लेखक लिहीत राहतो. म्हणजे लिहिण्याचा व्यायाम. सृजनाचा व्यायाम
ग्रंथनामा - आगामी
डॉ. सुधीर रा. देवरे
  • ‘टिंबं’
  • Sat , 30 November 2019
  • ग्रंथनामा Granthnama आगामी टिंबं सुधीर देवरे

डॉ. सुधीर रा. देवरे यांची ‘टिंबं’ ही नवी कादंबरी लवकरच गोव्याच्या ‘सहित’ प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या कादंबरीचा काही अंश...

.............................................................................................................................................

सिनियर लेखकाशी ज्युनियरचं प्रत्यक्ष वा फोनवर बोलणं होत राहतं. प्रत्येक वेळी जशी मागची उजळणी होते तसे बोलण्यात नवे मुद्देही येत राहतात.

परवा सिनियर बोलता बोलता ज्युनियरला म्हणाले, ‘व्यायाम करतोस ना रोज?’

‘होय करतोय ना. जोरात चालण्याचा व्यायाम करतो. सूर्य नमस्कार नाही करत आता. झेपत नाही. शीर्षासन करायचो पण आता वय आणि वजन वाढल्यामुळे तेही नाही करत.’ असं म्हणून ज्युनियरने सिनियरला बोलायला स्पेस दिली.

स्पेस मिळताच सिनियर बोलू लागले, ‘बरोबर,  आता या वयात नाही करू शीर्षासन. मानेला त्रास होतो. एक कल्पना डोक्यात येऊन गेली परवा : जे अवयव हलवता येत नाहीत त्यांचा व्यायाम कसा करायचा. उदाहरणार्थ, काही अवयव सांगतो तुला. मुत्रपिंडाचा व्यायाम करता येईल का? कसा करायचा? माणसाला कान हलवता येत नाहीत. छोटे असतात ना म्हणून. बाकी प्राणी त्यांचे कान फडफडवतात. म्हणजे व्यायामच करतात ना कानांचा. माणसाला कानांचा व्यायाम कसा करतात, हे शोधून काढावं लागेल. कपाळाचा व्यायाम कोणालाच करता येत नाही. प्राण्यांनाही नाही. नाकाचा व्यायाम कसा करायचा. हृदय-काळीज, यकृत यांचा व्यायाम कसा करायचा? ज्या अर्थी आपण डोळ्यांचा व्यायाम करतो त्या अर्थी कपाळ, हृदय, यकृत, कान, नाक यांचा व्यायाम का करू नये? एका लेखकाने ‘यकृत’, ‘हृदय’ नावाची नाटके लिहिलीत हे माहिती आहे ना तुला?’

‘हो. श्याम मनोहर’ ज्युनियर म्हणाला.

‘बरोबर’

‘आतड्यांचा व्यायाम आपोआप होत असावा. जिभेचा व्यायाम आपोआप होतोय. दातांचा व्यायाम आपोआप होतो. नाकाचा आणि कानांचा आपोआप होतो की नाही मला माहीत नाही.’

‘कठीण आहे सगळं. खूप सुचतंय सर तुम्हाला’

‘हो, आणि हे कुठं द्यायचा प्रयत्न करू नकोस तू. फेसबुक, व्हॉटसअॅपबिटसअॅपवर देऊ नकोस. माझ्या नावासहीत द्यायचं झालं तरी देऊ नकोस. अशीच एकाशी फोनवर चर्चा केली आणि त्याने फेसबुकवर पोस्ट करून दिली. माझ्या नावानिशी. दिली तर दिली पोस्ट. माझी काही वाक्यं त्याच्या नावावर खपवून टाकली त्याने.’ सिनियर श्वास घेण्यासाठी थांबले. म्हणून ज्युनियर म्हणाला,

‘तुम्ही जे काही बोलतात ना वाचकांशी ते तुमच्या कादंबरीत येत असतं पुढं-मागं, हे मला माहीत आहे. म्हणून मी ते इतरत्र कुठं देत नाही आणि खाजगीतही सांगत नाही मित्रांना.’

