महाराष्ट्रातील अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या विदुषींमध्ये इरावतीबाईंचा समावेश होतो!
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
कामिल पारखे
  • इरावती कर्वे आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Thu , 28 May 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो इरावती कर्वे परिपूर्ती Paripurti भोवरा Bhovra गंगाजल Gangajal

आम्हाला बहुधा सहाव्या इयत्तेत इरावती कर्वे यांचा धडा होता. ‘परिपूर्ती’ या शीर्षकाच्या त्या धड्याची दोन पाने आणि सुरुवातीला इरावतीबाईंच्या छायाचित्रांसह त्यांची ती छोटीशी माहिती आजही माझ्या नजरेसमोर आहे. त्या कॅन्सरने गेल्या हेसुद्धा त्या परिचयात सांगितले होते. इतका त्या छोट्याशा लेखाने माझ्या मनावर खोल परिणाम केला होता.

काही वर्षांपूर्वी एका पुस्तकाच्या दुकानात ‘परिपूर्ती’ या शीर्षकाचा कर्वे यांचा लेखसंग्रह दिसला अन लगेच विकत घेतला. पुस्तकाच्या जीर्ण पानांच्या आणि विटलेल्या रंगांवरून ते खूप जुने आहे हे दिसतच होते. देशमुख आणि कंपनीच्या १९९० सालच्या दहाव्या पुनर्मुद्रित आवृत्तीच्या त्या १४६ पानी पुस्तकाची किंमत होती २५ रुपये. एका बैठकीत त्या पुस्तकातील अनेक लेख मी अधाशीपणाने वाचले. अलीकडेच या पुस्तकाची नवी आवृत्ती दिसली आणि एक अमूल्य साहित्य ठेवा म्हणून आपल्याकडे दुसरी एक प्रत असावी म्हणून तेही पुस्तक घेतले.

काही दिवसांपूर्वी या पुस्तकाची जुनी प्रत हातात आली तेव्हा सहज म्हणून पुस्तकाची पहिली आवृत्ती आणि नंतरच्या आवृत्त्यांचे प्रकाशन वर्षं यावर नजर टाकली. ‘परिपूर्ती’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९४९ साली प्रसिद्ध झाली आहे आणि लेखिकेच्या हयातीतच म्हणजे १९६९पर्यंत या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघाल्या होत्या. मी नव्याने घेतलेल्या पुस्तकाची सोळावी आवृत्ती २०११ साली प्रसिद्ध झाली होती.

इरावतीबाई या काही रूढार्थाने लोकप्रिय लेखिका नाहीत. मराठी साहित्याच्या इतिहासात कुठल्याही प्रकारे प्रमोट न करता वा एखाद्या विशिष्ट विचारसरणीचे वा प्रचारकी साहित्य नसूनही इतक्या आवृत्त्या प्रसिद्ध होणे बहुतेक दुर्मीळ असावे.

साहित्य अकादमी वा ज्ञानपीठ यांसारखा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळूनही एखाद्या मराठी पुस्तकास वाचकांची मागणी वाढेलच असे नसते असा कटु अनुभव आहे. या पार्श्वभूमीवर इरावतीबाईंच्या एकूण पाच आवृत्त्या निघालेल्या ‘गंगाजल’ या ललित लेखसंग्रहाचे आणि सहा आवृत्त्या निघालेल्या ‘भोवरा’ या तिसऱ्या ललित लेखसंग्रहाचे वेगळेपण उठून दिसते. यामध्ये देशमुख आणि कंपनी या प्रकाशनसंस्थेने दाखवलेली चिकाटी महत्त्वाची असली तरी वाचकांनी या पुस्तकास दिलेली दादही तितकीच महत्त्वाची आहे.

