पुलंसंबंधी काही नकारात्मक म्हणणं मोठं कर्मकठीण आहे
ग्रंथनामा - झलक
मेघना भुस्कुटे
  • ‘पुलं - असा असा मी’चे मुखपृष्ठ
  • Fri , 10 January 2020
  • ग्रंथनामा Granthnama झलक पुलं - असा असा मी पु. ल. देशपांडे Purushottam Laxman Deshpande

२०१९ हे पुलंचं जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त साहित्य-संस्कृती मंडळाने ‘पुलं - असा असा मी’ हा गौरवग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे. तो प्राध्यापक व समीक्षक राजशेखर शिंदे यांनी संपादित केला आहे. तब्बल सव्वापाचशे पानांच्या या गौरवग्रंथात जवळपास ६० लेख आणि दोन परिशिष्टे आहेत. यात दिनकर गांगल, हर्षवर्धन निमखेडकर, मंगला गोडबोले, स. गं. मालशे, मेघना पेठे, मुकेश माचकर, विजय भटकर, उमा कुलकर्णी, राम गबाले, अरुणा ढेरे, सुधीर गाडगीळ, सतीश जकातदार, शांता शेळके, सुशील धसकटे, अशा मान्यवर लेखकांचे लेख आहेत. हा त्यातील एक लेख संपादित स्वरूपात...

.............................................................................................................................................

पुलंसंबंधी काही नकारात्मक म्हणणं मोठं कर्मकठीण आहे.

एकतर माणूस अतिशय म्हणजे अतिशयच चांगला कलावंत - किंवा स्वतः पुलंच्या शब्दांत म्हणायचं, तर खेळिया. अनेक क्षेत्रांत केलेला संचार. भाषेवरची जबरदस्त हुकूमत. लोकांना मोहवून टाकणारं बहुविध साहित्य. मी स्वतःच पुलंच्या साहित्याची इतकी पारायणं केलेली आहेत, की आता नव्यानं वाचायला घेतलं इतक्या वर्षांनी, तर पुढची ओळ आपसूक आठवते. बरं, माणूस नुसताच कलावंत म्हणून चांगला नाही, तर माणूस म्हणूनही जिंदादिल आणि उमदा. दातृत्व? पुष्कळ. उत्तम वेव्हारे जोडून उदास विचारे वेचलेलं धन. सरकारी ठोकशाहीविरुद्ध उभं ठाकण्याचं कर्तृत्व? दोनदा दाखवलेलं- एक : आणीबाणीच्या कालखंडात प्रचारसभांमध्ये भाग घेऊन; दोन : ‘लोकशाही हवी आहे, ठोकशाही नको’ असं महाराष्ट्रभूषण या सरकारी पुरस्काराचा स्वीकार करताना सरकारला खडसावून. माणसात मिसळून माणसांवर प्रेम करण्याची अफाट ताकद. पत्नीनं मतभेद आणि नाराजी व्यक्त केली; उमदेपणानं नम्र स्वीकार. मुख्य धारेतली लोकप्रियता लाभली, तिचा वापर करून दलित साहित्याचं जाहीर कौतुक. कोणत्या आधारावर या माणसाचं उणं काढणार? जागाच नाही. त्यांच्या जन्मशताब्दीवर्षात - त्यांना जाऊन जवळजवळ एकोणवीस वर्षं उलटून गेली, मधल्या वर्षांत काळानं कूस पालटली, जग कधी नव्हे इतकं जवळ आलं नि आमूलाग्र बदललं, तरीही या माणसाची लोकप्रियता अबाधित. पुस्तकं आपली खपतातच आहेत.

सगळं दृष्ट लागावं असंच तर आहे.

तरीही अलीकडेच एका गोतावळ्यात वय वर्षं वीसहून लहान असलेल्या एका मुलाकडून पुलंच्या साहित्यातली उद्धृतं सतत ऐकण्याचा योग आला आणि चक्रावायला झालं. पुलंच्या मृत्युवर्षाच्या आसपास जन्माला आलेला हा मुलगा. त्याची भाषा मराठी आहे खरी. पण त्याखेरीज पुलंच्यात आणि त्याच्यात कोणताही समान दुवा नाही. थिसियसच्या जहाजाचं उदाहरण खरं मानायचं, तर मधल्या काळात भाषेच्याही पेशी आमूलाग्र बदलून गेलेल्या. जरी भाषेचं नाव मराठी असंच असलं, तरीही तिची चौकट, ठेवण, वापर सगळंच आरपार बदललेलं. पुलंनी ज्या मध्यमवर्गीय माणसाचं आत्मचरित्र निरनिराळ्या प्रकारे हयातभर रेखाटलं, त्याच्या आयुष्याशी या मुलाच्या आयुष्याचा काय संबंध आहे? चाळ, कचेर्‍या, गजरा-नाटक-शालू-शेले-व्याख्यानं या सांस्कृतिक बाबींशी असलेले लागेबांधे, पोस्ट आणि तत्सम संस्था... सगळं अंतर्धान पावलं आहे वा हळूहळू अंतर्धान पावत चाललं आहे.

मग हा मुलगा पुलंचे त्याच्या आयुष्याशी असंबद्ध असलेले उतारे हे असे वेळावेळी फेकतो आहे, आळवतो आहे, त्यांचा आनंद लुटतो आहे-ते नक्की कशातून? आणि ते इतकं अस्थानी-कुरूप आणि कोड्यात टाकणारं का वाटतं आहे मला? या प्रश्नांच्या उत्तरासाठी पुन्हा पुलं वाचायला घेतलं. आश्चर्य म्हणजे, त्यांचं काहीच मनास येईना. ते कमालीचे कालबाह्य वाटायला लागले. त्यांच्या साहित्याचा सांधा ‘आज’शी जुळतोसं वाटेना. लिंगभावाबद्दल कमालीचा असंवेदनशील, असंतुलित असलेला त्यांचा विनोद खुपायला लागला. लोकांना काय वाटतं आहे याचा कानोसा घेण्यासाठी तसं म्हणायचा प्रयत्न केला; मात्र - लोक अंगावर धावून यायला लागले आणि मी हबकले. पुलंवर प्रेम तर मीही भरभरून केलं आहे, करते. तरीही त्यांच्या साहित्याची अशी चिकित्सा करणं म्हणजे घरावर दगड मारून घ्यायला आमंत्रण देण्यापैकीच असणार आहे, हे नीट लक्षात आलं. मुळात पुलंच्या साहित्याबद्दल प्रश्नचिन्हांसकट काहीतरी म्हणायला लागला, की लगेच तुमच्या हेतूबद्दल शंका घेतली जाणार, अशा प्रकारची आणि अशा प्रमाणातली पुलंची लोकप्रियता - किंवा खरंतर त्यांच्याबद्दलची भक्ती - दिसायला लागली.

