महाराष्ट्रातील अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या विदुषींमध्ये इरावतीबाईंचा समावेश होतो!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कामिल पारखे
  • इरावती कर्वे आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Thu , 28 May 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो इरावती कर्वे परिपूर्ती Paripurti भोवरा Bhovra गंगाजल Gangajal

आम्हाला बहुधा सहाव्या इयत्तेत इरावती कर्वे यांचा धडा होता. ‘परिपूर्ती’ या शीर्षकाच्या त्या धड्याची दोन पाने आणि सुरुवातीला इरावतीबाईंच्या छायाचित्रांसह त्यांची ती छोटीशी माहिती आजही माझ्या नजरेसमोर आहे. त्या कॅन्सरने गेल्या हेसुद्धा त्या परिचयात सांगितले होते. इतका त्या छोट्याशा लेखाने माझ्या मनावर खोल परिणाम केला होता.

काही वर्षांपूर्वी एका पुस्तकाच्या दुकानात ‘परिपूर्ती’ या शीर्षकाचा कर्वे यांचा लेखसंग्रह दिसला अन लगेच विकत घेतला. पुस्तकाच्या जीर्ण पानांच्या आणि विटलेल्या रंगांवरून ते खूप जुने आहे हे दिसतच होते. देशमुख आणि कंपनीच्या १९९० सालच्या दहाव्या पुनर्मुद्रित आवृत्तीच्या त्या १४६ पानी पुस्तकाची किंमत होती २५ रुपये. एका बैठकीत त्या पुस्तकातील अनेक लेख मी अधाशीपणाने वाचले. अलीकडेच या पुस्तकाची नवी आवृत्ती दिसली आणि एक अमूल्य साहित्य ठेवा म्हणून आपल्याकडे दुसरी एक प्रत असावी म्हणून तेही पुस्तक घेतले.

काही दिवसांपूर्वी या पुस्तकाची जुनी प्रत हातात आली तेव्हा सहज म्हणून पुस्तकाची पहिली आवृत्ती आणि नंतरच्या आवृत्त्यांचे प्रकाशन वर्षं यावर नजर टाकली. ‘परिपूर्ती’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९४९ साली प्रसिद्ध झाली आहे आणि लेखिकेच्या हयातीतच म्हणजे १९६९पर्यंत या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघाल्या होत्या. मी नव्याने घेतलेल्या पुस्तकाची सोळावी आवृत्ती २०११ साली प्रसिद्ध झाली होती.

इरावतीबाई या काही रूढार्थाने लोकप्रिय लेखिका नाहीत. मराठी साहित्याच्या इतिहासात कुठल्याही प्रकारे प्रमोट न करता वा एखाद्या विशिष्ट विचारसरणीचे वा प्रचारकी साहित्य नसूनही इतक्या आवृत्त्या प्रसिद्ध होणे बहुतेक दुर्मीळ असावे.

साहित्य अकादमी वा ज्ञानपीठ यांसारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळूनही एखाद्या मराठी पुस्तकास वाचकांची मागणी वाढेलच असे नसते असा कटु अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर इरावतीबाईंच्या एकूण पाच आवृत्त्या निघालेल्या ‘गंगाजल’ या ललित लेखसंग्रहाचे आणि सहा आवृत्त्या निघालेल्या ‘भोवरा’ या तिसऱ्या ललित लेखसंग्रहाचे वेगळेपण उठून दिसते. यामध्ये देशमुख आणि कंपनी या प्रकाशनसंस्थेने दाखवलेली चिकाटी महत्त्वाची असली तरी वाचकांनी या पुस्तकास दिलेली दादही तितकीच महत्त्वाची आहे.

