाकृतींना न्याय देण्याच्या दृष्टीनंही महत्त्वाचं ठरतं. 

रा. रा. नेमाडे, देशीवाद आणि The World is Flat - नितिन भरत वाघ 

आऱ्हान बुकस्मिथ्स, नाशिक

पाने – २२४, मूल्य – ४०० रुपये.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/3508

..................................................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......