मग ही चिकित्सा करून बघणं जास्त-जास्तच महत्त्वाचं वाटायला लागलं.

 

पुलंनी कुणाबद्दल लिहिलं?

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातला मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुष पुलंच्या साहित्याच्या केंद्रस्थानी होता. ‘असा मी असामी’ किंवा ‘बटाट्याची चाळ’ या कथनात्मक काल्पनिक लेखनात तर तो उघडपणे आहेच. पण वेळोवळी लिहिल्या गेलेल्या त्यांच्या इतर लेखांमध्ये व्यक्तिचित्रांमागच्या लेखकाच्या आवाजामध्ये प्रवासवर्णनांमधला ‘मी’ म्हणून शहरी मध्यमवर्गीय पुरुषाचा स्वर ऐकू येतो. ‘मी अंतर्बाह्य शहरी प्राणी आहे’ हे खुद्द पुलंचंच विधान आहे. ज्या मंडळींची मतं मराठी साहित्यात अनुकरणीय गणली जातात, पीअर प्रेशरसारखं काम करतात, अशी मंडळीही कायम बहुतेकरून शहरी आणि उच्चवर्णीय होती; त्यामुळे पुलंच्या लोकप्रियतेचं अनुकरण पुढे निमशहरींतून आणि गावांतून झालेलं असणं शक्य आहे. मात्र पुलंचं साहित्यविश्व शहरी लोकांपुरतं मर्यादित होतं, इतकं तरी म्हणणं भाग आहे.

सहस्रकानं कूस बदलण्याच्या सुमारास या शहरी मध्यमवर्गीय जगाचं चित्र बदलायला लागलं. चाळी जाऊन हाऊसिंग सोसायट्या आवतरल्या. कोकण रेल्वेनं लालडब्याला स्पर्धेतून भिरकावून दिलं. चारचाकी गाडी, फोन आणि एसी या एके काळी अप्रूपाच्या आणि अपूर्वाईच्या असलेल्या, श्रीमंत समजल्या जाणार्‍या वस्तू सहजी कुणापाशीही दिसू लागली. कारकुनांनी कात टाकली. सरकारी कचेर्‍यांमधला मराठी मध्यमवर्ग वेगानं आयटीत मजुरी करण्याकडे सरकू लागला. परदेशवार्‍या सहजसाध्य झाल्या. स्मार्टफोन्स आणि इंटरनेट रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाले. मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुषाचं सगळं भवताल आणि परिणामतः तो स्वतःही आधीचा उरला नाही.

भवतालातल्या या बदलांमुळे मला पुलंचं साहित्य कालबाह्य वाटू लागलं का?

मनाशी आलं खरं. पण हे उत्तर फारच ढोबळ ठरलं असतं. साहित्यिक आपल्या साहित्यातून कोणता काळ रंगवतो, या गोष्टीवरून त्याचं कालसुसंगत असणं का ठरावं? पेशवेकालीन व्यक्तिरेखांवर आज श्रीमंत गोपिकाबाईची बखर लिहिणारे आनंद विनायक जातेगावकर म्हणा किंवा भविष्यकालीन समाजाचं काल्पनिक चित्र उद्यातून रेखाटणारे नंदा खरे म्हणा - एक जण वरकरणी भूतकाळाबद्दल लिहितो आहे, या कारणामुळे तो कालबाह्य ठरणार नाही आणि एक जण वरकरणी भविष्यकाळाबद्दल लिहितो आहे, हे त्याच्या भविष्यवेधी असण्याचं कारण नव्हे. आजच्या काहीशी त्यांचे लेखन सुसंगत असण्याची वा नसण्याची कारणं निराळी असतील. फक्त मजकुरातला काळ न पाहता, त्या काळाबद्दल, त्या काळाच्या वर्तमानाशी असलेल्या नात्याबद्दल, कारण-परिणामांबद्दल लेखक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काय म्हणतो आहे, त्यावरून तो कालसुसंगत आहे की नाही हे ठरते. थोडक्यात, लेखकाला त्याला हवा तो काळ निवडण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य असतं. तो काही त्याच्या कालसुसंगत असण्याचा निकष नव्हे.

या निकषाचा साहित्याचा भाग असलेल्या अनेक गोष्ट आजच्या वाचकांनी पाहिलेल्या-अनुभवलेल्या नाहीत, हे तरीही उरतंच. बटाट्याच्या चाळीतला रामा गडी, व्यक्ती आणि वल्लीमधल्या नंदा प्रधानच्या इंदूचा थेरडा, परदेशी जाण्यासाठी करण्याचा बोटीतला प्रवास... अशी अनेक उदाहरणं देता येतील. फार लांब कशाला जा, गेल्या पंधराएक वर्षांत लाल डब्ब्याला पाय न लावलेली कितीक तरुण शहरी माणसं सापडतील. तरी ज्यांनी आयुष्यात एकदा तरी एसटीचा प्रवास केला आहे, त्यांना ‘म्हैस’मधले कितीतरी संदर्भ अनाकलनीय ठरतील. त्या अर्थी पुलंच्या साहित्याच्या कालबाह्यतेला हळूहळू का होईना, सुरुवात झाली आहे. ‘माझे पौष्टिक जीवन’मधला ‘कि-हिं-क-ह-व-ह-डि-ही’ असं ठणकावणारा बावज्या बोहोरीकर मी कधीही पाहिलेला नाही. तसाच ‘जलशृंखला योग’ हे नाव कुठून आलं आहे, हे जाणण्यासाठी सामायिक संडास, त्यांच्या दुरुस्तीची घरमालकावर असलेली जबाबदारी आणि त्यातून तयार होणारी विवक्षित परिस्थिती हे सगळं चाळीत राहून अनुभवलेलं नाही. ‘घरमालकांस मानपत्र’मधला विनोद माझ्यापर्यंत पोचणं कठीणच आहे. माझ्या आकलनात काहीतरी कमतरता राहून जाणार. मानवी प्रवृत्ती अमर असल्यामुळे, कल्पनेचं आयुध वापरून आणि पुलंच्या चित्रदर्शी-जिंवत भाषेचा आधार घेत मी अनेक गोष्टींचा आनंद तरीही लुटू शकले. इक्ष्वाकू कुळातल्या राजकुमारांची वर्णनं काय किंवा ‘निमकराच्या खानावळीतील डुकराची भजी’ ही निर्बुद्ध भाषांतराची उडवलेली रेवडी काय, पुलंचं काही लेखन अजुनी सदाबहार आहे. पण तरीही - सत्तर सालात पुलंच्या लेखनाना वाचकानं दिलेली दाद आणि आज मी देत असलेली दाद, यात फरक पडला आहे, हे मान्य करावच लागेल.