‘हो मला माहीत आहे ते. विश्वास आहे तुझ्यावर. तू नाही देणार हे कुठं. हं, तर आपण काय बोलत होतो. व्यायामाविषयी. व्यायाम हा सर्वव्यापी आहे. शरीराच्या आतल्या आणि बाहेरच्या अवयवांच्या व्यायामाविषयी आपण बोलत होतो ना?’

‘हो सर’

सिनियर तंद्री लावत म्हणाले, ‘मेंदू आणि प्रतिभा हे काय आहे? मेंदू नावाचा आपल्या डोक्यात एक अवयव आहेच. पण प्रतिभा कुठं आहे? प्रतिभा हा अवयव नाही. मग लेखकात ती येते कुठून? मेंदूचा व्यायाम शक्य आहे. अनेक नवनवीन शोध हे मेंदूच्या व्यायामामुळेच शक्य झालेत असं म्हणता येईल. आणि कलांचा उद्‍गम हा प्रतिभेमुळे झाला. पण प्रतिभा कुठं आहे?’

सिनियर बोलायचे थांबले म्हणून ज्युनियर म्हणाला, ‘खूप गहन होत चाललंय सर.’

सिनियर सावकाश चिंतनात हरवून बोलू लागले, ‘हो. गहन आहेच रे हे सगळं. खूप खोल जावं लागतं. प्रतिभा हृदयात असते असं म्हणतात. आपणही गृहीत धरू तसं. गायक गाण्याचा रियाझ करतो. म्हणजे गाण्याचा व्यायामच ना. चित्रकार चित्रं काढण्याची सवय ठेवतो. म्हणजे चित्र काढण्याचा व्यायाम. लेखक लिहीत राहतो. म्हणजे लिहिण्याचा व्यायाम. आपण लेखक आहोत म्हणून लेखकावर फोकस करू. लेखक इतके श्रम करून लिहितो, त्या लिखाणाचं नेमकं काय होतं? कुठंतरी छापून येतं. नंतर त्याचं पुस्तक होतं. पण ते पुस्तक सर्वदूर पोचावं यासाठी आपण, प्रकाशक वा साहित्य रसिक काही खास प्रयत्न करतो का? लेखक जे लिहितो ते मर्यादित रसिकापर्यंतच पोचतं. आपल्या भाषेच्या लोकांपर्यंत पुस्तक सर्वदूर जाऊन धडकत नाही. एखाद्या घरी पोचतं, पण त्या घरातले सगळे लोक तरी ते पुस्तक वाचतात का? एखाद्या ग्रंथालयात पोचतं आणि तिथंच पडून राहतं ना नुसतं? सर्क्युलेट होत नाही. तुझं मी वाचायचं आणि माझं तू. हे साटंलोटंच झालं ना कॉलेजात एकमेकांना भाषणाला बोलवल्यासारखं.’

सिनियरला रिलिफ मिळावा म्हणून ज्युनियर मध्येच म्हणाला, ‘साहित्य वाचन चळवळ जोरात राबवायला हवी. मागे मी सांस्कृतिक दुष्काळाची डायरी लिहिली होती पहा. यावर भर द्यायला हवा.’

धागा पकडत सिनियर पुढे म्हणाले, ‘तसंच असं नाही, तेही बरोबर आहेच  परंतु जे लिहिलं जातं.. लिहून झालं आहे… छापून झालं आहे.. वितरीत झालं आहे... त्याची लागण का होत नाही दूर दूर पर्यंत? ते वादळासारखं पसरलं पाहिजे वेगानं, इतकं की एकानं वाचलं की त्याने दहा जणांना सांगून त्या दहा जणांनी झपाटून वाचलं पाहिजे. आणि त्यापुढे प्रत्येकाचे पुन्हा दहा दहा. दहाच का? दहाचे शंभर, शंभराचे हजार अशा रीतीने ...पुस्तकाची लागण झाली पाहिजे साथीच्या आजारासारखी. वाईट गोष्टी कशा स्प्रेड होतात सोशल नेटवर्कवरून तसं पुस्तकांचं झालं पाहिजे...’