‘परिपूर्ती’ या शीर्षकलेखात इरावतीबाईंनी एक छोटासा प्रसंग रेखाटला आहे. एका शाळेच्या कार्यक्रमास मुख्य पाहुणे म्हणून आलेल्या लेखिकेची ओळख करून दिली जात आहे. या प्रस्तावनेस काही मिनिटे लागतील असा विचार करून लेखिका आपल्या विचारात गढून जाते. मधूनमधून ओळख कुठपर्यंत पोहोचली आहे, याचा अंदाज घेत त्या परत आपल्याच विचारात गढून जातात. ओळख करून देणारी निवेदिका सांगते की, इरावतीबाई अमुकअमूक यांच्या कन्या आहेत, शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सूनबाई आहेत; फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य दिनकर कर्वे यांच्या पत्नी आहेत...

ओळख करून दिली जाताना लेखिका आपल्या मामंजींबद्दल विचार करतात; प्राचार्य असलेल्या आपले पती दिनूविषयी आणि त्यांच्या पती-पत्नींच्या नातेसंबंधाबद्दल विचार करतात.  त्या लिहितात- ‘एकमेकांची मनःस्थिती कळायला बोलायची गरज आहेच कुठे? पाठमोरा असला तरी नाही का मला समजत की, आज काही तरी बिघडले आहे म्हणून?’

इरावतीबाईंची ओळख आटोपल्यानंतर त्या आपले व्याख्यान देतात. मात्र त्यानंतर दिवसभर त्या निवेदिकेने आपली संपूर्ण ओळख करून दिली नाही असे त्यांना राहून राहून वाटते. त्यांच्या मनाची चुटपुट दुसऱ्या दिवशीचीही कायम राहते.

दोन दिवसानंतर त्या घरी जाताना त्यांच्या कानावर पडते-  “ ‘अरे, शू: शू: पाहिलीस का? ती बाई जाते आहे ना, आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का...’ ”

लेखिका म्हणते, ‘...मी थांबले. पण चुटकी वाजवली. त्या दिवशी बाईंनी सांगितलेली ओळख आज पुरी झाली.’ 

मराठी साहित्याचा मी अभ्यासक नाही, तरीही इरावतीबाईंची दिसेल ती पुस्तके मी विकत घेऊन वाचलेली आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात कुतूहल होण्यास दुसरे एक कारण म्हणजे त्यांच्या लहानपणाच्या एक जवळच्या सखी आणि नातलग असलेल्या शकुंतला परांजपे. म्यानमार येथे जन्मलेल्या इरावतीबाईं त्या काळच्या फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल रँग्लर परांजपे यांच्या घरी शंकुतला यांच्याबरोबर राहिल्या. त्या काळच्या घरातल्या गंमतीजमती; वाद आणि थट्टामस्करी त्यांनी ‘दुसरे मामंजी’ या लेखात सांगितल्या आहेत.

शकुंतलाबाई नंतर रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या संततीनियमन प्रचार मोहिमेत सहभागी झाल्या. त्यांना सरकारने ‘पद्मभूषण’ किताबाने १९९० साली सन्मानित केले, तेव्हा ‘इंडियन एक्सप्रेस’साठी त्यांची मुलाखत मी घेतली. तेव्हापासून आम्हा दोघांची गट्टी जमली. शकुंतलाबाई आणि र. धों. कर्वे यांच्या नातलग असलेल्या आणि त्यांच्याविषयी लिहिणाऱ्या इरावतीबाईंबद्दल मला त्यामुळे औत्सुक्य निर्माण झाले होते.

महाराष्ट्रातील अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या पंडिता रमाबाई, दुर्गा भागवत यांच्यासारख्या विदुषींमध्ये इरावतीबाईंचा समावेश होतो. त्यांनी लिहिलेल्या ललितलेखांचे तीन संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. यापैकी ‘परिपूर्ती’ आणि ‘भोवरा’ या लेखसंग्रहाला त्यांच्या हयातीतच वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर ‘गंगाजल’ हा संग्रह त्यांच्या मृत्यूनंतर १९७६ साली प्रसिद्ध झाला.