साहित्याच्या आस्वादाकरता प्रत्यक्ष अनुभवाची काय गरज, असं एक प्रतिपादन केलं जातं. उदाहरणार्थ, काही प्रकारच्या साहित्यात काल्पनिक विश्‍व चितारलेलं असतं. जे. के. रोलिंगचं हॅरी पॉटरविश्व हे याचं अत्यंत चपखल उदाहारण. जादू, जादूच्या छड्या, मंत्र, चेटक्यांची शाळा... हे सगळे कल्पनेतले घटक हॅरी पॉटरच्या जगाचा अविभाज्य आणि अनिवार्य भाग आहेत, पण ते वास्तवात अस्तित्वात नाहीत. तरीही सर्व वयाच्या, अनेक भाष्यांच्या, अनेक देशांमधल्या वाचकांना हॅरी पॉटरची ओढ वाटते. ‘हॅरी पॉटर’ हे अभिजात साहित्यात मोडत नसेल, तर ऑन्त्वान् द सान्तेक्झ्युपेरीच्या ‘द लिटिल प्रिन्स’चं उदाहरण देता येईल. तीन ज्वालामुखी असलेला लिटिल प्रिन्सचा छोटुकला ग्रह वास्तवात अस्तित्वात नाही. तरीही लिटिल प्रिन्स कित्येक वर्ष जगभरातल्या वाचकांना भुरळ घालतो आहे. ही सरळ सरळ फॅन्टसीची उदाहरणं. त्याहून थोडं वेगळं उदाहरण घ्यायचं, तर श्री. ना. पेंडशांच्या ‘तुंबाडचे खोत’चं. त्यामधील तुंबाड कल्पनेतलं आहे. ते पेंडशांच्या अंतःचक्षूंखेरीज इतर कुणीही पाहिलेलं असणं शक्य नाही. तरीही वाचकांच्या नजरेला ते कल्पनेनं पाहता येतं. जयंत पवारांच्या ‘कोन नाय कोनचा वरणभात लोन्चा’ या कथासंग्रहातल्या सगळ्याच कथांमध्ये अद्भुत अतिवास्तवाचा एक धागा आहे. त्यामुळे त्या कथा कमी परिणामकारक ठरतात का? तर नाहीच. हे प्रतिपादन मान्यच आहे.

इथे आपल्याला पुलंची लेखक म्हणून असलेली जातकुळी नीट तपासून पाहण्याची गरज आहे.

लेखक नक्की काय आणि कसं सांगू पाहतो आहे, याचा विचार करून त्यांची ढोबळ वर्गवारी करू गेलं असता त्यांचे तीन प्रकार दिसतात. काल्पनिक गोष्ट सांगणारे - अर्थात फिक्शन लिहिणारे - लेखक. एखाद्या बाबीचा चहूअंगांनी विचार करून तिची खोलवर छाननी करणारे लेखक. सद्य:कालीन परिस्थितीचं वर्णन करून त्यावर आपली मल्लिनाथी वा शेरा नोंदवणारे लेखक. तिन्ही भाग तसे पाणबंद नव्हेत, हे उघडच आहे. पुलं यांपैकी कोणत्या भागात बसतात ते आपण ढोबळ मानानं बघू.

पुलं काही गोष्ट सांगणारे साहित्यिक नव्हेत. त्यांनी थेट कथा वा कादंबर्‍या लिहिलेल्या नाहीत. त्यांची नाटकंही बहुतांश वेळा कोणत्या ना कोणत्या परकीय नाटकाचं रूपांतर अशाच स्वरूपाची आहेत हे लक्षात घेण्यासारखं आहे. मुख्य आहेत ती प्रवासवर्णनं, वास्तव आयुष्यातली वा काल्पनिक व्यक्तिचित्रं, निरनिराळ्या लेखांतून मध्यमवर्गीय आयुष्याचं नाना प्रकारे केलेलं वर्णन, त्याबद्दलचे खास त्यांचे असे शेरे. या सगळ्या साहित्यात स्वतंत्रपणे गोष्ट रचण्याची ऊर्मी दिसत नाही. दिसते ती एक प्रकारची कॉमेंटरी. समालोचन. लालित्यपूर्ण आणि रंजक, पण समालोचन. त्या समालोचनात लेखकाला दिसणार्‍या चित्राचं हुबेहूब वर्णन आहे आणि समालोचकाचा विशिष्ट नजरियाही आहे. तो विलक्षण लोभस आहे यात वादच नाही. पण तो काही रचलेली कथा नव्हे. लेखक आणि वाचक ज्या एका सामाजिक परिस्थितीचा भाग आहेत, त्या परिस्थितीतल्या एका विवक्षित जागेवरून दिसणार्‍या एका मर्यादित तुकड्याचं रंजक, लालित्यपूर्ण वर्णन आणि त्याबद्दलचे शेरे आहेत. ते समालोचन आहे, त्यामुळे लेखक आणि वाचक दोघेही एकाच काळात वावरत आहेत हे गृहीतकही आहे.