सिनियर श्वासासाठी थांबताच ज्युनियर म्हणाला,

“तसं होतंही. पण ते लोकप्रिय साहित्याबद्दल होतं. अभिजात साहित्याबद्दल असं होत नाही. बाबा कदम जितके वाचले जातील तितके श्याम मनोहर वाचले जात नाहीत. गुलशन नंदा जितके वाचले जातात, तितके भालचंद्र नेमाडे वाचले जात नाहीत. दुसरा मुद्दा आजचे अनेक चांगले लेखक वाचकांना माहीत नाहीत. अजूनही अनेक वाचक ‘ययाती’, ‘मृत्यूंजय’, ‘स्वामी’ या पुस्तकांनाच मानदंड मानतात. काही लोक तर न वाचताच ही पुस्तकं वाचल्याची नावं सांगत राहतात.’

सिनियर नाहीतली मान हलवत म्हणाले, ‘तुझा हा मुद्दा मला तितकासा पटला नाही. कारण की, ‘ज्ञानेश्वरी’ कशी वाचली जाते अजूनही घराघरात? ‘तुकारामांची गाथा’ वाचली जाते ना अजून घराघरात? यावरही बोललं पाहिजे.’

ज्युनियरचे उत्तर तयार होते, ‘हो, सांगतो ना. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा घराघरात आजही वाचली जाते. पण त्याच्यातले काव्य वा तत्त्वज्ञान भिडतं म्हणून ती वाचली जात नाहीत. म्हणजे तत्त्वज्ञान वा काव्यानंदासाठी ती वाचली जात नाहीत. धार्मिक ग्रंथ म्हणून केवळ श्रद्धेने ती वाचली जातात हे खरं कारण. जर या ग्रंथांत अध्यात्म नसतं वा त्यांचे कर्ते संत नसते तर हे साहित्यही दुर्लक्षित झालं असतं इतर अभिजात साहित्याप्रमाणे.’

सिनियर कबूल करत म्हणाले, ‘तुझ्या म्हणण्यात तथ्य आहेच. नाही असं नाही. पण मला दुसरी शंका येते’

‘कोणती?’

‘अजून तशी लिखित कलाकृतीच निर्माण झाली नसेल कदाचित? आपल्या प्रतिभेची निर्मितीच कमी पडते की काय. लेखकाला लिहायच्या मर्यादा पडत असाव्यात? सृजनाचाही व्यायाम असायला हवा, तो कमी पडतो की काय, अशी शंका आहेच.’ प्रश्न उपस्थित करून सिनियर थांबले. 

विचारांची लिंक लावत ज्युनियर म्हणाला, ‘सृजनाचा व्यायाम असतोच. पण हे सुद्धा पूर्ण सत्य नाही. विलास सारंग, जी. ए. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे... ह्यांची निर्मिती कमी पडते असं म्हणणं धारिष्ट्याचं ठरेल. त्यांना मर्यादा आहेत असंही नाही. इतकं अभिजात लेखन येऊनही अनेक वाचकांना ते ऐकूनही माहीत नसेल तर आपण उपस्थित केलेला मुद्दा बरोबर नाही असं मला वाटतं, तेव्हा…’ ज्युनियरने आपले म्हणणे अर्ध्यावर सोडून दिलं. यावर सिनियर काही बोलत नाहीत म्हणून ज्युनियर मनात म्हणाला,

‘वाचन ही जीवनावश्यक गरज नाही असं म्हणता येईल...’

.............................................................................................................................................

लेखक डॉ. सुधीर रा. देवरे भाषा, कला, लोकवाड्‍मय, लोकसंस्कृती आणि लोकजीवनाचे संशोधक आहेत.

sudhirdeore29@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......