पुस्तक कसे वाचावे, हे आता नव्याने शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
महेंद्र कदम
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 05 March 2021
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो सार्वजनिक वाचनालये किरण नगरकर भालचंद्र नेमाडे

सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत वाचन चळवळी केलेले भाषण…

..................................................................................................................................................................

महाराष्ट्रात आज जवळपास १२,२४१ आणि सोलापूर जिल्ह्यात ९५०च्या आसपास सार्वजनिक वाचनालये आहेत. शासनाचे यासाठीच एकूण तरतूद १२० कोटी रुपये असल्याची माहिती राज्य ग्रंथालय संघाचे संचालक मा. किरण धांडोरे यांनी दिली. ही तरतूद तशी फार आहे, अशातला भाग नाही. पण तरी एकूण वाचनालय चळवळीसाठी तशी ती फार कमीही नाही. या अनुषंगाने काही एक गंभीर विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे.

ही सर्व वाचनालये साधारणपणे अ, ब, क आणि ड अशा वर्गवारीतील आहेत. या पार्श्वभूमीवर विचार करताना आजपर्यंत काय झाले, या तपशिलात न जाता काय करता येऊ शकेल, यावर विचार होणे महत्त्वाचे आहे. यातला पहिला महत्त्वाचा विचार म्हणजे सर्व वाचनालये चालवणाऱ्यांनी मिळणारा निधी तुटपुंजा आहे, असे म्हणून चालणार नाही. आपण जर ते काम स्वेच्छेने स्वीकारलले आहे, तर आहे त्यात काय करता येईल यावर विचार करणे गरजेचे आहे. ४०-५० टक्के सवलत देणारी आणि केवळ संख्या वाढवणारी पुस्तके खरेदी करण्यावर जो भर दिला जातो आणि त्यातून जी रद्दी जमा होते ती काहीच कामाची नसते. त्यावर उपाय शोधला पाहिजे. याला उत्तर देताना संचालकांनी हा बदल या वर्षीपासून अमलात आणला असल्याचे सांगितले. तसेच दर्जेदार प्रकाशकांची पुस्तके घेण्याबाबत प्रक्रिया सुरू करत असल्याबाबतही त्यांनी आश्वासकता दाखवली. म्हणजे आता किमान गुणवत्तेच्या दिशेने ही चळवळ निघाली आहे, पण ती मूलभूत गोष्ट झाली.  तरीही ती महत्त्वाची आहे. 

या चळवळीच्या संदर्भात विचार करताना लक्षात येते ते असे की, पूर्वी वाचन चळवळ नव्हती, पण गावोगाव एक मौखिक परंपरा होती. तिच्या माध्यमातून लोकांचा कान तयार केला जायचा. त्यात धार्मिकता फार दिसत असली तरी ती मुळात तशी नव्हती. चार्वाक, बुद्ध, ज्ञानेश्वर-तुकारामांची वारकरी परंपरा, महानुभाव, गावागावातील कीर्तन-भजन, पोथी-प्रवचने, विविध लोककला, तमाशा या सगळ्या परंपरा आपण पाहिल्या तर एक सलग अशी प्रबोधनाची परंपरा दिसून येते. कालांतराने या परंपरांना विधीचा दर्जा येत गेला असण्याच्या दाट शक्यता आहेत. कारण या मौखिक परंपरांमागे रंजन, श्रमातून विसावा आणि प्रबोधन या मुख्य प्रेरणा होत्या. काळ बदलत आला आणि हे हेतू मागे पडले. काळाबरोबर रंजनाची साधने बदलली. तरीही प्रारंभी रंजनाबरोबर प्रबोधन केले जात होते. उदाहरणार्थ, हिंदी सिनेमाचा नव्वदपूर्वीचा कालखंड पाहिला तर त्यात सामान्य माणूस आणि त्याचे शोषण केंद्रस्थानी असल्याचे लक्षात येते. तसेच पारतंत्र्याच्या काळत छपाई यंत्रणा आली आणि इंग्रजधार्जिणे लेखन करण्याच्या नादात आपली ही प्रबोधनाची परंपरा लुप्त होत गेली. तरीही लिखित परंपरेने साधारणपणे नव्वदीच्या दशकापर्यंत ही प्रबोधनाची पताका फडकावत ठेवली होती.  पण अलीकडे मात्र केवळ रंजनच प्रधान बनत चालले आहे. त्याला काही अपवाद असले तरी अपवादानेच नियम सिद्ध होत असतो.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

नव्वदनंतरच्या जागतिकीकरण-खाजगीकरणाने आणि एकविसाव्या शतकातील तंत्रज्ञान क्रांतीने जग आमूलाग्र बदलून गेले. आणि वाचन व प्रबोधन परंपरेची जागा सगळ्या सामाजिक माध्यमांनी हस्तगत केली. असे असले तरी नुकताच अलीकडे जो सर्व्हे झाला आहे, त्यानुसार मराठी वृत्तपत्रांचा खप वाढला आहे. असे असूनही वाचनाच्या बाबतीत मात्र फार आशादायक चित्र नाही. एकूणच सगळी वैचारिक दिवाळखोरी आणि ‘नो इझम्स’चा जमाना आला आहे. त्यामुळे एक प्रकारचे वैचारिक अराजक खूप वेगाने वाहू लागले आहे. आणि त्याची गंभीरता एक तर कुणाच्या नीट लक्षात येत नाही, आली तर त्याबाबत कोणतीही भूमिका घेण्याची कोणाची तयारी नाही.