पुलं विचारवंत-लेखकही नव्हेत. त्यांच्या काही पुस्तकांतून काही विशिष्ट विधानं केली जात असतात. विषयाच्या अनुषंगानं काही विचार मांडले जात असतात. ते विचार काही प्रमाणात कालातीतही असतात. त्यात अनेकदा चिंतनशील भाग येतो. पण नरहर कुरुंदकरांसारच्या लेखकाशी पुलंशी तुलना केली, की पुलंची निराळी जातकुळी लख्ख दिसायला लागते. एखादा प्रश्न वा एखादी साहित्यकृती वा एखादी परिस्थिती समग्रपणे न्याहाळून तिच्या निरनिराळ्या बाजूंची छाननी करणं, प्रश्न विचारणं, काही एका निष्कर्षावर पोचणं, निष्कर्षाचं समर्थन करणं वा तो विश्लेषणासकट खोडून काढणं आणि पर्यायी उत्तर मांडणं... असं पुलंनी कधीही केलेलं दिसत नाही, तो त्यांचा पिंडच नाही. त्यांना बहुतेकदा आपल्या नायकाची- पक्षी - स्वतःची - आजूबाजूच्या परिस्थितीनं उडवलेली त्रेधातिरपीट दाखवून मनसोक्त हसायचं असतं. ललित समालोचन असं याचं वर्णन करता येईल. अलीकडे स्टँडप कॉमेडी करणारे अनेक लोक या प्रकारचा आणि अशाच विषयांचा अवलंब करताना दिसतात. पुलंही त्यांच्या मंत्रमुग्ध करणार्‍या आणि वैविध्यपूर्ण एकपात्री प्रयोगांसाठी प्रसिद्ध होते, हा काही योगायोग नाही. आजही ‘त्यांचं लिखाण वाचायला कंटाळा येतो, पण ऐकायला मजा येते’ अशी कबुली देणारे अनेक जण सापडतात. पुलं स्वतःला लेखक म्हणवत नसत, परफॉर्मर उर्फ खेळिया म्हणवत असत, याची नोंद करून आपण पुढे जाऊ.

तर-असा लालित्यपूर्ण रंजनात्मक वर्णन करणारा समालोचक समकालीन असणं कळीचं नसतं का? माझ्या मते, असतं. तो त्याच्या लेखनाच्या परिणामकारकतेचा एक महत्त्वाचा भाग असतो.

थोडा विचार करून पाहा, आज पुलंच्या किती व्यक्तिरेखा आपल्याला येता-जाता भेटतात? ‘मॅन/वुमन नेक्सट डोअर’ म्हणाव्यात अशा असतात? आयटीत काम करणार्‍या कॉर्पोरेट मजुराचं आणि पुलंच्या कोचरेकर मास्तरांचं विश्‍व किती वेगळं आहे! घरा-कुटुंबाबतची कर्तव्यं, करियरमध्ये यशस्वी होण्याची निकड आणि मुक्त स्त्री असण्याचं पिअर प्रेशर- ही सगळी दडपणं वागवणार्‍या आजच्या बाईचं आणि ‘त्या चौकोनी कुटुंबा’तल्या गृहिणीचं काय नातं आहे? ‘असा मी असामी’तले धोंडोपंत जोशी चाळीतून ब्लॉकमध्ये गेले आणि त्यांच्या ठरीव आयुष्यात एकाएकी नवनवीत पर्यायांची गर्दी उडाली. हीच पर्यायांची भाऊगर्दी धोंडोपंतांच्या उत्तरायुष्याहून कितीतरी पटींनी वाढलेली आहे. धोंडोपंत चाळीतून ब्लॉकमध्ये गेल्यानंतर काहीसे भांबावलेले होते. आज धोंडोपंतांचा नातू आपल्याला भेटला, तर तो बहुतेक मुंबईत राहत नसेलच. तो अमेरिकेत असेल, गेला बाजार बंगळुरात तरी नक्कीच. त्याच्या समोर बहुधा ऐन विशीतच मिडलाईफ क्रायसिस आ वासून उभा असेल. धोंडोपंतांचं तर सोडाच, धोंडोपंतांची विकेट उडवणार्‍या शंकर्‍याही त्याच्यासमोर हतबुद्ध होत असेल. हे निव्वळ ब्लॉकच्या जागी अमेरिका, हिंदी सिनेमाच्या जागी इंग्रजी सिनेमा, कॅक्टसच्या जागी शेअर्ड गार्डनिंग, सरोज खरेच्या जागी आंतरराष्ट्रीय इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक... इतकं एकास एक असलेलं हे रूपांतर नाही. भौमितिक वेगानं वाढत गेलेल्या ओळखी आणि निवडीत पर्याय. मुलांच्या शिक्षणाचं माध्यम, शालेय शिक्षणापासून ते त्यांच्या संभाव्य करिअरनिवडीपर्यंत करण्याच्या आर्थिक तरतुदी, लैंगिक छळ छावण्यांचे अनंत आणि सक्तीचे पर्याय, आपल्या मुलांच्या लैंगिक कलांविषयीचे सावध आणि खुले पवित्रे, धार्मिक आणि जातीय ओळखींशी जुळवून घेण्याचे वांशिक आणि राष्ट्रीय ओळखींचे सांधे... या सगळ्या पर्यायांशी आट्यापाट्या खेळताना शंकर्‍याच्या मुलाचीच विकेट उडत असणार, असं मानायला जागा आहे. धोंडोपंतांना जन्माला घालणारे पुलं यांच्यामधलं नातं आज किती जवळचं-किती दूरचं आहे? त्या दोघांच्यात कमालीचं अंतर पडलं आहे इतकं तरी आपल्याला कबूल करावंच लागेल.

 