या तीनही लेखसंग्रहांमध्ये या विदुषीने वेगवेगळे विषय हाताळले आहेत. ‘गंगाजल’ या लेखसंग्रहाला नरहर कुरुंदकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. इरावतीबाईंच्या आधी ललितलेख लिहिणाऱ्या वि. स. खांडेकर, ना. सी फडके, कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत वगैरे साहित्यिकांच्या लिखाणांची चर्चा करून इरावतीबाईंच्या लिखाणाची जातकुळी कशी वेगळी आहे, हे कुरुंदकरांनी स्पष्ट केले आहे.

इरावतीबाई इतर अनेक मराठी साहित्यिकांप्रमाणे मराठी व इतर कुठल्याही भाषेच्या प्राध्यापक नव्हत्या. त्या समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ होत्या. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिकवत असताना आपल्या संशोधनाचा भाग म्हणून त्या जगाच्या कानाकोपऱ्यांत हिंडल्या. त्यामुळे त्यांच्या विचारांचा परीघ खूप विस्तारला आणि याचे प्रतिबिंब त्यांच्या ललित आणि इतर लिखाणात दिसते. या कारणांमुळे त्यांनी विविध विषयांवर लिहिलेले ललितलेख अगदी अभ्यासपूर्ण ठरतात.

उदाहरणार्थ पंढरपूरच्या वारीविषयी लिहिलेला त्यांचा ‘वाटचाल’ हा लेख. या वारीत लेखिका सश्रद्ध मनाने सहभागी झाल्या होत्या. या वाटचालीत आलेले अनुभव वाचकांना अंतर्मुख बनवतात. पंढरीच्या वारीविषयी औत्सुक्य असणाऱ्यांनी दि. बा. मोकाशींनी साठच्या दशकात लिहिलेले ‘पालखी’ हे पुस्तक वाचावे अशी माझी नेहमी शिफारस असते. इरावतीबाईंचा ‘वाटचाल’ हा लेखही त्याच पठडीतला आहे. ‘महार आणि महाराष्ट्र’ हा समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीकोनातून लिहिलेला लेख या समाजघटकाविषयी वेगळीच माहिती सांगून जातो. या लेखाचे शेवटचे वाक्य आहे - ‘जेथपर्यंत महार पोचले तिथपर्यंत महाराष्ट्र!’ 

आपल्या दीर्घ प्रस्तावनेत कुरुंदकरांनी इरावतीबाईंचे व्यक्तिमत्त्व तीन पातळ्यांवर मांडले आहे.

पहिली पातळी - प्रापंचिक गृहिणी,

दुसरी पातळी - समाजशास्त्रज्ञ आणि

तिसरी पातळी - नवनवे अनुभव टिपण्यासाठी उत्सुक असलेले इरावतीबाईंचे संवेदनशील मन.

‘हे तीनपदरी मन इरावतींच्या लिखाणात एका एकसंध व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून अवतीर्ण होते. आणि म्हणून इरावतींचे लिखाण वाचताना पुष्कळदा वाचकाचे मन भारावून जाते,’ असे कुरुंदकरांनी म्हटले आहे.

‘आजोबा’ हा लेखिकेचे सासरे महर्षी कर्वे यांच्यावरचा लेख आणि ‘दुसरे मामंजी’ हे शकुंतला परांजपे यांचे वडील रँग्लर परांजपे यांच्यावरील लेख या तीनपदरी व्यक्तिमत्त्वाचा परिपाक म्हणून वाचता येतील. महर्षी कर्वे यांची साधी जीवनशैली, काटकसरीपणा आणि त्यागी जीवन यावर लिहून झाल्यावर शेवटी लेखिका म्हणते – ‘केवढे माझे भाग्य, की मी अशा माणसाची सून झाले! त्याहीपेक्षा केवढे महत्तर माझे भाग्य, की मी अशा माणसाची बायको झाले नाही!!’

अशी वाक्ये इरावतींच्या लिखाणात अनेकदा सापडतात, त्यातला आशय समजून घेतल्यानंतरही हे लेख पुन्हापुन्हा वाचावेसे वाटतात.

..................................................................................................................................................................

इरावती कर्वे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/client/search/

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......