सोशल मीडिया जितका उपयोगी आहे, तितकाच तो घातक आहे. कारण तासाभरात एखाद्या माणसाचे, महापुरुषाचे होत्याचे नव्हते करण्याची ताकद या मीडियात आहे. परंतु याचाही विचार कोणी करायला तयार नाही. अशा सगळ्या कालात वाचनालयांची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. कारण मोबाईल क्रांतीमुळे माणूस काही वाचायलाच नको म्हणत आहे. अशा गंभीर काळात आपण टिकणार का? तर याचे उत्तर आहे- हो जरूर टिकू. पण त्यासाठी कात टाकावी लागेल. म्हणजे काय करावे लागेल? 

तर आपण पहिल्यांदा हे लक्षात घेतले पाहिजे की, जितकी परिस्थिती प्रतिकूल तितक्या परिवर्तनाच्या संधी जास्त असतात. आणि आजचा हा काळ आपण त्यासाठी अनुकूल मानायला हवा. तसेच आपण काहीच न करता टीका करण्याला काही अर्थ नाही. आधी काम करावे लागेल. पालथ्या घड्यावर सतत पाणी घालत राहिलो तर त्या घड्याचं बूड झिजून त्यात पाणी जाऊ शकतं; यावर आपण विश्वास ठेवायला हवा. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी काही गोष्टींना प्रारंभ करावा लागेल. यासाठी फार मोठं शिवधनुष्य उचलण्याची गरज नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पहिली गोष्ट म्हणजे आपल्या हातात आता सोशल मीडिया आहे. गावातील काही जाणकार लोकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप करून रोज किंवा चार–दोन दिवसातून वाचनालयातील पुस्तकाचे मुखपृष्ठ टाकावे. त्याबद्दलची काही माहिती त्यासोबत शेअर करावी. तसाच फेसबुक ग्रुप करावा किंवा फेसबुकवर स्वतंत्र माहिती शेअर करावी. त्याचा पाठपुरावा करून काही नवे प्रयोग करता येतील का ते पहावे. तिथं काही चर्चा करता येऊ शकते. अशा काही चर्चा दरम्यानच्या काळात सुरू झाल्या आहेत. काही जणांची निरीक्षणे अशी आहेत की, करोना महामारीच्या काळात पुस्तकांची विक्री वाढली आहे. वाचकवर्ग वाढत चालला आहे. अनेक पुस्तकांच्या मोफत पीडीएफ उपलब्ध आहेत. सोशल मीडियात पुस्तकांच्या चर्चा सुरू आहेत.

या मीडियाच्या आधारेच चांगल्या पुस्तकांची माहिती गोळा करावी. आणि तशीच पुस्तके खरेदी करावीत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेत महिलांचा जास्तीत जास्त सहभाग कसा होईल, यावर भर द्यावा. कारण त्यांच्यामार्फत ही चळवळ अधिक परिणामकारक करता येते. ही चळवळ अधिक गतिमान होण्याची आवश्यकता आहे. कारण पुस्तक कसे वाचावे, हे आता नव्याने शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण जातीच्या आणि धर्माच्या अस्मिता टोकदार बनत चालल्या आहेत. प्रत्येक जण आपल्या अस्मितेच्या चष्म्यातून पुस्तकांच्या जगात प्रवेश करू लागला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

मागे एका मुलाखतीत किरण नगरकर म्हणाले होते की, मी आज माझी ‘प्रतिस्पर्धी’ ही कादंबरी लिहू शकलो नसतो. इतका हा काळ तीव्र अस्मितांच्या संवेदनशीलतेचा बनला आहे. याच दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातील कवितेवरून गोंधळ झाला. तर तब्बल १० वर्षानंतर भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू’ कादंबरीच्या अंगाने जातीय राजकारण केले दिसत आहे. हा सगळा गोंधळ आपण निमूटपणे सहन करत निघालो आहोत, जो अत्यंत चुकीचा आहे.

ही चळवळ अधिक व्यापक करण्याची आणि ती अधिक दुरुस्त करण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपली आहे. कारण वाचन परंपरा विकसित करण्यासाठी अभिरुची निर्माण होण्याची गरज असते. ही अभिरुची निर्माण करण्याचे काम प्रगल्भ वाचक आणि समीक्षक यांचे असते. त्याचीही वाणवा आज जाणवते आहे.

अलीकडे तर दोन पानांचा काही तरी खरडलेला मजकूर शोधनिबंध म्हणून प्रकाशित केला जात आहे. समीक्षा नावाचा स्वतंत्र प्रकार शिल्लक राहिलेला दिसत नाही. त्याची आणि त्याच्या अनुषंगाने अभिरुची विकसित होण्याची गरज आहे. ती करण्यासाठी आपल्याला विविध प्रयोग करावे लागतील.

..................................................................................................................................................................

लेखक महेंद्र कदम विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

mahendrakadam27@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......