पुलंबद्दलच्या प्रेमादरातून बाहेर पडल्यानंतर मला खुपायला लागलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पुलंच्या साहित्यातलं बायांचं चित्रण. पुलंचा नायक का-य-म एक मराठी शहरी मध्यमवर्गीय पुरुष असतो. नुसतं तितकंच नव्हे. बटाट्याच्या चाळीत किंवा खरंतर पुलंच्या कोणत्याही ओरिजनल साहित्यात - भेटणार्‍या स्त्रिया मुद्दामहून निरखण्यासारख्या आहेत. अनेकदा त्यांचा आवाज थेट ऐकू न येता मुख्य कथानकाच्या पार्श्‍वभूमीला येत असतो. जर कधी आवाज मोठ्यांदा आलाच, तर तो विनोदाचा विषय असतो. त्यांच्या अनेक लेखांमध्ये येणारं धर्मपत्नीचं पात्र हे नवर्‍याला गप्प करणारं, व्यावहारिक शहाणपणाची मात्रा अधिक असणारं, आपलं ते खरं करणारं असं किंवा मग चक्क बावळट, चेष्टेचा विषय असणारं असतं आणि पुलंचा नायक हे सोशीकपणे, काहीशा विनोदी धाटणीनं स्वीकारून पुढे जात असतो. ‘अतिविशाल महिला मंडळ’बद्दलच्या त्यांच्या विनोदावर टीका झालेली मी ऐकली होती. पण कधी इतकी मनावर घेतली नव्हती. पुढे सुनीताबाईंचा थांब लागला. पुलंच्या साहित्यानं भारून जाण्याचा काळ उलटून गेला. अघळपघळमधली अभया थोपटे वाचताना माझ्या भिवया वर गेल्या. ‘अभयाच्या भाषेला पुरुषी घाट आहे’पासून ते ‘बाई मर्द आहे’पर्यंत सगळेच शेरे मला लाल रंगात दिसायला लागले. तरुण मुलींना साहित्यात-अभ्यासात-राजकारणात मत असलं, तर त्या पुरुषी असतात नाहीतर मग नुसत्याच सुंदर नि माठ तरी असतात, या स्टिरिओटाईपनं लक्ष वेधून घेतलं. पुलंच्या लेखनातल्या यच्चयावत मध्यमवयीन स्त्रियाही स्वैपाकघराची वेस न ओलांडणार्‍या नि ओलांडल्यास विनोदाचं कारण ठरणार्‍या तरी होत्या, नाहीतर बेगडी समाजकार्य करणार्‍या आणि आकारानं विशाल असलेल्या तरी. मुख्याध्यापिका म्हणून सरोज खरे आली खरी, पण ती लिपस्टिक सांभाळण्यासाठी ओठाला ओठ न लावता बोलणारी. नाही म्हणायला त्यांच्या सुंदर मी होणारमधल्या दीदीराजे आणि बेबीराजे या पात्रांचा अपवाद करता येईल. पण ते नाटक स्वतंत्र नव्हे. ब्राउनिंग पती-पत्नींच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यामुळे त्या व्यक्तिरेखांचं संपूर्ण श्रेय पुलंचं नव्हे. तसंच ती फुलराणीतल्या मंजुळाचंही नव्हेच. तुझे आहे तुजपाशीमधल्या गीता आणि उषा या पात्रांचा मात्र खरोखरच अपवाद. आपणच निवडलेल्या सर्वोदयी आदर्शवादामधल्या त्रुटी दिसायला लागल्यावर उषानं निर्भयपणे पाऊल तिच्या स्वतंत्र बुद्धीबद्दल आदर वाटायला लावतं. तसंच गीताचंही. ती तर लहानपणापासून याच आदर्शवादाच्या आधारानं जगलेली मुलगी. तिला त्यापलीकडे कुठलीही जीवनशैली माहीत नाही. तरीही त्यातली मुस्कटदाबी तिला जाणल्यावाचून राहत नाही. तरीही आचार्यांची भावनिक जपणूक आपण केली पाहिजे, ही कृतज्ञतेपाटी घेतलेली जबाबदारी ती टाकूनही देत नाही. हे अपवाद खरेच. पण या अपवादांखेरीज इतर वेळी, जेव्हा पुलंच्या लिखाणात स्त्रीव्यक्तिरेखा असतात, तेव्हा-तेव्हा पुलंनी त्यांना दिलेली वागणूक भिवया उंचावायला लावणारी असते. अजूनही अनेकांना ती मुद्दाम लक्षात आणून दिल्याखेरीज जाणवत नाही, हा वाचकांच्या न बदललेल्या मानसिक घडणीचा पुरावा आहे, पुलंच्या आधुनिकतेचा नाही. पुलंचं हे पुरुषप्रधान समाजाचा प्रतिनिधी असल्यासारखं, त्या व्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा प्रश्‍न न करता, कधी बोलून, तर कधी न बोलता खतपाणी घालत लिहीत जाणं, मला नंतरनंतर अधिकाधिक खटकत गेलं. त्याबद्दल निषेधाचा शब्द उच्चारणं तर सोडाच, पण असल्या विनोदाला न हसल्यामुळेही ‘बाई स्त्रीवादी दिसतेय’ हे कुत्सितपणे उच्चारलेलं वा अनुच्चारित वाक्य ऐकावं लागतं, असा माझा आज-आत्ताचाही अनुभव आहे. खुद्द पुलंच्या काळात अशा प्रकारचा निषेध झाला नाही, याचं आश्‍चर्य वाटत नाही ते म्हणूनच. असा विनोद हा संस्कृतीनं स्वीकारून टाकलेला भागच असावा. पुलंनी त्याविरुद्ध कधीही शब्द तर उच्चारला नाहीच, पण आपल्या लेखनातून असा विनोद अगदी सहजमान्य असल्यागत वापरला, त्याचं उदात्तीकरणही केलं, असं आता लक्षात येतं.

व्यक्ती आणि वल्लीमध्ये एकही स्त्री नाही. लेखकाला आपल्या एका आयुष्यात सगळंच्या सगळं जग कवेत घेता येणं अशक्य आहे, हे मान्य केलं, तरीही व्यक्ती आणि वल्लीचा स्त्रीपात्रविरहितपणा चकित करतो. माणसांना निरखण्यात आनंद मानणार्‍या पुलंना बाई असलेली एकही वल्ली भेटू नये, हा पुलंच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या मुशीत घडलेल्या नजरेचा दोष, की वल्लीपणाची मिजास आणि बाईपण एकत्र नांदूच न देणार्‍या संस्कृतीचा, हे कळेनासं होतं.

हे वास्तविक आपल्याला शिंगं फुटल्यावर आपल्याच एखाद्या प्रेमळ आजोबांवर चिडण्यासारखं आहे, कबूल आहे. तरीही माझं वैतागणं रास्त नाही, असं मात्र मला म्हणवत नाही. असो.

तर माझ्यासारख्या आणि माझ्याहून वयानं लहान असलेल्या अनेक जणांमध्ये अजूनही पुलंची लोकप्रियता इतकी अफाट आणि इतकी तीव्र कशी?

या प्रश्‍नाला तीन बाजू आहेत.

एक तर पुलंचा समर्थ उत्तराधिकारी ठरेल असा लेखक आपल्याकडे नाही. बहुतांश लेखकांचे कुणी ना कुणी वारसदार असतात. लोकप्रियतेत, भूमिकांत, भाषाप्रभुत्वात थोडाफार फरक अर्थातच असतो; पण परंपरेच्या साखळीमधला हा पुढचा दुवा, असं म्हणण्याइतकं साम्यही असतं. स्त्रीवादी लेखिकांमध्ये जशी विभावरी शिरूरकर-गौरी देशपांडे-मेघना पेठे-कविता महाजन अशी एक ढोबळ साखळी दिसते नि थोड्याफार मतभेदांसकट मान्यही असते, त्या प्रकारे पुलंनंतर कोण? या प्रश्‍नाचं काही उत्तर मिळत नाही. त्यांच्या शैलीची छाप अनेकांवर पडलेली दिसते. पण ते काही पुलंचे वारसदार नव्हेत. पुलंचा वारसा पेलणं अतिशय कठीण आहे. संगीतापासून नाटकापर्यंत आणि चित्रपटांपासून टीव्हीपर्यंत चौफेर आणि लीलया संचार असणार्‍या आहे. त्यामुळेच निरागस, सुलभीकरण करणारं, शहरी, उच्चवर्णीय आणि मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याचं दर्जेदार आणि लोभस चित्रण हवं असल्यास, पुलंना पर्याय नाही.