‘परिपूर्ती’ या शीर्षकलेखात इरावतीबाईंनी एक छोटासा प्रसंग रेखाटला आहे. एका शाळेच्या कार्यक्रमास मुख्य पाहुणे म्हणून आलेल्या लेखिकेची ओळख करून दिली जात आहे. या प्रस्तावनेस काही मिनिटे लागतील असा विचार करून लेखिका आपल्या विचारात गढून जाते. मधूनमधून ओळख कुठपर्यंत पोहोचली आहे, याचा अंदाज घेत त्या परत आपल्याच विचारात गढून जातात. ओळख करून देणारी निवेदिका सांगते की, इरावतीबाई अमुकअमूक यांच्या कन्या आहेत, शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सूनबाई आहेत; फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य दिनकर कर्वे यांच्या पत्नी आहेत...

ओळख करून दिली जाताना लेखिका आपल्या मामंजींबद्दल विचार करतात; प्राचार्य असलेल्या आपले पती दिनूविषयी आणि त्यांच्या पती-पत्नींच्या नातेसंबंधाबद्दल विचार करतात.  त्या लिहितात- ‘एकमेकांची मनःस्थिती कळायला बोलायची गरज आहेच कुठे? पाठमोरा असला तरी नाही का मला समजत की, आज काही तरी बिघडले आहे म्हणून?’

इरावतीबाईंची ओळख आटोपल्यानंतर त्या आपले व्याख्यान देतात. मात्र त्यानंतर दिवसभर त्या निवेदिकेने आपली संपूर्ण ओळख करून दिली नाही असे त्यांना राहून राहून वाटते. त्यांच्या मनाची चुटपुट दुसऱ्या दिवशीचीही कायम राहते.

दोन दिवसानंतर त्या घरी जाताना त्यांच्या कानावर पडते-  “ ‘अरे, शू: शू: पाहिलीस का? ती बाई जाते आहे ना, आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का...’ ”

लेखिका म्हणते, ‘...मी थांबले. पण चुटकी वाजवली. त्या दिवशी बाईंनी सांगितलेली ओळख आज पुरी झाली.’ 

मराठी साहित्याचा मी अभ्यासक नाही, तरीही इरावतीबाईंची दिसेल ती पुस्तके मी विकत घेऊन वाचलेली आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात कुतूहल होण्यास दुसरे एक कारण म्हणजे त्यांच्या लहानपणाच्या एक जवळच्या सखी आणि नातलग असलेल्या शकुंतला परांजपे. म्यानमार येथे जन्मलेल्या इरावतीबाईं त्या काळच्या फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल रँग्लर परांजपे यांच्या घरी शंकुतला यांच्याबरोबर राहिल्या. त्या काळच्या घरातल्या गंमतीजमती; वाद आणि थट्टामस्करी त्यांनी ‘दुसरे मामंजी’ या लेखात सांगितल्या आहेत.

शकुंतलाबाई नंतर रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या संततीनियमन प्रचार मोहिमेत सहभागी झाल्या. त्यांना सरकारने ‘पद्मभूषण’ किताबाने १९९० साली सन्मानित केले, तेव्हा ‘इंडियन एक्सप्रेस’साठी त्यांची मुलाखत मी घेतली. तेव्हापासून आम्हा दोघांची गट्टी जमली. शकुंतलाबाई आणि र. धों. कर्वे यांच्या नातलग असलेल्या आणि त्यांच्याविषयी लिहिणाऱ्या इरावतीबाईंबद्दल मला त्यामुळे औत्सुक्य निर्माण झाले होते.

महाराष्ट्रातील अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या पंडिता रमाबाई, दुर्गा भागवत यांच्यासारख्या विदुषींमध्ये इरावतीबाईंचा समावेश होतो. त्यांनी लिहिलेल्या ललितलेखांचे तीन संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. यापैकी ‘परिपूर्ती’ आणि ‘भोवरा’ या लेखसंग्रहाला त्यांच्या हयातीतच वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, तर ‘गंगाजल’ हा संग्रह त्यांच्या मृत्यूनंतर १९७६ साली प्रसिद्ध झाला.