इथे दोन नावांची आठवण निघणं अपरिहार्य आहे. आचार्य अत्रे हे त्यातलं पहिलं नाव. अत्र्यांनाही महाराष्ट्रात कमालीची लोकप्रियता लाभली. त्यांच्या सर्वार्थानं प्रचंड असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणी अजूनही काढल्या जातात. पण विनोदाचा आणि विविधक्षेत्रसंचाराचा समान धागा असला, तरी अत्रे आणि पुलं यांच्यात जातकुळीचा मोठाच फारक होता. पत्रकारिता आणि राजकारण यांच्या मुशीतला अत्र्यांचा विनोद अनेकदा बीभत्स पातळी गाठत असे. आपल्या जबरदस्त व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर त्यांनी ते लांच्छन लीलया पेलून नेलं असावं. पुलं त्या बाबतीत अत्यंत सोज्ज्वळ, घरगुती ऊबदारपणा जपून असलेले, मध्यमवर्गीय पापभीरूपणाला जवळीचे वाटणारे. दुसरं नाव चिं. वि. जोशी यांचं. त्यांच्या चिमणराव-गुंड्याभाऊ या जोडीवर मराठी माणसांनी अतिशय प्रेम केलं. या प्रेमाला खरा बहर आला, तो चिंविंच्या लेखनकाळात नव्हे, तर दूरदर्शनवरची चिमणराव-गुंड्याभाऊ मालिका प्रदर्शित झाल्यानंतर. चिंविंना त्यांच्या हयातीत पुलंसारखी भरभरून लोकप्रियता लाभली नाही. खरंतर त्यांचा विनोद अधिक रेखीव आणि जिवंत व्यक्तिरेखाटन करणारा, संवादी, पुलंच्या शब्दप्रधान विनोदाहून अगदी वेगळी अशी घटनाप्रधान नि काहीशी फार्सिकल शैली असलेला, कथनात्मक होता. चिंविंची चिमणराव मालिका जणू टीव्हीसाठी लिहिल्यासारखीच होती आणि दिलीप प्रभावळकरांच्या चिमणरावानं तिला पुरेपूर न्यायही दिला. पुलंच्या निबंधवजा घाटात लिहिलेल्या वल्लींवर वा बटाट्याच्या चाळवर कथाप्रधान टीव्ही मालिका झाली नाही. पुलंच्या स्वतःच्या जबरदस्त सादरीकरणाच्या छायेतून त्या कलाकृती कधीही बाहेर पडल्या नाहीत. हे जसं त्याचं कारण आहे, तसाच त्या कलाकृतींचा ललितनिबंधवजा घाटही त्याला कारणीभूत आहे, चिंविंचं लेखन मात्र दृश्यमाध्यमाला पूरक असं होतं. पण एकूण साक्षरतेचं वाढत जाणारं प्रमाण, मध्यमवर्गाच्या नि टीव्हीच्या उदयाचा-बहराचा काळ आणि चिंविंचा लेखनकाळ यांची वेळ जुळून आली नाही, हे खरं. शिवाय ही दोन्ही नावं पुलंच्या पूर्वसुरींची. पुलंच्या नंतर ही चौकट व्यापणारं आणि चौकट अद्ययावत करत जाणारं, एकही मोठं, लक्षणीय नाव आठवत नाही. पण त्यामागच्या कारणात शिरायचं झालं तर नव्या लेखाची सुरुवात करावी लागेल. कारणं काही का असेनात; सोपं आकर्षक आणि मध्यमवर्गीयांना चुचकारणारं लेखन करणारे पुलं हाच एक पर्याय वाचकांपाशी उरल्याचा भास तयार झाला खरा.

दुसरी बाजू बघायची, तर थोडं खोलात शिरावं लागतं. कालचा मध्यमवर्ग- आज खरंतर मध्यमवर्ग उरलेलाच नाही. क्रयशक्तीचे निकर्ष लावायचे झाले, तर त्याला उच्चमध्यमवर्गीय असं म्हणणं हेसुद्धा मध्यमवर्गीय या संज्ञेची कमालीची ओढाताण करण्यासारखंच आहे. मध्यमवर्ग या संज्ञेत बसणार्‍या समाजाचाही पोत बदललेला आहे. त्यातली निमशहरी लोकांची संख्या वाढत गेली आहे. जातीय टक्केवारी बदलली आहे. खेरीज या नवमध्यमवर्गापुढची निर्णयाची आणि प्रलोभनांची निव्वळ संख्या, त्यातून उद्भवत गेलेली ओढाताण नि व्याकूळता, आणि जगण्यातला एकूणच गोंधळ... हे सगळं कित्येक पटींनी वाढलेलं आहे. अशा वेळी एक मनोरंजक, आकलनाला सोपा आणि अनेकांच्या आवडीनिवडींचा लसावि असू शकेल. असा लेखक म्हणून पुलं हा जणू आदर्श साचाच आहे. ‘तुका म्हणे त्यातल्या त्यात’प्रकारे भाषेमुळे जवळचं आणि आकर्षक वाटणारं गोंजारणारं, हसवणारं पुलंचं लेखन आवडणे-ऐकणे-वाचणे-त्याबद्दल बोलणे प्रतिष्ठेचं आहे. त्यात सवयीतून आलेला सोपेपणा आहे, परंपरांचा सुखासीन पिंजरा न सोडता मिळणारी करमणूक आहे, आणि त्या खेरीज आयता मिळणारा सुसंस्कृतपणाचा शिक्का आहे. कोणत्याही प्रकारची कष्ट नाहीत, प्रश्‍न नाहीत, पेच नाहीत.

पुलं कधीच अस्वस्थ करणारे प्रश्‍न विचारणारे लेखक नव्हते. बटाट्याची चाळ, हसवणूक, व्यक्ती आणि वल्ली ही त्यांची सर्वाधिक लोकप्रिय पुस्तकं पाहिली, तर स्मरणरंजन आणि एका विशिष्ट प्रकारच्या समाजघडीबद्दलचा जिव्हाळा त्यात उघड उघड दिसतो. त्यातला विनोद अतिशय सूक्ष्म निरीक्षण मांडणारा, भेदक आणि रंजक आहे, यात प्रश्‍नच नाही. पण ही पुस्तकं वाचकाला अस्वस्थ करण्यापेक्षाही स्वस्थ करण्याकडेच अधिक लक्ष्य देतात. पुढे-पुढे पुलंनी लिहिलेल्या ‘वंगचित्रे’सारख्या पुस्तकांतून त्यांचा सूर प्रगल्भ होत गेलेली जाणवतो. निरीक्षणातून विनोदनिर्मिती न होता प्रश्‍न पडताना दिसतात. भाषा ही विनोदाचं शस्त्र न घेता चिंतनशीलता लेऊन येते आणि तरीही आपलं जिवंत प्रवाहीपण कदापि सोडत नाही. पण ‘वंगचित्रे’हे काही पुलंच्या लेखक म्हणून ऐन बहराच्या काळातलं पुस्तकं नाही. तसंच ‘हसवणूक’कार पुलंवर लोकांनी जितकं प्रेम केलं, तितकं प्रेम ‘वंगचित्रे’कार पुलंवर केलं नाही. ऐन बहरातल्या पुलंमधल्या लेखकानं अतिशय लोभसवाण्या प्रकारे मध्यमवर्गीय माणसाचा अपराधभाव दूर केला, त्याच्या गोंधळाला हतबलतेतून येणार्‍या विनोदाची ढाल पुरवली. नंतरच्या लेखनातलं त्यांचं चिंतन मात्र लोकांपर्यंत तितकंसं पोचलंच नाही. एक शून्य मी, मुक्काम शांतिनिकेतन हीदेखील बोलकी उदाहरणं आहेत. त्यांच्या सगळ्या कारकिर्दीत हा विरोधाभास दिसतो. आपल्या निर्मितीतून मिळवलेली श्रीमंती समाजाला परत देऊन टाकणं (बाबा आमट्यांच्या ‘आनंदवना’शी असलेले ॠणानुबंध), दलित साहित्याचं भरभरून जाहीर कौतुक करणं (‘बलुतं’चं केलेलं कौतुक), पत्नीच्या जाहीर नाराजीचा अतिशय उमदेपणानं स्वीकार करणं (‘आहे मनोहर तरी’बद्दलची संयत, उमदी प्रतिक्रिया), साहित्यातल्या नव्या प्रवाहांचं मनापासून स्वागत आणि प्रसार करणं (बा. सी. मर्ढेकरांच्या कवितांवरचा कार्यक्रम) हे एका बाजूला. तर दुसर्‍या बाजूला उच्चवर्णीय, शहरी, मध्यमवर्गीय, पुरुषी मानसिकता बाळगणार्‍या संस्कृतीचे साचे कदापि न सोडणं (त्यांच्या लिहिण्यातून कायम दिसणारं स्मरणरंजन आणि परंपरेबद्दलचं प्रेम), नवचित्रकला-नवनाट्य यांसारख्या गोष्टींची यथेच्छ टर उडवणं (असा मी असामीतला नानू सरंजामे किंवा खुरच्या), राजकारणासारख्या तथाकथित गलिच्छ स्पर्धेपासून कटाक्षानं दूर राहणं (आणीबाणी-नंतरच्या निवडणुकीत प्रचाराला उतरून नंतर मात्र राजकारणातून माघार घेणं). या दोन्ही बाजूंमध्ये एक मूलभूत विसंगती होती. पण यांपैकी दुसरी बाजूच प्रचंड लोकप्रिय ठरली. तिची छाया पुलंच्या प्रतिमेवरून कधीही दूर झाली नाही. ही पुलंची मर्यादा आहे की लोकांचा दोष? की दोन्हीचं दुर्दैवी रसायन?

तिसरं असं, की पुलंच्या या अफाट लोकप्रियतेपूर्वी मध्यमवर्गीयपणा ही काहीशा संकोचाची गोष्ट होती. हातात फारसा पैसा नसल्यामुळे काटकसर हा जीवनावश्यक गुण होता. गुन्हेगारी विश्‍वापासून लांब राहण्याची पापभीरू शिकवण असे, ती बहुतांशी सुरक्षिततेच्या गरजेतून. श्रीमंतीबद्दल आकर्षण होतं, पण आपल्याकरता ती नाही अशी एक समजूत होती. अंथरूण बघून पाय पसरण्यात आत्मसंतुष्टता होती. पण या सगळ्या गुणांमागे निदान सर्वसामान्यांमध्ये तरी काही वैचारिक बैठक नसे. जगण्याकरता आवश्यक असे हे गुण होते, पण त्याबद्दल संकोचही होता. पुलंनी या गुणांची यथेच्छ टिंगल उडवली. सकाळच्या वरणाला संध्याकाळी फोडणी देणं आणि रात्रीचा भात सकाळी फोडणीचा भात म्हणून खाणं (तुझे आहे तुजपाशी), सेकंड क्लासातून प्रवास करताना बुशकोट घालणं आणि बुशकोटाच्या आतल्या गंजीफ्रॉकला मात्र भोकं पडलेली असणं (सवणूक), बच्चूच्या उद्योगाचे तपशील आईला कळले, तर आईची बोबडी वळली असती असा उल्लेख (व्यक्ती आणि वल्ली), आपल्या सीमित चौकटीत विलक्षण खूश असणार्‍या चौकोनी कुटुंबाची रेवडी उडवणं (व्यक्ती आणि वल्ली)... अशी अनेक उदाहरणं देता येतील. या टिंगलीला मराठी लोक सरावले, संकोच कमी होऊन थोडे मोकळे झाले. या टवाळीखेरीस मध्यमवर्गीय मराठी गुणांचं पुलंनी मुक्त हस्ते कौतुकही केलं. शास्त्रीय गाण्याच्या बैठकींना पुण्यातल्या गल्लीबोळांतून उसळणारी तोबा गर्दी (गुण गाईन आवडी), आपल्या चौकटीपल्याडच्या जगाविषयीचं काहीसं भितरं कुतूहल (नंदा प्रधानच्या आयुष्याबद्दलचे लेखकाचे शेरे, व्यक्ती आणि वल्ली), पापभीरू आणि भाविक धार्मिकता (व्यक्ती आणि वल्ली मधली अंतू बर्व्याने दिलेली अंगार्‍याची पुडी किंवा संस्कृती म्हणजे असते तरी काय, या प्रश्‍नाबद्दलचं पूर्वरंग मधलं चिंतन), सर्वसंगपरित्यागाबद्दलचा प्रश्‍नातीत आदर (विनोबा किंवा बाबा आमटे यांची व्यक्तिचित्रं)... इत्यादी उदाहरणं पाहण्यासारखी आहेत. त्याच्या जोडीला ‘माझे खाद्यजीवन’ या लेखातल्यासारखे ऐंद्रियसुखाचे संदर्भ असलेलं, वैचारिक गुंतणूक अजिबात न मागणारं, पण विलक्षण श्रीमंत भाषेची कळा लेऊन आलेलं लेखन. हळूहळू मध्यमवर्गीय-पणातल्या या बर्‍यावाईट सवयींच्या गाठोड्याचं एक सेलिब्रेशन व्हायला लागलं.