या तीनही लेखसंग्रहांमध्ये या विदुषीने वेगवेगळे विषय हाताळले आहेत. ‘गंगाजल’ या लेखसंग्रहाला नरहर कुरुंदकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. इरावतीबाईंच्या आधी ललितलेख लिहिणाऱ्या वि. स. खांडेकर, ना. सी फडके, कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत वगैरे साहित्यिकांच्या लिखाणांची चर्चा करून इरावतीबाईंच्या लिखाणाची जातकुळी कशी वेगळी आहे, हे कुरुंदकरांनी स्पष्ट केले आहे.

इरावतीबाई इतर अनेक मराठी साहित्यिकांप्रमाणे मराठी व इतर कुठल्याही भाषेच्या प्राध्यापक नव्हत्या. त्या समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ होत्या. पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये शिकवत असताना आपल्या संशोधनाचा भाग म्हणून त्या जगाच्या कानाकोपऱ्यांत हिंडल्या. त्यामुळे त्यांच्या विचारांचा परीघ खूप विस्तारला आणि याचे प्रतिबिंब त्यांच्या ललित आणि इतर लिखाणात दिसते. या कारणांमुळे त्यांनी विविध विषयांवर लिहिलेले ललितलेख अगदी अभ्यासपूर्ण ठरतात.

उदाहरणार्थ पंढरपूरच्या वारीविषयी लिहिलेला त्यांचा ‘वाटचाल’ हा लेख. या वारीत लेखिका सश्रद्ध मनाने सहभागी झाल्या होत्या. या वाटचालीत आलेले अनुभव वाचकांना अंतर्मुख बनवतात. पंढरीच्या वारीविषयी औत्सुक्य असणाऱ्यांनी दि. बा. मोकाशींनी साठच्या दशकात लिहिलेले ‘पालखी’ हे पुस्तक वाचावे अशी माझी नेहमी शिफारस असते. इरावतीबाईंचा ‘वाटचाल’ हा लेखही त्याच पठडीतला आहे. ‘महार आणि महाराष्ट्र’ हा समाजशास्त्रज्ञांच्या दृष्टीकोनातून लिहिलेला लेख या समाजघटकाविषयी वेगळीच माहिती सांगून जातो. या लेखाचे शेवटचे वाक्य आहे - ‘जेथपर्यंत महार पोचले तिथपर्यंत महाराष्ट्र!’ 

आपल्या दीर्घ प्रस्तावनेत कुरुंदकरांनी इरावतीबाईंचे व्यक्तिमत्त्व तीन पातळ्यांवर मांडले आहे.

पहिली पातळी - प्रापंचिक गृहिणी,

दुसरी पातळी - समाजशास्त्रज्ञ आणि

तिसरी पातळी - नवनवे अनुभव टिपण्यासाठी उत्सुक असलेले इरावतीबाईंचे संवेदनशील मन.

‘हे तीनपदरी मन इरावतींच्या लिखाणात एका एकसंध व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून अवतीर्ण होते. आणि म्हणून इरावतींचे लिखाण वाचताना पुष्कळदा वाचकाचे मन भारावून जाते,’ असे कुरुंदकरांनी म्हटले आहे.

‘आजोबा’ हा लेखिकेचे सासरे महर्षी कर्वे यांच्यावरचा लेख आणि ‘दुसरे मामंजी’ हे शकुंतला परांजपे यांचे वडील रँग्लर परांजपे यांच्यावरील लेख या तीनपदरी व्यक्तिमत्त्वाचा परिपाक म्हणून वाचता येतील. महर्षी कर्वे यांची साधी जीवनशैली, काटकसरीपणा आणि त्यागी जीवन यावर लिहून झाल्यावर शेवटी लेखिका म्हणते – ‘केवढे माझे भाग्य, की मी अशा माणसाची सून झाले! त्याहीपेक्षा केवढे महत्तर माझे भाग्य, की मी अशा माणसाची बायको झाले नाही!!’

अशी वाक्ये इरावतींच्या लिखाणात अनेकदा सापडतात, त्यातला आशय समजून घेतल्यानंतरही हे लेख पुन्हापुन्हा वाचावेसे वाटतात.

..................................................................................................................................................................

इरावती कर्वे यांच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/client/search/

..................................................................................................................................................................

लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

camilparkhe@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......