याला पुलंनी प्रतिष्ठा दिली, की लोकांना या प्रकारचं लेखन मानवू लागल्यामुळे पुलं अधिकाधिक लोकप्रिय होत गेले, की या दोन्ही गोष्टी परस्परपूरक ठरल्या? कारण-परिणाम नात शोधण्याचा खटाटोप न करता असं म्हणता येईल, की पुलंचं लेखन-सादरीकरण आणि त्याला मराठी मध्यमवर्गीय वाचकांनी दिलेली दिलखुलास दाद या दोन्ही गोष्टी काळाच्या त्या टप्प्यावर एका नैसर्गिक उत्स्फूर्तपणे घडल्या. असं दुसर्‍या कोणत्याही लेखका-खेळियाच्या बाबतीत घडलं नाही, घडू शकलं नाही. त्यात पुलंची थोरवी आहे की अचूक टायमिंगचा महिमा हे गुलदस्त्यात. पुलं लोकप्रिय झाले आणि मध्यमवर्गीय जाणिवांनाही त्यांनी आपल्या लोकप्रियतेचा स्पर्श घडवला, इतक खरं. कर्तव्यभावना हे मूल्य मागे पडून जगण्यातला आनंद लुटणं मराठी मध्यमवर्गीय जगण्याच्या केंद्रस्थानी आलं, त्याला कारणीभूत पुलं असतील असं नव्हे, पण पुलंच्या लिहिण्याचं निमित्त मात्र नक्की होतं.

 

आज जगण्यातले गोंधळ वाढलेले असतानाही लोकांना पुलंच्या विनोदाचा तोच जुना, आयता साचा विरंगुळ्यासाठी हवाहवासा वाटतो. तसं नसतं, तर पुलंना आपल्या जातकुळीचा वाटणारा पी. जी. वुडहाऊस त्याच्या स्वतःच्या मायदेशात केव्हाच जुना आणि वंदनीय होऊन बसलेला असताना, आपल्याकडे पुलंचं इतकं कौतुक अजूनही का असावं? नि त्याचा दोष पुलंना देणं कितपत बरोबर? निरानिराळ्या प्रकारच्या अस्मितांचे गोंधळ माजलेले असताना आणि नव्या नीतिमूल्यांच्या निकषांवर जुने नायक अपुरे-बुटके ठरत असतानाही बहुतांश लोकांना वाचा-बघायला मात्र रमा-माधवांचं प्रेम, सतीचं उदात्तीकरण, राजपूत स्त्रियांचा जोहार... हेच आवडतं. त्याचाच हाही एक भाग नव्हे का? पण म्हणून लेखकाच्या या रूपाबद्दल, त्याच्या लेखनातल्या या विधानाबद्दल चर्चा करायचीच नाही? अशी चिकित्सा करू पाहणं हा वाचक म्हणून थेट आपला कृतघ्नपणा किंवा अकलेची दिवाळखोरीच?

कठीण आहे...

काहीही असलं, तरी पुलंबद्दलच्या या अतिरेकी कौतुकामुळे सर्वसामान्य मराठी वाचकाचं नुकसानच झालं. ‘मी आणि माझ्या शत्रुपक्ष’मध्ये नायकाच्या खांद्यावर पडलेल्या शिमिटाच्या गिलाव्याच्या लपक्याला ‘नवचित्रकला’ असं सबोधणार्‍या पुलंचा आदर्श मानून आजही अनेक जण ‘ते अ‍ॅबस्ट्रॅक्ट वगैरे आपल्याला नाही बा कळत’ असं आनंदानं आणि अभिमानानं सांगतात. हे स्वतःलाच एका विशिष्ट प्रकारच्या अभिरुचीच्या कुंपणात बंदिस्त करून घेणंच होतं. पुलंच्या राक्षसी लोकप्रियतेनं त्याला प्रतिष्ठाही बहाल केली. पुलंपेक्षा निराळ्या जातकुळीचा, धारदार आणि वाचकाकडे डोकं चालवण्याची मागणी करणारा विनोद इथे कधी रुजला नाही. स्मरणरंजनात्मक उमाळे काढणार्‍रांची आणि पुलंच्या शैलीच्या बर्‍यावाईट नकला करणार्‍यांची संख्या तेवढी फोफावून बसली. ‘पुलं म्हंजे काय, प्रश्‍नच नाही!’ किंवा ‘आम्हाला तुमच्यासारचे नाही ते प्रश्‍न पडत नाहीत. आमच्या देवानं लिहून ठेवलंय, ते आम्ही वाचतो, सुखानं झोपतो.’ किंवा ‘पुलंना प्रश्‍न विचारता? तुमची काय लिहायची लायकी आहे हो?’ असे प्रश्‍न विचारत आणि वर्षांमागून वर्षं त्याच त्या पिढीजात विनोदांवर इमानेइतबारे हसत लोक महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची कौतुकं करत राहिले.

पुलं असताना हे होणं एक वेळ समजण्यासारखं आहे. पण आता पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलेलं असताना पुलंचीच वाक्यं सटासट फेकणार्‍या त्या मुलाला ‘तू ही जुनी-अपुरी पासोडी घेऊन किती काळ बसणार आहेस बाबा!’, असा प्रश्‍न मी विचारायला हवा होता का? की काळच ते काम करेल?

.............................................................................................................................................

‘मुक्त शब्द’च्या २०१८च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेल्या लेखाची ही सुधारित आवृत्ती आहे. 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......